Bhagy Dile tu Mala - 18 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग १८

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत. खरच अस असत का?

नक्कीच नाही. चुकीच्या पध्दतीने मिळविलेल प्रेम कधी ना कधी दूर जातच. प्रेमात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकदा तो विश्वास तुटला की मग कितीही प्रयत्न केला तरीही तो विश्वास, प्रेम कधीच परत मिळवू शकत नाही. युद्धाचेही जसे काही नियम असतात तसे प्रेमाचेही असतात त्यामुळे युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत हे बोलणं योग्य नाही. नाही तर स्वरासारख्या कित्येक मुलीवर प्रेमाच्या नावाने होणारे ऍसिड अटॅक, रेप योग्यच असते आणि काहीही चूक नसताना स्वरासारख्या कित्येक मुलींना हे सहन कराव लागलं असते.

दिवस हळुहळु जात होते. स्वरा शरीराने ठीक होत होती पण मनाने ती जास्त खचत चालली होती. अशा स्थितीत इच्छा असते ती कुणीतरी समजून घेण्याची पण इथे तिलाच समजावण्याचा प्रयत्न करत होते. बातम्यांवरही फक्त तिचीच चर्चा असायची. आपलाच चेहऱ्यावर हात ठेवलेला फोटो जेव्हा ती टीव्हीवर बघायची तेव्हा तिचे घाव पुन्हा उफाळून यायचे. तिने आपला चेहरा पाहिला नव्हता पण विचार करूनच तिला स्वतःची भीती वाटू लागली. ती शरीराने बेटर फिल करू लागली होती पण मन मात्र अजूनही कुठेतरी दूर हरवल होत. तो क्षण तिच्या डोक्यात इतका फिट्ट बसला होता की ती त्यातून कधी बाहेरच येऊ शकली नाही. दोन्हीही पाय चेहऱ्याजवळ घेत ती एकटीच बसून राहायची. आत्मा नसलेले शरीर ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे स्वरा. ती हॉस्पिटलमध्ये असली तरीही तिला कायम एकांतात राहायला आवडत होत आणि एकांतात असली की तिच्या बाजूला राज येऊन तिच्यावर पुन्हा हसतोय असे भास होऊ लागायचे त्यावेळी ती खूप मोठ्याने किंचाळायची. तिचा आवाज ऐकून सर्व जवळ यायचे तेव्हा तिला कुणीच दिसायच नाही. हे सर्व सतत घडू लागलं होतं. सुरुवातीला दिल्लीत आल्यावर एकदम कॉन्फिडन्ट जाणवणारी स्वरा इतकी घाबरट झाली होती की साधी पिन खाली पडली तर त्या आवाजाने ती घाबरून जायची. तिच्या नसानसात भीती वाहू लागली. आजूबाजुला काहीतरी घडत तर नाहीये असे भास तिला होऊ लागले. स्वराला आता फक्त वेड लागायच बाकी राहील होत. जेव्हा केव्हा स्वरा एकटीच रूममध्ये असे तेव्हा ती खिडकीतून बाहेर काहीतरी बघत असे. काय चाललं होतं तिच्या मनात कुणाला काहीच समजत नव्हतं आणि तिच्यासोबत राहणारा प्रत्येक व्यक्ती आता तिला बघून घाबरु लागला होता.

मेरी चाहतमे क्यू मुझे तुमनेे बदनाम कर दिया
मेरी हर सांस मे तुणे डर का जेहर फैला दिया

दिवस जात होते आणि स्वराची स्थिती आणखीच बिघडू लागली. तिला आता ह्या शहरात ठेवणे योग्य नव्हते असा डॉक्टरने सल्ला दिला होता म्हणून स्वराच्या बाबांनी तिला दिल्लीहून दूर न्यायचा विचार केला होता. स्वरालाही तेच हवं होतं. ह्या सर्व दिवसात स्वराची नजर फक्त दारावर असायची. तिला ह्या सर्वातून बाहेर फक्त स्वयम काढू शकत होता, ती त्याची सतत वाट बघत असायची पण त्याने तिला कधी आपले तोंड दाखवले नाही आणि स्वराचा त्याच्यावर राग वाढत गेला. एका प्रेमासाठी तर तिची ही अवस्था झाली होती. एकाने दुसर्याला घाबरून तीच प्रेम नाकारल होत एवढंच काय तिच्यावर अन्याय झाला हे बघून सुद्धा तो आला नाही, स्वीकारायच तर दूरच राहील. तर दुसर्याने प्रेमासाठी तिचं पूर्ण आयुष्य उध्वस्त केलं होतं. तिची ओळख हिरावून घेतली होती. खरच प्रेम अस असत का हो ??

स्वराला आता प्रेम ह्या शब्दाचा तिरस्कार वाटत होता. तिला तिच्या आयुष्यात प्रेम कधीच नको होतं. प्रेम हा शब्द ऐकला की तिचे डोळे रागाने लाल व्हायचे. तिचा प्रेमावरचा विश्वास पूर्णता उडाला होता त्यामुळे ती प्रेमाला आपल्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नव्हती पण एक गहन प्रश्न सतावतो तो असा की तिला कदाचित प्रेम नको असेल तरीही तिचा चेहरा बघूनही तिच्यावर कुणी प्रेम करू शकेल का?

स्वराची अशी स्थिती होती तर तिकडे राजबद्दल वातावरण ढवळून निघाल होत. पोलीस काहीच ऍक्शन घेत नाहीत हे बघून विद्यार्थी, महिला मोर्चा आक्रमक झाला होता. रोज तिला भेटायला कितीतरी महिला , विद्यार्थी यायचे. त्यांना स्वराला सोबत न्यायच होत पण तिची स्थिती पाहता तिला नेने शक्य नव्हते. त्याला जशी जशी अटक टाळली जात होती तस तसे लोक अधिकच आक्रमक होऊ लागले. सुरजला ताब्यात घेण्यात आल होत पण राज अजूनही बाहेरच होता एवढंच काय राजला काही येऊ नये म्हणून त्याला शहराबाहेर पाठवण्यात आल होत. त्याच्या वडिलांना वाटलं होतं की सर्व काही शांत होईल पण दिवसेंदिवस सर्वच आणखीच चिघळू लागलं होत. महिलांच आंदोलन, विद्यार्थ्यांचा आक्रोश बघून एक ना एक दिवस सरकारला झुकाव लागणार होतं. आता स्वराचा विषय महिला आयोगाकडे सुद्धा पोहोचला होता आणि आपल्याच नेत्याच्या मुलावर कार्यवाही करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सरकारने राजच्या वडिलांवर दबाव आणला आणि शेवटी सर्वांच्या अथक प्रयत्नाने राजला जेल मध्ये टाकण्यात आल पण पुन्हा एक प्रश्न पडतो त्याला ही शिक्षा पुरेशी आहे का आणि स्वराला हा न्याय पुरेसा आहे का?

इकडे स्वराची मेंटल कंडिशन खराब होताना बघून डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज देऊन तिला ह्या वातावरणातून बाहेर जायला सांगितले. त्यानुसार स्वराच्या बाबांनी तिथून निघायची तयारी केली. पूजाने स्वराच्या सर्व वस्तू आज पॅक करून हॉस्पिटलमध्ये आणल्या होत्या आणि ते तिघेही हॉस्पिटबाहेर पडले. जाताना कियारा, शोभना, पूजा अशा कितीतरी मुली तिला सोडायला आल्या होत्या . त्यांच्या शब्दात, त्यांच्या वागण्यात तिला प्रेम दिसत होतं म्हणून इथून जाताना ती सर्वाना प्रेमाने भेटत होती. त्यांना भेटुन तिच्या डोळ्यात अश्रू अवतरले होते. तीही त्यांना अगदी हक्काने मिठी मारत होती. सर्वाना भेटून झाल्यावर तिने चेहऱ्यावर स्कार्फ बांधला आणि टॅक्सीकडे जाऊ लागले. तिने पुन्हा एकदा त्या सर्वांकडे नजर टाकली आणि नंतर बाजूला पाहू लागली. तिला वाटत होतं की स्वयम आज तरी तिला बघायला येईल पण तो आजही आला नाही आणि तिने स्वतःच्या विचारांवर हसूनच दिल्ली शहर सोडले. तिच्या चेहऱ्यावर स्कार्फ होता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे घाव लपले होते पण हा स्कार्फ जो तिने भीतीने घातला होता तोच भविष्यात तिची ओळख असणार आहे ह्याबद्दल तिला अंदाज नव्हता. ती दिल्लीतून निघाली तर होती पण माणस सरविकडे सारखीच असतात ह्याचा प्रत्यय तिला आला नव्हता. ती इथून दुसरीकडे सर्व काही विसरायला गेली होती पण खरंच लोक अशा स्थिती सर्व विसरू देतात का?

टॅक्सीने प्रवास करत ती रेल्वे स्टेशनवर पोहोंचली. काहीच क्षणात ती ट्रेनमध्ये बसली. ट्रेन सुरू होईपर्यंत तीच मन शांत होत पण जशी ट्रेन सुरू झाली तसेच तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. तिला कॉलेजचा पहिला दिवस आठवण झाला जेव्हा ती अशीच ट्रेनने आली होती. तिच्या स्वप्नांत दिल्ली होती. जिला तिला आपल्या नावाने ओळखलं जावं वाटत होतं . आपण सर्वांच्या नजरेत ह्याव अस वाटलं होतं. ती आलीही पण एका अशा कारणासाठी ज्याचा तिने स्वप्नांत सुद्धा विचार केला नव्हता. ह्या एका क्षणाने तिची पूर्ण स्वप्न, करिअर उध्वस्त करून टाकली होती. तिचा गुरुर तिच्यापासून हिरावून घेतला होता. तिचा कॉन्फिडन्स ह्या शहराने चुरचुर केला होता. हे सर्व विचार तिच्या डोक्यात आले आणि स्वराच्या डोळ्यात आपोआप अश्रू येऊ लागले. ट्रेन हळूहळू जात होती आणि ती कदाचित आपल्या स्वप्नांपासून दूर जात होती. कदाचित ती आता दिल्लीला कधीच परतणार नव्हती. कारण ज्या शहराला तिने आपलं बनवायचा विचार केला होता त्याच शहराने तिला तोंड दाखवायला जागा सोडली नव्हती. ती एकीकडे हे सर्व विसरायला दिल्ली सोडून जात होती ह्याचा तिला आनंद होता तर दुसरीकडे तिचे स्वप्न नाहीसे झालेत म्हणून तीच हृदय तीळतीळ तुटत होत. ट्रेनमधून मागे जाणार प्रत्येक झाड तिच्या अपयशाची कहाणी सांगत होत. ती ट्रेनच्या दारावर एकटीच उभी होती. काय सुरू होत तिच्या मनात खरच आपण विचार करू शकतो?? कदाचित आपली बुद्धी कमी पडेल ते आकलन करायला, हृदय कमी पडेल भावना जाणून घ्यायला आणि चेतना नष्ट होतील तिचा त्रास अनुभवायला.

किससे कहू के कसुरवार हो तुम मेरे
किससे बया करू हाल दिले के मेरे
मैने बडी बारिकीसे जाना है इस रंजीश मे
जमाणे के गुनेहगार तो लडकी के तेवर है ...

तसे तिला घरी जायला २४ तास लागणार होते पण हे २४ तास तिच्यासाठी जीवघेणे होते. आपण आपल्या लोकांत जातोय पण ते कसे वागतील तिला काहीच अंदाजा नव्हता. आपण आपल्याच मित्रांशी काय बोलणार आहोत, आपल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली ते कसं सांगणार आहोत, जेवढ्या ताठ मानेने आपण दिल्लीला आलो होतो आता तेवढ्याच ताठ मानेने त्यांना उत्तर देऊ शकू का ह्याबद्दल तिला विचार येत होते. त्याच उत्तर ना तिच्याकडे होत ना तिच्या वडिलांकडे. सत्य हे होत की तिला जे होईल ते फेस कराव लागणार होतं. ती आजची रात्री झोपली नव्हती कारण कुणीतरी तिची रात्रंदिवसाची झोप क्षणात उडवली.

स्वरा इकडे झोपली नव्हती तर तिकडे राजचीही तशीच स्थिती होती. एक वेळी हसणारा राज आता स्वतःच रडू लागला होता. ज्या मुलीला कुरूप बनवून त्याला समाधान मिळालं होतं तोच व्यक्ती आता जेलच्या भिंतीमध्ये हरवल्या गेला. त्याने आयुष्यात कधीच जेल पाहिली नव्हती त्यात ही केस सी.बी.आय. कडे गेली असल्याने त्याची कुठल्याही प्रकारे हयगय केली नाही. तो कसेतरी दिवस मोजून काढत होता. आजपर्यंत त्याच्या आई वडिलांने कधीच काही कमी होऊ दिली नव्हती पण आता एकाच जागी हगण आणि खान होताना त्याला कळून चुकलं होत की आपल्या हातून चूक झालीय. काय मिळालं होतं त्याला? समाधान की प्रेम? बदला घेतला म्हणून खरच समाधान मिळत आणि महत्त्वाचं म्हणजे कशाचा बदला? एका मुलीवर आपला हक्क समजणार्या मुलाने विचार कराव की हीच गोष्ट त्याच्या बहिणीसोबत, आईसोबत झाली तर काय होईल? तो बसेल का शांत? जर तो बसू शकणार नाही तर मग स्वराने स्वतःच्या आत्म सन्मानासाठी उचललेला हात कितपत चुकीचा होता आणि तिला दिलेली शिक्षा कितपत योग्य होती?? राज कधी ना कधी सुटेलही पण स्वराच जीवन, तिचा चेहरा, तिचा आत्मसम्मान कुणी परत करू शकेल का?

स्वरा आज ट्रेनमधून दिल्ली पळताना पाहत होती पण दिल्ली सोडली म्हणून तिचे प्रश्न सुटले होते का?

बेबस हु मै तो बाते बना लिया करो
पर भुलना नही तुफान ज्यादा दिन शांत नही रहा करते

क्रमशा ...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED