Objection Over Ruled - 16 books and stories free download online pdf in Marathi

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 16




प्रकरण १६

पटवर्धन च्या ऑफिसात कनक ओजस बसला होता. “ पाणिनी, तुला त्या वाकलेल्या मेणबत्तीचा सुचलेला मुद्दा माझ्या बिलकुल लक्षात आला नाही. काय भानगड आहे ही?”
“ न्यायाधीशांच्या बरोब्बर ध्यानात आला तो म्हणून बर झालं. सोपी गोष्ट आहे समजायला कनक, साधारण ९९% खून हे जमिनीवरच होतात त्यामुळे पोलिसांना समुद्रावरील वातावरणाचा , तिथे घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज नसतो. एखाद्या दर्यावर्दी माणसाला समुद्र विषयी काही प्रश्न विचारून बघ तो प्रथम भरती आणि ओहोटी याच विषयावर येईल.”
“ त्या रक्ताच्या ठशा चा आणि मेणबत्तीचा काही संबंध आहे का? कोणी केले असावेत ते ठसे? काया ने? ” सौम्या ने विचारले.
“ ती म्हणतेच आहे की तिच्याच बुटाला लागले रक्त म्हणून.ती बोलते ते खरे असेल तर खून होण्या पूर्वी ते रक्त लागले असले पाहिजे.”पाणिनी म्हणाला
“ पण हे कसे शक्य आहे? ”ओजस ने शंका विचारली.
“ तू त्या ठशांची स्थिती पाहिलीस का? ”पाणिनी म्हणाला.
ओजस ने पटवर्धन च्या हातातून फोटो घेतला.काही लक्षात न आल्याचे भाव त्याच्या तोंडावर होते.
“ समज ती बोटीवर गेली तेव्हा बोट तिरकी झाली असेल, तिचे बूट रक्ताच्या थारोळ्यात गेले असतील तिच्या लक्षात आले नसेल, तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली असेल,काय घडलं असेल विचार कर कनक, तिरक्या झालेल्या बोटीवरचा जिना चढलायस कधी?”पाणिनी म्हणाला.
“ नाही बुवा. मी कशाला चढेन असा जिना?” ओजस म्हणाला.
“ मग चढून बघ ” अस म्हणून पाणिनी ने आपल्या लायब्ररीच्या खोलीतून एक शिडी आणली आणि भिंतीला अशी लावली की शिडीचे खालचे एकच टोक जमिनीला टेकवले आणि वरचे एकच टोक भिंतीला टेकवले.
“अशा शिडीवर कसे चढता येईल पाणिनी? ” ओजस म्हणाला.
पाणिनीने सौम्या ला खूण करून चढायला सांगितले.त्याने आणि ओजस ने शिडी घट्ट धरून ठेवली. सौम्या शिडीवर चढत असताना ते दोघे नीट बघत होते.जमिनीला आणि भिंतीला शिडीचे एक -एक टोक च टेकले असल्याने तोल सावरताना सौम्या ला अवघड जात होते त्यामुळे ती शिडीच्या पायऱ्या वर मध्यभागी पाऊल ठेऊ शकत नव्हती तर शिडीची जी बाजू उतरती होती त्याच्या कडेवर पाय ठेवत होती.
“ बुटाला रक्त लागलेले होते, त्याचे डाग शिडीच्या मध्यावर पडले आहे याचा अर्थ बोट तिरकी होण्या पूर्वी ती शिडी चढली ”पाणिनी म्हणाला.
“ हे तिच्या हकीगतीशी जुळतंय.” ओजस म्हणाला. “ नऊ वाजे पर्यंत बोट डगमगायला सुरुवात झाली नव्हती.”
“ बाकी सगळं जुळतंय पण या मुद्याशी एकच मुद्दा जुळत नाहीये की तेव्हा तो मेला नव्हता.” पाणिनी म्हणाला
“ मेला होता तेव्हा.बघ विचार कर पाणिनी, रेयांश आणि पुंड मधे झटापट झाली,त्याने पुंड ला ठोसा मारला, पुंड चे डोके उंबरठ्यावर आपटले आणि......” ओजस सांगू लागला , त्याला मधेच तोडत पाणिनी म्हणाला,
“ किंवा त्याला ठोसा मारल्यावर रेयांश प्रजापती रोइंग बोटीतून किनाऱ्याला आला ,नंतर दुसरेच कोणीतरी रोइंग बोटीतून पुन्हा बोटीवर आले, पुंड ला मारलं आणि निघून गेलं.”
“ हे तू सिद्ध करू शकलास तर उत्तम. नाहीतर काय होईल?”
“ खुनी स्वत: बोलेल. नाहीतर ती बोट किंवा त्यावरची मेणबत्ती आपल्या बाजूने साक्ष देतील ! तुम्हाला फक्त भरती,ओहोटी च्या वेळा पत्रकाचा अभ्यास करायला हवा.”पाणिनी म्हणाला
पाणिनी विचारात गढून फेऱ्या मारायला लागला. अचानक थांबून तो म्हणाला, “ हा साहस बेलवलकर, भोळा भाबडा पोरगा,प्रेमात पडलेला, पण लक्षात आलय का तुझ्या? जेवढे दाखवतो तो तेवढा साधा नाहीये तो. आठवतय तुला, तो म्हणाला होता की पद्मनाभ पुंड च्या मृत्यू ची बातमी त्याला दिव्व्या ने आधीच दिली होती,म्हणजे इन्स्पे.तारकर ने तिला देण्यापूर्वीच.लक्षात आलाय का तुझ्या? त्याचं वर्णन , जलचरांचा अभ्यास करण्यासाठी भाड्याने होडी घेणाऱ्या आणि त्या खाजणाच्या दिशेने जाणाऱ्या सारंग भूपाल नावाच्या माणसाशी किती जुळतंय ! ”
“ गृहीत धरू आपण की रेयांश प्रजापती ने पुंड ला ठोसा मारून खाली पडले.रागातच तो बोट सोडून निघून गेला.काया तिथे आली . तिला पद्मनाभ पुंड उंबरठ्यावर डोके असलेल्या अवस्थेत पडलेला दिसला.तिला वाटलं वडिलांनी त्याला मारलं असावं.तिच्या वडलानाही तसच वाटत असावं ,पण समजा त्यांनी खरच नसेल मारलं त्याला , तर? तसं गृहीत धरायच असेल तर त्याला पुष्टी देणाऱ्या शक्यतांचा विचार करावा लागेल.”
“ भरती ओहोटी यात महत्वाची भूमिका बजावेल.” पाणिनी ने एका कागदावर भरती ओहोटी च्या वेळा लिहायला सुरुवात केली.
शुक्रवारी संध्याकाळी ५.४१ ला भरती होती.
शुक्रवारीच रात्री १२.०३ ओहोटी
शनिवारी सकाळी ६.२६ भरती
बोटीचा तळ जमिनीला टेकला होता त्यामुळे शुक्रवारी रात्री आठ वाजता तिथून हलू शकत नव्हती.
तिरकी व्हायला सुरुवात झाली शुक्रवारी रात्री ९ वाजता.
१०.३० ला रात्री पूर्ण तिरकी झाली
शनिवारी पहाटे २ ला पुन्हा हलायला सुरुवात.
पहाटे ३ ला पुन्हा स्थिर पण तरंगायला सुरुवात नाही , जमिनीला तळ टेकलेला
पहाटे ४ ला तरंगण्यास सुरुवात
शनिवारी सकाळी ८.४५ ला पुन्हा जमिनीला तळ टेकलेला.
शनिवारी ९.४५ ला पुन्हा हलायला सुरुवात.
११.१५ ला शनिवारी सकाळी पूर्ण तिरकी झाली या वेळेला पोलीस आले.
आपल्या टेबलवर एक मोठा कागद पाणिनी ने ठेवला. “ मी इथे एक आकृती काढतो , बोटीवरच्या प्रेताच्या हालचालींची.” तो म्हणाला.
“ स्थिती एक- जिथे उंबरठ्यावर डोके आपटून प्रेत पडले
स्थिती दोन- जिथे प्रेत सापडले.
लक्षात घे कनक, जेव्हा बोट हलायला लागेल , तेव्हा प्रेत स्थिती- एक वरून स्थिती-दोन या ठिकाणी येईल पण जेव्हा पुढची भरती येईल तेव्हा प्रेत पुन्हा स्थिती –एक ला येणार नाही.कारण पुन्हा बोट हलेल तेव्हा उजवी बाजू म्हणजे स्टार बोर्ड ची बाजू खाली आणि डावी म्हणजे पोर्ट बाजू वर असेल ”पाणिनी म्हणाला
“ हे बरोबर आहे तर्क शुद्ध विचार केला तर.” ओजस म्हणाला.
“ आता आपण वरचे , भरती- ओहोटी चे वेळा पत्रक आणि साक्षी याचा विचार करू.पोस्ट मार्टम करणारे डॉक्टर म्हणतात की डोक्याला म्हणजे कवटीला लागलेल्या मारा व्यतिरिक्त रक्त बाहेर पडेल अशी कोणतीही जखम शरीरावर नव्हती. स्थिती –एक मधे जिथे प्रेत होते तिथे उंबऱ्यावर डोक्या खाली बऱ्यापैकी रक्त होते. स्थिती –दोन मधे जिथे प्रेत होते तेथे सुध्दा थोडे रक्त सांडले आहे. परंतू स्थिती –एक आणि स्थिती-दोन या दोघांच्या मधे रक्त सांडलेले नाही.अपवाद फक्त एक दोन थेंबांचा. ”
“ बरोबर आहे. म्हणजे लाटांमुळे बोट हलायला लागल्यावर स्थिती -१ वरून स्थिती –२ ला प्रेत घरंगळत जाईल. स्थिती-२ ही उताराची बाजू असल्यामुळे प्रेत तिथेच स्थिरावेल.” ओजस म्हणाला.
“ आता बोट हलायला कधी लागली? तर शुक्रवारी रात्री ९ वाजता.१०.३० पर्यंत ती पूर्ण तिरकी झाली. त्या आधी नाही.आता असं बघ, मेणबत्ती १७ अंशाच्या कोनात वाकली आहे.त्यावरून ती असं दाखवते की जेव्हा ती जळत होती तेव्हा बोट अर्धी तिरकी झाली होती.यावरून मी असं अनुमान काढू इच्छितो की रात्री ९ ते १०.३० च्या साधारण मध्यावर म्हणजे पावणे दहा पूर्वी बोट सुध्दा १७ अंशाच्या कोनात तिरकी झाली असेल.डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार मृत्यू नंतर अर्ध्या तासापेक्षा जास्त रक्त स्त्राव चालू राहण्याची शक्यता नाही.आपल्याला स्थिती –एक आणि स्थिती –दोन या दोन्ही ठिकाणी रक्त दिसतंय याचा अर्थ स्थिती-१ वरून स्थिती -२ ला प्रेत अर्ध्या तासाच्या आत घरंगळत गेलं असल पाहिजे. याचा अर्थ खून शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास झाला असला पाहिजे, ज्यावेळी बोट हलायला सुरुवात झाली होती.”पाणिनी म्हणाला
“ आणि मेणबत्ती च्या तिरक्या स्थिती वरून हे सिध्द ही होतय ” ओजस म्हणाला.
“ मेणबत्तीची स्थिती पाहता असे लक्षात येतंय की मेणबत्ती साधारण वीस मिनिटे जळाली असावी.रात्री ९ ते ९.४० च्या दरम्यान. बहुदा ९.२० ते ९.४० हा कालावधी असावा.” पाणिनी म्हणाला. “ आता आपण सर्वात विचित्र अशा शक्यतेकडे वळू. पुंड केबिन मधे अंधारात बसला असला पाहिजे किंवा दुसरी शक्यता, जी मला जास्त योग्य वाटते, ती अशी की ज्या ठिकाणी आपल्याला मेणबत्ती दिसली त्या ठिकाणी आधीच पूर्वीची मेणबत्ती अर्धवट जळलेली ठेवलेली असावी.त्याचे मेण आधीच खाली पसरलेले असावे, त्यात जुन्या मेणबत्तीचे थोटूक राहिले असावे ,ते त्याने आधी पेटवले असावे, ते पूर्ण जळून गेल्यावर ते थोटूक त्याने उपटून फेकून दिले असावे आणि त्याच मेणात नवीन मेणबत्ती खोचून पेटवली असावी. म्हणूनच मेणबत्ती तिरकी दिसते पण त्या खालचे मेणाचे थारोळे सगळीकडून सारखे मेण पडल्याचे दाखवते.”
“ वा! पाणिनी सगळ काही बरोब्बर बसतंय तर्क संगतीत! असंच झालं असावं.खुनी बोटीवर येण्यापूर्वी पाच दहा मिनिटे त्याने मेणबत्ती पेटवली असावी.”
“ पण, रेयांश प्रजापती आणि पद्मनाभ पुंड मधे झटपट झाली ती संध्याकाळी ६ वाजता.काया ला ते समजल्यावर ती बोटीवर सात नंतर गेली.पण आठ च्या आधी गेली.त्यावेळी बोट हलायला लागली नव्हती आणि प्रेत स्थिती-१ मधे दाखवलेल्या जागी पडलं होतं.असं तिने मला सांगितलं.पण ती वेळेच्या बाबतीत नक्कीच खोटं बोलत्ये.ती तिथे रात्री ९ नंतरच गेली असावी.एक तर तिने मेणबत्ती पेटवली असावी किंवा खुन्याने.खुनी ,खून करून गेल्यानंतरच मेणबत्ती पेटवली गेली असावी अशी शक्यता आहे.” पाणिनी म्हणाला
“ जुनी मेणबत्ती उपटून काढून टाकली गेली होती ही वस्तुस्थिती पाहता , पाणिनी, तू म्हणतोस ती शक्यता खूप कमी वाटते.” ओजस म्हणाला.
“ कमी वाटत असली तरी शक्यता आहे.”पाणिनी म्हणाला
“नक्कीच काया खोटं बोलते आहे.” ओजस म्हणाला.
“ पण एक मुद्दा असा आहे की जो काया च्या हकीगतीला पुष्टी देतो. ”
“ कोणता मुद्दा? ” ओजस ने विचारलं
“ रक्ताच्या ठशाचे ठिकाण. वर जायच्या जिन्यावर ते ठसे पायरीच्या मध्यावर होते. मगाशी आपण केलेल्या प्रयोगात बोट तिरकी असताना हे ठसे पायरीच्या कडेला उताराच्या बाजूने असायला पाहिजेत.ते मध्यावर आहेत याचा अर्थ बोट सरळ रेषेत असतानाच ती जिना चढली.म्हणजे उशिरात उशिरा रात्री आठ पर्यंत.पण भारती ओहोटी चे वेळा पत्रक आणि मेणबत्ती दाखवते की रात्री ९ पूर्वी खून झालेला नाही.”पाणिनी म्हणाला
“ पण हे ठसे पायरीच्या मध्यावर मुद्दामच कोणीतरी उमटवले असतील तर? ” सौम्या ने शंका विचारली.
“ माझ्या मनात आलेली गोष्ट च तु बोललीस.”पाणिनी म्हणाला “ एखाद्या मुलीला भरती,ओहोटीचा आणि बोटीच्या हलण्याचा अभ्यास असेल तर काय करेल ती? खून प्रत्यक्ष झाला त्या पूर्वीच झाला असे दाखवायचा ती प्रयत्न करेल . त्यासाठी, ती बोटीवर आली तेव्हा बोट प्रत्यक्षात जरी तिरकी झाली असली तरी ती स्थिरच आणि सरळ च होती हे भासवण्यासाठी मुद्दामच जिन्याच्या पायरीच्या मध्यावर ठसे उमटवेल.जेणे करून बोट स्थिर असतानाच ते उमटलेत असे भासवेल म्हणजेच तो संध्याकाळी ७ च्या सुमारास किंवा त्यापूर्वी झाला असे भासवेल.”
“ माझं तर डोकच सुन्न झालंय.स्थिती-१ आणि -२ मधे प्रेताचे जवळचे रक्त ,आणि मृत्यू नंतर अर्धा तास रक्त स्त्राव होऊ शकतो हा डॉक्टरांचा अंदाज, आणि ती तिरकी झालेली मेणबत्ती हे सर्व खून रात्री ९.२० ला झाल्याचे दाखवतात पण मग खून व्हायच्या आधीच म्हणजे सायंकाळी सात च्या सुमाराला काया चे बूट रक्तात माखले कसे?”ओजस सुन्न होऊन म्हणाला.
“ सर, असं तर नसेल ना की काया दुसऱ्या दिवशी बोट”वर आली असेल,तेव्हा बोट स्थिर असेल आणि तेव्हाच तिचे बुटाला रक्त लागले असेल आणि तशीच ते जिन्यावर चढत गेली असेल. बोट स्थिर असल्याने ते ठसे अगदी मध्यावर उठले.”
सौम्या म्हणाली.
“ काय अंदाज आहे सौम्या ! ” पाणिनी म्हणाला.
“ पण दुसऱ्या दिवसा पर्यंत रक्त सुकणार नाही का?” ओजस ने विचारलं
“ नाही. थोडेफार तरी ओलसर राहिलंच..” पाणिनी म्हणाला. “ खुनाची वेळ ठरवायला तीन घड्याळे सक्षम आहेत.रक्त, भरती ओहोटी वेळ आणि मेणबत्ती. या सर्वात जिन्यावर उमटलेले ठसे बसत नाहीत.ते नक्कीच खोटे आहेत. ”
“ म्हणजे काया ने त्या लॉकर मधे ते बूट ठेवणे याचेच द्योतक आहे की ते ठसे तिने खोटे उमटवले ! ” ओजस म्हणाला.
“ कनक, मला तर वाटतंय की बुटांच्या ठशाला महत्व प्राप्त व्हावं आणि खुनाची वेळ चुकीची गृहीत धरली जावी म्हणून काया ने मुद्दामच लॉकर ची पावती खाली पाडणे, पोलीसांच्या ते लक्षात आणून देणे हे सर्व जाणीव पूर्वक केले असावे. ”पाणिनी म्हणाला
“ कनक, आपण आज रात्री एक प्रयोग करणार आहोत.” खिशातून भरती ओहोटी चे वेळापत्रक काढत पाणिनी म्हणाला. “ आज रात्री ९.४२ ला भरती आहे.आणि पहाटे २.५४ ला ओहोटी. माझ्या अंदाजा नुसार बोटीचा तळ रात्री ११ वाजता जमिनीला टेकलेला असेल. बारा वाजता ती हलायला सुरुवात करेल.दीड वाजता ती पूर्ण तिरकी झाली असेल.रात्री साडेबारा ते पावणे दोन हा कालावधी मला तपासायचा आहे. ”
“ मी येणारे तुमच्या बरोबर ” उत्साहाने सौम्या म्हणाली.
“ बोट कुठे आहे सध्या? पोलिसांच्या ताब्यात नाही? ”ओजस ने विचारलं
“ बोटीचा मालक माझा अशील असल्यामुळे त्याच्या मार्फत मी तिचा ताबा परत मिळवलाय आणि चित्रांगद ला सांगून ठेवलंय की खुनाच्या दिवशी जिथे होती तिथेच बरोब्बर त्याच जागी बोट ठेऊन दे ”
“ न्यायाधीश त्या मेणबत्तीच्या प्रेमात आहेत सध्या.” ओजस म्हणाला.
“ आणि मी बोटीवर जाऊन आल्यावर ते प्रेम वाढवू शकलो तर उद्याच हे प्रकरण संपवून टाकू शकतो मी.”पाणिनी म्हणाला

पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी दोघेही बोट क्लब वर चित्रांगद च्या केबिन मधे आले.
“ आपण आधी मस्त कडक कॉफी घेऊ आणि निघू.” चित्रांगद म्हणाला. “ मी तुम्हाला मोटार बोट ने सोडून परत यायचं आणि पुन्हा दोन वाजता आणायला यायचं .बरोबर ना?”
“ बरोबर.”पाणिनी म्हणाला
“ माझी साक्ष चांगली झाली का तुमच्या दृष्टीनं? ” चित्रांगद ने विचारले.
“ चांगली झाली.”पाणिनी म्हणाला
“ रेयांश माझा चांगला मित्र आहे.त्याची ती मुलगी म्हणजे, जळती तार आहे ! ” चित्रांगद म्हणाला. “ चला निघूया.”
तिघे जण त्याच्या मोटार बोटीत बसले.
“ किती वेळ लागेल? ”सौम्या ने विचारलं
“ दहा मिनिटापेक्षा जास्त नाही.” चित्रांगद म्हणाला. बोट जवळ आल्यावर त्याने त्या दोघांना वर चढायला मदत केली.
“मी दोन वाजता येतो परत. बोट हलायला लागेल तेव्हा सावध पणे उभे रहा. ”असे सांगून तो गेला.
पाणिनी ने आपली बॅटरी लावली. थंडी पडली होती आणि प्रचंड धुकं.अंधारात खालचं पाणी ही दिसत नव्हतं.पाणिनी ने केबिन मधला स्टोव्ह चालू केला.त्याच्या आवाजा मुळे कोणाची तरी सोबत आहे असे वाटायला लागलं.आणि उष्णता ही निर्माण झाली.बोट हलायला सुरुवात झाली नव्हती अजून पण पाण्याचा सप्-सप् आवाज येत होता.
“ मी आता प्रेत जिथे पडलं त्याच जागेवर झोपणार आहे.” असं म्हणून पाणिनी त्या उंबऱ्या जवळ डोकं टेकवून आडवा झाला.
“ मला या सगळ्या प्रकारची भीती वाटते आहे.” शहारत सौम्या म्हणाली.आणि पाणिनी ला बिलगली. “ मी प्रेत असणें अपेक्षित आहे. प्रेत रोमान्स नाही करत !”पाणिनी म्हणाला
एवढ्यात बोटीला एक हिसडा बसला. “ अजून मोठा हिसडा हवा , माझ्या शरीराला दुसऱ्या स्थितीत आणून टाकण्यासाठी.ते ज्यावेळी होईल त्या वेळेची नोंद आपण आपल्या कडे करून घेऊ. आपली बॅटरी कुठे आहे सौम्या? ”पाणिनी म्हणाला.
“ टेबलावर आहे.”
“ किती वाजलेत ?”पाणिनी म्हणाला.
“ १.३० वाजायला आलेत.” सौम्या म्हणाली
“पुढच्या काही मिनिटातच सर्व चित्र स्पष्ट होईल.”पाणिनी म्हणाला
दोघेही न बोलता बसून राहिले .सौम्या पाणिनीच्या कपाळावरून हळूवार हात फिरवत होती.पाणिनी ला केव्हातरी झोप लागली.
अचानक केबिन ला मोठा हिसडा बसला, झोकांडी जाऊन सौम्या पडायच्या बेतात होती आणि पाणिनी पटवर्धन ला झोपेतून जाग आली तेव्हा तो जोरात घरंगळत जाऊन केबिन च्या उजव्या बाजूच्या भीतीवर आदळला होता
थोड्या वेळाने पाणिनी च्या हसण्याचा आवाज आला. “ बरोब्बर १.४३ झालेत.भरती नंतर चार तास नऊ मिनिटे.”
“ हे काय ऐकू येतंय? ” सौम्या ने अचानक सावध होत विचारलं
पाणिनी एकदम बोलायचं थांबला.
“ चित्रांगद येत नसेल ना , आपल्याला घ्यायला?” सौम्या ने विचारलं
“ तो दोन वाजता येणार होता.अजून पंधरा मिनिटांनी.”पाणिनी म्हणाला “ सौम्या, तू कुठे आहेस? आणि बॅटरी कुठे गेली?”
“ टेबलावर ठेवली होती मी. बोटीला हिसका बसला तेव्हा ती पडली कुठे तरी.”
बोटीला पुन्हा एक हिसका बसला आणि त्याच वेळी रोइंग बोट , बोटीवर आपटल्याचा आवाज आला.
“ सर, हातात ही सळई घेऊन ठेवा.कोणीतरी येतंय.”
“ सौम्या, केबिन मधे चल पटकन ”, पाणिनी दबक्या आवाजात म्हणाला.
दोघे आत गेले. प्रकाशाचा एक झोत त्या केबिन वरून पुढे सरकला आणि परत अंधार झाला. एका व्यक्तीचा पाय जिन्यात पायरीचढण्यासाठी उचलला गेला पण पुन्हा थांबला.जाळीचा दरवाजा पुन्हा लावल्याचा आवाज आला.डेक च्या उतारावर पावलांचे आवाज आले आणि पटकन कोणीतरी रोइंग बोट वर उतरून वल्हे मारल्याचा आवाज करत निघून गेल्याचे जाणवले.
“ पटकन बॅटरी शोध सौम्या, उताराच्या बाजूलाच ती सापडेल. ”पाणिनी म्हणाला
सौम्या ने बॅटरी शोधून पाणिनी कडे दिली त्याने त्याचा झोत वल्हे मारल्याचे आवाज येत होते त्या दिशेने टाकला. “ कोण आहे तिकडे? ” त्याने जोरात आवाज दिला.पण दाट धुक्यात त्याला कोणी दिसले नाही.
“ सर, त्याला आपण दिसलो नाही, आणि आपला आवाजही ऐकू नाही आला त्याला .तर तो कशाला घाबरून पळाला ?”
“ स्टोव्ह.” पाणिनी म्हणाला “ त्याने जिन्यात जाण्यासाठी जाळीचा दरवाजा उघडला तेव्हा स्टोव्ह ची धग त्याच्या अंगावर आली आणि त्याला समजलं की कोणीतरी आहे बोटीवर आणि मग तो पळाला.”
त्यांना पुन्हा आवाज ऐकू यायला लागला. “ हा चित्रांगद च्या मोटार बोटीचा आहे आवाज ”पाणिनी म्हणाला “ ज्या ठिकाणाहून आपला अनाहूत पाहुणा गायब झालाय त्याच बाजूने तो येतोय.”
पाणिनी ने प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद ला आपण कुठे आहोत याचा इशारा केला.

(प्रकरण १६ समाप्त)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED