Ramacha shela..- 10 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 10

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

१०. आजोबा नातू

सरलेचा पत्ता नव्हता. तिने खरोखरीच जीव दिला की काय? आणि तिचा उदय, त्यानेही जीव दिला असेल का? विश्वासराव एकटे बसले म्हणजे त्यांच्या मनात हे विचार सारखे येत. एके दिवशी रात्री ते उठले. त्यांना अलीकडे झोप फारशी येत नसेच. ते गच्चीत बसले होते. विचार करीत होते. त्यांना तेथे समोर कोणी दिसत का होते? ते टक लावून पाहात होते. कोण होते तेथे? त्यांना तेथे सरलेची आई दिसत होती. सरलेला तिने पोटाशी घेतले होते. माता मुलीचे अश्रू पुशीत होती. विश्वासरावांकडे बघून ती नुसती दु:खाने मान हलवी. सरलेची काय दशा केलीत असे जणू सुचवी. विश्वासराव उठले. त्यांनी डोळे मिटून घेतले. पुन्हा सभोवती पाहिले. सारा भास ! ते मोठयाने हसले. परंतु पुन्हा गंभीर झाले. कोणी तरी अगदी जवळ येऊन आपणास स्पर्श करणार असे त्यांना वाटले. ते थरकले, चरकले. ते मागे सरले. ते घाबरले. ते खाली गेले. खाटेवर पडले. त्यांनी डोक्यावर पांघरूण घेतले. परंतु मनातील भुते दिसल्याशिवाय का राहतील? डोळयांवरून दहा पांघरूणे घेतलीत तरी ती दिसायचीच.

“उठता ना? चहा तयार आहे.” रमाबाई म्हणाल्या.

“किती वाजले?”

“साडेसात वाजतील. निजायचे तरी किती? लोक हसतील ! बाळसुध्दा कधीच उठला.”

“मला रात्रभर झोप नाही आली. पहाटे जरा डोळा लागला.”

“का बरे?”

“आपल्या मुलीचे, तिच्या पतीचे प्राण घेणार्‍यास का झोप येईल? मी तीन खून केले आहेत. सरला, तिचा उदय व सरलेच्या पोटातील बाळ. अरेरे ! कशी येईल झोप? रात्री मला सरला व तिची आई सारखी दिसत होती. तिने सरलेला जवळ घेतले होते. सरलेचे अश्रू ती पुशीत होती. आणि माझ्याकडे पाहून मान हलवीत होती. काय केलेत असे जणू सुचवीत होती.”

“सारे मनाचे खेळ ! उठा.”

विश्वासराव उठले. त्यांनी शौचमुखमार्जन केले. त्यांनी चहा घेतला. बाळ हसत होता. खेळत होता. माता कौतुक करीत होती. “कसा खेळतो आहे ! पाय कसे नाचवीत आहे ! बघा तरी ! लबाड कुठला ! लौकर उठायला हवे ! चांगले झोपायचे तो उठला !”

“रमा, मी जरा बाहेर जाऊन येतो.”

“कोठे जाता? त्या झाडांना पाणी घाला. सुकून चालली फुलझाडे. अलीकडे तुमचे लक्षच नाही कशात. तुमची चर्याही काळवंडलेली दिसते.”

“खरेच ही फुलझाडे सुकून चालली. मला वाटे, सरलेने पाणी घातले तरच ती सुकतील. मी तिला पाणी घालू देत नसे. मी वेडा आहे. पाणी कोणी का घालीना, पाणी मिळाले म्हणजे झाले. झाडे वाढतात. मी बरेच दिवसात पाणी घातलेच नाही. रमा, चार दिवस पाणी मिळाले नाही तो झाडे बघ कशी दिसू लागली ! कोमेजली ! आणि सरलेला सार्‍या जीवनात प्रेमाचा शब्द मिळाला नाही. मी तिला विषवल्ली म्हणायचा. तिचे मन किती करपून गेले असेल ! तिचे हृदय कसे सुकून गेले असेल ! जळून गेले असेल; नाही?”

“खरेच ही फुलझाडे सुकून चालली. मला वाटे, सरलेने पाणी घातले तरच ती सुकतील. मी तिला पाणी घालू देत नसे. मी वेडा आहे. पाणी कोणी का घालीना, पाणी मिळाले म्हणजे झाले. झाडे वाढतात. मी बरेच दिवसात पाणी घातलेच नाही. रमा, चार दिवस पाणी मिळाले नाही तो झाडे बघ कशी दिसू लागली ! कोमेजली ! आणि सरलेला सार्‍या जीवनात प्रेमाचा शब्द मिळाला नाही. मी तिला विषवल्ली म्हणायचा. तिचे मन किती करपून गेले असेल ! तिचे हृदय कसे सुकून गेले असेल ! जळून गेले असेल; नाही?”

“खरेच विषवल्ली होती तुमची सरला. माझे बाळ तिनेच खाल्ले. या बाळाला कधी हात लावू दिला नाही. घरातून तिची धिंडका कोठे गेली ते बरे झाले. बाळ माझा वाचेल. मोठा होईल. शताउक्षी होईल. होय ना रे राजा? बघा, हसला. त्याला सारे समजते.”

विश्वासराव उठले. ते झाडांना पाणी घालत होते. त्यांनी फुलझाडांकडे प्रेमाने पाहिले. झाडांना टवटवी आली. काही फुले फुलली होती. विश्वासराव तेथे विचार करीत उभे होते. सरलेने केसात कधीच फुले घातली नाहीत. मी तिला दोन फुले कधी दिली नाहीत. परंतु पती नसलेल्या मुलींनी का केसात फुले घालायची? परंतु का नाही मी तिचे पुन्हा लग्न करून दिले? का नाही खटपट केली? “बाबा,” कसे दवडू सारे आयुष्य?” असे ती विचारायची. परंतु मी माझ्याच सनातनीपणात ! मी स्वत: लग्न केले. पुन्हा नवा संसार मांडला. आणि ती अभागिनी ! अरेरे ! विश्वासराव त्या फुलांकडे, फुलझाडांकडे पाहात होते. ती फुलझाडे आज त्यांची गुरू झाली होती. इतके दिवस विश्वासराव का त्या झाडांकडे पाहात नसत? परंतु त्या फुलांची भाषा त्यांना आज समजली. वेळ यावी लागते. सारी सृष्टी संदेश देत आहे. परंतु तो संदेश सर्वांना ऐकू येत नाही. ती दृष्टी यावी लागते. ती एकदा आली की अणुरेणू आपला गुरू होतो. आज सरलेच्या खोलीत विश्वासराव गेले होते. खोलीत तिची पुस्तके होती. वह्या होत्या. तिची गादी होती. पांघरूण होते. सारे तेथे होते. तिने जाताना फार काही नेले नव्हते. विश्वासराव ती पुस्तके चाळीत होते. त्यांनी तिच्या वह्या चाळल्या. हे काय आहे एका वहीत? विश्वासराव वाचू लागले. असे वाचावे का? दुसर्‍याचे वाचू नये. आपले कितीही कोणावर प्रेम असले तरी काही गोष्टी अशा असतात की त्या आपण आपल्याजवळच राखू इच्छितो. आपल्या हृदयात असा एक एकान्त असतो, की जेथे फक्त आपणच असतो; फक्त आपणच तेथे असावे असे वाटते. असलाच तर दुसरा परमेश्वर तेथेच असतो. आणि आपली सदसद्दविवेक बुध्दी असते. विश्वासराव, तुम्ही सरलेचे वडील असाल. परंतु तिचे वाचण्याला तुम्हाला अधिकार नाही. आणि तुमच्यासारख्या कठोर पित्याला तर नाहीच नाही. अपरंपार प्रेम करावे व मग दुसर्‍याचे वाचले तर ते थोडे क्षम्य तरी आहे. कारण प्रेमाला द्वैत सहन होत नाही. प्रेम अद्वैत अनुभवू इच्छिते. प्रेमाला दुजेपणा, परकेपणा कसा रुचेल? विश्वासराव, तुमचे आहे का प्रेम? हो आहे. आज तुमचे हृदय कोमल झाले आहे. इतक्या दिवसांत तुम्ही सरलेच्या खोलीत कधी आले नव्हतेत. आज आलेत. तुम्ही सरलेच्या खोलीत नाही आलेत; जणू तिच्याकडे आलेत प्रेमाने तिची वास्तपुस्त घ्यायला, तिचे अश्रू पुसायला, तिच्या केसांवरून हात फिरवायला. होय ना? परंतु कोठे आहे सरला? तिची ती पुस्तके तेथे आहेत. त्या वह्या आहेत बघा ती पुस्तके, बघा त्या वह्या. आज तुम्हाला थोडा अधिकार आहे. वाचा काय आहे तेथे लिहिलेले? प्रेमपत्र का? पवित्र प्रेमपत्र ! काय आहे त्या प्रेमपत्रात? किती वेळ वाचता? अजून नाही संपले? विश्वासरावांच्या डोळयांतून दोन अश्रू घळघळले. तेथील लिहिलेले वाचून का त्यांचे हृदय द्रवले? काय होते तेथे लिहिलेले? मोठे काव्यमय का ते पत्र होते? छे ! तेथे पत्र असे नव्हतेच. मग काय होते? विश्वासराव तर वाचीत आहेत. तेथे एकच शब्द होता. तो एकच शब्द पुन:पुन्हा लिहिलेला होता. इंग्रजीत लिहिलेला होता, मराठीत लिहिलेला होता. लहान अक्षरात लिहिलेला होता. मोठया अक्षरात लिहिलेला होता. त्या एका शब्दाभोवती सरला जणू नाचत होती. त्या एका शब्दाभोवती ती आपल्या भावना गुंफीत होती. त्या एका शब्दाला ती पूजीत होती, नटवीत होती. तो एक शब्द म्हणजे तिचे सरे परब्रम्ह होते. योगीजनांना, वेदान्त्यांना ॐ मध्ये ज्याप्रमाणे सारे विश्वरूप दिसते, त्याप्रमाणे त्या एका शब्दात सरलेचे विश्व होते. पाहा तरी तो शब्द ! किती तर्‍हेतर्‍हेने तिने तो लिहिलेला आहे. कधी कोरून लिहिलेला, कधी नक्षीत लिहिलेला एकच शब्द; परंतु शेकडो रीतीने तेथे चितारलेला होता. कोणता शब्द? तुम्ही ओळखलात? नाही ना? मी सांगू? उदय ! उदय ! उदय हा शब्द तेथे शेकडो वेळा, शेकडो पध्दतींनी लिहिलेला होता. उदय, उदय ! सर्वत्र पानांवर तो एकच शब्द. वर-खाली सर्वत्र त्याच शब्दाचा जयजयकार ! स्वत:च्या जीवनात ओतप्रोत भरलेल्या उदयला सरला जणू कागदावर चितारीत होती. स्वत:मध्ये तिला सर्वत्र उदय दिसत होता. त्यामुळे बाहेरही ती त्यालाच पाहू इच्छीत होती. त्या एका शब्दात तिची सारी शास्त्रे होती, साहित्य होते. त्या एका शब्दात तिचे सारे काव्य होते. उदय, उदय असे तेथे लिहिताना सरलेची जणू समाधी लागली असेल. तिची बोटे थरथरली असतील, डोळे चमकले असतील. तो शब्द लिहिताना ती हसली असेल, रडली असेल, तो लिहिताना तिने पदर सरसावला असेल, उचंबळणार्‍या हृदयाला धरून ठेवले असेल; नाही?

आपण पुष्कळ वेळा एकटे असलो म्हणजे काही तरी उगीच लिहीत असतो. जवळ कागद असावा, एखादे जुने कार्ड असावे, पेन्सिल असावी, दौतटाक असावा आणि आपण तेथे काही तरी लिहितो. पुष्कळदा आपण आपलेच नाव तेथे पुन:पुन्हा लिहीत असतो, आपलाच पत्ता लिहीत असतो. जणू आपल्याशिवाय कोणी नाही ! आपण कोणाला स्मरतो, कोणावर प्रेम करतो ते अशा बारीकशा गोष्टीवरूनही दिसून येते. जो केवळ स्वत:चेच नाव लिहीत बसेल, त्याचे फक्त स्वत:वरच जणू प्रेम असेल, सर्वांत अधिक प्रेम त्याचे स्वत:वर असेल. अशा साध्या प्रसंगी आपले मन सहजपणे प्रकट होत असते. कधी कधी आपण आपले नाव आधी लिहितो. मग शेजारी आपल्या मित्राचे वा भावाबहिणीचे लिहितो. हळूहळू आपली सारी प्रिय मंडळी तेथे येऊन उभी राहतात. गंमत असते. म्हणून आपण त्या साध्या नामलेखनातही अर्थ पाहतो. आपण कधी मित्राकडे गेलो व त्याच्या टेबलावर असे खरडलेले चिटोरे सापडले तर त्यात आपले नाव लिहिलेले आहे का, ते आपण पाहतो. त्या अहेतुक नामलेखनात आपले नाव दिसले तर आपणास आनंद होतो. दिसले नाही तर आपण खट्टू होतो. कधी आपण तुरुंगात असलो तर तेथील भिंतीवर आपण प्रिय मित्रांची नावे लिहितो. किती हळुवारपणाने ती लिहितो ! आणि त्या नावांकडे पाहात राहतो. आणि कोणी पाहिले तर लाजतो. हृदयातील प्रेम कधी, कुठे, कशा स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही.

विश्वासराव ! वाचा तो एक शब्द ! ज्या उदयवर तुम्ही आग पाखडलीत, ज्याला शिव्या दिल्यात, त्याचेच ते नाव. सरला त्या नावाचा जप करी. त्या शब्दातली जादू आज तुम्हांला कळेल. त्या शब्दाची तुम्ही आपल्या अश्रुपुष्पांनी आज पूजा करा.

विश्वासरावांनी त्या वह्या, ती पुस्तके नीट ठेवली. ती त्यांनी झटकली, त्यांच्यावरची धूळ त्यांनी पुसली. त्या खोलीत ते फिरू लागले. येरझारा करू लागले. तिकडे बाळ रडत होता. त्यांचे लक्ष नव्हते. रमाबाई बाळाला घेऊन वर आल्या.

“जरा घ्या तरी याला. रडतो आहे. तुम्हाला ऐकू नाही का येत? घ्या.”

“आण इकडे.”

“त्या खोलीत नको. इकडे या. सरलेच्या खोलीत नाही त्याला घ्यायचा.”

विश्वासरावांना वाईट वाटले. परंतु तो द्वेष त्यांनीच नाही का पत्नीलाही शिकविला? ते खोलीबाहेर आले. त्यांनी बाळाला घेतले. ते त्याला खेळवू लागले. रमाबाई खाली गेल्या. स्वयंपाकपाणी करू लागल्या.

असे दिवस जात होते. परंतु एक दिवस बाळाला बरे वाटत नव्हते. तो सारखी किरकिर करीत होता. तसे पडसे नव्हते, ताप नव्हता. परंतु तोंड सुकून गेल्यासारखे दिसत होते. तो रडत होता. आंदुळले तरी राहीना, पायावर घेऊन डोलावले तरी राहीना. काय झाले त्याला? कोणाची दृष्ट पडली? पोट का दुखते त्याचे? लहान मूल. नाही सांगता येत, बोलता येत. रमाबाईंनी त्याचे पोट शेकले. तेल चोळले. परंतु बाळ राहून राहून रडू लागे.

आता सायंकाळ झाली. रमाबाईंनी मीठमोहर्‍या काढल्या. विश्वासरावांनी रामरक्षा म्हणून त्याला अंगारा लावला. परंतु बाळ रडतच होता. रडून रडून त्याचा घसा बसला. परंतु रडणे थांबेना.

आता रात्र झाली. बाहेर अंधार होता. कृष्णपक्ष होता. चांदणे नव्हते. विश्वासराव बाळाला घेऊन गच्चीत गेले. तेथे त्याला घेऊन ते हिंडत होते. थोडया वेळाने तेथे लहानशी गादी घालून त्यावर त्यांनी बाळाला ठेवले. बाळ वर आकाशाकडे पाहात होता. आणि हळूहळू त्याचे रडणे थांबले. सारखी टक लावून ते मूल आकाशाकडे पाहात होते. ते चमकणारे सुंदर तारे ! त्यांच्याकडे तो बाळ बघत होता. तो मुठी नाचवू लागला. पाय नाचवू लागला. आणि पाहा किती हसतो आहे ! कोठे रे गेले सारे रडणे? आणि आता झोप नाही का तुला येत? सार्‍या दिवसात निजला नाहीस. नीज जरा. परंतु नाही. डोळयांवर नीज नाही. सारखी वर तार्‍यांकडे हसरी दृष्टी. रमाबाई वर आल्या.

“राहिले वाटते रडू? बघा खेळतो आहे ! झोप नाही का येत? ये मांडीवर नीज.” असे म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतले. प्यायला घेतले. तो बाळ पुन्हा रडू लागला.

“काय रे झाले राजा ! नको का दूध? आज थेंबभरसुध्दा प्यायला नाहीस. का रे नाही तोंड लावीत?”

“त्याला ठेव खाली. गादीवर खेळू दे.”

आणि काय आश्चर्य ! गादीवर ठेवताच ते मूल पुन्हा हसू लागले. ते आईबापांकडे पाहात नव्हते. टक लावून सारखे आकाशाकडे पाहात होते. ते अनंत तारे जणू त्याच्याजवळ बोलत होते. त्याच्याजवळ ते हसत-खेळत होते. बाळाला झोप नाही. सारखा वर बघे नि हसे. त्या विशाल सृष्टीकडे ते लहान लेकरू बघत होते. काय वाटत होते त्याला? का इतका आनंद? का हे हास्य? क्षुधातृषा सारी हरपली. झोप उडाली. केवळ अपार आनंद ! त्या लहानग्याच्या हृदयात तो आनंद जणू मावत नव्हता. तो आनंद उतू जात होता. त्याच्या नाचणार्‍या मुठींतून, प्रेमळ डोळयांतून, ओठांवरील हास्यातून तो आनंद बाहेर उसळत होता.

दहा वाजले, आकरा वाजले, बारा वाजले, बाळ झोपला नाही.

“मी त्याला खाली नेत्ये. पाळण्यात घालत्ये. जरा झोपला तर बरा.” असे म्हणून रमाबाईंनी त्याला उचलले व खाली नेले. परंतु एकदम लेकरू ओक्साबोक्सी रडू लागले. मातेने लक्ष दिले नाही. ती त्याला तशीच आंदुळीत होती. गाणी म्हणत होती. ओव्या म्हणत होती. परंतु बाळाचे रडणे सुरू. माता रडकुंडीस आली. तिने त्याला प्यायला घेतले. ते तोंड लावीना. काय करायचे? ती त्याला पुन्हा वर गच्चीत घेऊन आली. गार वारा सुटला होता. थंडी होती. थंडीचेच दिसत होते. गुरंगटून त्या गादीवर ठेवताच बाळाचे रडे थांबले. त्या मुलाला खालच्या भिंती का आवडत नव्हत्या? त्या संकुचित खोलीतील सृष्टी का रूचत नव्हती? विशाल विश्वाशी का एकरूप व्हायची त्याला इच्छा होती? ना बंधन, ना मर्यादा. सभोवती मोकळा वारा, वर मोकळे अनंत आकाश, नि ते अनंत तारे ! निर्मळ सतेज ! खालच्या घरात, त्या खोल्यांत का क्षुद्रता भरलेली होती? तेथे का द्वेषमत्सर होते? संकुचितपणा होता? त्या बाळाला विशाल जीवनाची, निर्मळ जीवनाची का भूक होती? कोणाला माहीत !

बाळ हसत होता. सारखी वर टक लावलेली. रमाबाई रडू लागल्या. विश्वासराव खिन्न होते. मूल हसत असता, खेळत असता ते आईबाप का बरे खिन्न? मूल हसत असताना आईबाप का रडतात? लहान मुलाचे हास्य पाहून रडणारे रडे विसरतात. आणि येथे असे का उलटे?

“बाळाचे लक्षण काही ठीक नाही.” रमाबाई म्हणाल्या.

“त्याला कसला एवढा आनंद होत आहे?”

“काही कळत नाही. दिवसभर रड रड रडला. आता सारखा हसत आहे. हा का हर्षवायू? काय आहे हे? डॉक्टरला तरी बोलवा.”

“त्याला खरेच आनंद वाटत असेल. बघू दे देवाचे तारे. तू वाटले तर पड जरा.”

“मला का झोप येईल?”

“मग बस.”

आईबाप तेथे बसले होते. पहाटेची वेळ होत आली. ठळक ठळक तारे गंभीर दिसत होते. प्रशांत दिसत होते. बागेतील फुले फुलली होती. मंद सुगंध येत होता. आणि बाळाने सभोवती पाहिले. आईकडे पाहिले. बाबांकडे पाहिले.

“काय रे राजा, झोप नाही का येत?” आईने विचारले. आईच्या बोटाशी बाळ खेळत होता. वर बघत होता. हसत होता. विश्वासरावांनी खाली वाकून त्याचा मुका घेतला. बाळाने आनंदाने उसळी मारली.

आणखी थोडा वेळ गेला. बाळाने पुन्हा सारखी वर टक लावली. तारे कमी कमी होत चालले. आणि बाळाचे हसणे मंद मंद होऊ लागले. त्याचे डोळे जणू दमले. ते मिटू लागले. झोप का येणार सोन्याला? हळूहळू ती नेत्रकमले मिटली. बागेत फुले फुलत होती. झाडांवरून पाखरे उडू लागली होती. सूर्योदय होत होता. सृष्टीची निद्रा दूर होत होती. सर्वत्र जागृती येत होती. आणि बाळ? बाळ झोपला. शांतपणे झोपला !

“झोप का हो लागली?” रमाबाईंनी विचारले.

“असे वाटते.” ते म्हणाले.

“हळूच नेऊ का खाली? ठेवू का पाळण्यात? येथे गारठला असेल. रात्रभर येथे थंडीत होता. अंगाभोवती पांघरूण टिकू देत नव्हता. सारखे हातपाय नाचवी. नेऊ का खाली?

“नको. पुन्हा जागा व्हायचा. रडू लागायचा. मी येथे बसतो. येथेच पांघरूणात निजू दे. तू जा. जरा पड.”

“का हो, बाळ अगदी शांत दिसतो आहे नाही? त्याची छाती वरखाली का बरे नाही होत? जरा बघा ना वाकून.”

विश्वासरावांनी खाली वाकून पाहिले. श्वास नाही का? त्यांनी नाडी पाहिली. काही कळेना. ही क्षणिक निद्रा की चिरनिद्रा?

“काय हो, नीट नाही का लक्षण? बोलत का नाही तुम्ही?”

“मी डॉक्टरला बोलावतो.”

“मी केव्हापासून सांगते आहे की, डॉक्टरला बोलवा म्हणून. जा आधी. उठा.”

विश्वासराव निमूटपणे उठले. ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरने पाहिले. सारा खेळ खलास झाला होता.

“डॉक्टर, काय आहे?”

“संपले !”

“अरेरे ! असे कसे हो झाले !” रमाबाईंनी हंबरडा फोडला. डॉक्टर निघून गेले. रमाबाई बाळाला पोटाशी धरीत होत्या. जणू त्याला जिवंत करू पाहात होत्या. विश्वासरावांच्या डोळयांतही पाणी आले. असे कसे हे मरण? त्यांना त्या मरणाची अपूर्वता वाटत होती. त्या दु:खातही ते विचार करीत होते.

“रमा, रडू नको. बाळ पुण्यवंत होता. जणू तुटलेला पवित्र तारा. पुन्हा वर गेला. त्याच्या पुण्यवंत आत्म्याला येथली हवा जणू मानवेना. उगी, रडू नको. आपल्या घरात प्रेम नाही म्हणून का बाळ गेला? येथे सरला नाही म्हणून का बाळ गेला?”

“काढू नका त्या सरलेचे नाव. ती जेथे जेथे राहील तेथे तेथे स्मशान होणार !”

घरात उदास खिन्नता होती. विश्वासरावांनी बाळ नेले. भूमातेच्या कुशीत बाळ झोपला. विश्वासराव घरी आले. कोणी आज बोलत नव्हते. विश्वासराव सरलेच्या खोलीत बसले होते. रमाबाई बाळाची खेळणी, आंगडी-टोपडी पाहून अश्रू ढाळीत होत्या.

काही दिवस गेले. आणि रमाबाई आजारी पडल्या. विश्वासराव शुश्रूषा करीत होते. परंतु बरे होण्याचे चिन्ह दिसेना.

“बाळाकडे मी जात्ये.”

“आणि मी काय करू?”

“तुम्ही तुमच्या सरलेकडे जा. अलीकडे सारखे सरला सरला म्हणत असता. जा तिच्याकडे !”

“रमा, मरताना तरी कोणाचे वाईट नको चिंतूस. आपली पापे आपणाला छळीत आहेत. सरलेचा काय दोष? जगात का मरण नाही? सगळयांकडे का सरला आहे? आणि सरला आज आठ महिने घरात नाही. तरी मरण आलेच ना? बाळाला सरलेचा हात लागू नये म्हणून आपण जपत होतो. तरी मृत्यूचा हात आलाच ! आपण मूर्ख आहोत. सरलेला उगीच बोललो. उगीच तिचे हृदय आपण दुखवले. तिला छळले. तिला रडवले. तिच्याजवळ प्रेमाचा शब्द कधी बोललो नाही. सरलेच्या आईला काय बरे वाटत असेल? आणि तुझी दोन मुले गेली. जणू सरला त्यांना घ्यायला नाही म्हणून गेली. सरला असती तर तुझी बाळे जाती ना.”

“सरलेच्या पाठची तिची भावंडे का गेली? तिची आई का मेली?”

“त्यात सरलेचा काय दोष? कोणाच्या माथी मारायचाच असेल, तर तो माझ्या माथी मी का नये लादू? मीच करंटा, अभागी, असे मी का म्हणू नये? खरे ना? सरलेला नको नावे ठेवूस. कोठे असेल ती? तिने का खरेच जीव दिला असेल? तिच्या उदयनेही का जीव दिला असेल? अरेरे ! त्या सार्‍या हत्त्या आपल्या शिरावर आहेत.”

“असे चोरटे संबंध ठेवायला काही वाटले नाही त्यांना?”

“अग, सरला तरी माणूसच ना? मीच तिचे पुन्हा नको होते का लग्न लावायला? आणि कोणा तरूणाचे तिच्यावर प्रेम बसले व तिचे त्याच्यावर बसले तर त्यांचे हात एकमेकांच्या हातात देणे हे माझे नव्हते का कर्तव्य?”

“त्यांनी तसे सांगायला नको होते का?”

“सरला भ्यायली. आपले तिच्यावर प्रेम नव्हते. ती कसे सांगणार? तिने सांगितले नाही याचाही आपल्यालाच दोष. आपण प्रेमाने तिच्याजवळ वागलो असतो तर तिने सारे सांगितले असते. परंतु बिचारी निमूटपणे घरातून गेली. कोठे गेली?”

“पाणी द्या मला. घशाला कोरड लागली आहे.”

“देतो हां.”

विश्वासरावांनी पाणी दिले. रमाबाई डोळे मिटून पडून होत्या. असे दिवस जात होते. आणि अखेरचा दिवस आला. तिसरे प्रहरापासूनच रमाबाईचे जरा अधिक दिसत होते. त्या विश्वासरावांकडे बघत व डोळे मिटीत. शेवटी त्यांचा हात हातात घेऊन म्हणाल्या,

“भेटेल हो तुमची सरला. सारी सुखरूप आहेत. ती पहा मला दिसत आहेत. सरला, तिचा बाळ, उदय, सारी दिसत आहेत ! ती येथे परत येतील. घर गजबजेल, रडू नका. सरलेला सांगा की, मी तिची क्षमा मागितली आहे. हो, खरेच येईल सरला !”

“परंतु तू, तुझा बाळ जिवंत असता आली असती तर?”

“या सार्‍या मरणांनीच देव तुम्हाला-मला शिकवू इच्छीत आहे. आपले डोळे उघडायला या सर्व मरणांची जणू जरूर होती.”

“सरला. तिचा उदय कोठे भेटणार? ती हे जग सोडून कधीच गेली असतील ! तूही चाललीस ! बाळ गेला ! मीच कपाळकरंटा कशाला राहू ! मलाही मरू दे. येऊ दे तुमच्या पाठोपाठ. वर देवाच्या घरी एकत्र राहू.”

“तुम्ही जगा. सरला येईल. मरणार्‍याचे शब्द खरे होतात. सर्वांच्या वतीने क्षमा मागायला जगा. माझ्या वतीनेही तिला प्रेम द्या. तिच्या बाळाचे माझ्या वतीने पापे घ्या. हो, येतील ती. तुम्ही नका मरू.”

रमाबाईंना बोलवेना. त्या शांत पडून होत्या. त्यांची वाणी आता थांबली. डोळे मधून मधून उघडत. आणि शेवटची वेळ आली. रमाबाईंनी पतीच्या मांडीवर राम म्हटला.

ते घर आता भयाण दिसे. घरात कोणाचा आवाज असा नाही. विश्वासराव असून नसल्यासारखे. त्यांना खाणेपिणे काही रूचेना. कसे तरी जगत होते. सर्वांच्या मरणाच्या स्मृतींनी ते घर भरलेले होते. सर्वत्र मृत्यूच्या आठवणी ! तेथे बाळाची खेळणी, सरलेची पुस्तके, रमाबाईंच्या वस्तू ! काही पाहिले तरी कोणाची आठवण येई. सारे घर जणू बोलत होते. घरातील प्रत्येक वस्तू बोलकी होती. प्रत्येक वस्तू म्हणजे इतिहास होता. शोकमय इतिहास !

एके दिवशी सरलेच्या वह्या विश्वासराव चाळीत होते. चाळता चाळता एके ठिकाणी ते थबकले. काय होते तेथे लिहिलेले? एकाक्षरी प्रेमपत्र का? नाही. मग काय होते? ते एक अपूर्ण आत्मगत लेखन होते.

“मी पंढरपूरला जाऊ का? घेतील का तेथे मला? का तेही हाकलतील? जिला आईबाप हाकलून देतात, तिला जगाने का हाकलू नये? उदय, कोठे रे मी जाऊ? बाबांना कसे सांगू? तुझे-माझे प्रेम का पाप? अरेरे...

असा तो मजकूर होता. त्या लिहिण्यावर डोळयांतील पाणी पडलेले होते. तेथे डाग पडले होते. विश्वासराव त्या मजकुराकडे बघत राहिले. त्यांच्या मनात थोडी आशा आली. “सरला पंढरपूरला गेली असणे शक्य आहे. परंतु इतके दिवस का ती तेथे असेल? चौकशी करावी का? स्वत: जाऊन यावे का?” असे विचार त्यांच्या मनात आले. नाही तरी घरात त्यांचे लक्ष नसेच. घर जसे त्यांना खायला येई. यावे पंढरपूरला जाऊन. पांडुरंगाचेही दर्शन होईल, चंद्रभागेचे दर्शन होईल, असे त्यांनी ठरविले. आणि एके दिवशी पंढरपूरला जायला ते निघाले. जाण्याआधी त्यांनी फुलझाडांना, फळझाडांना भरपूर पाणी घातले. दोनचार दिवस त्यांना कोण पाणी घालणार? म्हणून ते घालून ठेवीत होते. त्यांनी सरलेची काही पुस्तके बरोबर घेतली. ती वही घेतली, जीत तो मजकूर होता. मीच सरलेचा बाप असे सिध्द करण्यासाठी जणू त्या वस्तू त्यांनी घेतल्या होत्या. घरात एक चांदीचे भांडे होते. सरलेचे तिच्यावर नाव होते. सरलेची आई जिवंत असताना तिच्या एका वाढदिवसाचे वेळेस ते भांडे आणण्यात आले होते. ते भांडेही त्यांनी बरोबर घेतले. ते निघाले, स्टेशनवर गेले. सोलापूरकडच्या गाडीत ते बसले. आणि कुर्डूवाडीस उतरून ते पंढरपूरला आले.

गाडीत एक भटजी भेटला. पंढरपूरच्या बडव्यांपैकीच तो होता. त्याच्याकडे ते उतरले. त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. देवाला नैवेद्य केला. ते भटजीस म्हणाले, “आता पाहण्यासारखे काय?”

“सारे झाले पाहून. गोपाळपुराही पाहिला. जनाबाईंची वाकळ पाहिली. आता काही राहिले नाही.”

“येथे एक अनाथ स्त्रियांची संस्था आहे ना?”

“तेथे कशाला जाता? तेथे काय पाहण्यासारखे आहे?”

“यावे जाऊन. ती संस्था खरे धर्मकार्य करीत आहे. अनाथ मुलांना वाढवीत आहे. परित्यक्त व अगतिक भगिनींना आधार देत आहे. हे देवाचे कार्य आहे. ती संस्था पाहिली पाहिजे. पंढरपूरला येऊन ती संस्था न पाहणे म्हणजे पाप आहे. माझ्या मते पतितपावन पांडुरंग जर खरोखर कोठे असेल तर तो तेथे आहे.”

“तुम्ही या जाऊन. मी तेथे येणार नाही. तुम्हांला एक टांगा करून देतो.” भटजींनी एक टांगा करून आणला.

“यांना ती बायकांची संस्था दाखवून परत येथे घेऊन ये. तेथे जरा थांबावे लागले तरी थांब.” असे त्यांनी टांगेवाल्यास सांगितले. विश्वासराव टांग्यात बसून गेले. ती संस्था आली. ते कचेरीत गेले. व्यवस्थापक तेथे होते. कुशल प्रश्नोत्तरे झाली. व्यवस्थापकांनी संस्थेची माहिती दिली. नवीन वर्षाचा अहवाल दिला.

“जरा हिंडून दाखवा सारे.”

“हो, चला. मुलांची व्यवस्था ठेवावी लागते. मोठे काम. पैसे हवेत. अनाथ मुले. ही कशी नीट वाढणार? यांचे उद्या शिक्षण कसे होणार? ज्यांची मने मोठी आहेत त्यांनी एखादे मूल आपल्या घरी न्यावे. त्याला प्रेमाने वाढवावे. तो खरा धर्म आहे. नाही का?”
बोलत बोलत व्यवस्थापकांबरोबर विश्वासराव हिंडत होते. तेथे त्या परित्यक्ता माता होत्या. कोणी रडत होत्या, कोणी उदासपणे पडून होत्या. आणि विश्वासरावांनी ती मुले पाहिली. देवाची लेकरे ! मुले पाहता पाहता एका मुलावर त्यांची दृष्टी खिळली. लहान मूल. असेल सहा-सात महिन्यांचे.

“किती गोजिरवाणे मूल !” ते म्हणाले.

“त्याची आई खरेच सुंदर होती. एके दिवशी एकटीच संस्थेत आली. बरोबर कोणी नाही. एक लहानशी वळकटी व हातकडीचा तांब्या.”

“तिचे नाव सरला होते का?”

“तुम्हांला काय माहीत?”

“परंतु सरलाच होते ना?”

“हो. सरला तिचे नाव. खरोखरच निरपराध निष्पाप मुलगी ! अति दु:खी होती. आणि जाताना म्हणाली, “माझे बाळ कोणाला देऊ नका. मी केव्हातरी येईन. माझे बाळ परत नेईन. सारा खर्च देईन.” जाताना तिने आपली कुडी, हातांतील बांगडया सारे संस्थेस दिले. पुन:पुन्हा ती मुलाचे मुके घेत होती. काय तिची स्थिती झाली असेल ! कल्पना करा. पोटचा गोळा येथे टाकून जायचे. आम्हांला वाईट वाटते. परंतु काय करायचे? त्या माता तरी काय करतील?”

“हा बाळ मला द्या. पाहा तो माझ्याकडे पाहात आहे. सरलेसारखेच नाकडोळे. माझ्या सरलेचाच बाळ. होय, सरलेचाच.”

“तुम्ही सरलेला ओळखता?”

“अहो, माझी मुलगीच ती. मला तिने काही सांगितले नाही. घरातून निघून गेली. परंतु पुढे कळले. अकस्मात कळले. चला, मी सारी हकीकत सांगतो. मी तिचा बाप खरा; परंतु मी कठोर होतो. तिच्याजवळ तुसडेपणाने वागत असे. म्हणून तिला माझ्याजवळ सांगण्याचे धैर्य झाले नाही. अरेरे ! विश्वासरावांनी सरलेच्या मुलाला उचलून घेतले. त्यांनी त्याचे मुके घेतले. बाळ हसला, त्यांना बिलगला. जणू ओळख पटली.

विश्वासराव बाळाला मांडीवर घेऊन सारी हकीकत सांगत होते. त्यांनी उदयचीही वार्ता सांगितली. तो आला होता, आपण त्याला कसे घालविले, ते सारे त्यांनी सांगितले. त्यांनी सरलेच्या वह्या दाखविल्या. उदय, उदय लिहिलेले ते पान दाखविले. “पंढरपुरास जावे का “ वगैरे मजकूर असलेले पान त्यांनी दाखविले. सरलेचे भांडे दाखविले. ते म्हणाले,

“अहो, माझीच ती मुलगी. हा मजकूर वाचून तर येथे आलो. पश्चात्ताप होऊन आलो. घरात मी एकटा. सारी मेली ! आता सरलाच काय ती राहिली. ती जगात असेल का नाही काय सांगावे? तिचे गेल्यापासून पत्र आले का?”

“पत्र आले नाही. कोठे नोकरी मिळती तर पत्र आले असते. परंतु पत्र नाही.”

“हे मूल मी नेतो.”

“परंतु कोणासही मूल देऊ नका असे सरलाबाईंनी निक्षून सांगितले आहे.”

“अहो, मी तिचा प्रत्यक्ष पिता. या मुलाला वाढवीन. सरला आलीच तर सांगा की, “तुझ्या वडिलांनी तुझे बाळ नेले आहे. तूही त्यांच्याकडे जा. त्यांचा तुझ्यावर बिलकूल राग नाही. त्यांना पश्चात्ताप झाला आहे. तुझे बाबा पूर्वीचे राहिले नाहीत.” वाटले तर मी एक पत्र लिहून ठेवतो. ती आली तर तिला ते पत्र द्या. किंवा तिचे पत्र आले तर तिला हे पत्र द्या पाठवून. आणि तरीही तिला तिचे मूल परत पाहिजे असेल तर मी तिच्या हवाली करीन. माझे ऐका. हे बाळ दिलेत तर मी जगेन. माझ्या जीवनात आनंद येईल. नाही तर या चंद्रभागेतच मी प्राणार्पण करीन. कोण आहे मला? कशासाठी जगू?”

बाळाने आजोबांकडे पाहिले. लबाड कसा गोड हसला ! आजोबांनी नातवास पोटाशी धरले.

“तुमचे दु:ख मी समजू शकतो. घेऊन जा मूल. नीट वाढवा. पत्र येथे लिहून ठेवा.” व्यवस्थापक म्हणाले. विश्वासरावांनी पत्र लिहिले:

“चि.सौ.प्रिय सरलेस कृतानेक सप्रेम आशीर्वाद.

मी तुला सौभाग्यवती लिहीत आहे. उदयचे व तुझे नाते पतिपत्नीचे होते असे मी मानतो. मी तुमच्या नात्यास संमती देतो. उदय खात्रीने कोठे तरी असेल म्हणूनही मी सौभाग्यवती असे तुला लिहीत आहे. तुला केव्हा पाहीन असे मला झाले आहे. तू जीव दिलास असे मी उदयला सांगितले. तो माझ्याकडे आला होता. आणि उदयने जीव दिला असे तुला सांगितले. परंतु प्रसूत होईपर्यंत तरी तू जिवंत होतीस. कोणालाही बाळ देऊ नका असे सांगून तू गेलीस. यावरूनही कोठे तरी तू जिवंत असशील. उदयही जिवंत असेल. मला तसे वाटत आहे. अनुतप्त हृदयाला खरे काय ते जणू समजत असते. सरले, तुझा बाळ मी नेत आहे. त्याला प्रेमाने वाढवीन. तूही लौकर परत ये. उदयही येऊ दे. माझे घर तुमचे आहे. तुमच्यासाठी ते मी सांभाळून ठेवीत आहे. परंतु पित्याचे तोंड बघायचेच नाही असे तू ठरविले असलेस तर? तर तुझे बाळ मी तुला परत देईन. तू सांगशील तेथे आणून देईन. तुझ्या बाळावर तुझा हक्क.

सरले, पित्याला क्षमा कर. सारे विसरून माझ्याकडे ये. मी एकटा आहे. रमा गेली. रमेचा बाळ गेला. परमेश्वर जणू कठोर होऊन मला शिकवीत होता. आणि शिकलो. नवीन डोळे मला आले. नवीन दृष्टी आली; जणू या जीवनात पुनर्जन्म झाला. तुझी मी वाट पाहात आहे.

तुझा पिता-विश्वासराव.”

अशा अर्थाचे पत्र त्यांनी तेथे लिहून ठेवले. व्यवस्थापकांनी कपडे वगैरे लेववून बाळ आणले. दुलई वगैरे दिली.

“सांभाळा. आयांचे काम तुम्हाला करावे लागेल. हगू होईल, मुती होईल, कराल ना नीट? न्याल ना सांभाळून? बाटलीत दूध वगैरे घ्या. की येथूनच भरून देऊ?” व्यवस्थापकांनी विचारले.

“मी गावातून घेईन. ही संस्थेला देणगी. पुढे आणखी पाठवीन. तुमचे उपकार आहेत. फार थोर कार्य तुम्ही चालवले आहे.”

“समाजाला ही जाणीव अधिकाधिक व्हावी हीच इच्छा आहे. परंतु समाजाला उदार दृष्टी आली तर असे प्रसंगच येणार नाहीत. आईबाप, सासू-सासरे उदारपणे वागले तर स्त्रियांना येथे यावे लागणार नाही. सहानुभूतीचा उदार धर्म आला पाहिजे. असो.”

विश्वासराव बाळाला घेऊन गेले. टांगा निघाला. बाळ सभोवती पाहात होता. मध्येच आजोबांच्या मिशा ओढत होता. त्यांचे नाक धरीत होता. टांगा भटजींच्या घरी आला.

“काय हो, हे मूल आणलेत की काय?”

“होय. याला घेऊन जाईन. आमच्या घरी मूलबाळ नाही. याला वाढवीन.”

“कशाला आणलेत ते मूल? जातकुळी माहीत नाही. कसे निघते काय सांगावे?”

“आपण तरी का सद्गुणांचे पुतळे आहोत? देव सर्वत्र आहेत ना? सारे ऋषी असेच नव्हते का जन्मले? परंतु त्यांचे तुम्ही स्मरण करता, तर्पण करता. खरे ना?”

“तुम्ही आधुनिक दिसता.”

“भटजी, तुम्ही का त्रेतायुगात आहात? तुम्हीही आधुनिकच आहात. आणि ऋषींच्या कुलकथा त्रेतायुगातीलच आहेत. असो. चर्चा नको. तुम्ही मला एक मोठी बाटली दूध भरून द्या. जाताना द्या. मी पैसे देईन. तुमचाही हिशोब करा.”

भटजींचा हिशोब पुरा करण्यात आला. बाजारातून नातवाला सुंदर कपडे आजोबांनी आणले. त्यांनी आपल्या हातांनी त्याला ते चढवले आणि ते परत पुण्याला निघाले. पंढरपूरचा जिवंत प्रसाद घेऊन ते पुण्यास परतत होते. पांडुरंगाची जणू ती प्रेममय मूर्ती होती. तिला घेऊन ते जात होते.

विश्वासराव गाडीत बसले होते. मांडीवर बाळ होता. त्याच्या तोंडात रंगीत रिंगणे होते. शेजारी बसलेल्या लोकांना आश्चर्य वाटत होते. हा म्हातारा एकटाच लहान मुलाला कोठे नेत आहे? कोणी त्याच्याबरोबर कसे नाही? आणि बाळ किती सुंदर आहे ! त्याला घ्यावे असे सर्वांना वाटत होते. त्याचे कौतुक करावे असे सर्वांना वाटत होते.

विश्वासराव आपल्या घरी आले. पहाटेची वेळ होती. बाळ खांद्याशी निजलेला होता. त्यांनी बाळाला काही खाली घालून त्यावर ठेवले. नंतर त्यांनी दार उघडले. मग त्यांनी बाळाला आत नेऊन निजविले. सामान सारे आत आणले. घरात दिवा लागला. ते त्या चिमण्या बाळाकडे पाहात होते. बाळाला घेऊन ते झोपी गेले. आणि त्यांच्या आधी बाळ उठला. तो खेळत होता. हसत होता. परंतु विश्वासरावांना ओले ओले लागले. ते जागे झाले.

तुतरी केलीस वाटते ! केव्हारे उठलास? रडू नको हो. तुझी आई येईल हो. येईल ना तुझी आई? येईल ना सरला? येईल ना उदय? नुसता हसतोस काय गुलामा? असे म्हणून त्यांनी बाळाचे मुके घेतले.

त्यांनी तो रंगीत पाळणा टांगला. रमाबाईच्या बाळाचा पाळणा. त्या पाळण्यावर चिमण्यांचा चांदवा त्यांनी लावला. आणि भांडी घासणारी मोलकरीण आली. त्यांनी तिला सांगितले, “बाळाला रोज न्हाऊमाखू घालीत जा. तुझे हे काम.”

“कोठून आणलात बाळ?”

“माझा हा नातू हो.”

“कसा हसतो आहे बघा.”

पाणी तापले. मोलकरणीने बाळाच्या अंगाला दूधहळद लावली. तेल लावले. तिने त्याला न्हाण घातले. तीट लावली. नंतर तिने त्याला थोडे दूध पाजले आणि पाळण्यात बाळ निजला.

विश्वासरावांचे जेवणखाण झाले. तेही जरा पडले. बाळ आता त्यांची करमणूक होता. पूर्वीच्या बाळाची खेळणी होती. ते त्या लहानग्यास खेळवीत बसत. खुळखुळा वाजवीत. बिडकुळी एकावर एक रचीत. बाळ पटकन उधळून हात लावी. आणि ती सारी बिडकुळी पडत. विश्वासराव पुन्हा रचीत. असा खेळ चाले. सायंकाळी नातवाला खांद्याशी धरून ते फिरायला जात. त्याला मोटार दाखवीत, सायकल दाखवीत, घोडा दाखवीत, पाखरे दाखवीत. दिवे लागायच्या सुमारास ते घरी येत. बाळाला दूध पाजीत, तेही दूध पीत. ते एकदाच जेवत. रात्री फलाहार करीत. दूध घेत. बाळाला जवळ घेऊन रामरक्षा म्हणत, स्तोत्रे म्हणत, अभंग म्हणत. त्याला पाळण्यात घालून आंदुळीत. तोंडाने गाणी म्हणत. ओव्या म्हणत.

बाळाचे नांव त्यांनी प्रकाश ठेवले. अंधारात आलेला प्रकाश ! निराशेत आलेला प्रकाश ! उदयने आणलेला प्रकाश !

“प्रकाश, अरे प्रकाश ! केव्हा येतील तुझे बाबा? केव्हा येईल तुझी आई? केव्हा तुला घेतील, नाचवतील? येऊ दे लौकर. येतील ना? लौकर बोलायला शीक, चालायला शीक. आई, बाबा म्हणायला शीक. नाहीतर मी शिकवले नाही असे म्हणतील हो.” असे मुलाजवळ बोलत बसायचे. एखादे वेळेस प्रकाश रडू लागला म्हणजे घाबरायचे. म्हणायचे. “तुला का आईची आठवण झाली? तुझी आई येणार असेल तर रडे थांबव.”

“थांबले रडे. येणार सरला. अरे पुन्हा रडायला लागलास. उगी उगी. नको रडू. उगी उगी. हात रे !” असे ते म्हणायचे. कधी सायंकाळी त्याला दिवा दाखवून “अडगुलं मडगुलं” म्हणायचे. कधी तिसरे प्रहरी त्या लहानग्याचा हात आपल्या हातात घेऊन “काऊकाऊ चिऊचिऊ, येथे बस; दाणा खा; पाणी पी; आणि बाळाच्या डोक्यावरून भूर्रकन उडून जा” असे म्हणायचे. कधी “लवलव साळुबाई मामा येई, हाती खोबर्‍याची वाटी देई, तिकडून येई घार, नि उचलून नेई” असे म्हणायचे.

अशा रीतीने विश्वासराव त्या आनंदमूर्तीला, त्या प्रकाशाला वाढवीत होते, त्यांचा वेळ केव्हाच जाई. त्यांना आता कंटाळा येत नसे. कधी कधी एकच विचार त्यांच्या मनात येई व तो हा की आपले डोळे मिटण्यापूर्वी बाळाचे आईबाप येवोत. त्यासाठी ते देवाची प्रार्थना करीत.

कधी सरलेच्या वह्या, पुस्तके ते बाळाला दाखवीत.

“तुझ्या आईची ही पुस्तके. येतात का वाचता? या बघ वह्या. हे बघ तुझ्या बाबांचे नाव. उदय, उदय. कितीदा लिहिले आहे? अरे, फाडू नको. तुझी आई रागावेल हो.”

अशा त्या दोघांच्या करमणुकी किती सांगाव्या ! कल्पनेनेच त्या मनात जाणाव्या, सहृदयपणे जाणाव्या. नाही का?

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED