Ramacha shela..- 1 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 1

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

१. अभागिनी

सरला आपल्या खोलीत रडत बसे. या जगात आपल्याला कोणी नाही असे तिला सदैव वाटे. आणि खरोखरच तिला कोण होते? आई नाही म्हणजे कोणी नाही. आईची उणीव कशाने तरी भरून येणे शक्य आहे का? किती झाले तरी आई ती आई. सरला आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली. तिचे वडील होते; परंतु ते कठोर स्वभावाचे होते. सरलेशी प्रेमाने ते कधी बोलत नसत. का बरे असे? आईपेक्षा पिता जरी कठोर असला तरी त्याचे का मुलांवर प्रेम नसते? बाहेरून दिसले नाही तरी पित्याच्या अंतरंगात का ओलावा नसतो? बाहेरच्या व्यवहारी जगात सदैव वागावे लागत असल्यामुळे पुरूषांची मने का कठोर होतात? काही असो. विश्वासरावांचे सरलेवर प्रेम नव्हते ही गोष्ट खरी. निदान तसे दिसत तरी असे.

सरला विश्वासरावांचे पहिले अपत्य. तिच्या पाठीवर झालेले एकही मूल जगले नाही. सरलेला ना भाऊ ना बहीण. आणि सरलेची आईही शेवटी एका बाळंतपणातच वारली. सरस्वतीबाई सरलेला सोडून गेल्या. मरताना त्या पतीला म्हणाल्या, ‘तुम्ही पुन्हा लग्न करा. सरला लहान. स्वत:चे हाल नका करू.’

परंतु काही वर्षे विश्वासराव तसेच राहिले. त्यांचे संसारातून लक्ष जणू उडाले. त्यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्याचे कारण दाखवून लवकरच पेन्शन घेतली. आणि पुण्याला एक लहानसा बंगला बांधून तेथे ते राहिले. सरला व विश्वासराव दोनच माणसे. बंगल्यात बि-हाडाला जागा ते देत नसत. माणसांचा जणू त्यांना तिटकारा असे. त्यांना कोणी मित्रही नव्हता. आप्तेष्टही कधी कोणी येत नसे. बंगल्याभोवती फुले फुलवण्याचा त्यांना विलक्षण नाद. त्यातच त्यांची सकाळ-सायंकाळ जाई. फुलांकडे ते पाहात राहायचे. तर्‍हेतर्‍हेची सुंदर फुले, शोभेची फुले, सुगंधी फुले. रस्त्यातून जाणारे-येणारेही त्या फुलांकडे पाहात राहात. कमानीवरील फुलवेलीकडे पाहात राहात.

विश्वासराव फुलांची काळजी घेत. परंतु सरलेची काळजी घेत नसत. फुले किती हळुवारपणे ते फुलवीत. परंतु सरलेशी ते कठोरपणे वागत. ते फुलांशी बोलत, त्यांना कुरवाळीत; परंतु सरलेशी ते प्रेमाने बोलत नसत, तिला कधी जवळ घेत नसत. तिच्या केसांवरून वात्सल्याचा हात फिरवीत नसत. ते तिला जेवू-खाऊ घालीत. तिला कपडेलत्ते पुरवीत. शाळेत पाठवीत. पुस्तके देत. परंतु प्रेम देत नसत. सरलेला प्रेमाशिवाय सारे काही मिळत असे.

एखाद्या वेळेस ती जर फुलझाडांना पाणी घालू लागली तरी विश्वासराव रागावत.

“तू नकोस पाणी घालू.’ ते म्हणत.

“का हो बाबा?’ ती खिन्नतेने विचारी.

“तू पाणी घातलेस तर ती फुले मरतील. ती झाडे सुकून जातील.’

“माझे हात का विषारी आहेत?’

“असे एखाद्या वेळेस वाटते.’

“मग तोडून टाका हे हात ! मारून टाका मला !’

“ते देवाच्या हाती.’

सरला आपल्या खोलीत जाऊन रडत बसे. ती हातात चाकू घेई. परंतु बोटे तोडण्याचे तिला धैर्य होत नसे. एखाद्या वेळेस पित्याच्या नकळत ती त्या फुलांजवळ जाई, त्यांच्यावरून हात फिरवी, फुले सुकून जातात की काय ते ती पाही. परंतु फुले सुकून जात नसत. ती आनंदी दिसत, नाचत, डोलत. सरलेचे मुखपुष्प पाहून जणू त्या फुलांना आनंद होई. परंतु सरलेला रडू येई. तिच्या डोळयांतील पाणी फुलांवर पडे. ती फुले कावरीबावरी होत.

सरलेच्या फार मैत्रिणीही नव्हत्या. तिचा स्वभाव घुमा झाला होता. मनाचा मोकळेपणा नाहीसा झाला होता. ती कधी कधी एकटीच फिरायला जात असे. एकटीच टेकडीवर जाऊन बसत असे. एकटीच कालव्याच्या काठी बसत असे. बाभळीची ती सुंदर पिवळी फुले तिला फार आवडत. त्याचा मंद वास तिला आवडे. ती मनात म्हणे, ‘या काटेरी बाभळीसही अशी सुंदर सुकुमार फुले यावीत. परंतु माणसांची मने कठोर का असावीत?’

एखाद्या वेळेस तिला घरी यायला उशीर झाला तर पिता रागे भरे. एके दिवशी तर ती बर्‍याच उशिराने आली.

“सिनेमाला गेली होतीस की काय’

“नाही.’

“मग एवढा वेळ कोठे होतीस?’

“कालव्याच्या काठी बसले होते.’

“एकटीच?’

“दुसरे कोण आहे मला?’

“तेथे बसून काय करीत होतीस?’

“आईला आठवीत होते, रडत होते.’

“घरात नाही वाटते रडता येत?’

“रडायलाही तुमची भीती वाटते.’

“उद्यापासून उशीर झाला तर बघ. या घरात राहायचे असेल तर आठाच्या आत फिरून आलेच पाहिजे.’

असे दिवस जात होते. परंतु अकस्मात विश्वासरावांनी पुन्हा लग्न केले. एका गतधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. बंगल्यात नवीन माणूस आले. रमाबाई आनंदी होत्या. सरलेजवळ त्या पुष्कळ बोलत. प्रथम प्रथम त्यांनी पुष्कळ प्रेमही दाखविले. सरलेच्या केसांत त्या फुले घालीत. त्या तिला सिनेमाला घेऊन जात. सरला जरा सुखी दिसू लागली. विश्वासरावही सरलेशी प्रेमाने बोलू लागले.

“सरले ये पाणी घालायला.’

“फुले सुकतील हो बाबा.’

“आता नाही सुकणार.’

“का बरे?’

“असे वाटते खरे.’

सरला पाणी घाली. तिचे हृदय आनंदाने भरुन येई. तिची आंतरिक फुलबागही फुलू लागली. तेथे आत्तापर्यंत केवळ उजाड ओसाड रान होते. तेथे सुखाचे, स्नेहाचे, केवळ भावनांचे मळे फुलू लागले. जीवनात आनंद व सुगंध आला.

घरात आता फोनोग्राफ आला होता. सरला सुंदर सुंदर प्लेटी लावी. रमाबाई झोपाळयावर बसून ऐकत.

“आई, आता कोणती लावू?’

“तुला आवडेल ती लाव.’

“मला सार्‍याच आवडतात.’

“मलाही.’

असे संवाद चालत.

कधी कधी रमाबाई व सरला दोघी फिरावयाला जात. एके दिवशी दोघी कालव्याच्या काठी बसल्या होत्या आणि एकाएकी सरलेचे डोळे भरून आले.

“काय ग झाले, सरले? रडतेसशी?’

‘मला एक आठवण आली.’

‘कशाची?’

‘येथे अशीच मी एकदा बसले होते. आईची आठवण आली होती. मला कोणी नाही असे वाटत होते. मी किती वेळ बसले त्याचे भानही नाही राहिले. उशिरा घरी गेले. बाबा रागावले. ते सारे पुन्हा आठवले.’

‘पूस डोळे. वेडी कुठली ! आता मी आहे ना तुला?’

‘तुम्ही कराल माझ्यावर प्रेम? कराल का माया? मी तुम्हाला आई म्हणते. व्हाल ना माझी आई? तुम्ही प्रेम करता म्हणून बाबाही करू लागले आहेत. ते पूर्वी मला फुलझाडांसही पाणी घालू देत नसत. म्हणत की ती झाडे सुकतील. आई, माझे हात का असे पापी आहेत? बघ ना.’

रमाबाईंनी सरलेचे हात प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी आपल्या पदराने तिचे डोळे पुसले.

‘मी देईन हो तुला प्रेम. मी होईन तुझी आई. सावत्र नव्हे तर सख्खी आई. इतके दिवस तू एकटी होतीस; आता एकटी नाहीस. हसत जा. रडत नको जाऊस. समजलीस ना?’

आणि जवळ असणार्‍या मळयातल्या आम्रवृक्षावरील कोकिळा कुऊ करून ओरडली. सरला आनंदली. तीही कूऊ कूऊ करू लागली. कोकिळा चिडली; ती रागाने कूऊ करू लागली.

‘कशी चिडून ओरडते आहे?’ रमाबाई म्हणाल्या.

‘पशुपक्ष्यांनासुध्दा समजते. त्यांना रागलोभ समजतात नाही आई?’

‘चल आता जाऊ.’

‘ही कोकिळा काय म्हणते आई?’

‘मला नाही माहीत.’

‘मला आहे माहीत.’

‘सांग.’

‘ती म्हणते, ‘प्रेम, कुठे आहे प्रेम? कूऊ, कूऊ, कुऊ, प्रेम, कुठे आहे प्रेम? कूऊ कूऊ’ असे ती विचारीत आहे.’

‘तू तिला काय उत्तर देशील.’

‘आहे, माझ्या आईजवळ प्रेम आहे. या नव्या आईजवळ प्रेम आहे.’

‘वेडी आहेस तू. चल घरी जाऊ.’

रमाबाईचे प्रेम मिळाल्यापासून सरलेच्या जीवनात फरक पडला. ती नाचू-खेळू लागली, वर्गातील मुलींशी बोलू लागली. त्यांना खाऊ देऊ लागली. ती कधी कधी फराळाचे नेई, इतर मुलींना देई. तिच्या हृदयाचे दार आजपर्यंत जणू बंद होते, हृदयातील झर्‍याच्या तोंडावर जणू दगड होता, परंतु आता दार उघडले होते. झ-याच्या तोंडावरचा दगड दूर झाला होता, दबलेल्या प्रेमळ, कोमल भावना वाहू लागल्या. पिंजर्‍यातील पक्षी मोकळा होऊन नाचू-गाऊ लागला.

रमाबाईंना आता काही दिवस गेले होते.

‘सरले, तुला भाऊ हवा की बहीण?’ विश्वासरावांनी विचारले.

‘भाऊ. बहिणीला भाऊ.’

आणि खरोखरच भाऊ झाला. रमाबाईंना मुलगा झाला. प्रसूतिसदनातून त्या नव्या बाळासह सुखरूप घरी आल्या. सरला बाळाला आंदुळी. त्याला गाणी म्हणे. ओव्या म्हणे. तिचा आनंद आता गगनात मावत नसे. सर्वांपेक्षा ती सुखी होती, आनंदी होती. हा भाऊ जगो, या भावाला आयुष्य कमी न पडो, असे ती सारखी प्रार्थी.

परंतु ती प्रार्थना देवाने ऐकली नाही.

बाळ आजारी पडला, तापाने फणफणला. सरलेच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. ती बाळाजवळ बसून राही. परंतु एके दिवशी वज्राघात झाला. तिचा जीव कासावीस झाला.

‘तू बाळाला हात नको लावूस. तू त्याला घेत असे, खेळवीत असे म्हणून तर तो नाही ना आजारी पडला? खरंच का तुझे हात विषारी आहेत? नको बाई. खरेच नको त्याच्याजवळ तू बसूस. बाळाचे दुखण जिवावरचे दिसते.’ रमाबाई म्हणाल्या.

‘आई, खरेच का नको हात लावू?’

‘खरेच नको. तेसुध्दा असेच म्हणाले.’

सरला ओक्साबोक्सी रडू लागली. तिला हुंदका आवरेना. ती आपल्या खोलीत गेली. खाटेवर पडून राहिली. अश्रू संपत ना. ‘देवा, माझे आयुष्य बाळाला दे. मला अभागिनीला कशाला वाचवितोस? अशी कशी मी? माझा स्पर्श, माझा श्वास जणू विषारी आहे. माझी दृष्टी विषारी आहे. अरेरे ! अशी कशी मी? देवा, ने रे माझे प्राण. बाळाचे वाचव.’ असे ती स्फुंदत स्फुंदत म्हणत होती.
बाळाचे दुखणे त्या दिवशी अधिक होते. ती काळरात्र होती. विश्वासराव व रमाबाई बसून होती. सरला आपल्या खोलीतून डोकावून बघे. बाळाच्या जवळ जाऊन बसावे असे शतदा तिच्या मनात आले. परंतु पुन्हा निराश होऊन ती खाटेवर जाऊन पडे. शेवटी तिने धैर्य केले. ती बाळाजवळ गेली.

‘बाबा बसू का जवळ? मी नाही हो वाईट. माझ्या स्पर्शाने फुले सुकत नाहीत. बसू का बाळाजवळ? बसू का माझ्या भावाजवळ? आई बसू का?’

‘तुझ्या पाठीवरचे एकही भावंड वाचले नाही. माझी आईही गेली. हा बाळही आजारी पडला. नको. तू जा. सरले, खरेच जा.’ विश्वासराव म्हणाले.

‘बाबा, मी तेवढी वाईट आणि तुम्ही सारे चांगले वाटते? माझे पाप मारीत असेल तर तुमचे पुण्य का नाही कोणाला तारीत?’

‘तू जा. बाळ घुटमळत आहे. मरणाच्या दारात आहे. येथे वाद घालायला काही वाटत नाही का तुला? जा म्हणतो ना. जा.’ विश्वासराव तीव्र स्वराने म्हणाले.

सरला गेली. आणि थोडया वेळाने बाळही देवाघरी गेला. घरातला आनंद पार मावळला. आता सरलेशी कोणी बोलत नसे. अश्रू फक्त तिचे मित्र होते.

सरला मॅट्रिक पास झाली. पुढे काय?

‘बाबा मला शिकायची इच्छा आहे.’

‘शिकणे पुरे. तुझे लग्न ठरवीत आहे.’

‘माझे लग्न?’

‘हो.’

‘ते कशाला बाबा? मी दुर्दैवी आहे. मी विषारी आहे. एका घराण्याचा मी सत्यानाश करीत आहे. आणखी दुस-या घराण्याचा सत्यानाश कशाला करू? नको. बाबा लग्न नको. माझे विद्येशी लग्न लावा. ज्ञानाशी लग्न लावा. मला नको दुसरा सखा, नको कोणी जिवाचा सोबती. बाबा, लग्नाचा विचार मी माझ्या मनातून कधीच काढून टाकला आहे. एवढे तरी माझे ऐका.’

‘मी ठरवले आहे लग्न. लग्नाशिवाय राहणे बरे नव्हे. केवळ विद्येशी व ज्ञानाशी लग्न लावून भागत नसते. तू या घरात विषवल्ली असशील; कदाचित दुसर्‍याच्या घरी अमृतवल्ली होशील.’

आणि सरलेचे लग्न झाले.

“सरले !”

“काय?”

“तू पुन्हा लग्न कर. लग्न झाले नाही असे समज. तू दु:खी नको राहूस. सुखाचा संसार कर. माझी आज्ञा आहे. माझी प्रार्थना आहे कबूल कर.”

सरला सासरी गेली. तरुण सुंदर पती; परंतु लग्न होऊन पंधराही दिवस झाले नाहीत तोच पती आजारी पडला. घरातील गोडधोड अद्याप शिल्लक होते. लग्नातील लाडू-करंज्या अद्याप होत्या. तोच पती मरणशय्येवर पडला. सरला देवाला रात्रंदिवस आळवीत होती. पतीजवळ ती बसून होती.

रात्रीची वेळ होती. सासूसासरे जरा पडले होते. सर्व झोपली होती. सरला पतीजवळ बसली होती. पती वातात होता. सरला पतीच्या कानात म्हणाली, ‘माझे आयुष्य तुम्ही घ्या. तुमचे मरण मला द्या.’ पतीने डोळे उघडले. भ्रामकपणाने त्याने तिच्याकडे पाहिले. पुन्हा तो डोळे मिटून पडला. काही वेळाने त्याने हाक मारली,

“काय कबूल करू ?”

“करीन पुन्हा लग्न असे मला सांग. म्हणजे मी सुखाने मरेन. माझे प्राण घुटमळत आहेत.”

सरला रडू लागली. पती पुन्हा वातात गेला. सासूसासरे आले व तेही जवळ बसले. रात्र संपत आली. आयुष्यही संपत आले. सरलेचा पती देवाघरी गेला.

दुर्दैवी सरला माहेरी आली.

सरला आपल्या खोलीच्या बाहेर पडत नसे. मरता येईना म्हणून दोन घास ती खाई. रमाबाई नाही नाही ते तिला बोलत. ‘जाईल तेथे मेली मसणवटी करील. पांढर्‍या पायाची अवदसा कुठली ! सरलेच्या कानांवर ते निखारे पडत. परंतु सर्व गोष्टींची आता तिला सवयच झाली होती.

“बाबा माझे सारे आयुष्य मी कसे दवडू? मला आणखी शिकवा तरी.”

“कर्व्यांच्या कॉलेजात जाशील?”

“वाटेल तेथे जाईन. शिकवा म्हणजे झाले.” आणि सरला महिला महाविद्यालयात जाऊ लागली. पुस्तकांत पुन्हा रमली. आपले दु:ख विसरू लागली. परंतु विसरण्यासारखे ते दु:ख नव्हते. कधी कधी तिला आपले सारे जीवन आठवे. आणि एखाद्या वेळेस तिचे डोळे अकस्मात भरून येत. ती बाहेर उठून जाई. शोकावेग आवरून ती वर्गात पुन्हा येऊन बसे.

त्या दिवशी रविवार होता. आज पर्वतीच्या बाजूस ती एकटीच फिरावयाला गेली होती, आणि पर्वतीच्या पायथ्याखालच्या कालव्याच्या काठाने ती जात होती आणि एके ठिकाणी बसली. तीच ती पूर्वीची जागा. तेथेच ती एकदा खूप वेळ बसली होती. तेथेच रमाबाई व ती दोघी एकदा बसल्या होत्या. मी तुला सख्ख्या आईचे प्रेम देईन असे त्या म्हणाल्या होत्या. कोठे आहे ते प्रेम? आईचे प्रेम ते जगात कुठे मिळेल, कोण देईल? सरला तेथे आजही रडत बसली होती.

तो पाहा एक तरुण मुलगा. कॉलेजमधला विद्यार्थी दिसतो. तोही एकटाच फिरायला आला आहे. त्यालाही का कोणी मित्र नाहीत? तोही का दु:खी आहे? सरलेचे लक्ष नाही. परंतु त्या तरूणाचे तिच्याकडे लक्ष आहे. सरलेचे अश्रू तो पाहात आहे. त्याला वाईट वाटत आहे. त्या बाभळीच्या झाडाखाली तो उभा आहे.

सायंकाळचा प्रकाशही कमी होत आला. कालव्याचे पाणी काळसर दिसू लागले. आजूबाजूस गंभीर भीषण शांतता होती. आणि पुन्हा एकदा सरलेला हुंदका आला. तेथे एक दगड होता. सरलेने दु:खावेगाने त्या दगडावर जोराने डोके आपटले. ती पुन्हा डोके आपटणार तो, तो तरुण विद्युतवेगाने तेथे धावून आला. त्याने तिचे डोके धरले. त्यातून रक्त येत होते.

“कोण?”

“मी.”

“फोडा हो हे डोके ! मरू दे मला ! धरा व जोराने या दगडावर आपटा. मला तितक्या जोराने आपटता येईना. मरावेसे तर वाटते; परंतु धैर्य नाही

“का असे करता दु:ख? हे पहा रक्त घळघळत आहे. माझा हा रूमाल बांधतो.”

त्याने रक्त पुसले. रूमालाची पट्टी करून ती पाण्याने भिजवून त्या जखमेवर त्याने बांधली. तो तेथे जवळ बसला. कोणी बोलत नव्हते. रात्र होऊ लागली. अंधार पडू लागला.

“तुम्ही कोठे राहता? चला. मी तुम्हाला पोचवतो. पुढे टांगा भेटला तर करू. घरी का त्रास आहे? तुम्ही किती वेळ रडत होतात. मी पाहात होतो. अश्रू पुसायला आधी आलो नाही. संकोच वाटे. परंतु तुम्ही डोके फोडू लागल्यावर थांबवेना. संकोच गेला. मी धावत आलो. क्षमा करा. राग नका मानू. कोणते तुम्हाला आहे दु:ख? तुम्हाला का कोणी प्रेमाचे नाही?”

“काय सांगू? मी एक अभागिनी आहे. माझी आई मेली. माझी सारी भावंडे मेली. पती मेला. मी सर्वांचा संहार करणारी आहे. बाबा मला विषवल्ली म्हणतात. सावत्र आई मला पांढ-या पायांची म्हणते. सासूसासरे मला परत घरी घेत नाहीत. मी येथे बाबांकडे आहे. परंतु कोण आहे मला? मला कोणी नाही ! सहानुभूती, प्रेम, ओलावा, दया, गोड शब्द, सर्वांना मी पारखी आहे. मी वाईट आहे. अरेरे ! देवाने मला जिवंत का ठेवावे? तुम्ही जा. तुमच्यावर माझी विषारी सावली पडेल. तुमचाही सत्यानाश होईल. जा पळा.”

“तुम्ही निराश आहात. असे एखाद्याच्या पायगुणाने मरण येत नसते. असल्या भोळसट कल्पना आज कोणी मानील? आम्ही सुशिक्षित तरूण तरी अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही तरी कारण होते. मरण येते. शरीरात बिघाड होतो, रोग होतो व प्राण जातात. कोणाच्या पायगुणाचा संबंध? तो पहा एक मुंगळा तुमच्या पदरावर. तो काही तुमच्या स्पर्शाने मेला नाही. हा मुंगळा मरत नाही, मग माणसे का मरावी? सारा वेडेपणा आहे. असे नका मनात आणू. दु:खामुळे, अज्ञानामुळे कोणी तसे म्हणत असतील. तुम्ही ते मनावर नका घेत जाऊ. त्यांच्या अज्ञानाची कीव करा.”

“कीव करण्यासारखी माझीच स्थिती आहे. त्यांचे बोलणे मी मनावर घेतले नाही. एवढयाने काय होणार? एवढयाने काय परिस्थितीत फेर पडणार आहे? त्यांचे प्रेम, त्यांची सहानुभूती थोडीच मिळणार आहे? मी घरीदारी बहिष्कृत आहे. सर्वांकडून माझा तिरस्कार होतो. मी कोणासही नको. जीवन कसे कंठावे, कसे जगावे? ज्याला सुखवायला कोणी नाही; ज्याला धीर द्यायला, प्रेम द्यायला कोणी नाही, ज्याचे अश्रू पुसायला कोणी नाही, ज्याला सहानुभूती दाखवायला कोणी नाही, ज्याला आधार नाही, कोठे विसावा नाही, ज्याला पाहून कोणाला आनंद होत नाही अशा माणसाने कशाच्या जोरावर जगावे? हे उदास जीवन त्याला कसे सहन होईल? खरे ना? तुम्ही जा. मी एकटी घरी जाईन. मी एक अभागिनी आहे. माझे दु:ख व मी; माझी निराशा व मी; माझे अश्रू आणि मी; दुसरे कोणी नको माझ्याबरोबर. खरेच जा. का घुटमळता? तुम्हाला माझी दया येते? तुम्हाला माझ्याविषयी सहानुभूती वाटते? छे: शक्य नाही. आणि काही वाटत असले तरी ते क्षणभर. माझी नवी आई माझ्यावर प्रेम दाखवू लागली होती. मी सुखी होऊ लागले होते. परंतु ते प्रेम आळवावरचे पाणी ठरले. आता नको कुणाचे प्रेम. मागून अधिकच निराशा पदरी येते. हे काय? तुमचे डोळे भरून आले? पुरुष ना तुम्ही? जा. खरेच जा. पुसा डोळे. हा घ्या माझा रूमाल. पुसा. माझ्यासाठी नका रडू. जिच्यासाठी कोणी रडावे अशी नाही हो मी. तुमचे अश्रू मला मिळावेत इतकी भाग्यवान मी नाही. माझे रक्त तुम्ही पुसलेत; तुमचे अश्रू मी पुसू? पण नको, हे हात विषारी आहेत. तुमच्या डोळयांना त्यांचा स्पर्श नको. जा खरेच जा. माझा विचार सोडा. जिच्या दुर्दैवाला अंत नाही अशी पराकाष्टेची मी अभागिनी आहे.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED