mirage books and stories free download online pdf in Marathi

मृगजळ

मृगजळाचे उदाहरण द्यायचे झाले तर या जगा पेक्षा उत्तम उदाहरण होऊच शकत नाही. मृगजळ म्हणजे आभासी पाणी जे वाळवंटात दिसते आणि ज्याला भुलून तृष्णेने व्याकुळ झालेले लोकं,पशु,हरणं त्याच्या मागे धावतात पण त्यामुळे त्यांची तृष्णा तर शमतच नाही उलट धावल्याने उगीच दमछाक होते. हे जग म्हणजे वाळवंट असं जर समजलं तर हरणं म्हणजे या जगात राहणारे लोकं, आणि मृगजळ म्हणजे आभासी सुख ,खरे सुख समजून आपण आयुष्यभर त्यामागे धावतो पण शेवटी असमाधान कायम राहते. कोणी पैश्यामागे धावतो,तर कोणी प्रसिद्धीमागे धावतो, कोणी पदोन्नती मागे धावतो तर कोणी ऐहिक वस्तूंमागे धावतो.

प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे,कोणाला मोठ्याघरात सुख वाटते तर कोणाला घरात चार पाच गाड्या असल्या की सुख वाटते पण जेव्हा हे सगळं मिळवण्यासाठी माणूस धडपडतो तेव्हा तो इतका व्यस्त होतो की मोठं घर असून त्यात त्याला त्याच्या कुटुंबियांसोबत घालवायला वेळ नसतो. लोकं कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळवण्यासाठी एवढे कष्ट घेतात, बॉसला खुश ठेवणे, मग त्यासाठी वाट्टेल ते कॉम्प्रोमाइज करणे, वेळ पडली तर राजकारण करूनही पदोन्नती मिळवतात पण एकदा उच्च पदावर गेल्यावर त्यांना समाधान मिळते का? सोशल मीडिया वर तर वेगवेगळ्या वेशभूषा केशभूषा करून सेल्फी काढायच्या आणि त्या पोस्ट करायच्या यातही काही लोकं समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात,क्षणिक समाधान त्यांना मिळतही असेल पण ते फार काळ टिकत नाही. पूर्ण वेळ सोशल मीडिया वर पोस्ट टाकण्यात जातो आणि अशा व्हरच्युअल वर्ल्ड मध्ये जगून रिअल वर्ल्ड कडे दुर्लक्ष होते. परत, ह्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त लाईक्स मिळाले, आता उद्या मी जास्त चांगले , वेगळे फोटो टाकणार असा विचार करण्यातच आयुष्याचा बहुमूल्य वेळ वाया जातो. काही जण हिरो हिरोईन बनायला फिल्म इंडस्ट्रीत येतात अनेक ठिकाणी जोडे झिजवतात, इकडे फोटो शूट कर, तिकडे लग्गे लाव, आणि एवढं सगळं करून काय मिळते, एखादा छोटा रोल किंवा एखादी सिरीयल ,ग्रुप डान्स मध्ये बॅकग्राऊंड डान्सर चा रोल बाकी काही नाही. एखाद्या व्यक्तीला हिरो किंवा हिरोईन ची भूमिका मिळतही असेल पण ते मिळण्यासाठी त्यांना जे दिव्य करावे लागते, आणि फिल्म इंडस्ट्रीचे असे हिडीस रूप दिसते की त्यापुढे त्यांना हिरो हिरोईन झाल्याचं समाधान मिळत नाही आणि मग मनातली अशांती घालवण्यासाठी ते ड्रग्स, ड्रिंक्स सारख्या आणखी एका मृगजळाच्या मागे धावतात.

काही लोकं वंशाचा दिवा हवाच ह्या आभासी समाधानासाठी अनेक मुलींना जन्माला घालतात किंवा अनेक स्त्रीभ्रूणांच्या हत्या करतात आणि जेव्हा एवढा अट्टाहास करून त्यांना वंशाचा दिवा मिळतो तेव्हा ते खरंच पूर्णपणे सुखी होतात? अनेक लोकं आभासी सुखाच्या मागे धावून चुकीच्या गोष्टी करतात,काळे धंदे करतात पण शेवटी मिळते काय? तर केवळ असमाधान ! कारण खरं समाधान स्वतः मधेच असते त्याला बाहेर शोधून उपयोग नसतो. मुळातच मूल्यांना सोडून केलेल्या कुठल्याही कृत्यातून समाधान मिळत नाही,आणि मिळालेलं समाधान फार काळ टिकत नाही. चांगले संस्कार आणि मूल्ये यांना अनुसरून जे काही आपण कृत्य करतो ते चिरकाळ समाधान देणारे असते. मानव आणि इतर प्राण्यांमध्ये हाच फरक आहे की मानवाजवळ सतसद्विवेक बुद्धी असते, जी इतर प्राण्यांजवळ नसते त्यामुळे जेव्हा आपण चुकीचं वागतो तेव्हा आपोआपच समाधान आपल्या आयुष्यातून निघून गेलं असते. मग उरते फक्त मृगजळ जे फक्त दमवते,माणूस सदैव समाधानासाठी तृषार्थ राहतो पण त्याची तहान भागल्या जात नाही, तो फक्त धावत राहतो ,धावत राहतो जगाच्या अंतापर्यंत,मृगजळाच्या मागे. शोध सुखाचा अखंड घेतो,फिरतो मानवप्राणी सुख तयाचे मनात त्याच्या पण तो ह्यास न जाणी खऱ्या सुखाला सोडूनी करतो भासामागे पळापळ अखेर हाती उरे न काही मिळे केवळ मृगजळ
◆◆◆

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED