Kaal chakra Naeem Shaikh द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Kaal chakra

काल चक्र.

सकाळी ९च्या सुमारास अश्विनी, नहेमी प्रमाने कामावर निघाली होती. चालत असताना तिने सहज तिचा मोबाईल खिशातून बाहेर काढला. मोबाईलच्या स्क्रिनवर राकेशचे ७ मिस्ड् कॉल दिसले. त्याकडे दुर्लक्ष करत तिने मोबाईल पुन्हा खिशात ठेऊन दिला. काही दिवसांपासून ती राकेशला स्वतःच्या आयुष्यात जास्त महत्त्व देत नव्हती. राकेश हा गेल्या तिन वर्षांपासून तिचा मित्र होता आणि तिच्या सोबत कंपनीत काम करत होता.

अश्विनी शहराच्या मध्यवर्तीय भागात राहत होती. वाहनांचा गोंगाट, शहरी प्रदूषण आणि धावपळ करावे लागणारे ते शहरी जिवन, या सर्व गोष्टींची तिला आता सवय झाली होती. तिचे आई वडील गावाकडं राहत होते आणि अश्विनी गेल्या तिन वर्षांपासून शहराकडे एकटिच राहत होती. दर आठवड्याला ती, रवीवारच्या सुट्टीत गावाकडं जायची. अश्विनी एका कॉलसेंटरमध्ये काम करत होती. ही कॉलसेंटर कंपनी तिच्या घरापासून जास्त लांब नव्हती. त्यामुळे ती कामावर चालतच जात असे. आजही ती कामावर नेहेमी प्रमाने चालत जात होती.

ती अर्ध्या रस्तापर्यंतच पोहोचली असेल, अचानक वातावरण बदलले. पाहता पाहता निरभ्र आकाशाला काळ्या ढगांनी व्यापले. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली. पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती शेजारील ईमारतीच्या आडोशाला उभी राहिली. ते काळे ढग जणू जमीनीच्या दिशेने येत असावे असा भास तिला होत होता. अचानक घडून आलेल्या वातावरणातल्या बदलामुळे अश्विनी घाबरली होती. रस्त्यावरील वाहने एकाएक गायब झाली. तसेच फुटपाथावरील गर्दीसुध्दा नाहीशी झाली होती.

फुटपाथवरुन तिच्या डाव्या बाजूने एक मुलगी (साधारणपणे आठ दहा वर्षाची) धावत, अश्विनीला ओलांडून त्या बिल्डींगच्या मागे निघून गेली. त्या मुलीला अश्विनीने नीट पाहिले नही पण तिला असं वाटलं जणू ती त्या मुलीला ओळखत असावी. अश्विनीने त्या मुलीचा पाठलाग करु लागली. अश्विनी जेव्हा बिल्डींगच्या कोप-यातून मागे जाण्यासाठी वळाली तेव्हा तिने जे पाहिले त्यावर तिला विश्वासच बसला नाही. त्या बिल्डींगचा जिथे अंत होत होता तिथून मागच्या बाजूला मोकळा माळरान दिसत होते. माळराणावर सर्वत्र हिरवे गवत पसरले होते. त्याच माळरानाचे पुढे टेकडीत रुपांतर झालेले दिसत होते. त्या टेकडीच्या मधोमध एक वडाचं झाड होतं. तिच्या समोर असलेले दृष्य तिने आधीही पाहिलेले आहे असे तिला वाटत होते. ती लहान मुलगी धावत त्या वडाच्या झाडाजवळ जात होती. अश्विनीही तिच्या मागे त्याच दिशेने निघाली होती.

पावसाचा जोर वाढतंच चालला होता. अधून मधून विजा चमकत होत्या. ती मुलगी झाडाजवळ पोहोचली. अश्विनीची नजर तिच्यावरच खिळली होती. ती मुलगी त्या वडाच्या झाडावर चढली आणि एका फांदीवर जाऊन बसली. ती फांदी वडाच्या पारंब्यांनी भरलेली होती. इतर फांद्यांच्या पारंब्या त्या फांदी शेजारुन जात होत्या. खेळण्याच्या नादात तिने फांदीकडे लक्षच दिले नाही. ती फांदी त्या मुलीच्या वजनाला उचलू शकेल एवढी सशक्त नव्हती. त्या मुलीला फांदीवर खेळताना पाहून अश्विनी घाबरली. एक क्षणही वाया न घालवता अश्विनीने झाडाच्या दिशेने धाव घेतला. जणू तिला पुढं घडणा-या घटने बद्दल आधीपासूनच माहित होतं. झाडावर बसलेल्या मुलीचा खेळताना तोल गेला आणि ती त्या पारंब्यांच्या गर्दीतून खाली कोसळली. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात तिने हात पाय हलवायला सुरवात केली. पण तिच्या याच प्रयत्नात काहि पारंब्या तिच्या गळ्या भोवती गुंडाळल्या गेल्या. आणि तिला गळफास बसला. अश्विनी तिथं पोहोचे पर्यंत त्या मुलीनं प्राण सोडला होता.

‘ मला माहित असुन सुध्दा मी हिला वाचवू शकले नाही.’

स्वतःलाच दोष देतं अश्विनीने त्या मुलीला मिठीत घेतले. ती मुलगी पारंब्यांवर लोमकळत होती. अश्विनीचे डोळे अश्रृने भरलेले होते. त्या अश्रृने भरलेल्या डोळ्यांना जेव्हा तिने उघडले तेव्हा तिच्या समोर काही अंतरावर अस्पष्ट अशी एक आकृती पाहिली. स्पष्ट दिसण्यासाठी तिने डोळे पुसले . समोरच्या दृष्याला पाहून तिला घाम फुटला आणि दुस-याच क्षणाला ती बेशुद्ध पडली.

जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला फुटपाथवर असल्याचे पाहिले. दहा बारा मानसांची गर्दी तिच्या भोवती जमली होती. बेशुध्द अवस्थेत अश्विनीला पाहून ती गर्दी तिच्या भोवती जमा झाली होती. गर्दीतून एका महिलेने तिला पाणी पिण्यासाठी दिले. तिची विचारपूस करुन सर्वजण आपापल्या मार्गाला लागले. अश्विनी अजूनही तिच्यासोबत घडलेल्या घटणेच्या विचारात होती. काही वेळासाठी ती तिथेच बसून राहिली. विश्रांतीनंतर तिने पुन्हा त्या ईमारती मागे जाऊन पाहिले. त्या ईमारती मागे उंचचं उंच अशा अनेक ईमारती होत्या. पण तिथे गवताचा एक तुकडासुध्दा नव्हता. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. तिला त्या क्षणी काय करावे हे समजतं नसल्याने, तिने खिशातून मोबाईल काढला आणि राकेशला फोन करुन तिच्या घरा शेजारच्या कॉफी शॉपमध्ये बोलवले.

अर्ध्या तासात राकेश अश्विनीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. ती कॉफी शॉपमध्ये बसली होती. राकेशही आत जाऊन तिच्या जवळ बसला.

“काय झालं अश्विनी. मला असं अचानक बोलवलं.”

“माझ्यासोबत खुप विचित्र घचना घडली.”

“तू आधी मला हे सांग, तू माझा फोन का नाही उचलला .”

“राकेश...¡ माझ्यासोबत काय घडलं ते विचारायचं सोडून, तू मला ‘कॉल का नाही उचलला’ हे विचारतोस.”

“जर तू कॉल उचलला असतास तर तुझ्यासोबत जे काही घडलं, ते घडलंच नसतं.”

“का ... तुला माहित होतं का माझ्यासोबत काय होणार आहे ते... “

अश्विनीने रागात विचारले. अश्विनीचा राग पाहून राकेश तिला शांत करत म्हणाला.

“अश्विनी, शांत हो तू आधी ... चल जाऊदे. काय झालं ते आधी सांग.”

अश्विनीचा राग अजूनही शांत झाला नव्हता. राकेश तिचा राग शांत होण्याची वाट पाहत होता. राग शांत झाल्यानंतर ती बोलू लागली.

“मी नेहेमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले होते. अर्धाच रस्ता पार केला असेल, अचानक सर्व काही बदललं. तिथला वातावरण, तिथले रस्ते आणि जागासुध्दा. असं अचानकच बदललं... पाऊस येऊ लागला, विजा चमकु लागल्या. मी एका मुलीला माझ्या समोरुन पळतं जाताना पाहिले. असं वाटलं जणू मी तिला आधीही कुठंतरी पाहिलं असावं. म्हणून मी तिचा पाठलाग केला. ती धावत तिथल्या एका वडाच्या झाडाजवळ गेली. नंतर ती जेव्हा झाडावर चढली तेव्हा मला आठवलं, ती तर ‘सई’ होती. ती त्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसली. मी ती घटना आधीसुध्दा अनूभवली असावी असं मला वाटतं. मला महित होतं की पुढं काय होणार आहे ते. पण मी तिथ पोहोचण्या आधी ती त्या फांदीवरुन खाली पडली आणि पारंब्यांमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास बसला. मी तिथं पोहोचले तो पर्यंत तिने प्राण सोडला होता. मी तिला वाचवू शकले नाही या गोष्टीचा मला दुःख होताच पण जे काही मी तिथ पाहिलं त्यानंतर मी बेशुध्द पडले आणि डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला रस्त्यावर पाहिले.... मला तर काहीच समजत नाहीये.”

“तिथं तू कोणाला पाहिलंस... “

राकेशने औपचारीकता केल्या प्रमाणे विचारले.

“तिथं माझ्या समोर मीच उभी होते. मी त्या झाडापासुन काही अंतरावर उभी राहून ती घटणा फक्त बघतं होते. मी तिला वाचवण्याचा प्रयत्नसुध्दा केला नाही.”

“... आणि सई... तिच्याबद्दल पण सांग. ”

राकेश कॉफीचा कप खाली ठेवत म्हणाला.

“तुला ही गोष्ट खोटी वाटत असेल ना...”

अश्वीनी पुन्हा रागवली.

“तू जे काही सांगीतलंस ते सर्व खरं आहे, हे मला माहीत आहे... तू सांग, ‘सई’ कोण आहे.”

“सई, माझ्या मामाची मुलगी. आम्ही तिला प्रेमानं सई म्हणतो. काल आपल्याला सुट्टी होती म्हणून मी काल मामाच्या घरी गेले होते. सईला सुध्दा रवीवारची सुट्टी होती. काल दिवसभर आम्ही दोघी खुप मजा केली. संध्याकाळी मी इथं येण्यासाठी निघाले तेव्हा सई माझ्या मागं लागली. तिला सुध्दा माझ्या सोबत इथं यायचं होतं. मामांनी आणि मी तिला खुप समजवलं पण तिने तिचा हट्ट सोडलाच नाही. तिला मी इथं घेऊन आले असते तर मी कामावर गेल्यानंतर तिला कोणी सांभाळ असतं. ती खुप रडत होती पण मी तिला तशीच सोडून आले आणि सकाळी कामावर जाताना अशी घटना घडली.”

“झालं का तुझं. आता माझं ऐकशील का. “

अश्विनीची परीस्थिती, तिच्यावर ओढावलेले संकट यांचा कसलाही परीणाम राकेशवर झाला नाही हे पाहून अश्विनीला आश्चर्य वाटत होते. अश्विनी त्याच्या तोंडाकडेच पाहतं राहिली. राकेश पुढे बोलू लागला.

“गेल्या ४ दिवसांपासून तू मला रोज याच वेळी फोन करुन बोलवतेस आणि रोज मला हीच कहाणी सांगतेस. काल गुरुवार होता आणि काल आपल्याला सुट्टी नव्हती. तू काल मला बोलावलंस आणि हीच गोष्ट मला सांगीतली तेव्हा आपण डॉक्टरांकडं गेलो. त्यांनी गोळ्या दिल्या होत्या. ज्याने तुला असले भास होणार नाहीत. तू काल संध्याकाळी गोळ्या घेतल्या पण सकाळी गोळ्या खाल्ल्या की नाही तेच विचारण्यासाठी मी फोन केला होता. पण तू....”

राकेशचं बोलणं ऐकल्यानंतर ती आनखीनच गोंधळली. कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्यावर नाही, हेच तिला समजतं नव्हते. ती डोक्याला हात लाऊन बसली.

“अश्विनी, तू काळजी करु नको. डॉक्टरांनी सांगीतलं आहे की गोळ्या वेळच्या वेळी घेतल्या तर हा आजार लवकरच बरा होईल... तू एक काम कर, आज माझ्या घरी चल. एकटी राहशील तर परत असेच भास होत राहणार...”

“थँक्स राकेश. पण ईट्स् ऑके, मी माझ्या आईला बोलवून घेईन.”

खुर्चीवरुन उठत अश्विनी म्हणाली. “मी घरी जाते आता.... कामावर नाही येऊ शकणार.”

“ऑके , तर आराम कर घरी गेल्यावर... आणि आईला नक्की बोलवं.”

राकेशही तिथून निघाला. अश्विनीला घरी सोडून तो कामावर गेला.

***

संध्याकाळची वेळ. अंधार पडू लागला होता. अश्विनी काही वेळापुर्वीच झोपुन उठली होती. फ्रेश झाल्यानंतर, वेळ घालवण्यासाठी ती पुस्तक वाचू लागली. तेवढ्यात बाहेरच्या रुम मधून रडण्याचा आवाज आला. बाहेर कोण आहे ते पाहण्यासाठी ती उठलीच होती तेवढ्यात बाहेरुन सई धावत तिच्या जवळ आली आणि तिने अश्विनीला मिठी मारली.

“ताई तू मला घेऊन चल ना...”

ती रडत रडत बोलत होती. तिच्या मागे अश्विनीचा मामासुध्दा तिथे आला. तोही सईला समजवू लागला. पण सई समजण्याच्या मनस्थितीत नव्हती.

“सई, अगं तू तिथं कशी येणार. उद्या तुझी शाळा आहेना. आणि पुढच्या रवीवारी मी येणारच आहेना. तेव्हा आपण खुप धमाल करुया. पुढच्या रवीवारी मी येईन तेव्हा तुला बागेत घेऊन जाईन....”

अश्विनी सईला समजवण्यात मग्न होती. टेबलावर ठेवलेल्या मोबाईलची रींग वाजत होती. मोबाईलवर राकेशचा कॉल आला होता. पण तो आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हता. कारण अश्विनी काळाच्या त्या चक्रात अडकली होती जिथं ती एका वेगळ्याच विश्वात जगत होती.

***