Ti Chan Aatmbhan - 10 books and stories free download online pdf in Marathi

ती चं आत्मभान .. 10

१०. झरोक्यातला एक कवडसा..

श्रुती कुलकर्णी.

‘आई मी निघतीय ग आज माझा पदवीदान समारंभ आहे. फायनली मला सुवर्णपदक मिळाल ग’. आर्याचा हा उत्साहाने भरलेला आवाज ऐकून मालतीताई ना खूप बर वाटल. आर्या लवकर ये ग! मी वाट पाहीन येताना पेढे सुद्धा घेऊन ये. पण मालतीताईचा आवाज आर्यापर्यंत पोहचायच्या आत आर्याच्या स्कुटीचा आवाज दूर दूर जात राहिला.

ही आर्या तर तुफान मेल एक्स्प्रेस आहे. दम म्हणून नाही. दिसायला सुंदर नाही पण दुसऱ्याच मन पटकन मोहणारी. गहूवर्णी चेहरा, धारदार नाक, उंचीला बेताचीच पण स्वप्नाळू डोळे आणि सदा उत्साही चेहरा म्हणजे आर्या. त्याउलट मालतीताईची ओळख एक शांत, सोशिक आणि स्वाभिमानी गृहिणी अशी होती. जिद्दीने संसार करणाऱ्या मालतीताई आजूबाजूच्या शेजाऱ्यामध्ये प्रेमळ काकू म्हणून प्रसिद्ध होत्या. आज मात्र त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता होती. आर्या नावाच्या सुरवंटाचे फुलपाखरू इतक्या सहजपणे झालेलं नाही. तलावाच्या तळाचा गाळ जसा ढवळून निघतो तसा त्यांच्या मनातला वाईट आठवणीचा गाळ ढवळून निघाला होता. १० वर्ष झाली ह्या गोष्टीला. दिवस किती लवकर संपतात नाही.

आज ही तो दिवस त्यांना लख्ख आठवत होता. आर्या नेहमीप्रमाणे शाळेला गेली होती. साधारणपणे १२ वाजता एका अनोळखी नंबरवरून एक फोन आला. मालती कोल्हापुरे आहेत का? मी स्प्रिंग स्कूल मधून बबन बोलतोय. तुमची आर्या फिट येऊन पडली आहे. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन जात आहोत तरी तुम्ही धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोहचा. मालतीताईच्या पायाखालची जमीन सरकली होती. सकाळी ठीक असणाऱ्या आर्याला नक्की काय झाल?

त्या धावत घराबाहेर पडल्या. कुणाला फोन करायचे ही सुचले नाही. तडक त्यांनी रिक्षा पकडली आणि धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये पोहचल्या. चौकशी रूम मध्ये चौकशी करून त्या भरभर दुसऱ्या मजल्यावरच्या जिन्यावरून २०६ खोलीकडे निघाल्या. हॉस्पिटलला लिफ्ट आहे ह्याचे देखील त्यांना भान राहिले नाही. त्यांना फक्त आर्याला पाहण्याची ओढ लागली होती.

खोलीत पोहचल्यावर त्यांनी बेडकडे पहिले तिथे आर्या पांढऱ्याफटक व मलूल चेहऱ्याने निपचित पडून होती. तिच्याकडे पाहिल्यावर मालतीबाईना भोवळ आली. हे वाईट स्वप्न तर नाही ना? त्या स्वतःला समजावत धीर गोळा करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात केशवराव कोठून तिथे पोहचले कुणास ठाऊक? त्यांनी एकंदरीत परिस्थिती पाहून नेहमीप्रमाणे आकांडतांडव केला आणि तणतणत बाहेर कुठे तरी निघून गेले. कस?, कुठे?, का? ह्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. आर्या बेशुद्ध असल्याने शाळेच्या स्टाफ पैकी एकाने हकीकत सांगण्यास सुरवात केली. सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली आणि पहिला तास सुरु झाल्यावर थोड्याच वेळात आर्या अस्वस्थ झाली आणि आचके देऊन खाली पडली. शेजारच्या मुलीने जोरात ओरडल्यावर तास थांबवण्यात आला आणि तिच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला गेला पण काही हालचाल दिसेना म्हणून शेवटी तिला दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला गेला.

कशामुळे? कोणामुळे? अचानक का? कुठल्याच प्रश्नाच समर्पक उत्तर मिळत नव्हत. आता जोपर्यंत आर्या शुद्धीवर येणार नव्हती तोपर्यंत खर कळण्याचा कोणता ही मार्ग उरला नव्हता. डॉक्टरांशी बोलून बघाव म्हणून मालतीताई डॉ. जाधवांशी बोलायला गेल्या. डॉ. डी. एम. जाधव (M.S.) न्युरॉलॉजिस्ट ही पाटी वाचतच त्या केबिनमध्ये शिरल्या. डॉ. दुसऱ्या सहयोगी डॉक्टराना काही सूचना देत होते. डॉ. आत येऊ का? डॉ.नी मान वरून पाहिले.

प्रश्नार्थक चेहऱ्याने पहिले असता त्या म्हणाल्या मी रूम न. २०६ मधील पेशंट आर्या कोल्हापुरेची आई! ओके, ओके या या बसा. मालतीताई डॉ. कडे पाहू लागल्या. डोळ्यावर सोनेरी कड्याचा चष्मा, साधाच पण स्वच्छ असा शर्ट, हातात कोणते तरी साध्याच कंपनीचे घड्याळ. मजबूत पण साजेशी तब्बेत. वय असाव साधारणपणे ४२-४५च्या आसपास पण चेहऱ्यावर योग्याला शोभतील असे शांत आणि निर्मोही भाव. शांत भाव, स्नेहार्द नजर आणि मृदू आवाज ही डॉ. ची बलस्थाने म्हणावी लागतील. त्या ताणतणावाच्या मूडमध्ये ही मालतीताईना डॉ. कडे बघून आतून शांत वाटले. हा माणूस इथे केबिन मध्ये आजूबाजूला इतक्या वेदना आणि दुखण्यात एवढा निर्मोही कसा राहू शकत असेल? असे एकदा मालतीताईना वाटून गेल.

काय झालय नक्की आर्याला? मालतीताईनी विचारलं. हममम अशी सुरवात करून डॉ. तेवढ्याच मृदू आवाजात म्हणाले की आम्ही मेंदूच MRI केलंय आता बघू काय निदान होतंय ते? सध्याच्या तिच्या परिस्थितीकडे पाहून कोणताच अंदाज येत नाही. तो पर्यंत वाट पहावी लागेल.

तिचे वडील कोठे आहेत? परगावी असतात का? डॉ. जाधवांनी प्रश्न विचारला. मालतीताई नेहमीप्रमाणे आवंढा गिळला. कारण ह्या प्रश्नांची त्यांना प्रतीक्षा होती. केशवराव आणि मालतीताई असे एक जोडपे की जे त्यांची समांतर आयुष्य जगात होते. अधिकृतरित्या जरी त्यांचा घटस्फोट झाला नव्हता पण ते एकत्र रहात नव्हते. इतर होणाऱ्या घटस्फोटाप्रमाणे केशवराव बदफैली वगैरे नव्हते पण रूढी, परंपरा ह्या वातावरणात वाढल्याने ते कमालीचे दुराग्रही झाले होते. पुरुष प्रधान संस्कृतीचे पुरस्कर्ते होते त्यामुळे महिलांना कमी लेखणे, त्यांचा सतत अपमान करणे हे त्यांच्या अंगवळणीच पडून गेल होते. मालतीताई मात्र स्वतंत्र्य विचारसरणी आणि चौकटीबाहेर पडून काम करणाऱ्या होत्या. त्यामुळे केशवरावांच वागण त्यांना अजिबात पटत नव्हते पण समजूतदार पणे जगण हे त्यांच्या आयुष्याचा भाग होता किती ही जुळवून घेतलं तरी केशवराव तक्रार करत राहायचे. शेवटी एक दिवस संतापाचा कडेलोट झाला आणि केशवरावानी मालतीताईवर हात उचलला. त्या दिवशी मालतीताईनी केशवरावांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ५ वर्षाच्या आर्याला घेऊन ते घर सोडले. स्वाभिमानी स्वभाव असल्याने माहेरी न जाता त्या २-३ दिवस जवळच्या मैत्रिणीकडे राहिल्या आणि नंतर एक छोट घर घेऊन त्या राहू लागल्या. खर तर पहिल्या पहिल्यांदा त्यांना केशवराव परत माफी मागायला येतील असे वाटले होते पण ते पुन्हा परत कधीच आले नाहीत. तस पहिलं आर्थिक अडचणी होत्या पण जिद्द असल्याने त्यांनी पहिल्यांदा छोटया मोठ्या नोकऱ्या करत एका स्वयंसेवी संस्थेमध्ये महिला सबलीकरणाचे काम पहायला सुरवात केली. मिसेस कोल्हापुरे! कुठ हरवलात डॉ. च्या आवाजाने मालतीताई भानावर आल्या.

ते आर्याचे वडील म्हणजे ते ते....आहेत येतील थोड्या वेळात असे म्हणून त्यांनी विषय टाळला पण चाणाक्ष डॉ. च्या मालतीताई काहीतरी लपवतात हे लक्षात आले. बर मी तुम्हाला नंतर बोलवतो असे म्हणून त्यांना अप्रत्यक्षपणे जायला सांगितले.

संध्याकाळी MRI चे रिपोर्ट आले. डॉ.नी मालतीताईना बोलावले. हे बघा मिसेस कोल्हापुरे सगळे रिपोर्ट आले आहेत पण मोठा असा कोणता दोष सापडत नाही आणि हे कशामुळे झाले ह्याच निदान होत नाही. माझ्या माहितीनुसार ह्याच्या मागे कोणत तरी मानसिक कारण असाव! पण मानसिक कारण कितीपत खोल आहे ह्याचा अंदाज मला लावता येण कठीण आहे तुम्ही कोणत्या तरी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बर होईल. एवढ्यात एक नर्स धावत डॉ. च्या केबिनमध्ये शिरली आणि डॉ. २०६ रूम च्या पेशंटला शुद्ध आली आहे.

डॉ. आणि मालतीताई लगबगीने उठून आर्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले. मालतीताई मनातल्या मनात देवाचा धावा करत होत्या. देवा आर्या ठीक असू दे. तीच एकमेव जगण्याचा आधार आहे. तिला काय होऊन देऊ नको. पण मालतीताईना तेव्हा हे माहित नव्हत की ही झालेली घटना एक चुणूक होती अजून बरच काही घडायचं बाकी होत.

रूममध्ये पोहच असतानाच आर्याचा स्फुंदून रडणारा आवाज कानावर पडला. आई, आई मला नीट दिसत नाही आणि मला उठता ही येत नाही. अरे देवा? हे काय बोलतीय ही. हिला एवढा कोणता धक्का बसलाय? मालतीताईला तिला उठवण्यासाठी पुढे झाल्या आणि तिला समजवण्यासाठी अग अशक्तपणामुळे होत असेल काळजी नको करू असे म्हणत राहिल्या पण आर्याचे रडणे चालूच राहिले.

आज १ महिना होत आला पण आर्याच्या तब्बेतीत फारसा फरक नव्हता आणि ठोस असे कोणते निदान ही लागत नव्हते. १-२ मानसोपचार तज्ञही येऊन पाहून गेले. ते ही फारसे काय करू शकले नाहीत. फक्त त्यांच्या उपचारामुळे ती अडखळत चालू लागली होती पण तिच्या डोळ्यात निर्विकार भाव असायचे.

शेवटी डॉ. जाधव मालतीताईना म्हणाले की तिला थोड माणसात जाऊ द्या. शाळेत पुन्हा पाठवायला चालू करा. कदाचित मित्रमैत्रिणीच्या सहवासात तिला बर वाटेल आणि ती लवकर बरी होईल. तस ही तिला कोणता ही दुर्धर आजार नाही हा फक्त मानसिक आजार आहे. दुसऱ्या दिवशी मालतीताईनी आर्याला लवकर उठवले आणि म्हणल्या आर्या उठ लवकर आज तुला शाळेत जायचं आहे. ते ऐकल्यावर आर्या हातातल्या वस्तू फेकू लागली आणि म्हणाली मला त्या शाळेत जायचं नाही किंवा मला इथून पुढे अभ्यास आणि शिक्षण हे विषय सुद्धा काढायचे नाहीत. हे ऐकल्यावर मालतीताई कधी नव्हे त्या संतापल्या आणि बळजबरीने आर्याला शाळेत घेऊन गेल्या. पण शेवटी व्हायचं ते झाल आर्या पुन्हा चक्कर येऊन पडली आहे परत ३-४ दिवस दवाखाना.

आता हे चक्र असच सुरु झाल. महिन्यातले १५ दिवस दवाखाना आणि १५ दिवस घर अशी महिन्याच्या ३० दिवसाची विभागणी होऊ लागली. मालतीताईचा धीर सुटत चालला होता. हे करता करता ६ महिने निघून गेले होते. आर्या शाळेला जाण्याचे काही मनावर घेत नव्हती. शाळेचे अर्ध वर्ष वाया गेले होते. खरतर आर्याला नाटक आणि अभिनय करण्याची खूप आवड होती. तिने जिल्हास्तरावर त्यात बक्षिसे ही मिळवली होती पण ह्या नैराश्याच्या झटक्यामुळे तिने आजकाल नाटक, त्या बद्दल बोलण ही बंद करून टाकल होत.

एके दिवशी संध्याकाळी भाजी आणावयास म्हणून मालतीताई नाक्यापर्यत गेल्या. तिथे एक मुलगा सारखा त्यांच्याकडे टक लावून पाहत होता. त्याला काही विचारायचे होते म्हणून तो घुटमळत होता. शेवटी न राहवून मालतीताई त्याला विचारले आपण एकमेकांना ओळखतो का? तर तो म्हणाला की तुम्ही मला नाही ओळखत पण मी तुम्हाला ओळखतो तुम्ही आर्याची आई ना? कशी आहे ती आता? मालतीताईनी एक दीर्घ उसासा टाकत आहे ती परिस्थिती सांगितली. कशामुळे झालं तेच कळत नाही रे? काकू माझ नाव विवेक आहे मी आर्याच्या वर्गातच शिकतो. ह्याची सुरवात खर तर आर्याच्या नाटकाच्या रिहर्सल पासून झाली. तिला पहिले बक्षीस मिळाले खरे पण ह्यामुळे तिचे शाळेतले काही तास चुकल्यामुळे अभ्यास मागे पडला होता. त्यामुळे आर्याला खूप ताण येत होता. तसे ही काही शिक्षक आर्याला तिच्या ह्या आवडीमुळे तिला सतत घालून पाडून बोलत. अभ्यास मागे राहिला म्हणून शिक्षा करत. शिक्षक बोलतात म्हणल्यावर वर्गातील इतर मुले-मुली ही तिला आता त्रास देऊ लागली होती. त्या दिवशी तर हद्दच झाली सकाळी प्रार्थना झाल्यावर वर्गाकडे जात असताना काही मुली तिला चिडवू लागल्या होत्या आणि शेवटी त्या आर्याचे वडील तिची असली थेर बघून त्यांना सोडून गेले असतील असे म्हणून गेल्या. आधीच एकटी पडलेली आर्या उदास आणि अस्वस्थ झाली आणि ह्याचा परिणाम म्हणजे तिला तो नैराश्याचा झटका आला.

मालतीताईना ही माहिती नव्यानेच कळत होती. तिच्या मनात एवढी मोठी त्सुनामी येऊन गेली आणि ती आपल्याला काहीसुद्धा बोलली नाही. त्यानंतर त्यांनी विवेकला त्यांच्याबरोबर घरी येण्यास सुचवले. विवेक लगेच त्यांच्यासोबत यायला तयार झाला. घरी पोहचल्यावर आर्या तिच्या खोलीत नेहमीप्रमाणे शून्य नजर लावून बाहेर पाहत बसली होती पण विवेकला पाहून थोड ओळखीचे हसली. आता आर्याशी बोलणे भागच होते. मालतीताईनी सरळ मुद्याला हात घातला. आर्या तुला एक सांगू का ग? तुझे बाबा हे त्यांच्या स्वभावदोषामुळे आपल्या सोबत नाहीत. त्यांनी आपल्याला सोडले ह्यात तुझा कोणताच दोष नाही.

पण आई असा कसा हा समाज जिथे माझ्या आईच स्वंतत्र होण मान्य नाही. माझी आवडनिवड मान्य करत नाहीत तर अशा समाजात आपण का राहायचं? मला शिकायचं ही नाही आणि मला नाही जगायचं ग!. त्यानंतर विवेकने बोलण्यास सुरवात केली. आर्या तू चुकीची नाहीस. अग हा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे ग आणि तो बरोबर असतो असे नाही ग! आता त्याच शिक्षक आणि मुलामुलींना तू दाखवून दे की तू कोण आहेस ते? तुझा छंद कसा मानाचा आणि चांगला आहे हे तू त्यांना दाखवून दे. चिखलात राहूनही कमळ फुलतच ना ग! ह्या दलदलीतूनच तुला तुझ्या आयुष्याच कमळ फुलवायचं आहे ग! विवेकच्या त्या समजवण्याने आर्या विचारात पडली. त्यावर मालतीताई म्हणाल्या हारण तर खूप सोप आहे ग! जिंकण त्याहून कठीण. पण कठीण म्हणून सोडून द्यायच का ग? ह्यानंतर आर्या ओक्साबोक्शी रडली आणि मनावरच मळभ दूर झाले. आता तिने आपली चूक मान्य करत मी माझ आयुष्य माझ्या अटीवर जगेन अशी ग्वाही दिली. त्यानंतर उरलेले ६ महिने आर्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवले आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतली.

आर्याने शालेय शिक्षण तर पूर्ण केलेच पण नाट्यशास्त्राची पदवी घेतली. आज तर तिला नाट्यशास्त्र विषयातल पदव्युत्तर पदवीसाठी असलेल विद्यापिठाच सुवर्णपदक मिळत आहे. धन्य झाले मी! माझ्या आर्याने करून दाखवल. जी मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती ती आज उच्चपदवीधारक झाली. इतक्यात स्कूटीचा हॉर्न वाजला आणि मालतीताई भानावर आल्या. आर्या उत्साहाने धावत घरात आली आणि म्हणाली आई तुला आज दोन आनंदाच्या बातम्या आहेत आणि त्या म्हणजे मला इंग्लंडमधील नाट्यशास्त्राची मानाची ३ महिन्याची शिष्यवृत्ती मिळतीय आणि परत आल्यावर मला एका मोठ्या निर्मितीसंस्थेकडे काम करण्याची संधी मिळतीय.

आई अग आज हा दिवस पाहायला विवेक हवा होता ना! कुठे असेल कुणास ठाऊक? त्यादिवशी तू आणि विवेकने मला जाणीव करून दिली नसती तर मी हा दिवस पाहूच शकले नसते ग!

अग आर्या चांगल्या माणसांना शोधाव ग आणि त्यांच्यातल आपण आपल्या अंगी बाणवून आपण ही चांगल बनाव जेणेकरून आणखी कोणाचा तरी चांगल्या माणसाचा शोध पूर्ण होईल ग!

आज विवेक माझ्या संपर्कात नसेल पण मला आता इतर लोकांसाठी विवेक बनायचं आहे ग. मी एका व्यक्तीसाठी जरी विवेक बनू शकले तरी ते खऱ्या अर्थाने माझ आयुष्याचे सार्थक झाले असे मानेन.....

डोळ्यात आलेले अश्रू परतवत मालतीताईनी फक्त आर्याचा हात हातात घेतला.

श्रुती कुलकर्णी.

कोल्हापूर.

* परिचय

-पर्यावरणशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

- सध्या पुणे विद्यापीठात पी.एच. डी(पर्यावरणशास्त्र) करत आहेत.

- ह्या आधी बायफ व पर्यावरण शिक्षण केंद्र सोबत काम केले आहे.

-अनेक नियतकालिके व मासिकामधून अनुभव तसेच पर्यावरण विषयावर लेखन केले आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED