भाग्य दिले तू मला - भाग ९२ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९२

जिंदगी मे संघर्षसे मिठा
और कुछ भी नही
जित लो एक बार सांसो को
फिर तुम्हे हराना आसान नही...

स्वरा-अन्वयच्या आयुष्यात अलीकडे आनंद वाऱ्यासारखा दरवळू लागला होता. त्यांच्या जीवनातली ही अशी एक फेज होती जिथे ते दोघे सतत हसत होते. ह्या काही दिवसात त्यांना जगाच टेन्शन नव्हतं की स्वताच भान. अन्वयने इतकं सुंदर आयुष्य निर्माण केलं होतं की ती सतत वाहवत गेली, बाकी तिला त्यासमोर कधीच कुठल्याच गोष्टीची कमी जाणवली नाही. अन्वयच प्रेमच होत ज्यासाठी ती काहीही सहन करू शकत होती अगदी लोकांचा द्वेष, त्यांचं बोलणंही आणि अन्वय होता की लोकांमुळे तिला त्रास होऊ नये म्हणून सतत तिच्या चेहऱ्यावर हसू ठेवू पाहत होता. कदाचित हीच निस्वार्थ प्रेमाची व्याख्या होती.

अशीच एक सुंदर सकाळ. अलीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सतत पसरलेला असायचा आणि आजही काहीशी तशीच रोमँटिक सुरुवात झाली होती. आज स्वराला आवरायला उशीर झाला होता तर अन्वय कार बाहेर काढत होता. तो दारात पोहोचलाच होता की एका आवाजाने त्याच लक्ष वेधल. त्या मोठ्याने म्हणाल्या," काय महाशय, विसरलात ना आम्हाला? अलीकडे एक फोन नाही की काही नाही. नाही तर एक क्षण माझ्याविना जायचा नाही तुझा. विसरलास ना एवढ्या लवकर मला?"

अन्वयच समोर लक्ष गेलं, अन्वयने धावतच त्यांना मिठी मारली आणि हळुवार स्वरात उत्तरला," आत्या तू इथे? आधी सांगितलं का नाहीस येणार आहेस ते? मी आलो असतो ना तुला घ्यायला. उगाच तुला त्रास झाला ना? एकदा सांगायचं तरी होतंस."

आत्या काही बोलणार त्याआधीच मधून अन्वयचे बाबा धावतच बाहेर आले. दोघांनाही बघून हसतच ते उत्तरले," अग ताई तू इथे? सांगायचं ना पाठवल असत अन्वयला तुला न्यायला. उगाच त्रास कशाला करून घेतलास?"

आत्याने मिठी सैल केली आणि मध्ये येत उत्तरली," तुला खूप पडली आहे रे माझ्या त्रासाची? नाही म्हणजे आधी जेव्हा तुझ्या मुलाने- बायकोने माझ्या लहान मुलीच्या स्थळाला नकार दिला होता तेव्हाही पडली होती आणि आताही आहेच की काळजी तेव्हाच तर लग्नालासुद्धा बोलावलं नाहीस. बोलवायचं तर जाऊदे पण साधी भनक सुद्धा लागली नाही. किती महिने झाले कुणालाच माहिती नाही ह्याबद्दल, अचानक समजाव आणि मी आले इकडे."

अन्वय आणि अन्वयचे बाबा आता शांत झाले तर आत्या बॅग घेऊन सोफ्यावर बसल्या. घरातील वातावरण अचानक शांत झाल होत आणि पुन्हा आत्याच म्हणाल्या," प्रफुल बायको कुठे आहे तुझी? मागे मला बरच सुनावल होत ना तिने, मुलासाठी सुंदर मुलगी वगैरे आणेन म्हणून मग आता तिला विचारेन म्हणतेय की नक्की दिल्ली मध्ये सुंदर मुली सापडणं बंद झाल्या की तुझ्या बायकोचे विचार बदलले. बदललें तर आधीच का बदलले नाहीत?"

आत्या बोलतच होत्या की अन्वयच्या आई समोर येऊन उभ्या राहिल्या आणि आत्या पुन्हा म्हणाल्या," काय ग, तुझे विचार बदलले की काय? नाही एक वेळ होती तेव्हा म्हणायचीस ना की सुंदर मुलगी हवी माझ्या मुलाला तेव्हाच तर माझ्या मुलीला नकार कळवलास न, मग आता अचानक काय झालं? मला तर विश्वासच बसेना म्हणून म्हटलं बघून ह्याव मी ऐकलं ते खरं आहे का? खर आहे का? अरे गप्प का बसून आहेस? तुझी जीभ तर तशी चालत राहते मग आज काय झालं तिला?"

आज सर्व एकमेकांकडे बघत होते. अन्वयचे आई-बाबा मान खाली टाकून सर्व ऐकत होते तर अन्वयला स्वराची भीती वाटत होती. आता कुठे ती जरा खुश राहू लागली होती तेव्हा हे सर्व ऐकून पून्हा ती उदास होऊ नये म्हणून अन्वय आत्याला म्हणाला," आत्या तू इथेच आहेस ना मग बाकीच बोलणं होत राहील, चल रूममध्ये फ्रेश हो मग बोलू निवांत."

अन्वयने बोलायला आणि स्वराने समोर यायला एकच वेळ झाली. समोरचे सर्व का शांत आहेत म्हणून स्वरा सर्वांकडे बघत होती आणि आत्या आता स्वराकडे. आता स्वराचीही नजर त्यांच्यावर गेली आणि आत्या हसतच उत्तरली," बरोबर आहे तर मी ऐकलेले म्हणून पळवत होतास का मला? हुशार आहेस हा आईसारखा!! पण मला सांग अन्वय तुझी आणि तुझ्या आईची चॉइस नक्की कशी बदलली? तुझ्या आईला तर सुंदर मुलगीच हवी होती मग हिला कस स्वीकारलं आणि जर हिला स्वीकारलं तर माझ्या मुलीमध्ये नक्की काय दोष होता? तुला माहिती आहे ना मी त्या दिवसानंतर तुमच्या घरी कधी आलेच नाही, आज आले पण ते हे बघायला की आता तुम्ही कोणता हिरा आणला? इथे आले तर खरच जाणवलं की हिराच आणलात तुम्ही फक्त त्या हिऱ्याला चकाकी द्यायला विसरलात. मस्त चॉइस आहे रे तुझी आणि तुझ्या आईची."

स्वरा एकटक आत्याकडे बघत होती तर अन्वय स्वराकडे आणि अन्वयची आई त्यांचं बोलणं ऐकावे लागत आहे म्हणून अन्वयकडे रागाने बघत होत्या. आत्याच्या नजरेतुन ह्यातली एकही गोष्ट सुटली नाही आणि त्याच पूढे म्हणाल्या," प्रफुल चल रे माझी बॅग वर घेऊन. थांबेल काही दिवस आता आलेच आहे तर. मग बोलता येईलच सर्व. आता मला नाही वाटत कुणाकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे असतील. मला मेलीला मिळतील उत्तर लवकरच. मी घेतल्याशिवाय जाणार कुठे आहे. तुम्हाला काय वाटत मी विसरले माझा अपमान. अजिबात नाही. आता आलेच आहे तर बघ घेते की नाही उत्तर तुझ्या बायकोकडून."

अन्वयच्या बाबांनी बॅग हातात घेतली आणि ते त्यांना वरच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागले. आई देखील रागात बेडरूमला पोहोचल्या तर अन्वय स्वराच्या चेहऱ्यावर लक्ष देऊन होता. स्वराला कदाचित माहीत होतं की तो तिच्याकडे बघत होता म्हणून चेहऱ्यावर हसू आणत उत्तरली," सर निघायचं ना, नाही तर उशीर होईल उगाच."

अन्वय तिथेच उभा राहून तिच्याकडे बघत होता तर स्वरा त्याच्यासमोरून पटापट समोर निघाली आणि कार मध्ये जाऊन बसली. पहिल्यांदा त्याला तिच्या मनात नक्की काय सुरू आहे समजलं नव्हतं म्हणून तो तिथेच शांत उभा होता तर स्वराने कारमधून हॉर्न वाजविला आणि शांत असलेला अन्वय अचानक आपल्या विचारातून बाहेर आला. तो लगेच धावतच कारमध्ये पोहोचला आणि हळूच त्याने कार सुरू केली.

कार तर सुरू झाली होती पण अन्वय अजूनही शांतच होता. कार चालवताना त्याच अर्ध लक्ष तिच्याकडे होत. त्याला वाटत होतं की तिला नक्की त्रास झाला असेल पण इकडे स्वरा आपल्यातच हरवली होती. तिच्या तोंडून गाण्याच्या ओळी बाहेर येत होत्या. ती एकटीच गुणगुणत बसली होती म्हणून स्वराच्या मनात नक्की काय सुरू आहे ह्याचा अंदाज त्याला येत नव्हता. तिला समजून घेण्याचे त्याचे अविरत प्रयत्न सुरू होते पण आज तो तिला समजू शकत नव्हता. अगदी लग्नानंतरचा पहिला दिवस तसाच होता, जेव्हा तो तिच्यावर नजर ठेवून होता तर ती आपल्याच जगात हरवली होती पण चेहऱ्यावर हसू असणे म्हणजे मनात त्रास होत नाही अस काही आहे का? हा प्रश्न त्याला सतत त्रास देत होता आणि कदाचित पूर्ण दिवसात त्याला हा प्रश्न नक्की त्रास देणार होता.

अन्वय स्वरा ऑफिसला पोहोचले होते पण अन्वयच अजूनही कामात मन लागत नव्हत. आत्याच बोलणं ऐकून तिला त्रास झालेला असावा अस त्याला वाटत होतं म्हणून आज ऑफिसमध्ये त्याची नजर क्षणभर तिच्यावरून दूर झाली नव्हती पण स्वरा मात्र दुःखी होण्या ऐवजी सतत हसत होती. तिच्या चेहऱ्यावर आज क्षणभरही दुःख जाणवत नव्हतं कदाचित तिने त्याला सतत हसत राहण्याच वचन दिल होत म्हणून ती हसत असावी असा त्याचा अंदाज होत पण आज तीच हसू बघूनही अन्वय शांत झाला नव्हता. त्या हसण्यामागे नक्कीच कुठेतरी दुःख लपून बसलय हे त्याला माहिती होत म्हणून आज त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती तर स्वराला आनंदी राहायला आता कारणांची गरज नव्हती. आज दिवसभर दोघांचाही असाच खेळ सुरू होता पण अन्वयच मन काही जाग्यावर नव्हतं. एक सल होती त्याच्या मनात जी तशीच कायम राहिली होती.

आजचा दिवस कसातरी गेला होता. ती रात्रीची वेळ होती. सर्वांचे जेवण आटोपले होते आणि आत्या एकट्याच आपल्या रूममध्ये बसल्या होत्या. बाबाही आताच आत्याच्या रूममधून निघाले होते हे लक्ष्यात येताच त्याने दाराजवळ येत विचारले," आत्या कामात नसशील तर आत येऊ का??"

आत्याने हसतच म्हटले," अरे ये ना परवानगी का घेतो आहेस. ह्यावेळी कोणते काम असणार आहेत मला? ये बरच झालं, निवांत बोलायला मिळेल मला तुझ्याशी."

आत्याने परवानगी देताच अन्वय अगदी तिच्या जवळ जाऊन बसला. आत्या आता जरा शांत वाटत होत्या म्हणून अन्वय हळुवार स्वरात उत्तरला," अग मला वाटलं की झोपायची वेळ झालीय ना तर उगाच त्रास नको तुला म्हणून म्हटलं. आधीच प्रवास झाला आज त्यात मी नको ना त्रास द्यायला म्हणून म्हटलं विचारावं नाही तर उद्या बोललो असतो आपण."

आत्या हसतच उत्तरली," दिवसभर झोपूनच होते रे. बर झाल तू आलास, आता थोडा वेळ का होईना छान जाईल माझा. बोल काय म्हणतोस? "

आज आत्याच्या चेहऱ्यावर सतत हसू होत. ते बघूनच अन्वय अगदी नम्र स्वरात उत्तरला," आत्या खूप दिवस झाले तुझ्याशी काहीतरी बोलायच होत पण संधी मिळाली नाही. जर तुझी काही हरकत नसेल तर बोलू का?"

त्याचे शब्द ऐकताच आत्याच हसू नाहीस झालं आणि त्या त्याच्यावर नजर रोखीत म्हणाल्या," हमम बोल.."

अन्वयने दीर्घ श्वास घेतला आणि आत्याच्या नजरेला नजर देत हळुवार शब्दात उत्तरला," आत्या तू मला मेघाच स्थळ आणलं होतं त्यावेळची गोष्ट. मी तुझा कदाचित लाडका म्हणून मी तुझा जावई होणं कुठेच चुकीच नव्हतं पण मी मेघाला नकार देण्याच कारण ती सुंदर नव्हती हे अजिबात नव्हतं, त्याच कारण म्हणजे आमचं नात. मी मेघा आणि निहारिकाला कायमच बहीण म्हणून बघत आलोय मग अचानक तिला लाइफ पार्टनर म्हणून कस बघू? हेच कारण होत की मी तिला नाही म्हटलं, नाही तर मला आईपेक्षाही प्रिय असलेल्या आत्याचा शब्द मी कधीच पडू दिला नसता हे तुलाही माहिती आहे. माझा नकार आला तेव्हापासून तू कधीच घरी आली नाहीस आणि हे तुला सांगायचं राहील. तरीही मी ह्याबद्दल मेघाशी बोललो होतो. तिनेही मला कधीच भावाच्या वर बघितले नव्हते. तिने जेव्हा मला ह्याबद्दल सांगितले तेव्हा जाऊन मी माझा निर्णय घेतला. तू रागावलीस पण ती कदाचित आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करून आज सुखी आहे. जर आज आम्ही लग्न केल असत तर सर्व लोक तर खुश असते पण आम्ही दोघे असतो का?? कदाचित.."

आत्या अजूनही शांतच होत्या आणि अन्वय पुन्हा नम्र स्वरात उत्तरला," आत्या तू बोलत नव्हतीस म्हणून तुला माझ्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे माहिती नव्हतं पण आज सर्व काही सांगतो तुला. आत्या माझं ना काही दिवसांसाठी मुंबईला ट्रान्सफर झालं होतं तेंव्हाची ही गोष्ट. माझा लग्नावरचा विश्वास उडाला होता मुली बघून बघून अशातच मला स्वरा भेटली. होती तशी सामान्य मुलगी पण माझ्यासाठी असामान्य मुलगी. कुणीतरी दिलेली एक शिक्षा तिने हसत हसत स्वीकारली आणि आपलं आयुष्य जगू लागली. सोपं नव्हतं तिच्यासाठी हे अस जगणं पण तरीही तिने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही. ती जगत राहिली फक्त आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून. तिची जिद्द अशी होती की आपल्यासारख्या नॉर्मल व्यक्तींना लाजवून टाकेल आणि मी तिथेच तिच्या सुंदरतेच्या प्रेमात पडलो. चेहऱ्याच्या नाही हा मनाच्या. मला त्याच क्षणी पटलं की ही मुलगी जर आपल्या आईवडिलांठी इतकं सर्व करू शकते तर ज्या घरात जाईल त्या नात्यासाठी काय काय करेल कुणालाच अंदाज नाही."

आत्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते हे अन्वयच्या नजरेतून सुटलं नाही तरीही त्याने बोलणं सुरूच ठेवल," आत्या मला वाटलं होतं की तिची ती सुंदरता सर्व अगदी सहज स्वीकारतील पण जग तर सोडा माझ्या घरच्यांनीही तिच्या चेहऱ्याकडे बघन सोडून तिच्या मनाची सुंदरता कधीच अनुभवली नाही. आत्या ती खरच सुंदर आहे, तू सकाळी म्हटलस त्याप्रमाणे हिरा आहे पण त्या हिऱ्याची किंमत फक्त सोनार करू शकतो कारण वरून जरी तो कोळशात सापडला असला तरीही त्या कोळशाच्या मध्ये तो सापडतो हे विसरून चालणार नाही. लग्न खर तर सर्वांच्या समवेतच करायचं होतं पण जिथे घरच्यांनाच मान्य नव्हत तिथे सर्वाना बोलावलं असत तर आईला आणखीच वाईट वाटलं असत म्हणून कुणालाच बोलावलं नाही. आत्या खर सांगू ना मला तुमचं प्रामाणिक मत आवडत पण कधी कधी आपल्या रागाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एखादाच्या भावना ओळखायच्या असतात हे आपण विसरून जातो. स्वराने इतक्या वर्षात काय काय सहन केलंय फक्त हे मला माहिती आहे त्यामुळे तिची सुंदरता फक्त मी बघू शकतो. आईने तिला आजपर्यंत खूप काही म्हटलं पण तिने एका शब्दाने आईला उत्तर दिलं नाही. ती एकटीही जगू शकली असती पण तिने प्रेमाला स्वीकारलं त्रास होणार हे माहिती असतानाही. ती कैद मध्ये जीवन जगतेय फक्त माझ्यासाठी. मग अशा मुलीला हिरा म्हणायचं की नाही ते तू ठरव. आत्या मी कुणाला ह्याबद्दल स्पष्टीकरण दिलं देखील नाही आणि देणारही नाही पण तुला देतोय कारण मी तुला आईपेक्षा मोठं मानतो म्हणून तुला सर्व सांगायला आलो. आत्या तुम्ही कितीही काहीही बोला पण ती एक शब्द उलटून बोलणार नाही हे माहिती आहे मला पण ती काही बोलत नाही म्हणून आपण सतत सर्वांनी सुनावन योग्यही नाही. मी तुझा मुलगा आहे तेव्हा हवं तेवढं ओरड पण ती माझी जबाबदारी आहे, तिच्या आईला मी कायम आनंदी ठेवेन अस वचन दिले आहे तेव्हा प्लिज तिला काही बोलू नका. हे मी बायकोसाठी म्हणत नाहीये तर एका मुलीसाठी म्हणतोय जी खरच ह्या समाजात आदर डिजर्व करते, आपलं स्थान डिजर्व करते. तिला आपण खूप काही नाही देऊ शकलो तरीही चालेल पण तिच्याकडून सर्व काही हिरावून घेऊ अस नको व्हायला. मला फक्त एवढंच बोलायच होत, तुला मी दुखावलं असेल तर माफ कर पण मी माझ्या आईजवळ सर्व हक्काने बोललो ह्याचा मला आनंद आहे. आता आई रागावली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण हक्क आहे तिचा पण एक गोष्ट सांगेन आत्या तिची सुंदरता चेहऱ्यावरून नाही तर मनाने ठरव मग सांग मला ती सुंदर आहे की नाही. मी हिरा शोधून आणला की नाही ते? वरून पाहताना तर हिराही एक चमकणारा दगड आहे पण त्याचे गुण बघायचे असतील तर त्याला आधी ओळखावं लागेल. सर्वांनी हीच चूक केली. आता तुही करणार असेल तर खुशाल कर पण विना ओळखता कुणाला काहीही बोलणं योग्य आहे का हा विचार नक्की कर."

अन्वयला बोलता बोलता भरून आलं होतं म्हणून तो सरळ बाहेर निघाला तर आत्या आताही त्याच्या बोलण्यावर विचार करत बसली होती. तिने लाईट तर ऑफ केला होता पण तिला काही झोप येत नव्हती. अन्वयचा प्रत्येक शब्द तिची झोप उडवत होता. अन्वय- स्वरा सोडून आत्या एकमेव व्यक्ती होती जीची स्वराचा विचार करून झोप उडाली होती. काहीतरी तिच्या मनात सुरू होत पण ती कुणाजवळ बोलू शकत नव्हती म्हणून ती रात्र जाण्याची वाट पाहू लागली पण झोपेचा अजिबात पत्ता नव्हता हे मात्र खरं. त्यांनी अन्वयचे शब्द फक्त ऐकले नव्हते तर समजूनही घेतले होते म्हणून कदाचित ते शब्द त्यांना जास्तच लागले होते.

ती सकाळची वेळ. आत्याला काही नीट झोप आली नव्हती त्यामुळे त्या सरळ खाली पोहोचल्या. त्यांना जाणवलं की स्वरा किचनमध्ये काम करत आहेत म्हणून त्या तिथे पोहोचल्या. त्यांना बघताच स्वराने हसतच वीश केले," गुड मॉर्निंग आत्या."

आत्या काहिच बोलली नाही पण त्यांची नजर स्वरावरच होती. स्वराची काम आवरताना धांदल उडत होती हे आत्याला दिसत होतं तरीही त्या काहीच म्हणाल्या नाही. काही क्षण तसेच शांततेत गेले आणि आत्याने स्वराला विचारले," सुनबाई चहा मिळेल का मला?"

सुनबाई हा शब्द ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. तिने वळून हसतच त्यांना विचारले," तुम्हाला खरच आवडेल माझ्या हातचा चहा घ्यायला??"

स्वरा हसून बघत होती तर ती अस का म्हणाली म्हणून आत्या विचार करत होती. त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी म्हटले," हो मग न आवडायला काय झालं? घरचे पीत नाहीत का चहा? मी काही वेगळं मागितल का?"

आत्याचा होकार येताच स्वराने सर्व काम बाजूला ठेवले आणि चहा टाकू लागली. तिच्यात इतका उत्साह होता की बाकीच्या प्रश्नांकडॆ आपोआप तीच दुर्लक्ष झालं. तिने चहा ठेवला आणि पुन्हा आत्याने विचारले," तू अस का म्हणालीस की तुम्ही खरच घेणार का चहा? "

स्वराने गॅस कमी केला आणि आत्याकडे बघून म्हणाली," अन्वय सरानंतर तुम्ही पहिल्या आहात ज्यांना माझ्याकडून काहीतरी हवंय. काही क्षण विश्वास बसला नाही माझ्या कानावर म्हणून म्हणाले."

आत्या नकळत बोलून गेल्या," म्हणजे ह्या घरचे तुझ्या हातच काहीच खात नाहीत की पीत नाहीत?"

स्वराच्या चेहऱ्यावरच हसू आताही तसच होत आणि ती हसतच उत्तरली," हो, त्यांनी मला कधी आपली सून मानलं नाही. तेव्हा इतर गोष्टीचा विषयच येत नाही. आमच्या किचनच्या वेळा पण ठरलेल्या आहेत म्हणून मी लवकर उठून आवरते. इथे मी फक्त अन्वय सर आणि माझ्यासाठी स्वयंपाक बनवते. तुम्हाला आवडेल माझ्या हातच खायला? तुम्हाला आवडणार असेल तर मी आज रात्री सर्व तुमच्या आवडीचच बनवेल. मला फार आवडतो स्वयंपाक बनवायला. मला जमतो छान स्वयंपाक. तुम्ही खाणार माझ्या हातच?"

आत्या स्वराच्या चेहऱ्यावर लक्ष देऊन होत्या. तिच्या आयुष्यात कितीतरी दुःख होती तरीही चेहऱ्यावरच हसू कमी झालं नव्हतं हे बघून त्यानाही तिचा हेवा वाटला. त्यांनी तिच्या चेहर्यावर नजर टाकत म्हटले," का नाही आवडणार? मी तर तुला ऑर्डर देणार आहे मग म्हणू नको हा कंटाळा आलाय."

स्वरा हसतच उत्तरली," तुम्हाला हवं ते बनवून देईल. त्यात माघार नाही. तुम्ही बोलून तर बघा, कंटाळले तर म्हणा मला. सर्व करेन अगदी आवडीने. आईसाठी बनवायला मी का माघार घेईन? तुम्ही ऑर्डर करा फक्त."

तीच उत्तर ऐकून क्षणभर त्यांना शांती मिळाली होती. एव्हाना चहा तयार झाला होता. स्वराने त्यांना चहा दिला आणि आत्या तिथेच उभ्या राहून चहा घेऊ लागल्या. आत्या काही क्षण चहा घेताना शांतच होत्या आणि हळुवार स्वरात त्यांनी विचारले," स्वरा तुला त्रास नाही होत अन्वयच्या आईच्या वागण्याचा??"

स्वरा काही क्षण शांत झाली. चेहऱ्यावरच हसू काही क्षण नाहीस झालं आणि ती हळुवार स्वरात उत्तरली," नाही होत आत्या. त्या आपल्या जागी योग्यच आहेत. आपल्या लाडक्या मुलाने त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं तर कोणतीही आई अशीच करेल हे माहिती आहे मला म्हणून त्यांचे शब्द मनावर घेत नाही. आईच प्रेम जस आपल असत, तसा त्यांचा रागही आपलाच असतो. कधीतरी स्वीकारतील त्या मला. अन्वय सर आहेत ना सोबत मग आम्ही आईला मनवु नक्की. ते माझ्यावर खूप विश्वास ठेवतात आणि मलाही त्यांचा विश्वास पूर्ण करून दाखवायचा आहे."

आत्याने पटकन विचारले," आणि नाही स्वीकारलं तर?"

स्वराने चेहऱ्यावर निख्खळ हसू आणत म्हटले," नाही स्वीकारलं तर अन्वय सरांच प्रेमच पुरेस आहे आयुष्यभर एकट जगायला. त्यांच्या प्रेमासमोर मला लोकांचे शब्द, बोलनी काहीच दिसत नाही म्हणूनच तर आई सतत रागावणार हे माहिती असतानाही फक्त ते प्रेम अनुभवायला मी इथे आले आणि मला माझ्या ह्या निर्णयावर खूप अभिमान आहे. अन्वय सरांसारखा साथीदार असला ना तर मग बाकीच्या जगाची चिंता राहत नाही. इतकं प्रेम मिळाल्यावर लोकांचे कटू शब्दही गोड वाटू लागतात हे जाणवलं मला काहीच दिवसात."

स्वरा सहज बोलून गेली होती पण आत्याच्या डोळ्यात पटकन पाणी आल. त्यांनी ते सहज लपवून घेतलं. स्वरा आता त्यांच्याशी बऱ्याच वेळा बोलत होती पण त्यांची पुढे स्वराला प्रश्न विचारायची हिम्मत काही झाली नाही. असा करता करताच बराच वेळ निघून गेला.

स्वराच्या ऑफिसची वेळ झाली होती. ती तयार होऊन हॉलला पोहोचली. आत्या अजूनही हॉलमध्येच बसल्या होत्या. स्वराने त्यांना बघताच नमस्कार करत म्हटले," आत्या आज मी ऑफिसला जातेय, उद्या सुट्टी घेईन मग खूप गप्पा मारू. सॉरी हा आज जावं लागेल. आधी कळवल नाही ना सुट्टीच म्हणून. येते मी."

स्वराने त्यांचे आशीर्वाद घेतले आणि निघाली. अन्वय स्वराची बाहेर वाट बघत होता म्हणून स्वराही बाहेर पडली. आत्याने तिला आशीर्वाद दिले नव्हते म्हणून त्याही पटकन बाहेर आल्या. अन्वय समोर दिसताच आत्याने भावुक होत म्हटले," अन्वय सॉरी!! काल मी कुत्सितपणे सर्व बोलून गेले होते पण आज आनंदाने सांगेन की खरच खूप सुंदर मुलगी शोधली आहेस तू. अगदी हिरा. ह्या घराला अगदी अशीच जोडून ठेवणारी मुलगी हवी होती आणि ते काम स्वरा नक्की करेल ह्याची खात्री आहे मला. स्वरा तुला काय आशीर्वाद देऊ समजत नाहीये. तू खूप आनंदी राहाविस बस हीच देवाला प्रार्थना करेन."

स्वरा- अन्वयने धावतच त्यांना मिठी मारली. त्या पहिल्याच व्यक्ती होत्या ज्यांना त्यांनी आपल्या मनाने जिंकल होत म्हणून तो दिवस सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. आत्याने त्यांना घट्ट मिठी मारली होती, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते तर स्वरा-अन्वयच्या चेहऱ्यावर हसू आणि आयुष्यात एका व्यक्तीला का होईना पण जिंकण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

बहोत कुछ गवाकर
दिल को सुकून मिला है
एक रिषता है यहा
जीसने मुझे अपना कहा है...