Ekach Pyala - 1 books and stories free download online pdf in Marathi

एकच प्याला - अंक पहिला

एकच प्याला

(मराठी नाटक)

अंक पहिला

साहित्यिक = राम गणेश गडकरी

मंगलाचरण

(राग-भूप, ताल-झपताल. चाल- अमरवर नमित पद.)

शरण ते करुण तव नि:श्वसन व्यसनि घन।

नंदनंदन! जना पापकामा॥ हो॥ ध्रु.॥

कलहरत करि यदा मद्यमद यादवा।

सकल कुल कलि तदा ने विरामा॥

हानि ती पाहता दृष्टी बाष्पाकुला।

सृष्टी कष्टद तुला सौख्यधामा!॥ 1॥

कर्मरेखाबले धर्म नच मज कळे।

न स्मरत मतिही तव पुण्य नामा॥

रक्षणी मम तरिही दक्ष राहूनि सदा।

अक्षय स्वपदि पद देह रामा॥ 2॥

***

अनुक्रमणिका

१.अंक पहिला

१.१प्रवेश पहिला

१.२प्रवेश दुसरा

१.३प्रवेश तिसरा

१.४प्रवेश चवथा

१.५प्रवेश पाचवा

अंक पहिला

प्रवेश पहिला

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यंत्राजवळ बसला आहे.)

सुधाकर : कोण तीनतीनदा घंटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलतं आहे कोण? रामलाल! (पुन्हा ऐकून) हो. तिच्याकडून सर्व तयारी आहे. तू लवकरच चल. सिंधू, जरा इकडे ये पाहू! सिंधू!

सिंधू : हे काय भलतंच? आपलं नावानंच हाक मारीत सुटायचं?

सुधाकर : तर काय तुझं नाव टाकू? मग तूच उलटी माझ्या नावानं हाका मारीत सुटशील! हे पाहा, भाईसाहेबांनी आता विचारलं आहे त्याच्या निघण्याची सर्व तयारी आहे का म्हणून? तो येईलच इतक्यात.

सिंधू : तयारी सर्व आहे; पण भाई जाणार म्हणून कुठल्या कामाला उत्साह कसा तो वाटत नाही.

(राग: यमन; ताल: त्रिवट. चाल : येरी आली पिया बिन.) लागे हृदयी हुरहुर। अजि। सुखविषय गमति नच मज सुखकर॥ ध्रु.॥ काही सुचेना। काही रुचेना। राही कुठे स्थिर मति नच पळभर॥ 1॥

सुधाकर : वृष्टीपूर्वीची अभ्रे जमू लागली का? सिंधू, असं म्हणून कसं चालेल? ज्या जगात आपण आलो आहो, ते इतके चमत्कारिक आहे की, त्यातल्या नुसत्या चांगल्या गोष्टीचीच अपेक्षा करायला निरंतर नुसत्या दु:खात दिवस काढावे लागतील!

(राग: छायानट; ताल: त्रिवट. चाल: नाचत धी धी.) सुखचि सदा कधि मिळत न कवणा। मिश्ररूप जग। सुखचि रिघे अघ। दु:खातुनि हो जन्म सुखांना॥ ध्रु॥ हो जरि आशा मात्र सुखवशा। करित विधि तरी अंति निराशा॥ रमत मतिही नच प्राप्त सुखीही मग । करि अवमाना॥ 1॥

केव्हाही उत्साह सोडून चालायचं नाही. शिवाय रामलालभाई जातो आहे तो केवढया महत्त्वाच्या कामासाठी! या प्रसंगी आपण त्याला आपल्या निरुत्साहानं असं तद्रूप करायचं! वा:, आपण तर उलट त्याचा उत्साह द्विगुणित केला पाहिजे.

सिंधू : भलतंच सोंग कसं आणता येईल असं? पुरुषांना पाषाणहृदयाचे म्हणून म्हणतात. ते असं एखादे वेळी खरं वाटायला लागतं! आपल्याला नाही वाईट वाटत?

सुधाकर : माझ्या पाषाणहृदयावर रामलालच्या गत-उपकारांचे शिलालेखच तुला पाहायला मिळतील. तुझ्या माहेरच्या माणसांचा आणि भाईचा नुसता स्नेहसंबंधच असेल; पण मला तर तो वडिलांच्या ठिकाणी आहे. रस्त्यानं चालता चालता रामलालचं नाव लक्ष्यात आलं म्हणजे मला एक ब्रह्मांडच्या ब्रह्मांड आठवतं. मी सोळा वर्षांचा असेन नसेन, माझी प्रवेश परीक्षा उतरण्याच्या आधीच बाबांनी स्वर्गप्रवेश केला; आपला वृध्दापकाळ झाला असं पाहून आपल्या पश्चात् शरद्च्या संगोपनाची जबाबदारी माझ्यावर पडू नये म्हणून बाबांनी तिच्या आठव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. परंतु लग्नाच्या सोळाव्या दिवशीच तिचं दुर्दैव तिच्या पुढं उभं राहिलं; नवर्याच्या मुळावर आलेली मुलगी, म्हणून तिच्या सासर्यानं तिला आमच्या घरी कायमची परत लावून दिली! आईबापावेगळी आम्ही दोन परकी मुलं! पैशाचं पाठबळ नाही आणि आप्तेष्टांचा आधार नाही! त्या वेळी रामलाल देवासारखा माझ्या पुढं उभा राहिला! माझ्या मानी स्वभावामुळं माझ्या शिक्षणासाठी मी त्याची प्रत्यक्ष मदत कधी घेतली नाही हे खरं; परंतु शरद्ला सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्यानं माझ्यावर फारशी पडू दिली नाही; पुढं शिकवण्या वगैरे पत्करून माझ्या शिक्षणक्रमातून शेवटपर्यंत मी यशस्वी रीतीनं पार पडलो; पुढं तुझ्या वडिलांना भाईनंच आग्रह करून आपला हा भाग्यशाली योग घडवून आणला. हे सोन्याचे दिवस आज आपण पाहतो आहोत, याचे कारण एक रामलालची कृपा! सिंधू, आज सकाळपासून ही सारी गोष्ट हृदयात सारखी उचंबळत आहे! कोणापाशी बोलल्याखेरीज राहवेना, म्हणून तुला ती जणू काय अगदी नव्यानंच म्हणून विस्तारानं सांगत सुटलो! रामलाल जाणार म्हणून मला वाईट वाटल्याशिवाय कसं राहील? परंतु या संसारात नेहमी परिणामाकडे दृष्टी ठेवून चालावं लागतं! आपण अशी दुर्मुखल्यासारखी बसलो आणि समज, एकदम रामलाल आला- (रामलाल येतो.)

सिंधू : भाई, तुला शंभर वर्षांचं आयुष्य आहे!

सुधाकर : हे खरं ना? मग शांत मनानं त्याला जायला आनंदानं निरोप दे पाहू! भाई, हिचं समाधान करता करता मला पुरेसं झालं आहे. मला वाटतं, यापुढं मला वकिलीची सनद सोडून देऊन हा एवढाच उद्योग करीत बसावं लागणार! बरं, भाई, इथून जायचं कधी?

सिंधू : थांब, भाई, इथून जायचं कधी हे सांगण्यापेक्षा पुन्हा इथं यायचं कधी, हे नक्की सांग पाहू एकदा- खरं सांग हो अगदी!

रामलाल : मग इतके दिवस सांगत आलो ते खोटेच का? ताई, मी पुष्कळ म्हटलं की, अमुकच दिवशी येईन म्हणून- दोन वर्षांनी येईन म्हणून म्हणतो; पण संकल्प आणखी सिध्दी यांच्यामध्ये परमेश्वराची इच्छा उभी असते. कुणाला ठाऊक, दोन वर्षांनी येईन की दोन महिन्यांनी येईन! इतकं होऊन कदाचित जाणारही नाही, कदाचित येणारही नाही; कदाचित ही आपण सर्वांची शेवटची भेट असेल.

(राग: भूप; ताल- एकताला. चाल- रतन रजक कनक.) परम गहन ईशकाम। विश्वा जरि पुण्यधाम। मनुजा तरी गूढ चरम। चिर अभेद्य साचे॥ ध्रु.॥ क्रीडा दैवी विराट। मनुजसृजन क्षुद्र त्यात। मानुषी मनीषा!। गणन काय त्यांचे?॥ 1॥

सुधाकर : भाई, तू अगदी पढतमूर्ख आहेस. इकडच्या तिकडच्या गोष्टींची धरणं बांधून इतका वेळ मी या गंगायमुना थोपवून धरल्या होत्या; तुझ्या आशीर्वादानं त्यांचा वाहता संसार मनासारखा सुरू झाला बघ! वेडया, तुला माहीत नाही की, शास्त्रांची अटक झुगारून, सिंधू नदी अटकपार होणं हे एक वेळ सोपं आहे. बाष्पशक्तीच्या जोरावर महासागराच्या तोडीचे काळा समुद्र, पिवळा समुद्र किंवा तांबडा समुद्र ओलांडणं हे तर त्यापेक्षाही सोपं आहे; पण मानससरोवरात उत्पन्न झालेल्या, डोळयांतून बाहेर येणार्या, आणि गालांवरच्या गुलाबी समुद्राला मिळणार्या या टीचभर गंगायमुना तुडवून जाणं, हे अजून कोणाही पुरुषाला साध्य झालं नाही!

(राग- मुलतानी; ताल- त्रिवट. चाल- हमसे तुम रार.) सरिता जनि या प्रबला भारी। जरि दिसती शीर्ण नयनांती अविकारी॥ ध्रु.॥ उत्तान गमति दर्शनी जरी। गंभीर अति तरी।

भवजलधीहुनी दुस्तर संसारी॥ 1॥

रामलाल : मनाची भलती फसवणूक कधीही करून घ्यायची नाही, हा माझा एक कृतसंकल्प आहे. सिंधूताई, या चंचल संसारात असल्या कडू सत्यांची मनुष्यानं निदान तोंडओळख तरी करून ठेवलेली असावीच. (राग- शंकरा; ताल- त्रिवट. चाल- सोजानी नारी.) संसारी विषारी। तीव्र सत्ये। अमृत होती। कृतिने कान्त॥ ध्रु.॥ दिव्य रसायन। संकटांतकी। सत्यपरिचये। क्षणि असुखान्त॥ 1॥ ईश्वराच्या दयेनं आपल्या दुर्दैवी ती अनुभवानं भोगण्याचा प्रसंग आलाच, तर त्यांच्या पहिल्या दर्शनानं अशा वेळी आपण गांगरून तरी जात नाही.

सुधाकर : तुझा सुध्दा कंठ सद्गदित झाला आहे. मानलेला का होईना, पण तिचा भाऊ शोभतोस खरा! सिंधूताई, आता तू दादाच्या गळयाला मिठी मार! भाई, तुला जायचं असेल, तर Don't say such a silly nonsense; you are a regular messeah of nonsense! अशानं होईल काय? इतक्यात शरद् येईल, तिच्या गंगायमुनांची जोडी चालायला लागेल. ती तळीरामाची गीता येईल- त्या भोळया जिवाला तर हसण्या-रडण्याला आपलं स्वत:चं सुध्दा सुखदु:ख लागत नाही! हा हा म्हणता इथं एका भूगोलपत्रकाच्या भरतीइतक्या नद्या जमून आपल्या महाराष्ट्राला पंजाबी पवित्र्यात उभं करतील! अशानं तुझ्या प्रवासाला किती त्रास होईल याचा नीट विचार कर. दगदग आणखी त्रास चुकविण्यासाठी पुरुष चातुर्मास टाळून प्रवासासाठी हिवाळा किंवा उन्हाळा योजून ठेवतात, पण ऐन प्रस्थानाच्या वेळी बायका पावसाळा पुढे आणून उभा करतात! तू संसार सोडून भटकणारा वैरागी आहेस; म्हणून तुला माहीत नाही, की स्त्री-पुरुषांच्या संबंधात ऋतुमान नियमानं सारखंच टिकून राहील असं नाही!

सिंधू : आमच्या इथे थट्टेला काळ वेळ नाही आणि सुमारही राहात नाही. एक गंगायमुना सापडायची खोटी, सर्वांसकट वाहून जायची तयारी!

सुधाकर : सिंधू, तुझ्या गंभीर उपदेशानं मला असा सतावून सोडू नकोस. आणखी दोन-चार महिन्यांनी एकदा मूल झालं, म्हणजे त्याला काय सांगायचं ते सांग.

रामलाल : आणि मुलाला दटावण्याचेच तिला डोहाळे होत असले तर मग?

सिंधू : भाई, तुलाही असंच गमत राहायचं आहे वाटतं? इकडचा स्वभाव तुला लहानपणापासून माहीत आहे ना?

रामलाल : ताई, नीट बैस अशी. सुधा, तू पण बैस, सुधा, तुझ्या देखत ताई, तुला दोन शब्द सांगायचे आहेत. आता तू म्हणालीस की, सुधाचा स्वभाव मला लहानपणापासून माहीत आहे, ते खरं आहे, आणि त्याबद्दलच तुला मला सांगायचं आहे. ताई, हा सुधाकर म्हणजे या जनसमुद्राच्या गरीब तळाशी सापडलेले एक अमूल्य रत्न आहे. पण ताई, अशी रत्नं लाभणं कठीण आणि लाभल्यावर त्यांना हाती ठेवणं तर फारच कठीण. सुधाकर बुध्दिवान आहे. फार काय सांगावं- खरोखरीच अलौकिक बुध्दिवान आहे. तो जात्याच मानी आहे आणि केवळ स्वावलंबनानं नावलौकिकाला चढल्यामुळं मूळचा मानीपणा हल्ली इतका उग्र स्वरूपाचा झाला आहे की, तो त्याच्या चांगल्या मित्रांनासुध्दा असह्य होईल. त्यातून व्यवहारी आयुष्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतून तो मार्गक्रमण करीत आहे. प्रतिस्पर्ध्येच्या गर्दीतून आपल्या बुध्दिमत्तेला शोभण्याजोग्या स्थळी त्याला अजून पोहोचायचं आहे. एक गावंढळ उदाहरण घेऊन सांगतो; आपल्या कळपातून बदकाचं पिलू आपल्या जातिधर्माप्रमाणं पाण्यात पोहणीला पडलं म्हणजे त्याच्याभोवती असलेल्या आणि त्याबरोबर वाढलेल्या कोंबडीच्या पिल्लाचा आश्चर्यानं आणि भीतीनं सारखा किलकिलाट सुरू होतो. जगाच्या व्यवहारात, पशूंच्या उदाहरणातल्या आश्चर्य आणखी भीती या विकारांऐवजी केवळ मनुष्यप्राण्यालाच मिळालेले द्वेष आणखी मत्सर हे विकार दिसून येतात. वकिलीच्या धंद्यात सुधाकर हल्ली या स्थितीत आहे. सर्वांनी एकच परीक्षा दिली असल्या कारणानं त्याच्या जोडीला वकिलांना तो आपल्यापैकीच एक वाटत आहे. त्याच्या बुध्दिमत्तेच्या जोरानं हा सामान्य वर्गातून पुढं जात असल्यामुळं याच्या बरोबरीचे लोक द्वेषाने आणि मत्सरानं त्याला मागं ओढीत आहेत. धंद्यात नामांकित म्हणून प्रस्थापित झालेले थोडेसे लोकही नव्या उमेदवाराला आपल्या भाग्यशाली यशाचा सुखासुखी वाटेकरू होऊ देत नाहीत. तरुण बुध्दिमत्तेची, आत्मविश्वासाची उग्रता या जुन्या लोकांना उर्मटपणाची आणखी अहंपणाची वाटून ते त्याचा उपमर्द आणखी तिरस्कार करीत असतात. मागच्याला मागं ढकलून बरोबरीच्याला बाजूला सारून आणि पुढच्यांना पुढं ढकलून सुधाकर या वेळी जीवनकलहाच्या गर्दीतून रस्ता काढीत आहे. धंद्याच्या पटांगणात त्याचं कौतुक करणारा, त्याला धीर देणारा, त्याचं समाधान करणारा, आणि रागाच्या ऐन भरात त्याचा तोल सांभाळणारा कोणी तरी जिव्हाळयाचा मनुष्य सध्या त्याच्या नेहमी जवळ असणं आवश्यक आहे. त्याच्या लहानपणापासून माझ्या पामरशक्तीप्रमाणं ही त्याची सेवा आजवर मी करीत आलो आहे. सिंधू, आज विलायतेला जाण्यापूर्वी- तसा तो तुझा प्राणच आहे- मी बोलून चालून एक परदेशी ति-हाईत आहे- माझा पाठचा भाऊ आज मी तुझ्या हवाली केला आहे. सिंधू, त्याच्या अफाट बुध्दिमत्तेला पुरून उरण्याजोग्या कामगिरीमध्ये त्याला नेहमी गुंतवून ठेव. कधीकाळी त्याचा मनोभंग झाला तरच- चतुर मुली, तू सर्वगुणसंपन्न आहेस. तुमच्यासारखी अनुरूप वधूवरं संसाराच्या अशा सुखपूर्ण आरंभात पाहून कोणताही मनुष्य त्या सुखाचा चिरकाल लाभ व्हावा म्हणून तुमच्यासाठी परमेश्वराजवळ आशीर्वाद मागेल- मग मला तर जवळजवळ तुमचा अनुरूप योग घडून आणण्याचा प्रत्यक्ष मानच मिळाला आहे

-सुधाकर : शाबास, रामलाल, तू आपल्या डॉक्टरांच्या जातीवर गेलास अखेर! माझ्या मनाला औषध काय चारायचं ते राहील तिच्या लक्षात! असंच एकदा पथ्याचं सांगून टाक म्हणजे झालं! एकदा पढतमूर्ख म्हटल्यानं तुझं समाधान झालं नाही. भलतंच बोलून तिच्या मागं ही एक दुसरी काळजी उत्पन्न करून ठेवलीस? दोन वर्षांनी तू परत येईपर्यंत तुझ्याबद्दलची काळजी आणि माझ्याबद्दलची काळजी !

सिंधू : दोन वर्षे? इतके दिवस आणखी इतक्या लांब तू परदेशी जाऊन राहणार? आपलं म्हणायला ओळखीचं माणूससुध्दा कोणी नाही. त्यातून तुझी प्रकृती अशी झालेली!

(राग: जिल्हा-मांड; ताल- दादरा. चाल: हे मनमोहन सावरो.) या जाळी चिंता मना। तयासि शांति येईना॥ ध्रु.॥ विरहा न दया। भेदीत हृदया॥ मानी मुळी नच। सांत्वन मोहाना॥ 1॥

सुधाकर : आणि तो इथं राहिला, तर तू काय त्याला चिरंजीव करशील?

रामलाल : सुधा, तुला मनुष्यस्वभावाची- त्यातून स्त्रीस्वभावाची चांगलीशी कल्पना नाही. आपल्या प्रियजनाचं आपल्या नजरेआड बरंवाईट झालं, म्हणजे परक्या माणसाच्या हलगर्जीपणामुळंच हे झालं असावं, अशी त्यांच्या मनात शेवटपर्यंत रुखरुख राहते. बायकांच्याच अंगी असलेल्या आपलेपणाच्या कळकळीनं बघायला कुणी असतं, तर हा प्रसंग टळला असता, असं प्रत्येक Fatal केसमध्ये त्यांना वाटत असतं.

(राग: तिलंग; ताल: पंजाबी. चाल: बसे किना वाट चालत.) मृदुलताधाम जगि ललनाहृदय। सकलशुभनिलय। धरित गुण ललित। मधुरता॥ ध्रु.॥ स्वार्थलव तया। कधी नच ठावा। सतत असुगणित परहिता॥ 1॥

सुधाकर : सर्वांचं सर्वतोपरी रक्षण करण्याची जबाबदारी सर्वसमर्थ परमेश्वरावर आहे. सिंधू, तो परमेश्वर अनुकूल असला म्हणजे हजारो कोसांवरच्या खवळलेल्या महासागरात सुध्दा तुझ्या प्रयत्नांवाचून रामलाल सुरक्षित राहील आणि प्रभूची कृपा एकदा फिरली म्हणजे तुझ्या डोळयांदेखत, इथल्या इथं, तुझं आटोकाट प्रयत्न चालू असता, महासागर नको, तलावसुध्दा नको, तो अतर्क्यसामर्थ्यवान् प्रभू मला एखाद्या लहानशा पेल्यातसुध्दा बुडवून टाकील! (तळीराम येतो.) काय रे? फैटणी आणल्यास का?

तळीराम : एव्हापासून फैटणी कशाला? जेवणं झाल्यावर इथल्या इथं आणता येतील.

सुधाकर : (घडयाळ पाहून) वेळ थोडा उरला आहे अगदी! सिंधू, लौकर पाट मांडण्याची व्यवस्था कर! तळीराम फैटणी दोनतीन आण! आपण सगळीच भाईला पोचवायला जाणार आहोत; सिंधू जा लौकर. (सिंधू व तळीराम जातात.) भाई, तू असा सचिंत का?

रामलाल : वैद्यविद्येचा अभ्यास पुरा करण्यासाठी मी आज हिंदुस्थानदेश सोडून युरोपात जाणार आहे. सुधाकर! मनुष्याच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादं मोठं स्थित्यंतर होतं, तेव्हा तेव्हा गतकालाची स्मृती आणि भावी कालाची कल्पना यांच्या तर्कातीत संमिश्रणानं चित्तवृत्ती अगदी व्याकुळ होते. विद्यार्जनाचा समाप्तिकाल, विवाहाचा प्रसंग, रोजगाराची सुरुवात, जबाबदार वडील माणसांचा मृत्यू, या प्रसंगांनी ही स्थित्यंतरं प्रत्येकाच्या आयुष्यात घडून येत असतात. मला या वेळी आज नजरेपुढून जात असलेलं हिंदुस्थानचं दारिद्रय आणि उद्या दिसणारं इंग्लंड देशाचं वैभव, दोन्ही दिसताहेत. अशा वेळी मनात कालवाकालव झाली, तर आश्चर्य ते कोणतं? उद्या मी माझ्या जन्मभूमीला अंतरणार! बापाच्या मिळकतीचा वारसा मुलांकडे जाताना वडील धाकटयाचा जसा विचार करतो, तसाच गुणांचा भेदाभेद करण्याची एकंदर जगाची प्रवृत्ती असते. लायकी-नालायकीचा प्रश्न फक्त जननी आणि जन्मभूमी यांच्या प्रेमाचा वारसा मिळवितानाच काय तो पुढे येत नाही. एक पुत्र बेचाळीस कुळं उध्दरणारा असतो, आणि एक पुत्र बेचाळीस कुळं बुडविणारा असतो. पण जन्मदात्रीकडे बोट करून दोघांनाही सारख्याच हक्कानं म्हणता येतं की, ही माझी! तीच गोष्ट जन्मभूमीची आहे! आणि म्हणूनच म्हटलं आहे की, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी. माझी आई वारली त्या वेळी मला जो तीव्र शोकावेग झाला; त्याचा आज मी पुन्हा अनुभव घेतो आहे-

(रागिणी: हंसकिंकिणी; ताल: झपताल. चाल: नैना सुराग सखि.) माता वियोगि मज। लोटी दुज्याने॥ ध्रु.॥ क्रीडन मधुर तदंकी। लाभेल ना फिरुनि। शंका भेदोनि। सुखा ने॥ 1॥

या भूमीवर तुझा, माझा, त्याचा, याचा, कोणाचाही प्रेमाचा हक्क अगदी सारखा आहे. ऋषीश्वरांच्या यज्ञकर्माची योगभूमी, शिबिगौतमांसारख्या महात्म्यांची त्यागभूमी, प्रतापशाली वीरांची जी कर्मभूमी, युधिष्ठिर- अशोक यांसारख्या पुण्यश्लोकांची जी धर्मभूमी, तीच आपली ही जन्मभूमी! तिच्याकडे पाहून श्रीशिवछत्रपतींनी मागं जितक्या अधिकारानं म्हटलं असेल की, ही माझी जन्मभूमी- तिच्याकडे पाहून लोकमान्य टिळक जितक्या अधिकारानं आज म्हणत आहेत की, ही माझी जन्मभूमी- उद्या इंग्लंडहून परत आल्यावर तिच्याकडे पाहून माझ्यासारख्या पामरालाही तितक्याच अधिकारानं म्हणता येईल की, ही माझी जन्मभूमी!

(दोघे जातात.)

प्रवेश दुसरा

(स्थळ : तळीरामाचे घर. पात्रें : तळीराम व भगीरथ)

तळीराम : (दोन्ही पायात बाटली धरून ओणव्याने बूच काढीत आहे.) म्हणे दारू सुटत नाही! एकदा घेतली म्हणजे सुटत नाही म्हणे! अन् तेवढयानं दारू वाईट! सुटत नाही म्हणजे बिशाद काय? घ्या! (दोघे पितात.) भगीरथ, दारूबद्दल बडबडणारांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी माहीत नसतं! बरं, मी म्हणतो, सुटत नाही, असंच गृहीत धरून चाला की, खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही! पण तेवढयानं दारू वाईट कशी ठरते? भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता, आणि ती जन्माची चिकटते खरी! म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको! एकदा नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो ना? म्हणून बायका करायचं टाकलं का आहे? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का?

भगीरथ : तळीराम, या तीन गोष्टींचं एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांशी तुलना कशी होईल? पदवी आणखी बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का?

तळीराम : यांचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. असे कैक पदवीधर हात धरून मी दाखवून देईन की, पदवीचा नावापुरता पोकळ आधार नसता, तर त्यांना आपला मूर्खपणा जगापुढं मांडण्याची छातीच झाली नसती. दारूबाजाचं बरळणं दुस-याला उमजत नाही हे खरं; पण पदवीधराची बाष्फळ बडबड तर त्याची त्यालासुध्दा कळत नाही! इंग्रजी अंमल सुरू झाल्यामुळं आमच्या हतभागी देशात ज्या अनेक आपत्ती आल्या, त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत. पाठशाळेत पाऊल टाकून पदवीचा वेळ लागण्याबरोबर मुलाला मतं आणि मिशा फुटू लागतात. मताच्या मंडपीवर मूर्खपणाला मनमोकळेपणानं मिरास मिळते आणखी मिशांचा मोर्चा आकडयांच्या वळणावळणानं पोरीबाळींच्या प्रेमाकडे वळतो.

भगीरथ : उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडली आहे म्हणायची!

तळीराम : भगीरथ, तुम्ही एक प्याला घ्या आणखी. म्हणजे तुमच्या जिभेवरून हे 'उदात्त' वगैरे शब्द धुवून जातील. प्रेम हे हास्यास्पद नाही वाटतं? अहो, काव्यात कमल, नाटकात सूड, कादंबरीत भुयार, मासिक पुस्तकांत खास अंक, वर्तमानपत्रांत खास बातमीदार, संसारात प्रेम, औद्योगिक चळवळीत सहकारिता, सुधारणेत देशभक्तीत स्वार्थत्याग आणि वेदान्तात परब्रह्म यांचा धुमाकूळ माजला नसता, तर त्या त्या गोष्टींची थट्टा करायला जागाच उरली नसती.

भगीरथ : हे राहू द्या. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा पाहू! सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढं या मदिरेची काय किंमत आहे?

तळीराम : हं, प्रेमात काय जीव आहे? प्रेमापेक्षा मदिरा प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळया जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वत:लाच मदिराक्ष बनता येतं! बोला-

भगीरथ : खरं आहे. या गोष्टी नव्हत्या माझ्या लक्षात आल्या. आणखी प्रेमाच्या नादात सापडलं, म्हणजे रात्रीच्या रात्री झोपेवाचून काढाव्या लागतात आणि मदिरेमुळे रात्रीच काय, पण दिवससुध्दा झोपेत जातात. बरं, मदिरेचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला?

तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

भगीरथ : बरं पुढं?

तळीराम : चोरीच्या बाबतीत तर तो बेटा अगदी अजाण असतो! एखादी लहानशी गोष्टसुध्दा त्याला दुस-याजवळून चोरून ठेवता येत नाही- फट्दिशी तो ती बोलून टाकतो.

भगीरथ : खरंच, चोरून प्यालेली दारूसुध्दा त्याला जिरवता येत नाही.

तळीराम : अशी थट्टेवर गोष्ट नेऊ नका! एकदा आमच्या मद्यपानाच्या बैठकीत आमच्या एका मित्राला चोरी करायची इच्छा झाली. तेव्हा त्यानं मोठया शर्थीनं माझ्या बोटातली अंगठी पळविली; पण शेवटी दारूच्या धुंदीत त्यानं ती पुन्हा माझ्याजवळ ठेवावयाला दिली. मात्र हा माल चोरीचा आहे, कोणाला दाखवू नकोस, असं त्यानं मला गंभीरपणानं बजावलं!

भगीरथ : छान! यात दोघांनाही समाधान! फळ एकाला चोरी केल्याचं आणि दुस-याला चोरी सापडल्याचं!

तळीराम : तेच तुमच्या प्रेमाच्या बाबतीत पाहा! कुणी कुणाचं मन चोरतो, तर कुणी चोरून भेटी घेतात! एकमेकांकडे पाहायचं ते सुध्दा चोरून! इथून तिथून सारा चोरांचा बाजार!

भगीरथ : प्रेमाचा पाशच तसा आहे. प्रेमानं दोन जिवांचा अगदी एकजीव होतो.

तळीराम : दोन जिवांचा एकजीव होत नाही, पण एका जोडप्याच्या दोन जिवांपासून दहा-पंधरा जिवांचं लटांबर मात्र उत्पन्न होतं! हिंदुस्थानच्या हवेत अव्वल आर्यांचा वंशवृक्ष तेहतीस कोटी फळांनी लादून निघाला, तो काही त्याच्या मुळाशी दारूचं शिंपणं झालं म्हणून नव्हे. प्रेमजलाच्या सिंचनानेच तो फोफावला आहे. तसं म्हणाल तर जीव कमी करण्याच्या बाबतीतसुध्दा मदिराच जास्त ठरेल. असं दोन जिवांचा एकजीव करण्यासारखं अर्धवट काम नाही करीत ती! मदिरेने आजपर्यंत असे कैक जीव अजिबात नाहीसे केले आहेत.

भगीरथ : मग प्रेमामुळं हल्ली जो प्रीतिविवाहाचा प्रघात पडतो आहे, त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल?

तळीराम : रंगभूमीच्या आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीत उतरला, म्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतात, नाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो की, हल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतो; किंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रीतिविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो. लग्नाच्यापूर्वी प्रेमाची आषुकमाषुकं हातात हात घालून भटकण्यासाठी जी तळमळत असतात, नुसती पायधूळ दृष्टीस पडण्यासाठी ज्या उत्कंठतेने एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात, तीच पुढं एकमेकांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठी संधी पाहात असतात! चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहताच चावू की गिळू, असं करायला लागतात. आणि दुस-याच्या अधराचं आपल्या दातांनी खंडण करण्याचं पर्यवसान आपल्याच ठिकाणी दातओठ खाण्यात होत जातं.

भगीरथ : मला वाटतं एकंदर सुधारणेच्या बाबतीत तुमचं मन बरंच कलुषित आहे. जुन्या थाटाच्या लग्नांना तुमचा तितका विरोध नसेल?

तळीराम : अलीकडे त्याही गोष्टीच्या विरुध्द माझं मन होत चाललं आहे. पुढले सात जन्म सलोख्यानं काढण्यासाठी एकमेकांसमोर आणलेली वधुवरं अनुभवांती असं वाटायला लावतात की, मागल्या सात जन्मांचं वैर साधण्यासाठी ही एकमेकांच्या समोर आलेली आहेत. बालबोध थाटाच्या लग्नाच्या बारशाला जशी भटाभिक्षुकांची जरुरी असते, तशी अलीकडे त्यांच्या उत्तरक्रियेला वकील-मुनसफांची जरूर भासू लागली आहे. आम्ही अलीकडे नेहमी पाहतो, नवरा-बायकोच्या बेबनावाचे खटले प्रमाणाबाहेर वाढत चालले आहेत. बोहल्यावर नवराबायकोभोवती भटाभिक्षुकांनी गुंडाळलेल्या सुताच्या गुंतागुंतीसुध्दा दिवाणी दरबारात उकलाव्या लागतात आणि धर्माच्या मंत्र्यांनी केलेली पातकं कायद्याच्या कलमांनी निस्तरावी लागतात. एकंदरीतच बघा. स्वत:च्या बायकोकडे पाहण्याची नव-याची नजर इतकी फिरली आहेशी दिसते की, आता परस्त्रीकडेसुध्दा स्वत:च्या स्त्रीच्या दृष्टीनंच पाहणाराला देखील पुण्यश्लोक म्हणण्याची पाळी येत चालली आहे आणि परस्त्रीच्या ऐवजी स्वस्त्रीच मातेसमान होत चालली आहे!

भगीरथ : तुम्ही केवळ थट्टेनंच बोलत आहात म्हणून तुम्हाला तितक्या तीव्रतेनं उत्तर देण्याची गरज नाही. बाकी खरं म्हटलं तर तसल्या दुनियेत ही जी हल्ली बेदिली दिसून येऊ लागली आहे तिच्याबद्दल वाडवडिलांना जबाबदार धरलं पाहिजे. बदलत्या परिस्थितीचा लग्नसंबंधांतून मुळीच विचार न करण्याचा आमच्या वडील पिढीचा कृतनिश्चय दिसतो.

तळीराम : ते काही म्हणा, बाकी लग्नाच्या बाबतीतला एकंदर बोजवारा पाहून शेवटी असं वाटायला लागतं की, संसारमार्गावरच्या प्रवाशानं लग्नाची बोजड बेडी पायात अडकवून घेण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक मार्गाला लागावं हे बरं.

भगीरथ : वा! वेश्यागमनाइतकी अनीति दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही.

तळीराम : तुम्ही अजून अजाण आहात. अहो, असल्या बाहेरख्याली संबंधांत पोराबाळाच्या खिल्लाराशी नुसता नावापुरतासुध्दा संबंध ठेवायचं कारण नाही. शिवाय बेइमानी दिसलीच तर बाहेरच्या रस्त्याकडे बोट करायला मोकळाच. मायबाप सरकारांनी बाहेरच्या बायकांच्या पोटापाण्याकडे अजून आपली कायदेशीर कृपादृष्टी वळविली नाही. बदचाल दिसली तरी तिची हकालपट्टी करताना पोटगी खर्चाचा तिला अहेर करण्याचं कारण नसतं.

भगीरथ : जाऊ द्या! चार घटका मजेनं जगण्यासाठी जगायचं, तिथं ही असली किळसवाणी कटकट कशाला हवी? मी मद्यपानाच्या विरुध्द बोलतो असं नाही. पण दारूमुळं मनुष्याची कर्तबगारी कमी होते, हे तर खरं आहे ना?

तळीराम : हा प्रश्न साहेब लोकांना विचारा. कोटयान्कोटी अस्सल आर्यांची कर्तबगारी कारकुनी पेशानं साहेबांच्या भेटीसाठी बंगल्याबाहेर उभी आहे व बंगल्याच्या आत पेल्यावर पेले घेणा-या कामामुळं सत्ताधारी साहेबांना बाहेर येण्याची फुरसत नाही! भगीरथ, असले वेडेवाकडे प्रश्न विचारता याचं कारण एवढंच की, मघापासून तुम्ही हात राखून काम चालविलं आहे. तुम्ही आता काही तितके नवीन नाही. हे बघा, भगीरथ, या घरी नवशिक्याला स्वत:च्या अब्रूबद्दल भिण्याचं काही कारण नाही. नवीन घेणा-याच्या अब्रूला आम्ही चारसहा महिने जपत असतो.

भगीरथ : आणि पुढे मग?

तळीराम : पुढं मग ज्याचा त्यालाच अब्रूबद्दल विधिनिषेध वाटत नाही.

भगीरथ : तळीराम, अब्रू, कीर्ती यांसारख्या गोष्टींची मला मुळीच चाड नाही. ज्यानं सार्या जगाचा जितेपणीच कायमचा निरोप घेतला, त्याला या असल्या गोष्टींची काय पर्वा वाटणार? भर चौकात जाऊन पीत बसायला मला सांगितलं, तरीसुध्दा माझी तयारी आहे.

तळीराम : शाबास भगीरथ, तुमच्यासारखी उत्साही माणसं मिळाली पाहिजेत. ही मोकळेपणानं खाण्यापिण्याची अडचण कायमची दूर करण्याकरता आम्ही आता लवकरच मद्यपानाची संस्था काढणार आहोत. मद्यपान हे बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळं संभावित समाजाकडून दारूची जी हेटाळणी होते, ती बंद व्हावी, मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं, हाच या मंडळींचा मुख्य उद्देश आहे. सर्व धर्माचे, सर्व पंथांचे, सर्व जातींचे- पोटजातींचे दारू पिणारे लोक यात सामील असल्यामुळे त्याला आम्ही 'आर्यमदिरामंडळ' हे नाव दिले आहे. त्याचे सर्व उद्देश विस्तारानं प्रसिध्द करून टोलेजंग पायावर लवकरच त्याची उभारणी करावयाची आहे. योग्य वेळी मी तुम्हाला सांगेनच.

भगीरथ : बरं तळीराम, वेळ बराच झाला असं वाटतं, जातो मी आता.

तळीराम : हे एवढं उरलं आहे, तेवढं उरकून टाका आणि मग चला.

भगीरथ : वाटेनं जाताना या वासानं कारणाशिवाय घोटाळा होतो.

तळीराम : थांबा, एक मंत्र सांगून ठेवतो. अगं ए, जरा बाहेर ये पाहू (गीता येते.)

गीता : (स्वगत) आज माझ्या नावानं 'गीते' म्हणून काही हाक मारली नाही. अजून रागरंग नीटसा जमला नाही वाटतं!

तळीराम : गीते, यांना थोडी बडीशेप आणून दे पाहू! भगीरथ, तोंडाचा वास मारायला हे अगदी रामबाण औषध आहे. (गीता जाते.) मग काय? 'आर्यमदिरामंडळा'ला तुम्ही पाठिंबा देणार ना? आम्हाला सर्व लोकांची मदत पाहिजे आहे.

भगीरथ : या संसारात मला पाशबंध असा राहिलाच नाही. (गीता येते. तळीराम तिजजवळून बडीशेप घेऊन भगीरथाला देतो; भगीरथ जातो.)

गीता : आज रावसाहेबांच्याकडे गेला होता का? बाईसाहेबांचे भाऊ ते पद्माकरदादा त्यांना न्यायला आले आहेत माहेरी. बाईसाहेबांच्या बरोबर शरदिनीबाईही जाणार आहेत.

तळीराम : त्या जाणार आहेत उद्या, आणि आज कशाला उगीच गडबड? बरं, उद्या परवा क्लबची स्थापना करायची आहे, त्यासाठी शक्य तितकी वर्गणी मला भरायची आहे; तर घरात काही आहे का?

गीता : घरात आता तुम्ही नी मी, दोघं बाकी आहोत! दागदागिने, सामानसुमान मावत नव्हतं घरात! सोन्याच्या राशी रचून वडिलांनी घराची सोन्याची लंका करून ठेविली होती; पण तुमच्या आशीर्वादानं सावकारांनी भरल्या घरात रामराज्य लुटलं! ते मेलं असो, पण मी म्हणते सगळं सगळं सामान कसं विकलंत?

तळीराम : त्यात काय अवघड होतं एवढं! निम्मं सामान विकलं म्हणून गरीब होत चाललो, आणि पुढं गरीब होत चाललो म्हणून बाकीचं निम्मं सामान विकलं!

गीता : चांगला लिहा-वाचायचा नाद होता; पण सारी पुस्तकंसुध्दा विकलीत!

तळीराम : तुला दूरदर्शित्व नाही! हल्लीचं युग विद्यादानाचं आहे, समजलीस? दुष्काळाच्या दिवसांत दानशूर श्रीमंत बाजारभावानं दाणागोटा खरेदी करून गोरगरिबांना स्वस्त्या भावानं विकून टाकतात, त्याबद्दल नाही कुठं हाकाटी होत? त्याचप्रमाणे भरकिमतीला घेतलेली पुस्तकं गरजवंत वाचकांना पडत्या भावानं देणं, याला वाईट कोण म्हणेल? विद्यार्थ्यांना निम्मे दरानं नाटकाला सोडण्यापेक्षा निम्मे दरानं पुस्तकं देणं हेच पुण्याईचं आहे, समजलीस?

गीता : तोंडावर तर सरस्वती बसली आहे तुमच्या! तसबिरासुध्दा घरात ठेवल्या नाहीत. अहो, जन्मदात्या वडिलांची तसबीर, पण तीसुध्दा चार आण्याला विकलीत!

तळीराम : मग यात वडिलांचा नावलौकिक वाढला की कमी झाला? अगं, आजकाल बाजारात शिवाजी,बाजीरावांसारख्या महात्म्यांच्या, फार काय, देवादिकांच्यासुध्दा तसबिरा दोन आण्याला मिळतात. त्याच्यापेक्षा आमचे वडील जास्त होते वाटतं?

गीता : माणसाच्या जन्माला आपले आले आहात एवढंच! सकाळी उठून तुमचं तोंडसुध्दा बघू नये कोणी!

तळीराम : हा, तोंड जास्त चालायला लागलं बरं-

गीता : हो बरं! पुष्कळ भीडमुर्वत धरली तुमची! वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच! अशी मी बोलणारच! करून करून करणार तरी काय तुम्ही?

तळीराम : काय करणार? मजजवळ अशी उधारीची बात नाही! तोंडाला तोंड दिलंस तर तिथल्यातिथं एका तोंडाची दोन तोंडं करून देऊन दामदुपटीनं उसनं फेडीन! अवांतर वाटाघाट ठेव बाजूला आणि चुकूनमाकून एखादा दागिना राहिला असेल तो ठेव आणून पुढं-

गीता : हे एवढं एक मणिमंगळसूत्र राहिलं आहे!

तळीराम : मग तेच दे इकडे. एकटयादुकटया दागिन्याची मिरवणूक काढली म्हणजे आपल्या गरिबीबरोबरच मनाचा हलकेपणाही लोकांच्या नजरेला येतो. सर्वांग सजलेल्या श्रीमंतांच्या ठिकाणी एखाद्या दागिन्याची उणीव चंद्राच्या कलंकाप्रमाणे शोभिवंत दिसते. पण उघडयाबागडया गरिबांना एकच दागिना घातला म्हणजे तो काळया कुळकुळीत अंगावरील पांढ-या कोडासारखा किळसवाणा दिसतो. हे लक्ष्मीचं असलं कोडकौतुक करण्यात काय अर्थ आहे? आण ते मंगळसूत्र इकडे.

गीता : अहो, चारचौघांची, देवाधर्माची, काही तरी चाड ठेवा! तुमच्या नावानं म्हणूनचना हे मंगळसूत्र गळयाशी बांधायचं ते?

तळीराम : सौभाग्यचिन्हासाठी सोन्याचे मणी काही लागत नाहीत. पोत गळयात असली म्हणजे झालं! सौभाग्या, तुझ्या सौभाग्याला मी धक्का लावतो आहे! पोत मागितली? बरं दोर मागितला? तेवढे मणी कुरतडून नेतो म्हणजे झालं! बायकांच्या मंगळसूत्राचा मणी म्हणजे काही जानव्याची ब्रह्मगाठ नव्हे की ती गळयात असलीच पाहिजे अगदी!

गीता : हो एवढं बरीक खरं. तितकं कुठं आहे बायकांचं दैव! जानव्याची ब्रह्मगाठ दाखविली म्हणजे तुमच्यासारखे ब्रह्मराक्षस मानगूट सोडून पळत सुटतात.

तळीराम : हो, बरोबर आहे! मंगळसूत्राचा सोन्याचा मणी दाखविला म्हणजे तोच ब्रह्मराक्षस अशी मानगूट धरतो. (तळीराम मान धरतो व मणी काढू लागतो.)

गीता : देवा! धाव रे धाव!

तळीराम : नवराबायकोच्या एकांतात येण्याची देवाचीसुध्दा ताकद नाही! (मंगळसूत्र तोडून मणी काढू लागतो, गीता रडू लागते.)

प्रवेश तिसरा

(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर, पद्माकर, सिंधू आणि शरद्.)

सिंधू : (राग- मांड-गर्भा; ताल- दादरा. चाल- गोकुलमा लई.) मानस का बधिरावे हे?। बघतसे खिन्न जगता॥ ध्रु.॥ गृहशृंखला या। दृढ बध्द पाया। बल ना भेद तया होता॥ 1 ॥

पद्माकरदादा, अजून माझं मन निघायला घेत नाही.

पद्माकर : सिंधूताई, अगदी नाइलाज झाल्यावाचून मी तरी इतका आग्रह धरला असता का? बाबांनी- स्वत: श्रीमंतांनीसुध्दा, इंदिराबाईंना पुष्कळ सांगून पाहिलं; पण पोरीच्या जातीपुढं इलाज चालेना! दादासाहेब, तुमच्या लग्नात तुम्ही पाहिलंच असेल, श्रीमंतांच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो! इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोरवय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधूताई म्हणजे तिची जिवाभावाची सोबतीण. तेव्हा घेतला हट्ट, की सिंधूताईच पाठराखणी पाहिजे म्हणून! दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट, विधात्यालासुध्दा पुरवावे लागतात, मग यांचा तिहेरी जोर एकवटल्यावर आपल्यासारख्यांची त्रेधा उडाली तर नवल काय? हा, सिंधूताईला लवकर परत पाठवावयाचं मात्र माझ्याकडे लागलं; शिवाय तिच्या वाढत्या जिवाची दगदग सोसायला आमची श्रीमंती तरी कुठं वर आली आहे? शरदिनीबाई, तुमचा ठरलाना विचार यावयाचा?

शरद् : दादा-वहिनी काय ठरवतील ते खरं! दादा, जाऊ ना मी वहिनीच्याबरोबर?

सिंधू : वन्संना एकटयांना इथं ठेवून कसं चालेल? घरात बायकोमाणूस कुणी नाही. बरं, दिवसभर कोर्टात असावं लागणार. शिवाय भाई म्हणावा तोही इथं नाही.

सुधाकर : शरद्ला न्यायलाच पाहिजे. पण भाऊसाहेब, अगदी आजच निघालं पाहिजे का?

पद्माकर : तुम्ही राहा म्हणावं, आणि मी जातो म्हणावं, अशातलं आपलं काही नातं नाही. पण आम्ही गिरण्यांचे मालक म्हणजे लोकांना बाहेरून दिसायला सुखी असतो; पण खरं म्हटलं तर गिरणीचा मालक म्हणजे हजार यंत्रांतलं एक यंत्र असतो. ठरलेली चक्रं घेणं त्याला कधी चुकत नाही. म्हणून म्हणतो मला आजच्या आज निरोप द्या.

सुधाकर : नाही, म्हटलं राहिला असता, तर तेवढेच चार दिवस बोलण्या-चालण्यात गमतीनं गेले असते. भाई गेल्यापासून मोकळेपणानं चार शब्द बोलण्याचं समाधानच नाहीसं झालं आहे.

(राग: देस-खमाज; ताल: त्रिवट. चाल- हा समजपिया मान मोरे.) हे हृदय सुख-विमुख होई। मन खिन्न सतत, भ्रमणनिरत शांती नाही॥ ध्रु.॥ श्वसन मित्र जणु, दुरी तो होता। देही कसे चैतन्य राही॥ 1॥

पद्माकर : काय करावं? अगदी इलाज नाही. शिवाय आमच्याशी बोलण्यानं तुम्हाला काय समाधान होणार? दादासाहेब, केवळ भाईची कृपा म्हणून तुमच्यासारख्या विद्वद्रत्नाचा आम्हाला लाभ झाला. आमची सिंधूताई मोठी भाग्याची! दादासाहेब, तुमच्याबद्दल चारचौघांना सांगताना दुनिया अगदी तुच्छ वाटते. तुमच्याशी बरोबरीनं बोलायची आमच्यासारख्या सजलेल्या मजुरांची लायकी तरी आहे का? खरं म्हणाल तर तुमच्याशी बोलताना माझा जीव अगदी खालवर होत असतो. जरा चुकून एखादा शब्द पडला तर तुमच्या मनाला आमचा रांगडी धक्का लागेल अशी भीती वाटते. बिरबलानं वाघासमोर बांधलेल्या अजापुत्राप्रमाणं मी तुमच्यासमोर अगदी धास्तावल्यासारखा बसलेला असतो. म्हणून तुम्हाला आपलं हात जोडून सांगणं आहे, की आमची आजच रवानगी करा.

सुधाकर : बरं आहे! सिंधू, गीता आहे ना घरात? तिला सांग तळीरामाला बोलावयाला, म्हणजे तो करील व्यवस्था.

पद्माकर : तळीराम म्हणजे तुमचा तो कारकूनच का?

सुधाकर : मनुष्य मोठा चलाख, हुषार आणि जिवाला जीव देणारा आहे.

सिंधू : आणि गीताबाई तर घरच्या माणसाच्या पलीकडे!

पद्माकर : ताई, आता असा बोलण्यात वेळ गमवून कसं चालेल?

सुधाकर : खरंच, राणीसाहेबांच्या जवळून घराचा चार्ज अजून घ्यावयाचा आहे. एकदोन नाही, पण निदान चार महिने तरी मला या बदलीवर राहावं लागणार! कारण हक्काची रजा तुंबता तुंबता जितक्या दिवसांची, तितक्या महिन्यांची-

सिंधू : दादा येवो, बाबा येवोत, मूळस्वभाव जाईना!

सुधाकर : बरं चला-

सिंधू : हो, पण भाईनं सांगितलेलं लक्षात आहे ना? माझ्या जिवाला नाही तर अगदी टांगल्यासारखं होईल. इथं एकटं राहायचं-

सुधाकर : मग एखाद्या बोर्डिंगात ठेवतेस मला? तो रामलाल आहे शहाणा आणि तू आहेस दीडशहाणी! सिंधू, या जगात तुझ्याखेरीज अशी एकही गोष्ट नाही की, जिचा म्हणून या सुधाकराला मोह पडेल-

(राग- बेहाग; ताल- त्रिवट. चाल- टेर सुनीपाये.) वेध तुझा लागे सतत मनी। वसतिच केली नामे वदनी॥ ध्रु.॥ जगत् सकल सखी भासत त्वन्मय। मधुर रूप तव खेळे नयनी॥ 1॥ (सर्व जातात.)

प्रवेश चवथा

(स्थळ : आर्यमदिरामंडळ. पात्रे: शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल,सोन्याबापू सुधारक, यल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी. तळीराम प्रवेश करतो.)

शास्त्री : शाबास तळीराम, किती उशीर केलास यायला? खरं म्हटलं म्हणजे, तू तर सर्वांच्या आधी यायला पाहिजे होतंस. आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस. तुझ्या हातून असा विलंब झाला तरी कसा?

तळीराम : शास्त्रीबुवा, आज विलंब व्हायला तसंच कारण झालं; आज एक इतकी वाईट गोष्ट झाली की विचारू नका!

खुदाबक्ष : मग विचारल्यावाचून सांग!

तळीराम : खुदाबक्ष, खरोखरीच ही थट्टेची गोष्ट नव्हे! आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफांनी सहा महिने रद्द केली.

शास्त्री : दादासाहेब म्हणजे आपले सुधाकरपंत?

तळीराम : हो!

मन्याबापू : सुधाकर इतका शहाणा, सालस, असे असून असं त्याच्याकडून कारण कसं मिळालं?

तळीराम : मन्याबापू, तसे दादासाहेब तुम्ही म्हणता त्यापेक्षाही चांगलेच आहेत. पण त्यांचा स्वभाव फारच तापट आहे.

शास्त्री : तरण्या रक्ताला इतकी उसळी असायचीच.

तळीराम : ते खंरच; पण अलीकडे दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले आहेत.

जनूभाऊ : कारण?

तळीराम : अहो, एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर असतो. आमच्या दादासाहेबांचं बरं इथं कोणालाही बघवत नाही. चारचौघांनी चहूकडून चाव चाव केल्यामुळं ते अगदी चिडल्यासारखे झालेले.

जनूभाऊ : मग मुन्सफांनी मुद्दाम असं केलं म्हणतोस?

तळीराम : छे: छे:, मुन्सफांची तर मुळीच चूक नाही! असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार? झालं काय- कुठल्याशा मुद्दयावर यांचं म्हणणं मुन्सफांना पटेना; दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं; पण नव्या दमात एवढा पोच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. चारचौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं, दादासाहेबांचा सुमार सुटला, अन् मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त, म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीपुरतीच त्यानं सनद रद्द केली; दुसरा कोणी- अहो, मी असतो तरीसुध्दा जन्माचं संसारातून उठविलं असतं! हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय? ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली. त्या बिचा-याला मरणापेक्षा अपेश खोटं असं होऊन गेलं! शेवटी कसं तरी घरी आणून पोचविलं त्यांना; आणखी तडक इकडे निघून आलो. म्हणून वेळ लागला.

शास्त्री : अरे अरे, फार वाईट गोष्ट झाली. बरं, आधीच उशीर झालेला आहे; आता आणखी वेळ नको. करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं?

खुदाबक्ष : हे बघा, कामाला आणखी बैठकीला एकदम सुरुवात होऊ द्या.

तळीराम : ही मी काही टाचणं करून आणली आहेत. ती वाचून दाखवितो म्हणजे झालं. या संस्थेचं नाव 'आर्यमदिरामंडळ' असं ठेवावं.

भगीरथ : आर्यमदिरामंडळ? 'आर्य' शब्दाचा जरा दुरुपयोग नाही का हा? दारूसारख्या निंद्य गोष्टीशी एवढा प्रौढ शब्द जोडणं-

तळीराम : हीच समजूत घालविण्याकरिता ही संस्था काढायची आहे. मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हाच आमचा खटाटोप आहे. इतर बाबतींमध्ये ज्या शब्दाचा उपयोग होतो, तेच शब्द दारूच्या बाबतीत रुळवून टाकले म्हणजे झालं.

भगीरथ : नुसत्या शब्दाशी अशी सलगी केल्यानं मद्यपानाला महत्त्व कसं येणार? मोठमोठाल्या पवित्र गोष्टींच्यासाठीच शोभणारे शब्द असल्या भलत्या गोष्टीत वापरल्यानं त्या गोष्टीची पवित्रता थोडीच कमी होणार आहे! शिमग्यातल्या शिव्यांनी थोरामोठयांची किंमत कमी होत नाही आणि चोरापोरांची किंमत वाढत नाही. बाजारबसव्यांनी साळसूदपणा पत्करला म्हणून पतिव्रतेची पुण्याई कधी ढळते का?

तळीराम : भगीरथ, तुम्ही अगदी अजाण आहात! दारूकडेच इतका वाईटपणा का यावा हो? आम्ही दारू पिणारांनीच आपण होऊन आमचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केली आहे. विडीचा धूर सोडणा-यांना काही पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कुणी रंगवून काढीत नाही; आणि एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आल्याबरोबर लोक लागलीच नाक मुरडायला लागतात. का हो असं? तसा कोणी नेटाचा प्रयत्नच केला नाही. साहेबलोकांत आज काय चाल आहे? समजा, हीच आपली भाऊसाहेब, बापूसाहेब यांच्यासारखी मोठाली माणसं उद्या मनमोकळया धिटाईनं, भरदिवसा दारू पिऊन व्याख्यानांतून किंवा सभांतून मिरवू लागली, सरकारदरबारातून वावरू लागली, म्हणजे चोहोंकडे हाच शिरस्ता पडत जाईल. दिवसेंदिवस चहाप्रमाणे दारूचंही काहीच वाटेनासं होणार आहे! म्हणून म्हणतो की, 'आर्यमदिरामंडळ' हेच नाव उत्तम आहे.

खुदाबक्ष : शाबास तळीराम, तू एक और मनुष्य आहेस.

शास्त्री : हं, पुढे चला.

तळीराम : आता मंडळाचे उद्देश थोडक्यात म्हणजे असे की, मंडळाचा प्रत्येक सभासद रोज दारू पिणारा पाहिजे. आपण दारू पितो हे प्रत्येकानं चारचौघात बोलून दाखवलं पाहिजे. अहोरात्र मंडळात खाण्यापिण्याची सोय तयार ठेवायची. मांसाहाराला ही सभा उत्तेजन देत आहे.

मगन : पण देशी दारू प्यायला हरकत नाही ना?

खुदाबक्ष : हा गुजराथी कंगाल मोठा कंजूष आहे.

मन्याबापू : खांसाहेब, असं का म्हणता? सर्वांचीही सोय झाली पाहिजे.

जनुभाऊ : बरोबर आहे, गोरगरिबानं काय करावं? दारिद्र्याच्या प्रसंगी स्वदेशीकडे साहजिकच सर्वांचं लक्ष लागतं.

तळीराम : झालं, अवांतर काही गोष्टी आहेत. साडेआठ एकदा वाजून गेले म्हणजे गरजवंताला स्टेशनावर रात्री अपरात्री धावावं लागतं.

सोन्याबापू : आणि तीसुध्दा सगळयाच स्टेशनवरून सोय असतेच असं नाही. शाळूच्या शेतात तुरीची पेरणी करावी तशीअधूनमधून काही स्टेशनं सोयीची आहेत. दारूची मेल प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही.

मगन : आणि शिवाय मेलगाडीप्रमाणं दर भारी! अडल्या वेळी भलत्या भावानं घ्यावी लागते.

तळीराम : म्हणून हे मंडळ सरकारला सारख्या विनवण्या करीत राहणार की, हा साडेआठाचा कायदा मोडून सर्रास दुकाने अहोरात्र उघडी ठेवावी.

शास्त्री : तसंच मी म्हणतो, दुकानाला परवान्याची आडकाठी का असावी?

भाऊसाहेब : मंडळी, काय सांगावं! आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो, तिथं वाण्याच्या दुकानी, कापडवाल्याच्या दुकानी हे खातं असायचंच.

बापूसाहेब : पोर्तुगीज सरकारचं एकंदरीनं धोरणच उदार!

तळीराम : हळूहळू मंडळ या सा-या गोष्टी घडवून आणणार. अहो, माझ्या डोक्यात अजून फार कल्पना आहेत. आमच्या भगीरथांसारख्या नवशिक्यांना वासाचा मोठा बाऊ वाटतो. तेव्हा बिनधुराची लढाईची दारू निघाली आहे, तशी बिनवासाची प्यायची दारू शोधून काढण्यासाठी मंडळातर्फे शिष्यवृत्त्या देऊन परदेशात विद्यार्थीसुध्दा पाठवून द्यावयाचे म्हणतो मी. तसंच प्रत्येक सभासदानं नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा प्रसार जारीनं सुरू केला पाहिजे.

शास्त्री : हो, हो, फारच महत्त्वाचं कलम आहे. कारण अलीकडे पाहावं तो सगळया समाजात, एकंदरीनंच व्यसन सोडण्याचं खूळ सुरू झालं आहे. अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुध्दा खायचा नाही असाच विडा उचलला; या प्रकाराला आपण आळा घातला पाहिजे.

तळीराम : आता वेळ फार झाला आहे. म्हणून चिटणीस, खजिनदार वगैरे निवडणं पुढच्या बैठकीवर टाकू. आत खाण्यापिण्याची तयारी झाली आहे. हो, खांसाहेब, तुमचा दो हुसेन भटयारी आणणार होता ना तुम्ही?

शास्त्री : खरं आहे बुवा! सूपशास्त्रात असा सांप्रदायिक मनुष्यच पाहिजे. 'तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे!'

खुदाबक्ष : ठीक आहे, सर्वांना ही योजना पसंत असल्यास हात वरती करावे. (सर्व हात वरती करतात.)

शास्त्री : सर्व एका हातावर तयार आहेत.

तळीराम : सर्व?

सगळेजण : सर्व!

(पडदा पडतो.)

प्रवेश पाचवा

(स्थळ : सुधाकराचे घर. पात्रे: सुधाकर व तळीराम.)

सुधाकर : (स्वगत) चोवीस तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसताहेत! काही सुचत नाही, काही नाही.

(राग- तिलंग; ताल-आडा-चौताल. चाल- रघुबिरके चरन.) जड बधिर हृदय शिर, भयकर मतिसंकर। तनुदहनहि खर॥ ध्रु.॥ नारकहुताशन। दाह का घोर। जळी वा प्रलयकर-। रविकिरणनिकर॥ 1॥ (मेजावर डोके ठेवून पडतो.)

तळीराम : (येऊन) दादासाहेब!

सुधाकर : तळीराम, मला काही सुचेनासं झालं आहे.

तळीराम : दादासाहेब, अशा आपत्ती या संसारात यायच्याच!

सुधाकर : तळीराम, अशा आपत्तींची मी पर्वा करतो असं का तुला वाटतं! मला ही अपमानाची आपत्ती सहन होत नाही! हलकटांनी हेटाळणी करावी, लब्धप्रतिष्ठितांनी छी: थू करावी, आपल्या वै-यांनी समाधानानं हसावं! तळीराम, माँ कुबेराची संपत्ती लाथेनं झुगारून दिली असती, आणखी पुन्हा हातानं ओढून आणली असती! पण या अपमानाच्या जाचण्या सहन होत नाहीत.

तळीराम : उद्या चार दिवसांनी या गोष्टीचा विसर पडून-

सुधाकर : विसर? ती गोष्टच विसर! प्राण जाईपर्यंत या सर्पदंशाच्या वेदना चालू राहाणार! नाही रे ... नुसती आग भडकून तळमळ चालली आहे! आत्महत्या ही नामर्दपणाची गोष्ट म्हणून म्हणतात... शिवाय आत्महत्येनं मी देहरूपानं सिंधूला अंतरेन ... तिच्या त्या दु:खाची कल्पना तर ... तळीराम शरीराचा नाश केल्यावाचून मरणाची जोड देणारं एखादं विष नाही का?

तळीराम : असं विष नाही, पण असं एक अमृत मात्र आहे! दादासाहेब, मी तेवढयासाठीच आलो आहे. तुम्ही चारचौघांच्या समजुती उराशी धरून बसणारे नाही आहात- स्वतंत्र बाण्याचे आहात! नुसत्या बोभाटयानं तुम्ही भिणार नाही, म्हणून तुमच्याशी बोलण्याचा मी धीर करतो. या तुमच्या दु:खाचा थोडा तरी विसर पडावा अशी तुमची इच्छा असेल तर त्याला इलाज आहे! तुम्ही रागावणार नाही? सांगू मी तो इलाज?

सुधाकर : सांग, काय वाटेल तो इलाज सांग!

तळीराम : तुम्ही थोडी दारू घेऊन स्वस्थ पडून राहा.

सुधाकर : काय दारू? तळीराम-

तळीराम : हो दारूच! इतकं दचकण्याचं काही कारण नाही! व्यसन म्हणून दारू अति भयंकर आणि निंद्य आहे हे मलाही कबूल आहे. पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे आणि तीसुध्दा अगदी किती अगदी थोडी! एवढीशी घेतल्याने सवय लागेल अशी नादानपणाची धास्ती आपल्याला वाटायचं काही कारण नाही.

सुधाकर : छे: छे:, सवय वगैरेचा बागूलबोवा मला मुळीच पटत नाही! लौकिकदृष्टयासुध्दा माझं सर्वसाक्षी मन मला साक्ष देत राहील की, हे काही मी चैनीखातर करीत नाही. सिंधू, रामलाल, यांची समजूत- जाऊ देत- जरा आराम खात्रीनं वाटेल ना?

तळीराम : अगदी खात्रीनं.

सुधाकर : मग आण- मी काही अशा दुबळया मनाचा नाही की, मला तिची सवय लागेल. सर्वांची समजूत मला घालता येईल, पण माझी स्वत:ची समजूत मला मात्र या वेळी घालता येत नाही. चल, आण कुठं आहे ती? या यमयातना घडीभर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.

तळीराम : मी घेऊनच आलो आहे बरोबर- ही घ्या. (पेला भरू लागतो.)

सुधाकर : अरे, उगीच जास्त मात्र भरू नकोस.

तळीराम : छे, छे, अगदी थोडी! ही एवढीच- फक्त- एकच प्याला! (सुधाकर पिऊ लागतो. पडदा पडतो.)

अंक पहिला समाप्त.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED