मात - भाग १० Ketakee द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मात - भाग १०

रेवतीचे आई -बाबा फारच काळजीत पडले होते..

काळजाचा तुकडा असा स्वतःहून विहिरीत पडतोय हे बघून त्याला ते आपल्या डोळ्यांदेखत विहिरीत कसे पडू देणार होते.. रेवतीच्या बाबांचा विरोध होता.. ते रेवतीला म्हणले “भावुकता एकीकडे आणि वास्तविकता एकीकडे.. संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.. मी तुला हा असला वेडेपणा करू देणार नाही..”

पण रेवती कोणाचेच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. त्यामुळे हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न रेवतीच्या बाबांनी ठरविले..

त्यांनी सुहासला घरी बोलावून घेतले.. एकांतात त्याच्याशी बोलायचे होते त्यांना.. त्यांची काळजी सुहासच्या लक्षात आली होती..

तो ही तेच म्हणाला “ती अजिबात ऐकत नाही आहे.. मी तिला माझ्या पासून तोडण्याचा खूप प्रयत्न केला.. पण ती काही ऐकत नाही.. यावर काय उपाय करावा कळेना..”

सुहास आणि रेवतीचे बाबा बराच वेळ विचार करत होते.. पण रेवतीच्या निर्णयाने दोघांची पुरती कोंडी झाली होती.. सुहास आणि प्रतीक त्यामुळेच तिला सुहासपासून तोडण्याचा.. वेगळ्या पद्धतीने तिच्या नकळत प्रयत्न करत होते.. पण तोही फसला होता..

सुहासच्या डोक्यात अचानक वीज चमकावी तसा विचार चमकून गेला.. ती कल्पना त्याने रेवतीच्या वडिलांना बोलून दाखविली..

“आत्ता फक्त साखरपुडा करायचा.. तोही अगदी घरगुती छोटासा.. रेवतीच्या समाधानासाठी.. जास्त गाजावाजा करायचा नाही जेणेकरून या गोष्टीची फार चर्चा होणार नाही.. रेवती कदाचित साखरपुडा मोठा करू म्हणेल..  तेव्हा तिला लग्न थाटामाटात गाजतवाजत करायचे असे सांगता येईल.. आपण वडीलधारे आणि अनुभवी आहात.. आपण विचार करावा.. आपल्या निर्णयानंतरच काय ते पुढे ठरविता येईल.."

किमोथेरपी आणि इतर उपचारांनंतर बरा होऊन तो घरी आल्यावर लग्न.. तिच्या बाबांना ही हा विचार पटला..

सुहासनेच हे रेवतीला सांगयाचे असे ठरले..

सुहास नि रेवती बाहेर भेटले.. त्याने तिला विचार बोलून दाखविला..

अपेक्षेप्रमाणेच सुरुवातीला तिला काही पटेना.. मग सुहासने त्याला कशी लग्नाची दगदग सहन होणार नाही आणि त्याला करायचे म्हणून लग्न करायचे नाही तर ते थाटामाटात करायचे आहे असे सांगितले..

मग ती थोडी निवळली आणि तयार झाली..

सुहासने ही आपल्या घरी सांगितले.. त्याच्या आईला थोडा संशय आलाच होता.. पण बाबांना अजिबात माहीत नव्हते.. म्हणून त्यांनी विचार करायला वेळ घेतला. त्याच्या घरून फार विरोध झाला नाही.. पण तिला आणि तिच्या घरच्यांना तुझ्या आजराची कल्पना आहे ना असे त्याच्या आई-बाबांनी विचारले..

सुहासने त्याचे आणि रेवतीच्या बाबांचे संभाषण सविस्तरपणे त्याच्या आई-बाबांना सांगितले..

"तिलाही आणि तिच्या घरच्यांना ही.. तिला माहीत आहे.. तिने तिच्या घरी सांगितलेले आहे आणि मी देखील तिच्या बाबांना भेटलो आहे आणि आत्ता फक्त साखरपुडा करायचा आहे.. बरे झालो तर लग्न..”

सुहास बोलून गेला खरे पण त्याच्या आई- बाबांचे डोळे पाणावले.

दोघांच्या आई-बाबांच्या भेटीगाठी झाल्या.. ठरल्याप्रमाणे अतिशय साधेपणाने आणि घरगुती लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा आनंदात पार पडला..

आता रेवती हक्काने त्याच्या बरोबर हॉस्पिटलमधे जाऊ शकत होती.. तासन तास ती हॉस्पिटल मधे बसून राहायची.. किमोथेरपी नंतर त्याला बरोबर घरी नेऊन सोडत होती.. अशीच दैनंदिनी चालू होती..

किमोथेरपीमुळे सुहासची तब्बेत खालावत चालली होती.. डोक्यावरचे केस उडाले सगळे.. अगदी त्याच्या कडे बघवत नव्हते..

असे असले तरीही किमोथेरपीला सुहासचे शरीर चांगला प्रतिसाद देत होते आणि डॉक्टरांना थोडी सकारात्मक चिन्हे दिसू लागली होती.. आशा वाटू लागली होती.. १०% पासून आता ४०% पर्यंत सुहासच्या जगण्याची आशा वाढली होती..

किमोथेरपीचे आजचे शेवटचे सेशन करून सुहास बाहेर आला.. डॉक्टरांनी त्याला सकारात्मक ऊर्जा दिली की प्रतिसाद खूप चांगला आहे सुहास तुझा.. आता औषधे वेळेवर घे आणि मला दोन दिवसांनी दाखवायला ये..

हे सगळे ऐकून सुहासच्या ही मनात जगण्याची थोडी आशा पल्लवित झाली होती..