KILLE RAIGAD books and stories free download online pdf in Marathi

किल्ले रायगड

पुन्हा रायगड ०५. १२. २००९

हा एक लक्षात राहणारा रायगड ट्रेक होता ...हो नाही करता करता तब्बल १२ जण तयार झाले होते .... आपल्या माहेरी यायला. तेव्हा आम्ही सडाफटिंग होतो... कोणावरही कसलीच जबाबदारी नव्हती .. १२ पैकी २ जणांचीच लग्न झाली होती आणि बाकी १० जणांची कोणी गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळे काळजी करणारे आई - वडीलां शिवाय कोणीही नव्हते.

शनिवार ०५. १२. २००९ तारीख ठरली... सर्व १२ जण आदल्या रात्री १२ वाजता म्हणजे शुक्रवारी मुबंई सेंट्रल , दादर टी टी,कुर्ला येथून एस टी महाड(रायगड) ला जाणारी एस टी पकडली..बुकिंग आधीच केले असल्यामुळे नीट झोपायला जागा मिळाली...आधी एस टीत बसल्यावर सर्वांची ओळख परेड झाली.डिसेंबर महिना असल्यामुळे थोडी थोडी थंडी जाणवत होती...जसे पनवेल पार केले तसे मी आणि भिवाजी सोडून सर्व झोपी गेले.. आम्हाला खर्चाचा ताळमेळ बसवायचा होता म्हणून आम्ही जागे होतो . नंतर काही वेळाने एस टी ने १० मिनिटांचं "हाल्ट" घेतला मी ,प्रसाद आणि भिवाजी प्रथम महाड(रायगड) एस टी स्टॅन्ड ला जाऊन आलो असल्यामुळे तिथे पोट खाली करण्याची कांय व्यवस्था आहे ते आम्हाला माहिती होते आणि तशा सुचना आम्ही सर्वांना दिल्या होत्या पण ...त्या बाकी ९ जणांनी मनावर घेतल्या नाहीत... त्या १० मिनिटात २ दिवस उपाशी असल्यासारखे खाल्ले .

मजल दरमजल करत महाड एस टी...स्टॅण्डवर ३ वाजता पोचली ....तेव्हा तिथे असलेले ३ कुत्रे आणि आम्ही १२ जण असे फक्त १५ जण होतो... एस टी थांबल्या थांबल्या..आमच्या मधले काही जण बॅग खाली टाकून..जिथे "पॉट" खाली करण्याची व्यवस्था होती तिथं धावत सुटले...मगाशी न ऐकण्याचा परिणाम... सगळ्याच आटपेपर्यंत आम्हाला घाई नव्हती ...४.३० ची रायगड पायथा एस टी होती ...पण नंतर कळले ती एस टी रद्द झाली होती.. झाला ना लोचा करणार काय आता पण आमच्या सर्वांच्या नशीबानं एक ४. १५ ची एस टी आली .. चौकशी केल्यावर की कळले ती .... पाचाड गावी जाणारी एस टी होती ... नंतर रायगड पायथा एस टी होती सकाळी ८ वाजता..मग सर्वानुमते त्या एस टी जाऊन बसलो.... एस टी निघायला अजुन थोडा वेळ होता मग काय... आमच्या गप्पा रंगल्या विषय राजे आणि रायगड...अहो विचार करा रात्री ४ वाजता मुंबई पासुन कुठच्या दुरच्या गावी आम्ही थंडींत कुडकुडत एस टी त गप्पा रंगवत होतो.

एस टी निघाली पुन्हा तेच मी आणि भिवाजी सोडून सर्व झोपी गेले.. फक्त १२ जणच एस टी होतो खाली सीट पाहून बाकी सर्व ताणून झोपले आणि थोड्यावेळाने एस टी ने कचकचून ब्रेक लावला तेव्हा सीट वर झोपी गेलेले सर्व धाडकन खाली आपटले त्यात आमच्यापैकी एक जण "चोर चोर " असेही ओरडला. पाचाड एस टी ते आम्हाला साधारण अर्धा तासात पाचाड ला सोडले.. तिथून तुम्हाला रायगड ला जाण्याऱ्या गाड्या मिळतील असे कंडक्टर ने आम्हाला सांगितले होते..पण उतरल्यावर फक्त २ बैल उभे होते.. आता काय करणार परत...पण आमच्या नशिबात काहीतरी वेगेळेच होते. समोरून जशी एस टी गेली तशी अगदी समोरच "राजमाता जिजाऊ " यांची समाधी होती.. पण बंद होती..तिथला असणारा "राजमाता जिजाऊ " यांचा पंचधातूंचा पुतळा चोरीला गेला होता.. पण आम्ही जवळ जवळ १० ते १५ मिनिट हात पाय जोडल्यानंतर आम्हाला आत प्रवेश दिला... समाधीचे दर्शन घेऊन निघालो तरी एस टी चा पत्ता नव्हता.. मग काय पाचाड ते रायगड अशी जवळ जवळ १ ते १. ३० तास त्या गावात आम्ही मस्त रपेट केली..आसपासचे गाव मिट्ट काळोखात आणि गुलाबी थंडीच्या कुशीत मस्त झोपले होते ...सकाळचे ५ ते ५. १५ वाजले असतील कोण होते आमच्या बरोबर रस्त्यावर मिट्ट काळोख आणि सोबतीला वेडे मित्र काय क्षण होते ते ...नाही कधीच विसरणार..

खूप दमलो होतो..पण करणार काय.. आता हळूहळू उजाडत होते..आणि एका डोंगरामागुन रायगडाच्या टकमक टोकाने दर्शन दिले...आम्ही धावतच सुटलो रायगडाकडे..रायगड पायथ्याशी असणाऱ्या "हॉटल " जवळ नाश्ता केला आणि गड चढायला सुरुवात केली ९ ते ९. ३० ला आम्ही वर पोचलो मग तिथे असणाऱ्या धर्मशाळेत बॅगा टाकल्या आणि मग प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतले तिथून पुढे हत्तीतलाव, गंगासागर तलाव , राणीवसा, राजदरबार ,जगदिश्वर मंदिर,टकमक टोक खूप भटकलो...भटकेपर्यंत दुपार झाली होती मग बाजारपेठच्या पाठी असणाऱ्या झोपडीत गरम गरम पिठले , भाकरी आणि लसणीची चटणी .... अक्षरशः आम्ही हादडली... चव अजून जिभेवरच आहे... मग जाऊन धर्मशाळेत ताणुन दिली...संध्याकाळी उठलो आणि मग नंतर असेच विजयस्तंभ च्या इमारतीत जाऊन बसलो ....रात्री मग राजांची गाणी गात गात झोपून गेलो...सकाळी ५ वाजता सर्वजण उठलो...मग एकाने अजून जोक केला... प्रसाद ने बळीराम नावाच्या मित्राकडे दात घासायला म्हणून पेस्ट मागितली...आणि त्याने झोपेत त्याला काढून दिली.. आणि नंतर त्याच्या लक्षात आले ती CRACK क्रीम होती .... प्रसाद ने दात घासले कि नाही ते माहित नाही...नंतर निघण्याआधी राजदरबारात जाऊन राजांना आम्ही मुजरा केला...

आणि मग धुक्यात हरवलेल्या वाटेवरून आणि गुलाबी थंडीला ला अंगाशी घेऊन आणि रायगडला मिठी मारून आम्ही घरची वाट पकडली...घरी पोहचायला रात्रीचे ९ ते १० वाजले असावेत...दमलो होतो येवढे कि पडल्या पडल्या अंथरुणात विरघळून गेलो...


अजूनपर्यंत किल्ले रायगडला चार वेळा गेलो पण मनाने मात्र अजूनही तिथेंच असतो


कसे जाल : सर्वप्रथम महाड गाठावे तिथून पाचाड किंवा रायगड पायथा ST आहेत ....किंवा आता अजून काही पर्याय झाले असतील... स्वतःची चार चाकी असेल तर अतिउत्तम गाडी किल्ले रायगड च्या पायथ्याशी नेता येते .

काय खाल : मुबलक प्रमाणात पाणी आहे गडावर आणि ताक , लिंबू सरबत घेऊन गड चढता चढता खूप जण भेटतील....गडावर हॉटल आहे आणि बाजारपेठच्या पाठी असणाऱ्या झोपडीत जेवणाची व्यवस्था होते.

काय पाहाल : अहो सर्व गड पाहण्यासारखा आहे.

इतर रसदार पर्याय