स्वप्नद्वार..... भाग 11 ( अंतारभ )
टीप :- या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे
भाग 10 वरून पुढे.
" किती झंझावाती वळण घेतलंय माझ्या जीवनाने. कोण असतं या सर्व खेळांचा रचनाकार? काळाच्या पुलावरून शांतपणे चालतांना कुठलंतरी एक वाईट स्वप्न पडावं .. भाबळ्या मनाने त्या स्वप्नांचा उलगडा करावा म्हणून त्या स्वप्नदुनियेत जावं. तर एक अद्भूतं अक्राळविक्राळ अमानवी शक्तीने वास्तविक जीवनात प्रवेश कराव.. . किती असीम, अनाकलनीय गोष्टी आहेत ह्या. जिथे विचारशक्तीचा अंत होतो तिथून काही गोष्टी सुरु होतात. जीवनाच्या एका अश्या वळणावर मी येऊन ठेपलोय जिथे जीवन आणि मृत्यदोरीवर माझा एक जरी चुकीचा पाऊल पडला तरी समोर मरणदरी आहे. काय असेल या लढाईचा अंत? नक्की काय असेल या तिमिरमयी गुहेत ". निशांत स्वतःशीच हितगुज करीत होता. मधमाश्यांचा मोहोळ उठावा तसा त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रश्नांचा मोहोळ उठला. निशांतने आपलं पहिल पाऊल त्या काळ समुद्री गुहेत ठेवलं. समोर दूरदूरपर्यंत काळोखाचा समुद्र पसरला होता. त्या काळोखात खट्याळ किजवे लुकलुकत होते. निशांत आपले एक एक पाऊले पुढे टाकून त्या स्वप्नद्वाराकडे मार्गक्रमण करीत होते. अचानकपणे वारुळातून प्रचंड मोठा भुजंग निघावा तसे जमिनीतून अगणित काळकुट्ट हात त्याच्या पायाला घट्टपणे पकडून थांबवित होते. त्या काळंकुट्ट हाताचा दायक स्पर्श होताच निशांतच्या मनात भीतीचे व्रण आरपार उमटले. गुहेच्या डाव्या बाजूला टप... टप... करीत पाण्याचे थेंब गळीत होते. त्या प्रत्येक गळणाऱ्या थेंबाच्या स्वराने निशांतच मनाची भीतीने पार ससेहोलपट होत होती. हलकासा मंद प्रकाश त्या गुहेच्या काळोखाची तीव्रता कमी करीत होता. गुहेच्या दोन्ही बाजूला सुकलेल्या रक्ताचे डाग पडले होते. एका कुबट वासाने निशांतच नाक आकसल. त्याच्या मनाच्या डोहात भयलहरी सर्वदूर पसरल्या. रातकिड्याची किर.. किर.. गुहेतल्या निश्चल शांततेला भंग करीत होती. एवढ्यात असंख्य भयानक राक्षसी सावल्या ज्यांचे लांबसडक सुळे होते त्या निशांतच्या मागे येऊन उभ्या ठाकल्या. निशांत एक एक पाऊल पुढे टाकून त्या प्रकाशाच्या बिंदुला शोधत होता. मध्येच एखादा काळपट हात जमिनीला भेदून त्याच्या पायाच्या गतीला मंद करीत होता. त्याची तीक्ष्ण नजर गुहेत सर्व दिशांचा वेध घेत होती आणि पाऊले आपोआप स्वप्नद्वाराकडे वळली. निशांतची गुहेत सर्व दिशांना फिरत असलेली नजर एका जागी स्थिरावली. समोरच दृश्य पाहून त्याच्या कंठाची टिटवी भीतीने आरोळी फोडणारच.. तर त्याने कसबसं आपल्या स्वराला कंठतच थांबवल. कारण समोर तोच हिरवेगार तोंड, पांढरा चेहरा आणि लटकणारी जीभ असलेला राक्षस अधाशीपणे कुजलेल्या प्रेताच भक्षण करीत होता. मागे असलेल्या काळसावल्या अधिकच अक्राळविक्राळ रौन्द्र रूप धारण करून नाचत होत्या. त्या राक्षसाने त्याच्या तोंडाला चिकटलेल्या मासकनावरून आपली लांबसडक लटकणारी जीभ फिरवली. एक कटाक्ष टाकून राक्षसाने आपली जहरी नजर निशांतवरून फिरवली. निशांतची नजर आणि त्या राक्षसाची नजर ऐकमेकांना भिडली. त्याची ती क्रूर नजर पाहून निशांतची यच्यावच्ययीत इंद्रिये भीतीने शहारली. मागे असलेल्या काळ सावल्या अधिकच कल्लोळ माजवीत होत्या. जमिनीतून निघालेल्या काळपट हाताने त्याचा रस्ता रोखून ठेवला होता. निशांतच्या डोक्यावर विचारांचे प्रहार एकापाठोपाठ एक सुरु होते. गळणाऱ्या पाण्याचे थेंब अगदी लयबद्ध पद्धतीने त्याच्या कानात घुमत होते. तो राक्षस वाऱ्याच्या वेगाने निशांतकडे येत होता. भीतीच्या त्रिकोणी चक्रात तो अडकला होता. वेळ त्याच्याकडे फार कमी होता. आपल्या नजरेला सर्व दिशेला फिरवून तो प्रकाशाच्या बिंदुला जिवाच्या आकांताने शोधण्याच्या प्रयत्न करू लागला. त्याच्या नेत्राची बुबुळे सर्व दिशेला गरगर फिरत होती. हिरवा राक्षस अगदी समोर येऊन ठेपला होता.
----------------------------------------------------------------------
एक भेसूर किंकाळी त्या खोलीत थैमान घालू लागली...ती अमानवी शक्ती अधिकच त्वेषाने सामोरी येत होती. आचार्य विष्णगुप्त आणी आर्य यांनी त्यांच्याजवळ असलेला सकारात्मक ऊर्जेचा शंख वाजविण्यास सुरवात केली.. जणू एका भीषण लढाईची ती पूर्वतयारीच असावी. ती अमानवी शक्ती जीवघेण्या स्वरात जोरजोरात किंचाळत होती. तिच्या किंचाळण्याच्या स्वरांनी प्रत्येकाच्या काळजात भीतीच्या विजा लखलखू लागल्या . आचार्य विष्णुगुप्त आणी निशांत यांनी अचूक मंत्रशक्तीचा मारा करण्याचा निर्णय घेतला कारण तीच एक अशी अभेद्य शक्ती होती जी त्या अमानवी शक्तीला काही काळ तरी रोखून ठेवू शकत होती. त्या अमानवी शक्तीने एक पाऊल पुढे टाकत खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसा आर्यने पवित्र जलाचे थेंब त्याच्या शरीरावर शिंपडले. शक्तिशाली पवित्र जलाच्या थेंबाचा स्पर्श होताच ती अमानवी शक्ती अंगावर Acid पडल्यासारखी ओरडू लागली.
" कर्मणेका विकारस्य. मा फलेषु कदाचन .. आपल्याला या लढाईत त्या अमानवी शक्तीला रोखण्यासाठी फक्त कर्मयोगाचा भगीरथ व्हायची गरज आहे. आपण सत्याच्या बाजूनी लढत आहोत म्हणून फक्त आणी फक्त सकारात्मक दृष्टीने कर्म करण्याची गरज आहे . या लढाईच सकारात्मक फळ तर आपल्याला मिळणारच आहे."आचार्य विष्णगुप्त यांनी सर्वांनी हितोपदेश दिला.
" छान.. आपल्याला फक्त 10 मिनिटच या अमानवी शक्तीला रोखायच आहे " निखळ मार्दव स्वरात डॉक्टरांनी सर्वांचा उत्साह वाढविला.
ती अमानवी शक्ती दोन पाऊले नक्कीच मागे सरली होती पण आपल्या पुढच्या वारासाठी सज्ज होती.
आचार्य विष्णुगुप्त यांनी मंत्रविधीची सुरवात केली. मंत्राचा अदृश्य असा एक शक्तिवर्धक घेरा त्या खोलीला संरक्षण प्रदान करीत होता. आचार्य विष्णगुप्त याच्या माथ्यावर एक वेगळेच तेज निर्माण झालं होत. त्या अमानवी शक्तीने आपल्या हातातील तलवार निशांतच्या शरीराला नष्ट करण्यासाठी अतिशय क्रूरपणे निशांतकडे फेकली. नकारात्मक ऊर्जाशक्ती असलेली ती तलवार आणी सकारात्मक मंत्रशक्तीचा घेरा यांचा परत एकदा टकराव झाला..या यच्चावयच्चयीत जगाच्या पाठीवर उमटलेलं सत्य म्हणजे .... नकारात्मक शक्ती ही कधीच सकारात्मक शक्तीला भेदू शकत नाही .त्याचप्रमाणे ती नकारात्मक शक्ती असलेली तलवार त्या अदृश्य मंत्रशक्तीच्या घेऱ्याला पार करू शकली नाही. आचार्य विष्णुगुप्त आणी निशांत यांनी मंत्रशक्तीचा जोर अधिकच वाढवला. ज्याप्रमाणे साळींदर आपल्या शरीरातील असंख्य काटे काटे बाहेर काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याला टोचून टोचून रक्तबंबाळ करतो त्याचप्रमाणे मंत्रशक्तीच्या काट्यांनी ती अमानवी शक्ती घायाळ झाली होती पण फक्त मंत्रशक्तीच्या जोरावर तिला समाप्त करणे अशक्य होते. काही वेळातच ती अमानवी शक्ती तेथून अदृश्य झाली.
" आपण विजयी झालो " योगेश म्हणाला.
" संकट अजूनही टळलं नाही आहे. ती अमानवी शक्ती निशांतच्या स्वप्नदुनियेत जाऊ नये हीच प्रार्थना आहे आता " गंभीर स्वरात डॉक्टर म्हणाले.
----------------------------------------------------------------------
एखाद निरागस लेकरू भयाण जंगलात भटकावं... पुढे आड आणी मागे विहीर अशीच काहीशी अवस्था निशांतची झाली होती. तो हिरवा राक्षस त्याला स्पर्श करणारच एवढ्यात त्याला त्याच्या डोक्याच्या वर अगदी बारीकसा.. पेनाच्या टोकाएवढा प्रकाशबिंदू दिसला. निशांतच्या मनाला अनेक प्रश्नांनी घेराव घातला होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या प्रकाशबिंदूला स्पर्श केला तसं
हे समग्र जग जणू एका जागी थांबलंय... या सर्व सृष्टीत नखनिशांत शांतता पसरलीय असं निशांतला भासू लागलं. एका प्रचंड मोठ्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशझोताने त्याला खेचून गुहेच्या वर असणाऱ्या राजमहालाच्या एका खोलीत घेऊन आला. स्फटिकासारखा पांढराशुभ्र प्रकाश त्या राजमहालाच्या खोलीत सर्वदूर पसरला होता. काही रेखीव ऐटदार चित्रे त्या भिंतीवर लटकवले होते.. नक्कीच ते वर्धन घराण्यातील योध्यांचे होते, समोरच्या दगडी भिंतीवर मनोहर शिल्प कोरले होते.. ज्यात ठगासोबत झालेल्या रणसंग्रामाचे अद्वितीय असे वर्णन केले होते. निशांतला नक्की काय सुरु आहे हे उमजतंच नव्हते. हजार सश्यांची उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर होती... नक्की काय असेल या खोलीत अश्या अनेक प्रश्नाचं वलय त्याच्या मनात निर्माण झालं होत.
" काय झालंय पार्थ.. आयुष्याची नौका कुठल्या वळणावर हेलकावे घेत आहे याचाच विचार करीत आहेस ना? "
एका भारदस्त आवाजाने निशांत भानावर आला. प्रश्नांच्या वलयातून आपले डोके काढून त्याने मागे पाहिजे आणी नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.
" राजन वीरवर्धन "
ज्या राजा वीरवर्धनचे वर्णन त्याने पुस्तकात वाचले होते.. पहिले होते. तोच राजा वीरवर्धन त्याच्या समोर उभा होता... तेच पाणीदार डोळे , लांबसडक नाक, चेहऱ्यावर एक दिव्य कांती, जास्ववंदासारखे गाल, भरदार काया, बलवान शरीरसृष्टी, भेदक नजर, कपाळावर असणार सुवर्णमुकुट आणी त्यावर टवटवीत असणार मयूरपंख.
निशांतला ह्या सर्व विचित्र घटना त्याच्यासोबत का घडताय हे उमजतंच नव्हतं. परत हे स्वप्न तर नाही ना याची तो खात्री करून घेत होता. निशांत राजा वीरवर्धन यांना दंडवत करून म्हणाला
" होय राजन...या काळसमुद्रात माझ्या आयुष्याची नौका कुठल्या वळणावर आली आहे हे मलाही कळत नाही आहे. मी निशांत एक मानसोपचारतज्ञ आहे "
" एक घटना तुला सांगतो महाभारतात जेव्हा अर्जुन अंगदेशात आले होते. तेव्हा त्याच्या रथाच चक्र हे जमिनीत फसलं होत. त्यावेळेस अंगराज कर्ण तिथे आले आणी त्यांनी विचारलं काय झालंय अर्जुन रथाच चक्र जमिनीत फसलंय का.. मी तुला ते चक्र बाहेर काढण्यासाठी मदत करू का? त्यावर अर्जुन म्हणाले... वाहन असो वा जीवन जेव्हा चक्र जमिनीत फसतं ना तेव्हा ते कुणाच्यातरी साहाय्य शिवाय बाहेर येऊ शकत नाही . अंगराज कर्णानी स्मितहास्य देऊन या प्रश्नाचं उत्तर दिलं.. जीवन असो वा वाहन जेव्हा भार मर्यादेपेक्षा अधिक होऊन जातो ना तेव्हा चक्र नक्कीच जिमिनीत फसतं. तुझ्या जीवनातही त्या अमानवी शक्तीला संपवण्याचा फार मोठा भार तुझ्यावर आहे " राजा वीरवर्धन म्हणाले.
" ती अमानवी शक्ती नक्की आहे तरी कोण... तिचा आणी माझा संबंध तरी काय. नक्कीच त्या अमानवी शक्तींचा काय अंत आहे. मला लवकर सांगा राजन माझ्याकडे वेळ फार कमी आहे. ठगांचा सरदार चेतनसिंघ याला संपवण्याचा काय मार्ग आहे आणी मला स्वप्नात दिसणाऱ्या त्या स्वप्नद्वाराच तरी काय सत्य आहे.? कुठली गोष्ट माझ्याकडून अनपेक्षितपणे लिहली गेली आहे ज्यामुळे त्या काळशक्तीला आव्हान झालं आहे? " निशांतने एकापाठोपाठ एक अनेक प्रश्न उपस्थित केले.
----------------------------------------------------------------------
" निशांत कुठे असेल डॉक्टर आपण त्याच्याशी काही संपर्क नाही का करू शकत? " योगेश डॉक्टरांना विचारू लागला.
" नाही सध्या तरी नाही करू शकत " खिन्न स्वरात डॉक्टर म्हणाले पण एवढं मात्र नक्की त्याला अजून कुठलीही ईजा पोहचली नाही आहे.
" तुम्हाला कसं माहित डॉक्टर? कुतूहलाने योगेश विचारू लागला.
" कारण जर त्याच्या शरीराला तिथे काही ईजा झाली तर त्याचे व्रण या शरीरावरही उमटेल आणी सध्या तरी तस काही दिसत नाही आहे म्हणून त्याच्या शरीराला कुठलीच ईजा झाली नाही एवढं नक्की
आहे ".
एवढ्या वेळ शांत असलेले आचार्य विष्णुगुप्त म्हणाले "अजूनही आपण संकटाच्या वेढ्यात अडकलेलो आहोच कारण ती अमानवी शक्ती प्रचंड ताकतीने परत इथे येऊ शकते म्हणून कुणीही गाफिल राहू नका".
क्रमश...