सलाईन थेरपी श्रीराम विनायक काळे द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सलाईन थेरपी

सलाईन थेरपी
के. के. अॅग्रो प्रॉडक्टस च्या डायरेक्टर बोर्डाची दुपारी अडीज वाजता सुरो झालेली मिटिंग रात्री साडे दहाला संपली.चौदावर्षाच्या कारकीर्दीत इतकी लांबलेली ही पहिलीच मिटींग! प्रदीप मिटींगमधून बाहेर पडला तरी टेन्समध्येच होता. गॅट करार झाल्यानंतर असंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या अक्षरश: टोळधाडी सारख्या भारतातल्या अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये घुसल्या. विक्रेत्यांना भरपुर कमिशन, जबरदस्त अॅडव्हर टायझिंग, आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्सना तोबरे चारून खिरापतीसारखे मिळवलेले आय.एस.आय. मार्क! ह्याच्या जोडीला प्रचंड आर्थिक पाठबळ आणि मार्केट कॅप्चर करण्यासाठी वाट्टेल त्या हीन पातळीवर जायची नीतीमत्त!!!! के.के.सारख्या रिनाऊण्ड रिलाएबल ग्रूपलासुद्धा त्यांचा फटका बसला.त्यांच्या अॅग्रो प्रॉडक्टस् ची विक्री खप खूप घसरायला लागली. हे असं फार काळ सुरु राहणं कंपनीला परवडणारं नव्हतं, कंपनी बँकरप्ट व्हायला वेळ लागला नसता.
के.के.चे बिगबॉस मिस्टर कलियथ यानी तर सरळ सरळ कंपनी बंद करून इंव्हेस्टमेण्ट एनकॅश करण्याचा सल्ला त्यांचे पार्टनर मिस्टर खन्ना याना दिला.कलियथसरांच्या दृष्टिने ते ठीकच होतं. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्यांचे आणखी तीन-चार बिझनेस सुरु होते. इथली इंव्हेस्टमेण्ट एलेक्ट्रॉनिक्स सेक्टरकडे वळवून त्यानी नवा बिझनेस सुरु केला असता. खन्ना सराना मात्र कंपनी बंद करणं पटत नव्हतं. त्यानी जीवाचं रान करून ग्रूप नावारूपाला आणलेला.... बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हा भुलभुलैया फारकाळ टिकायचा नाही. त्यांची देखभुलवणी स्ट्रॅटेजी काही काळ टिकणारी.... पवसाळ्यात रुजणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्यांसारखी अल्पजीवी आहे, असं त्यांचं ठाम मत! केवळ ट्रेड पॉलिसीवर मार्केट कॅप्चर होत नसतं,नव्याची नवलाई संपली की त्यांची ही सद्दी मोडीत निघेल हे खन्ना ओळखून होते. त्यांची फर्टिलाझर्स नी पेस्टिसाईडस् वापरून उत्पादनात काडीचीही वाढ होत नाही हे लक्षात आलं लोक त्यांच्याकडे पाठ वळवून त्याना जमिनीवर उतरतील असा त्यांचा विश्वास होता.
के.के. ग्रूपला डॅश देणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची किटकानाशकं नी टॉनिक्स (म्हणजे चक्क कॉन्सन्ट्रेटेड खतं) लॅब टेस्ट मध्ये अगदीच सुमार असल्याचं निष्पन्न झालं . केवळ ‘रामबाण, खतरनाक,वज्रटोला’ अशी लक्षवेधक नावं देवून भारतातल्या शेतकरी - बागायतदाराना तात्पुरतं आकृष्ट करण्यात यश मिळालं तरी त्या उत्पादनांचा दर्जा नी प्रभाव पारखल्या शिवाय तो विश्वास ठेवणार नाही. उलट एखादं उत्पादन सुमार दर्जाचं आहे असं पारखून बघितल्यावर भारतातल्या शेतकरी बागायतदारानी तो ब्रॅण्डच मोदीत काढून त्यांच्या इतर उत्पादनांकडेही कायमची पाठ फिरवली असती. कृषि उत्पादनाच्या बाबतीत तर एका सीझनमध्येच त्याची लायकी काय आहे हे पारखता येतं. खन्नासराना कृषि क्षेत्रातलं मुलगामी ज्ञान होतं. म्हणून कलियथसरानी कंपनी बंद करण्याचा पक्काविचार बोलून दाखवल्यावर ग्रूपमधली त्यांची पूर्ण म्हणजे ७०% पार्टनरशीप स्वत: घेण्याची तयारी खन्नासरानी दाखवल्यावर मात्र पारडं फिरलं. मार्केट पॉलिसीत कलियथ हाखन्नाचाबाप होता आणि खन्नांच्या एफ़िशिअन्सीवर त्यांचा पूर्ण भरवसा होता. त्यानी सिक्युरिटी म्हणून २०% पार्टनरशिप विकायचं मान्य केलं आणि दोह्गेही इक्वल पार्टनर झाले.
पार्टनरशीपचं सेलडीड झाल्यानंतर प्राप्त परिस्थितीत कंपनीच्या ट्रेड पॉलिसीत आणि मार्केट स्ट्रॅटेजीत काही धोरणात्मक बदल करणं गरजेचं होतं म्हणून ही आजची मिटींग होती. ग्रूपच्या मालाचा सेल खुपच कमी झाल्यावर कुणाला काहीही कल्पना न देता असिस्टंट मॅनेजर साळगावकर कंपनी सोडून गेले आणि नोकरवर्गाच्या तोंडचं पाणीच पळालं. सगळीकडे मोठमोठ्या कंपन्या एकामागोमाग एक धडाधड कोसळत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात जायला लागल्या. के.के.ग्रूपचंही असंच काहीतरी होणार अशी शंका सर्वानाच वाटू लागलेली. म्हणून ऑफिस अवर्स संपल्यावरही ठराविक नोकरवर्ग मिटींग संपेपर्यंत प्रिमायसिस मढ्ये थांबून राहिलेला.प्रदीप बाहेर येताच ज्युनिअर्सनी त्याला अक्षरश: गराडा घातला. “कंपनी सुरूच राहणार फक्त थोडेफार अॅडनिस्ट्रेटिव्ह चेंजेस होणार आहेत” असं प्रदीपने सांगितल्यावर सगळ्यानीच सुटकेचा निश्वास टाकला.
के.के. ग्रूपचा क्वालिटी कंट्रोल काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून सिद्ध झालेला होता. प्रदीप प्रॉडक्शन सुपरवायझर म्हणून आपलं काम डोळ्यात तेल घालुन करायचा. प्रत्येक फार्म्युला दोन-दोनवेळा चेक व्हायचा. मिक्सिंग तर प्रदीप जातीनिशी हजर राहून करून घ्यायचा. कॅन सिल्ड झाल्यावर सुद्धा अॅट रॅण्डम एक दोन कॅन्स फोडून आतल्या प्रॉडक्टचा फॉर्म्युला पुन्हा चेक केला जायचा. एवढी सगळी खबरदारी घेवूनही मध्यंतरी कंपनीवर एक मोठेच बालंट आलं. हापूस आंब्याच्या झाडावर तुडतुडे पडतात. ते मारण्यासाठी कंपनीने पावडर फॉर्ममध्ये काढलेलं एक प्रॉडक्ट कोकण एरियात भलतंच पॉप्युलर झालेलं. प्रतिवर्षी कोकणात त्या पावडरचा विक्रमी सेल व्हायचा. पण आठ-दहा वर्षानी त्या पावडरबद्दल प्राहकांच्या असंख्य तक्रारी यायला लागल्या. त्या पावडरचे रिझल्टस आता पहिल्याप्रमाणे मिळत नाहीत त्या अर्थी कंपनीने मूळ फॉर्मुला बदलेला असणार असा सार्वत्रिक ग्रह झालेला. देवगडच्या एका जुन्या डीलरने तर कोर्ट मॅटर केलं.
भायानक पेपरबाजी झाली. कंपनीने खप वाढवण्यासाठी फॉर्म्युला बदलून सौम्य केला असणार... एक ना दोन, अनेक आरोप झाले. डीलर एवढा जहांबाज की त्याने बागायतदारांकडून त्या पावडरचे पाच -सहा वर्षांचे जुने रॅपर पैदा करून ते एव्हिडान्स म्हणून सादर केलेले. त्यावर पावडर मधल्या कण्टेण्टचा तपशिल फॉर्म्युल्यासह नमूद केलेला असल्यामुळे कंपनी फॉर्म्युला बदलून बागायतदारांची कशी लूट करीतआहे ते सप्रमाण सिद्ध करायचा चंगच कोकणातल्या बड्या बागायतदार लॉबीने केलेला. सँपल्स गव्हर्नमेंट लॅब मध्ये चेकिंगला अनॅलिसिसला गेली. लॅबोरेटरीतले टेक्निशियन्स मॅनेज करायचा सल्ला कलियथनी दिला. पण खन्ना फर्म राहिले. कंपनी क्वालिटीकंट्रोल सेल मधल्या प्रदीपच्या टीमवर त्यांचा विश्वास होता. एकही बॅच फेल जाणार नाही अशी त्यांची पक्की खात्री.
लॅब पुण्यात असल्यामुळे तिथले तंत्रज्ञ-केमिस्ट कोकणातल्या आंबा व्यावसायिकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रिलेशन्स असणारे नी पैशाच्या आमिषाला कालत्रयी बळी ना पडणारे असणार, त्याना मॅनेज करायचा प्रयत्न अंगलट आला असता हे प्रदीपनेही खन्ना सरांच्या निदर्शनाला आणून दिलं. लॅब टेस्टचे रिपोर्टस् आले. वेगवेगळ्या वर्षांचे फॉर्म्युले चेक केल्यावर कंपनीचा फॉर्म्युला परफेक्ट असल्याचं सर्टिफिकेट मिळालं नी केस कंपनीनी जिंकली. कंपनी कायद्याच्या कचाट्यातून सहीसलमत सुटली खरी पण एक नवाप्रॉब्लेम निर्माण झाला. कोकणात्ला पावडरचा खप पूर्ण बंद झाला. ही गोष्ट कंपनीला परवडणारी नव्हती. काहीतरी नवीन ऑप्शन स्टँड करायचं आव्हान कंपनीसमोर उभं राहिलं. सगळे टॉप रँकचे अधिकारी टेक्निशियन्स, फार्मासिस्टस् कमर कसून कामाला लागले.
प्रदीपचा एक क्लासमेट बब्या भिडे! एम.एस्सी. केल्यावर तो कृषि विद्यापीठात केमिस्ट्र्री डिपार्टमेंचा एच. ओ.डी. झाला. तो जात्या भलताच जिनिअस! प्रदीप कायम त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायचा. कंपनीने तुडतुड्यांवर जी पावडर विकायची त्याचा फॉर्म्युला खरंतर बब्याच्या सुपिक डोक्यातूनच निघालेला. म्हणून प्रदीप मुद्दाम बब्याला भेटायला गेला. प्रदीपने बब्याच्या केबिनमध्ये प्रवेश केल्या-केल्या बब्याने सलामी दिली. “ मग काय म्हणतोय तुझा क्याँव क्याँव ग्रूप?” के.के. ग्रूपचा उल्लेख तो नेहेमीच क्याँव क्याँव ग्रूप असा करायचा. कंपनीवरच्या केसची माहिती सांगून त्यालाआपला प्रॉब्लेम विचारल्यावर हसत हसत बब्या म्हणाला, “ अरे लेको , निसर्ग हा क्याँव क्याँव ग्रूपचा बाप आहे बाप! तुमच्या केसच्या बातम्या वाचल्या तेंव्हाच त्यात काय गोची झाली असणार ते पुरतं ओळखलं मी. सतत एकच एकच कॉम्बिनेशन वापरल्यामुळे तुमचा फॉर्म्युला तुडतुड्यानी पचवलाय् आता! त्यांची रेझिटन्स कॅपॅसिटी वाढलीय् ....आता बसा यँव यँव करीत ! जुने फॉर्म्युले बदला आता .” मग लेटरहेडचा कागद ओढून त्याने नव्या फॉर्म्युल्याचे डिटेल्स फडाक्कन लिहून दिले.
प्रदीपचा म्हणले पर्यायाने कंपनीचा प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह झाला. पडून राहिलेल्या प्रॉडक्टस् मध्ये वेगवेगळी केमिकल्स टाकून ‘चॅलेंजर ’ हे पूर्ण नवीन प्रॉडक्ट कंपनीने लाँच केलं. ‘चॅलेंजर ’चे रिझल्टस फेव्हरेबल मिळू लागताच प्रॉडक्ट जोरदार खपायला लागलं. कोकण एरियात गेलेली पत कंपनीने पुन्हा हासिल केली. बब्याचा गुरुमंत्र हुषारीने राबवून खतांच्याही जुन्या फॉर्म्युल्यात बदल करून हापूस कलमांसाठी काही स्पेशल खतं सुद्धा कंपनीने नव्याने बाजारात आणली. पारंपारिक पावडर/ग्रॅन्युल्स ऐवजी लिक्विड फॉर्म मधली बायोकेमिकल खतं ही संकल्पना बब्याच्याच सुपिक डोक्यातून निघालेली. त्यांचा तर विक्रमी सेल व्हायला लागला.गव्हर्नमेंट जॉब मध्ये सबघोडे बारा टक्के. तिथे बब्याचा टॅलण्ट वाया जात होता.प्रदीप मुळे त्याला आपली एक्सिरीमेंटस् वर्काउट करून पहायला मिळायची. प्रदीप कोणतंही नवीन प्रॉडक्ट विक्रीला ठेवण्यापूर्वी ते आपल्या कुणकेश्वरच्या बागेत ट्राय करून पहायचा. काही वेळा त्याचे चुलते बाबुकाका यांचा या गोष्टीना विरोध व्हायचा.पण त्याचे चुलत नव्या विचारांचे होते. त्यांची दृष्टी व्यावसायिकाची होती.बाबुकाकांच्या मते शेळ्या-मेंढ्यांची लेंडी, शेण खत आणि टाळ मातीची हुरणी भरणी एवढी मेहनत -मशागत आणि गंधक पावडरीची राखेची फवारणी यापरती अन्य खते किंवा फवारणी करायची गरजच नव्हती. पण त्यांच्या या पद्धतीनी उत्पन्न वाढलं नसतं.
बब्याने दिलेल्या फॉर्मुल्या प्रमाणे बनवलेलं ग्रॅन्युअल फॉर्म नधलं ग्रो मोअर खत कोकणात भलतंच पॉप्युलर झालं. सराट्यासारखी कलमं चार महिन्यात हिरव्यागार पर्णसंभराने भरून जायची. पण अटलजींच्या सरकारने गॅट केल्यावर भारतीय बाजारात घुसलेल्या महाबलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यानी के.के.ग्रूपला चांगलाच दणका दिला. कंपनीचा निम्मा धंदा कोकणातल्या आंबा व्यवसायावर अवलंबून होता. साधन शुचिता धाब्यावर बसवून बहुराष्ट्रीय कंपन्यानी बाजारात आणलेलं कल्टार घातल्यावर कलमाना हमखास मोहोर येत असला तरी ते वाढ निरोधक असल्याने त्याचा वापर कलमांचे आयुष्य कमी करणारा होता. पण ही बाब कंपनीने व्यावसायिकांच्या निदर्शनाला आणून दिली नाही . उलट उत्पन्नाची हुकुमी शाश्वती मिळते म्हणून त्याचा खप भरमसाठ वाढू लागला. खप वाढला तशी त्याची किंमतही चौपट पाचपटीने वाढवून बहुराष्ट्रीय कंपन्यानी खोऱ्याने पैसा ओढायला सुरुवात केली.
बहुराष्ट्रीय कंपन्यांची कीटक नाशके तर सजीवांच्या आरोग्यावर विघातक परिणाम करणारी ....आंतर प्रवाही ! त्यांचा अंश फळातही उतरायचा. त्यांच्या सेवनामुळे पुढची पिढी जन्मत: विकृत उपजण्याचा धोका होता . त्यांच्या वापर निसर्गातल्या सजीवांच्या शृंखला खंडित करणारा होता. पण तत्कालिन परिणाम चटकन नजरेत भरण्या एवढा प्रभावी असल्यामुळे भरमासाठ किंमतीची उत्पादनेही व्यावसायिक बेदरकारपणे खरेदी करू लागले. साळगावकर कंपनीसोडून गेल्यावर प्रदीप असिस्टंट मॅनेजर झाला. त्याने बब्याच्या मदतीने नवनीन फॉर्म्युले वापरून कंपनीची उत्पादने मार्केटमध्ये स्पर्धा असूनही टोकून राहिली.
बहुराष्ट्रीय कंपन्यांची विकृत -विध्वंसक मार्केत स्ट्रॅटेजी बब्याला अजिबात पसंत नव्हती. त्यांच्या विघातक आंतरप्रवाही कृषिउत्पादनांचे विपरीत परिणाम स्पष्ट करणारे अनेक लेख त्याने वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही केले. पण वृत्तपत्रातून समाज प्रबोधन होण्याचा टिळक आगराकरांचा जमाना आता राहिला नव्हता. मजेची बाब म्हणजे ज्या पेपरमध्ये विघातक कीटकनाशकांचे दुष्परिणाम स्पष्ट करनारा बब्याचा लेख प्रसिद्ध व्हायचा, त्याच पेपरच्या पहिल्या पानावर पाऊणपान भरेल एवढी सायपर मेथ्रिन किंवा कॉन्फिडॉर असल्या घातक कीटक नाशकाची जाहिरात छापलेली असायची. सामान्य लोक असल्या चकचकित जाहिरातीना पटकन भुलायचे. हापुस आंबा, द्राक्षे, डाळिंब या व्यापारी फळांचे उत्पादक आणि वार्षिक मक्त्याने बागा घेणारे ठेकेदार यांचा डोळा तत्कालिन नफ्यावर असतो. दूर गामी परिणामांचा विचार , चिकित्सा करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा भरपूर नी हुकुमी उत्पनाची गॅरेण्टी देणारं कोणतंही औषध- कीटक नाशक चढ्या भावाने खरेदी करायला लोक तयारअसत. चकचकीत रॅपर्स, देखण्या पॉलिथीन बॅग्ज आणि गिऱ्हाईकाला खरेदीवर 20-25% कमिशनची भुलथाप ही आता विक्रीची अॅश्युरिटी बनली. उण्या महाग किंमतीची लओकाना फिकीरच नव्हती.
मल्टिनॅशनल कंपन्यांच्या घातक -अनैतिक ट्रेड पॉलिसीवर प्रदीप आणि बब्याची गंभीर चर्चा सुरु होती. कृषिमंत्र्याना मॅनेज करून विदेशी कंपन्यानी आपलीकाही प्रॉडक्ट अव्वाच्या सव्वा किंमतीने सरकारच्या गळ्यात मारली. अन् कृषि मंत्र्यानी राज्यातल्या सगळ्या कृषि महाविद्यालयाना काही ठराविक बियाणी, खतं-टॉनिक्स, किटक नाशकं घेण्याची नी त्यांच्या वापरामुळे उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचे रिपोर्टस् शासनाकडे सादर करण्याची अकथित सक्तीच झाली. बाब अगदी सरळ साधी सोपी.... शासनाने पुरवलेल्या बियाणी खतं याविरुद्ध रिपोर्ट करण्याचं धाडस कोणी कसं केलं असत? बब्या जाम उखडलेला होता.सरकारच्या या गळचेपी विरुद्ध ब्र ही न काढता तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात तशी गत झालेली. पण प्रदीपला सहाय्य करून मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मोनोपोलीला शह दिल्याचं समाधान त्याला मिळायचं. दुसरं म्हणजे तो एच.ओ. डी. असल्यामुळे आठवड्यातून चारदोन लेक्चर्स दिली की नवे नवे फॉर्म्युले शोधायला लागणारा निवांत वेळ त्याच्यापाशी मुबलक असायचा. अशाच उद्विग्न मानसिक अवस्थेत असताना आज पर्यंतच्या सगळ्या पद्धती मोडीत काढील आणि मल्टिनॅशनल कंपन्याना तोंडात बोट घालायला लावील अशी भन्नट ‘सलाईन थेरपी ’ त्याला सुचली. नावासह संपूर्ण पद्धतीच एवढी हॅण्टॅस्टिक होती की ती वर्कआउट झाल्यावर के.के. ग्रूपला त्यांचा प्लाँट एक्साण्ड करावा लागला असता. दोन दिवस सविस्तर चर्चा करून संपूर्ण थेरपीचं पेपर वर्क करून प्रदीप परत गेला.
पेपर वाचल्यावर युरेकायुरेका म्हणत नाचत सुटलेल्याआर्किमीडीज सारखीच खन्नांचीही अवस्था झाली. रिव्हॉल्विंग चेअर मधून टुण्ण्कन उठून ते म्हणाले, “रियली बिविचिंग, वी मस्ट सेलिब्रेट नाऊ ” त्यानी प्रदीपला अक्षरश: ओढित फाईवस्टार हॉटेलमध्ये नेलं. प्रदीपला त्याचं एक्सपिरीमेंट वर्कआऊट करण्यासाठी भली मोठी अमाउंट सँक्शन करून त्याच्या दिमतीला ड्रायव्हरसह स्वतंत्र ए.सी. गाडी खन्नानी दिली. मग सगळा प्रोग्रॅम चॉकआउट करून बब्याच्या सहा पी.जी.च्या रिसर्च स्टुडंटसची टीम घेवून थेरपीची प्री टेस्ट घेण्यासाठी त्याने सरळ कुणकेश्वर गाठलं. रात्री जेवणं उरकल्यावर ही नवीन सलाईन थेरपी तो भावाना समजावून देवू लागला. पारंपारिक पद्धतीत खतं झाडाच्या खोडापासून फुटभर अंतरावर गोलाकार चर खणून त्यात घतली जातात. ती संपूर्ण मात्रा काही झाड शोषून घेत नाही. जवळ जवळ निम्मेपेक्षाही अधिक मटेरियल फुकट जातं. स्प्रिंकलिंग पद्धतीने किंवा फवारणी करून दिलेल्या खतांच्या बाबतीतही वेस्टेज फार असायचं. या दोन्ही पद्धतीत मिळणाऱ्या रिझल्टस चा कालावधी , प्रभाव आणि आऊटपुट याचं ही काहीच उत्तर नेमकेपणाने देणं अशक्य असतं.
बब्याच्या थेरपीत झाडाच्या मुळापासून दीड फूट उंचीवर झाडाच्या बुंध्याची गोलाई बघून त्याच्या मध्यभागापर्यंत पोचेल अशा अदमासाने आठ ते दहा इंच खोल तिरपं ड्रील मारून त्यात दाभणा एवढी जाड स्टीलची पोकळ सुई खुपसायची, त्या सुईला सलाईन सारखी बॉटल जोडून काही जैवीक, झाडाच्या पेशीजल सदृश वाढीला पूरक पोषक द्रवरूप रसायनं, प्रतिकारशक्ती वाढविणारी रसायनं झाडाच्या आंतर भागात थेट पुरवायची. ही द्रवरूप रसायनं संपृक्त असल्याने आणि त्यांची निर्मिती लॅबोरेटरीत तज्ज्ञ केमिस्टस कडून करवून घ्यायची असल्याने त्याच्या डोसच्या तुलनेत किंमत अवाजवी वाटावी अशी असेल. प्णत्याबरोबरत्याची मात्राही पारंपारिक औषधांच्या तुलनेत खूपच अल्प असणार. औषधाची मात्रा तीन ते पाच मिली म्हणजे अक्षरश: खोडाला मारलेल्या सुईत मावतील एवढेच काही थेंब इतकी अल्प असणार. पण त्यांचे दृष्य परिणाम अल्प काळात आणि नजरेत भरावे इतके प्रभावी मिळण्याची नव्याण्णव टक्के खात्री देता येणार होती.
ही माहिती ऐकताच भावांचे चेहेरे उजळले. आतापर्यंत अलिप्तपणे बाजूला बसून निर्विकार मुद्रेने श्रवण करणारे बाबूकाका मात्र नाराजीच्या सुरात म्हणाले,“आता तूच सांगतोहेस म्हणून होय म्हणायचे इतकेच. आता तूच बघ, एकाच ठिकाणातली दहा झाडे घे... ती सारखी वाधतात काय? तर नाही. एकाच वयाच्या सारख्याच अंगलटीच्या दोन मुलांची भूक वेगळी, त्यांच्या आवडीनिवडी नी शारिरीक गरजा दिखी वेगळ्या म्हणून त्यांचे आहार पण वेगळा. एकजण दीड भाकरी खाईल तर दुसरा दोन खावून सुधा पुरे म्हणायचा नाय. दोघांची भुक एकाच मापात नाय मोजता यायची... एवढे मोठे झाड ते काय खाते नी किती खाते हे फक्त बृहस्पतीच जाणे.... ते शास्त्र तुम्हा आम्हाला अगम्य... तुमच्या बाता आयकायलाच बऱ्या.. इतकें मोठे झाड नी ते म्हणे चार नी पाच थेंब्यात सुधारणार....माती नी गोबर.... पैसे उकळून झाडाच्या जीवाशी खेळायचे धंदे ... दुसरें काय...! झाडाची नीट मेहनत करायला हवी. त्यापेक्षाही त्याला जीव लावायला हवा. मग त्याला धर म्हणून सांगावे लागत नाय नी ते कल्टार की फल्टार काय ते ते पण घालायला लागत नाय. ”
“तुला खरे नाय वाटणार कदाचित.....तू तेव्हा जल्माला दखी यायचा होतास. मे महिन्यात आमचा गोठा जळला. जेमेतेम परिस्थिती, तेव्हा तांबडा पैसा नदरेला पदायची मारामार. आमच्यावर जसे आभाळच कोसळले. तुझा बापूस एवढा खंबीर , पण ठिकाणात गेल्यावर घो घो रडायला लागला. गोठा बांधायचा म्हणजे कर्ज बोडक्यावर येणार.... मग ना ईलाजाने विठू बोंडाळ्याकडे मळा गहाण टाकून कर्ज काढले. तुझा बापूस गुरे चरवायला गेला की कलमांच्यामुळात बसून रडायचा. तुला खोटे वाटेल पण कलमाना त्याची दया आली.डिसेंबरातच आगप फूट आली. त्या काळी एक म्हण होती डिसेंबर शिकंदर जानेवारी सरासरी! डिसेंबरातली फूट म्हणजे आगप माल ... चढ्या दराने जाणार, जानेवारी म्हणजे मागस ...सगळ्या जग दुनियेतून माल जाणार नी बाजार कोसळणार, पडत्या भावाने जेमतेम आंगवाटावणी झाली न झाली. त्या वर्षी कलमांचे एकशे साठ रुपये झाले. कर्ज फिटून चार पैसे शिलकी पडले.”
“ तुझा बापूस जिता असे पर्यंत त्याची रोजची कलमातली फेरी काय कधि चुकली नाय. तो मेला हार्ट्फेल होवून तोसुद्धा कलमात हे म्हायतीच आहे तुम्हाला! आता ते तुमची कल्टार... फवारण्या नी खते....त्याने कलमे फळांच्या भाराने मोडेस्तोवर धरतात. पण दोनतीन वर्सानी फळ हे एवढे असोल्या सुपारी एवढे... आंबा काय धड पिकत नाय. देठाकडून कुसत जातो नी प्रत्येक फळात पोपी! जळले तुमचे शोध.....सगळे पैशाचे खेळ.” बाबुकाकांच्या तोंडाला लागण्यात अर्थ नव्हता. अन त्यांचे बोलणे फार गंभीरपणे घ्यायचीही गरज नव्हती,कारण आता सगळा व्यवहार त्यांचे मुलगे सांभाळित असत. दुसऱ्या दिवशी टीम कामाला लागली. पाचशे कलमांची बाग त्यातल्या निवडक शंभर कलमांवर प्रायोग सुरु झाला. तीन दिवसात सगळ्या कलमाना ड्रिलिंग करून सुया घुसवून मोहोर येण्याचा डोस देवून झाला. पहिल्या राऊंड नंतर तीस दिवसानी दुसरा नी पुन्हा वीस - वीस दिवसानी इम्युनिटी वाढवायचे दोन-तीन राऊंड असं शेड्युल बब्याने आख़ून दिलेलं नी इंजेक्शन मधून द्यायची लिक्क्विड तो स्वत:च्या देखेरेखी खाली जात निशी तयार करून पुरवणार होता.
दुसरा डोस द्यायला टीमआली तेंव्हा सगळ्या शंभरही कलमाना नखनिशिखांत फूट आलेली दिसली. प्रयोग यशस्वी होणार यात शंकाच नव्हती पण इतके ट्रिमेण्डस रिझल्टस दिसल्यावर टिमला हुरुप आला. नंतर प्रिझर्व्हेटिवचा फायनल डोस द्यायला टीम आली तेंव्हा प्रदीपची गाडी दिसल्यावर त्याचे भाऊ धावतच पुढे आले. प्रदीपला खाली उतरायलाही तकस न देता ते म्हणाले ,“ आता फळ सुपारी एवढं झालय नी एकेका देठाला पाच - पाच सहा- सहा अशी घोसाने फळं उतरलेली आहेत. गळ म्हणशील तर अजिबात नाही नी एकाही फळावर कसला रोगा-बिगाचा प्रादुर्भाव नाही...फळान फळ अगदी स्वच्छ आहे. असा उतारा बाबूकाकांच्या आठवणीत सोडच पण आमच्या पहाण्यात ही कधी-कुठे आलेला नाही. ”प्रदीपचे मन आनंदाने भरून गेले. चहा घेवून टीम बागेत गेली. फळ चांगले पोसावे, त्याला रंग यावा यासाठीचे केमिकल देवून झाले. आणखी साधारण दोन महिन्यानी फळाची वाढ पूर्ण झाली की खन्ना साहेबाना प्लॉटवर आणायचे, व्हिडिओ शूटींग करायचे नी मल्टिनॅशनल कंपन्याना जमालगोटा द्यायचा असा बेत त्याने मनोमन योजला.
रात्री जेवण्खाण झाल्यावर बाबुकाकानी प्रदीपला जवळ बोलावले. “प्रदीप, तुझा प्रयोग बघून मी चाट झालो बाबा....हे असे काही घडेल अशी मीस्वप्नात दिखी कल्पना केली नव्हती. आम्ही गाढव ठरलो ह्या ज्ञानापुढे... उरी फुटेतो धोंडे फोडून कलमाना तळ्या बांधल्या.गाड्यांवारी लेंडी ,शेणखत नी दर पावसात टाळाचे भारे घालून हुरणी भरणी केली. पण दोन-तीन खेपा सोडल्या तरउभ्या हयातीत फार मोठे उत्पन्न काय मिळाले नाय कधि... पणआमची भूकही कमी होती. कलमे मोडेपर्य&त धरतील, लाखो रुपये मिळतील नी आम्ही पायावर पाय डाळून घृतकुल्या मधुकुल्या खाऊ, छानछोकी करू हीमुळी आमची इच्छाच नव्हती. अती पैसा मिळवून तरी त्याचे करायचे काय? हा सुद्धा प्रश्नच! आमचे पोट ते केवढे नी खाणार तरी किती नी काय काय? आज अठ्ठ्यांयशी उमर आहे माझी पण अजुनही आकडी कोयती बांधून कलमात जावून विरडभर काम करतो मी. मला सुपारीच्या खांडाचे पण व्यसन नाय. चहा कसला तो मी उभ्या हयातीत चाखलेला नाय. अजून आरोग्य शाबूत राखून आहे मी. नी आमची पोरे बघा.... तुला डायबेटिस, गजाला प्रेशर प्रत्येकाच्या मागे काय ना काय व्याधी आहेच. आम्ही कोलव्याच्या घरात हायात काढली. पोराना कलमांचे लाखो रुपये मिळतात. त्यानी भले थोरले दहाखणी घर बांधले स्ल्याबचे.... तुला कंपनीची गाडी आहे... तुझे ईथले दोन्ही भाऊ यंदा आंगोपत्ती गाड्या घेतील यंदा. तुझ्या प्रयोगानी कलमांच्या जीवावर पैशाची जशी टाकसाळच गावली म्हण त्याना! आता ते सालाबाद नोकरदारां सारखे हुकमी उत्पन्न घेतील. छन आहे... कलमे जशीह्यांची देणेकरीच ... त्यांना पिळून सवाई दिढी ने दुपटीने चौपटीने वसूल करा तुम्ही नी एक दिवस होऊंदेत त्यांचे सराटे!! मला खुळ्याला तुमचे शोध-बोध कुठचे समजायला? आम्ही जे केलेते डोळसपणे नी कलम शाबूत राहिल हे योजून! ”
जरा दम खाल्ल्यावर आवंढा घोटून ते पुढे बोलु लागले. “गोठ्याजवळ एक आंबा होता. कधितरी कपडे वाळत घालायची दोरी अडकवायला म्हणून मी त्याच्या खोडात तीन इंची तारचूक मारली . काम झाल्याकर दोरी सोडली पण चूक काढायचे काय माझ्या लक्षात राहिले नाय. ह्या गोष्टीला आठ दहा वर्षे उलटली नी चूक मारलेल्या जागी मूर झाली. दोन आंगळे चार आंगळे म्हणता म्हणता चांगली वीतभर घब झाली नी आंबा हळू हळू वठायला लागला म्हणून तोडून टाकावा लागला. ह्या माझ्या हातानी चूक ठोकल्यामुळे पंधरा वर्षात सोन्यासारखे झाड वठून गेले. तुझ्या प्रयोगात तर दाभणाएवढ्या सुया मध्याभागापर्यंत ठोकलेल्या आहेत नी त्या कायम तशाच ऱ्हायच्याहेत म्हणे.... त्या बघितल्यावर मला आंब्यात ठोकलेल्या चुकेची आठवण झाली. तू काहीही म्हण पण त्या झाडांचे भवितव्य मला कठिणच दिसते आहे.. काही वर्षे जातील तोपर्यंत ... आणि दुसराही विचार आला माझ्या मनात माणसाला अन्ना ऐवजी नुसती टॉनिकची इंजेक्षने दिली तर तो कितपत कार्यक्षम राहिल ? तुम्ही हे आयते खाणे त्यांच्यातोंडात घालणार म्हटल्यावर हळू हळू झाडाना त्याचीच सवय होईल नी जमिनीतून सोधून खाणे मिळवायचे ही त्यांची सवयच मोडेल..... हे तुमचे प्रयोग पिशगती वाटतात मला..... ”
“झाड लावले की त्याने फळ द्यायला हवे ही अपेक्षा रास्तच आहे, नी झाड काही ना काही फळ देतेच. पण ती झाडाने कृतज्ञ भावनेने दिलेली देणगी आहे. माणसाने झाड लावले तरीही तो काही माणसाचा हक्क नाही. कारण तुम्ही नाही लवलेत तरी निसर्ग क्रमाने झाडे उगवतात नी वाढतातच ना? तुम्ही आधी एखादे तरी झाड लावा, त्याला रक्ताचे शिंपण करून वाढवा तेंव्हाच तुम्हाला फळासाठी ‘आ’ करायचा नैतिक अधिकार आहे. तुम्ही ज्यांच्याकडून अपेक्षा करताहात ती झाडे तुमच्या बापजाद्यानी लावलेली आहेत. तुमच्या राक्षसी अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही त्यांच्या जीवाशी अनैसर्गिक चाळे कराल तर निसर्ग तुम्हाला कदापि माफ करणार नाही. झाड वाढायला खूप वेळ लागतो पण नायसे व्हायला नाय लागत. तुम्ही शहाणेसुर्ते चांगल्या संस्कारात वाढलेले असून माकडाच्या हातात हे कोलित देताहात. पैशाला चटावलेले ठेकेदार उद्या जग दुनियेच्या बागांचा तुळांकार करतील. ”
बाबुकाकांचं बोलणं ऐकल्यावर रात्री प्रदीपला झोप लागली नाही. सकाळी उठून टीम परतीच्या प्रवासाला लागली. बब्याला भेटायला प्रदीप कृषि विद्यापीठात गेला. “आपल्या प्रयोगांचे रिझल्टस अनइमॅजिनरी आहेत.” त्यावर काहीही प्रतिसाद न देता चष्मा काढून त्याच्या काडीशी खेळ करीत शून्यात दृष्टी लावीत बब्या सांगू लागला,“अरे पद्या , आपल्या त्या प्रयोगात एक याँव याँव राहिलच बघ.... आपण झाडाच्या खोडात सुई ठोकणार ना ते छिद्र भरून येत नाही त्या भागात पावसाचे पाणी जाऊन तिथलाभाग कुजायला लागेल. गवठी भाषेत आपण त्याला मूर म्हणतो. झाडांच्या जीवन प्रणालीत खोडाला पडलेले छिद्र बुजायची प्रक्रियाच नाही. कदाचित आठ दहा वर्षे जातील पण त्यानंतर मात्र जखम चरत जावून झाड वठून जाईल. ” त्यावर जड आवाजात प्रदीप म्हणाला,“मी सुद्धा तुला तेच सांगायला आलोय.”
“आमच्या बाबू काकानी काल रात्री हीच शंका बोलून दाख़वली. त्यानीतर पुढचेही भाकित केले. सतत आयते खाणे खायची सवय लागली ना तर अन्ननिर्मितीची आपली क्षमताच झाड विसरेल. नी त्याही पेक्षा पैशाला चटावलेल्या ठेकेदारांच्या हातात हे कोलीत मिळाले तर बघायलाच नको. ” मग त्याने बाबू काकांचे बोलणे खड्यान खडा बब्याला सांगितले. “जिनिअस! एक्सायटिंग प्रेडिक्शन ...” बब्या म्हणाला. “तुझ्या त्या बाबू काकाला पीएच. डी. द्यायला हरकत नाही. आम्ही उभी हयात विज्ञानाच्या क्षेत्रात घालवली पण चूक करण्यापूर्वी एवढी क्षुल्लक बाबही आपल्या लक्षात आली नाही. इतके शिक्षण घेवूनही आपल्याकडे एवढाही दूरदर्शीपणा नसावा ....... छेऽ छे... मला तर या खुर्चीत बसायचीसुद्धा लाज वाटते. रिअली हॉरिबलऽऽ....! ”
“प्रदीप, एवढ्या उच्च पदव्या मिळवल्या त्याची घमेंड, स्वत:च्या स्वतंत्र बुद्धिमत्तेचा अतिरेकी अभिमान आणि सुखाला चटावलेली वृत्ती यांचा तर हा परिणाम नसेल? की आमच्या अतिरेकी भोगलालसे पायी आम्ही आमची सदसद्विवेक बुद्धी नी तारतम्यही गहाण टाकले ? आमच्या पिढीला असले अतिरेकी आततायी विचार सुचतातच कसे रे? मागचा पुढचा विचार न करता आम्ही माकडाच्या हातात कोलित द्यायला निघालो. आधीच कितीतरी स्पायसीज कोकणातून नामशेष झाल्यात.... छे ऽऽ मला तर कल्पनाही करवत नाही.आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून ताळ्यावर आणणाऱ्या तुझ्या काकाला मानलं आपण. पन काय रे आपलं प्लॅन तू कंनीत डिस्क्लोज करून मोकळा झालास ना? जैवीक फॉर्म्युले त्यांचे डिटेल्स वगैरे ...”
सुस्कारा सोडीत प्रदीप म्हणाला, “ सुरुवातीला आपण सलाईन थेरपीचं पेपर वर्क केलं ते पेपर्स मी खन्ना सराना दाखवले . नी ते वाचल्यावर त्यानी आपला प्लॅन अॅक्सेप्ट केला. पन तसं घबरायला नको. अजून वेळ गेलेली नाही. जैविक फॉर्म्युल्यांचे डिटेल्स तू अजून दिलेस कुठे? आपल्या प्रयोगाचं खरं यश नी रहस्य त्या फॉर्म्युल्यात आहे नी ते फॉर्म्युले तुझ्या डोक्यात आहेत. मी फक्त तू दिलेली सँपल्स प्लॉटवर ट्राय केली नी तिथेच संपवली. हे दुष्टचक्र इथेच थांबवाला हवं . ह्या सगळ्या गोष्टीना बूच लावायची जमालगोटा आयडिया माझ्याकडे आहे. असं कर मला एक फुलस्केप पेपर दे. ” बब्याने त्याला फुलस्केप पेपर दिला. प्रदीप त्यावर काहीतरी लिहू लागला. बब्याची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. लिहून झाल्यावर प्रदीपने पेपर बब्याकडे सरकवला. बब्या चष्मा लावून वाचू लागला. प्रदीपने के.के. ग्रूपमधली आपली नोकरी सोडल्याचं रिझायनिंग लेटर होतं ते!
※※※※※※※※