Hasari hasnaval bhayval he aad books and stories free download online pdf in Marathi

हसरी हसणावळ भयवाळ' हे आड

**************************** हसरी हसणावळ ****************************** *** 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभलेखक असून त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रवींद्र यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताईं ह्या एक उत्तम कवयित्री असून त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित आहे. रवींद्र यांच्या भगिनी सौ. अंजली ह्या कविता, कथा, स्तंभलेखिका असून त्यांच्या नावावर दोन पुस्तके आहेत. एकंदरीत साहित्य क्षेत्रात भयवाळ घराणे समृद्ध असून दमदार, यशस्वी वाटचाल करीत आहे.
भयवाळ घराण्यातील कुलदीपक रवींद्र भयवाळ हे ही मराठी वाचकांना परिचित आहेत. साहित्यातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला रवींद्र यांनी स्पर्श केला आहे, मग त्या विज्ञान कथा असो, गुढ कथा असो, रहस्य कथा असो, ललित असो वा वैचारिक लेख असो. या सोबतच रवींद्र यांनी खुसखुशीत विनोदी लेखन ही केले आहे. तसेच आंग्ल भाषा प्रांतात त्यांचा मुलाखतकार म्हणून प्रवेश झाला आहे.तसेच रवींद्र भयवाळ यांनी डॉ जोसेफ मर्फी यांच्या 'Believe in yourself' या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'स्वतःवर विश्वास ठेवा' या प्रमाणे केला असून हे अनुवादित पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. महाराष्ट्रातील अनेक दिवाळी अंकांतून त्यांचे साहित्य नित्यनेमाने प्रसवत असते. एकंदरीत एक प्रथितयश लेखक म्हणून रवींद्र भयवाळ यांचा लौकिक आहे. 'हसणावळ' हा त्यांचा पहिला विनोदी कथा संग्रह शासकीय अनुदानावर प्रकाशित होतो आहे. अनुदानासाठी पात्र ठरणे हा एक प्रकारचा शासकीय वाङ्मयीन पुरस्कार आहे असे मला वाटते.
माझ्या मते साहित्य प्रांतात मुशाफिरी करताना लेखनासाठी कोणता प्रकार अवघड असेल तर तो म्हणजे विनोदी लेखन! असं म्हणतात की, कुणाला हसवणं हे महाकठीण काम आहे. माञ हे कठीण काम रवींद्र लीलया पार पाडताना दिसत आहेत. पुस्तक रुपाने येण्याची त्यांनी कुठलीही घाई केली नाही. साधारणपणे सन २००० पासून रवींद्र यांनी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. तब्बल सतरा वर्षे ते केवळ लिहित राहिले. अनुभव घेत राहिले. ते अनुभव विविध साहित्य प्रकारांमध्ये प्रकट करीत राहिले. यावरून लेखकाजवळ असलेल्या संयम, शिकण्याची इच्छा आणि लालसा या गुणांचा परिचय होतो. ज्यावेळी स्वतः रवींद्र भयवाळ यांना वाटले, की आपल्या नावावर एखादा कथासंग्रह असावा तेव्हा त्यांनी त्यांचे साहित्यिक गुरू उद्धव भयवाळ यांच्याशी चर्चा केली असणार आणि दोघांच्या चर्चेचे फलित म्हणजे रवींद्र यांनी सादर केलेला 'हसणावळ' हा कथासंग्रह! जनक आणि लेखक या दोन्ही भूमिकेतून उद्धवजींनी रवींद्रला सर्वोत्तमरित्या घडवले असल्याचे आपल्या लक्षात येते. 'जे न देखे जनक, ते देखे लेखक' याप्रमाणे!
'हसणावळ' हा एकूण आठ विनोदी कथांचा संग्रह रवींद्र भयवाळ यांनी वाचक दरबारी सादर केलेला आहे. या सर्व कथांचा सर्वसमावेशक गाभा म्हणजे लेखकाने वाचकांची नस ओळखून ती पकडून ठेवली आहे. वाचकांची आवड लक्षात घेऊन त्यांनी विनोदाची पेरणी आणि पाखरण केली आहे. रवींद्र यांच्या विनोदामध्ये कुठेही अवाचनीय, असंस्कृत असा विनोद नाही. लेखकाचे तरूण वय पाहता रवींद्र यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे कदाचित याचे श्रेय त्यांच्या कथेच्या पहिल्या वाचक आणि प्रथम समीक्षक असलेल्या लेखकाच्या पत्नी सौ. ममता यांचे असू शकते.
रवींद्र यांची भाषा सहजसोपी, प्रवाही, रसाळ आणि वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. विनोदी लेखक म्हटला की, तो हमखास स्ञी आणि राजकारणी या दोन हक्काच्या क्षेत्रांवर लिहितो परंतु, भयवाळ यांच्या लेखणीचा संयम म्हणजे त्यांची एकही कथा राजकारणाला स्पर्श करीत नाही. मात्र, महिला या विषयावर त्यांच्या काही कथा आहेत. परंतु, त्यात कुठेही स्त्रियांची कुचेष्टा करणे, त्यांना निर्बुद्ध समजून लेखन करणे हा भाव आढळून येत नाही. तर स्ञीने खऱ्या अर्थाने सबला व्हावे हा त्यांचा दृष्टिकोन असल्याची साक्ष त्यांची 'रणचंडी फाईट क्लब' ही कथा देते. रवींद्र यांची नायिका रडूबाई नाही तर ती खमकी, नवऱ्याला धडा शिकवणारी आहे. गावाकडून आलेल्या आपल्या साध्या भोळ्या मेहूणीला इमारतीमधील चांडाळचौकडीपासून दूर ठेवण्यासाठी धडपडणाऱ्याला मेहुण्याला ती मेहूणी , त्याची स्वतःची बायको आणि मुलगा कसे चकवतात हा मनोरंजनात्मक किस्सा 'अभि मनूचे चक्रव्यूह' या कथेत वाचायला मिळतो. कथेतील नायकाला 'अभिनंदन' हे नाव कसे मिळते ही घटना आणि त्यामुळे घडणाऱ्या घटना हसवणाऱ्या आहेत.
विनोद हा कारूण्याची झालर लावूनही रेखाटता येऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण असणारी 'संगणक बाप्पा मोरया' ही कथा वाचकांना अंतर्मुख करते. 'रणचंडी फाइट क्लब' या कथेत महिला दिनानिमित्त पारंपारिक कार्यक्रम न घेता काही तरी भन्नाट, अफलातून कार्यक्रम घेण्याच्या निर्णयामुळे घडलेल्या घटनांमुळे कथा अधिक मनोरंजक झाली आहे. 'मधुबाला' या जुन्या नायिकेच्या प्रेमात आपला नवरा पडला हे बायकोला समजताच घडणाऱ्या गमतीजमती जाणून घेण्यासाठी भयवाळ यांची 'स्वप्नसुंदरी' ही कथा वाचायलाच हवी. लेखकाची लेखनी थेट चीनी सुंदरीच्या प्रेमात पडते आणि मग होणारी धावपळ आणि सारवासारव वाचताना वाचकांना असेही घडू शकते का हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर मिळण्यासाठी वाचकांनी 'चंपकवाडीत चीनची चटक चांदणी' ही कथा जरूर वाचावी.
रवींद्र भयवाळ यांच्या हसणावळ या विनोदी कथासंग्रहाचे मला जाणवलेले एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वापरलेल्या अफलातून उपमा! जसे की,.... 'पॅरागॉन चपलेत अडकवलेल्या त्यांच्या तळपायाची आग पॅराशुट लावलेल्या मस्तकापर्यंत गेली... ' अशा प्रतिकांमधून लेखकाची चौरस बुद्धी निदर्शनास येते.
कथाबीज अमर असतात, त्यांना कधीच अंत नसतो. एका कथेचा शेवट हा दुसऱ्या कथेचा प्रारंभ असतो. याची प्रचिती या संग्रहातील ' नाचू या गडे ' आणि ' विमानवारी ' या कथा वाचल्यावर येते. ' नाचू या गडे ' या कथेचा दुसरा भाग म्हणजे 'विमानवारी' आणि या विमानवारीतून तिसरी कथा प्रसवते ती म्हणजे 'सौंदर्य व ती' ही कथा! याचा अर्थ असा की, रवींद्र भयवाळ ह्यांची वाटचाल एका कादंबरी लेखनाकडे सुरू आहे. त्याचे बीजांकुरण या तीनही कथांमध्ये पाहायला मिळते. वाचकांची विनोदी कादंबरीची भूक शमविण्याची पाञता भयवाळ यांच्या लेखनीमध्ये निश्चितच आहे. त्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा!


- नागेश सू शेवाळकर -
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२
संचेती शाळेजवळ, थेरगाव
पुणे ४११०३३

(9423139071)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED