Ramacha shela..- 13 -Last part books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 13 - Last part

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

१३. समारोप

“मावशी ! मावशी !”

“सारे बोलतो हो नलू.”

सायंभोजने झाली. सायंप्रार्थना झाली. आणि सरला, उदय, नलू तिघे बोलत बसली होती. प्रकाश बोलत होता. खेळत होता. शेवटी तो आईच्या जवळ तेथे निजला. सरलेने नलूला सारी वार्ता सांगितली. उदय सद्गदित होऊन म्हणाला,

“नलू, माझी सरला अशा दिव्यातून गेली !”

“उदय, तुझ्यावर मी एक गोष्ट लिहिणार होते.”

“आता ही मोठी गोष्ट लिही. त्या वेळेस माझी स्मृती गेली. एवढेच तुला माहीत होते.”

“होय उदय, आता मोठी गोष्ट लिहीन. तुझ्या डोळयांचे गोष्टीत वर्णन करीन. रागावू नको हो, तेवढा मला हक्क आहे. आहे ना सरले?”

“होय नलू.”

“का रे उदय, गोष्टीला नाव काय ठेवू?”

“आधी लिहून तर काढ.”

“सरले, तू सांग ग.”

“नलू, “रामाचा शेला” असे गोष्टीला नाव दे. कारण सारी या शेल्याची कृपा ! प्रभूची कृपा ! हा शेला न येता तर उदय आपली काय रे गत झाली असती? नलू, “रामाचा शेला” हेच नाव ठेव. ठरले हो.”

“परंतु यांचे नाव काय?”

“सांग रे तुझे नाव.”

“तुम्ही एकदम अरेतुरे म्हटलेले पाहून किती आनंद होत आहे. माझे नाव मधू.”

“अरे ! खरेच की. तू सांगितले होतेस हे नाव. कसा विसरलो?”

“आणि तुम्हांला सांगितल्याचे मलाही आठवले नाही.”

“सरले, गोड आहे की नाही नाव?”

“मधू नाव का कडू असेल?”

आश्रमात सर्वांना आनंद झाला. आश्रमाचा व्याप वाढत होता. त्या गरीब जनतेत उत्साह येत होता. तो आश्रम म्हणजे चैतन्याचे केंद्र बनत होता. स्फूर्तीचा व सेवेचा झरा बनत होता.

आणि एके दिवशी एक मैत्रीण आश्रम पाहायला आली. कोणाची मैत्रीण ! सरलेची का? उदयची का? अकस्मात आली. सरला, उदय चकितच झाली.

“नलू, आधी पत्र तरी पाठवावे की नाही?”

“म्हटले खेडयात पत्र आठवडयातून एकदा येत असेल.”

“आश्रम झाल्यापासून येथे रोज टपाल येते.”

“आम्ही मुंबईस आलो होतो. मी त्यांना म्हटले आश्रम पाहून येऊ. वर्तमानपत्रांत नेहमी वाचता. ते म्हणाले, “तू ये पाहून.” माझ्याने राहवेना, मी आल्ये. सरले उदयची नि तुझी झाली एकदाची गाठ. तू पत्र ना पाठवणार होतीस?”

“नलू, त्या वेळेस भेट झाली नाही. किती यातनांतून मी गेल्ये ! रात्री सारे सांगेन.”

“आणि हा तुझा प्रकाश वाटते? किती छान नाव !”

“नलू, तुला मूलबाळ?”

“सरले, तुझी नलू अजून आई नाही झाली.”

“प्रकाश, ही तुझी नलूमावशी हो.”

एके दिवशी सरला, उदय, विश्वासराव सारी त्या ग्रामीण आश्रमात आली. सुंदर स्थान होते. सरलेची झोपडी प्रशस्त होती. तेथे पाळणा होता, प्रकाशची सोय होती. आणि आश्रमीय जीवन सुरू झाले. उदय खेडयांतून हिंडू-फिरू लागला. सरला शाळा चालवू लागली. विश्वासरावही त्या वारली वगैरे लोकांत जात. त्यांना अनुभव होता, ते म्हातारे होते, प्रेमळ होते. त्या गरीब लोकांत ते मिसळत. त्यांना नाना गोष्टी शिकवीत, पटवीत.

आणि उदय ग्रामोद्योगाचे शिक्षण घ्यायला गेला. वर्ध्यास गेला. खादीचे साद्यन्त शिक्षण घेऊन आला. नवीन नवीन शोधबोध सारे पाहून आला. त्या गरीब लोकांस तो सूत कातणे शिकवू लागला. बाया, माणसे, मुले कातू लागली. आणि गरिबांना मजुरी मिळू लागली. वृध्द विश्वासराव ठाणे जिल्हाभर आश्रमाचीच खादी घेणारे व्रती लोक मिळवीत हिंडू-फिरू लागले.

आश्रमाचा सुगंध पसरू लागला. मोठमोठे पुढारी भेटी देऊन जात. त्या भेटीची हकीकत वर्तमानपत्रांतून येई. अनेकांच्या कानांवर आदिवासी सेवा मंडळ गेले.

एके दिवशी सरला नि उदय सायंकाळी फिरायला गेली होती. रम्य शोभा होती. मेघांमधून प्रकाश पडला होता. दूरच्या वृक्षांच्या शेंडयांवर तो प्रकाश किती सौम्य-स्निग्ध दिसत होता. पाहात राहावे असे वाटत होते. एकाएकी देखावा बदलला. तिकडे पिवळा रंग सर्वत्र पसरला. आणि मधूनमधून निळया नभाचे दर्शन. जणू पीत समुद्रातली निळी बेटे. जणू पिवळया रेशमी वस्त्रांतून घननीळ गोपाळकृष्णाचे सुंदर शरीर दिसत होते !

“सरले, सरले, बघ तरी !”

“उदय, माझे सारे सौंदर्य म्हणजे तू. तू तिकडे पाहात होतास. मी तुझ्याकडे पाहात होत्ये. पुरूषांना विश्व पाहिजे असते. स्त्रियांना फक्त पती पुरे.”

इतक्यात एक मित्र त्यांना बोलवायला आला व म्हणाला,

“आश्रमात कोणी पाहुणे आले आहेत. ते तुम्हांला भेटू इच्छितात. चला.”

दोघे परत आली. कोण आले होते?

“नमस्कार. ओळखलेत का मला?

“ओळखले. परंतु तुम्ही तुमचे नाव सांगितले नव्हते.”

“तुम्हीच ते घेतले नाही. म्हणाले होतेत मरणाराने कशाला पत्ते घ्यावे? तुम्ही येथे आहात असे कळले. आणि मीही या संस्थेस वाहून घेण्यासाठी आलो आहे.”

“सरले, माझ्या खोलीत हा विद्यार्थी राहात असे.”

“मीही यांना पाहिले होते.”

“याने मला वाचवले. मरू नका सांगितले. सेवेचा मंत्र दिला. सरलेचे प्रेम ही एक सत्यता; परंतु सामाजिक कर्तव्ये ही दुसरी सत्यता असे याने सांगितले. सरले, तुझ्या उदयला याने वाचवले.”

“सरले, सारे सारे आठवते. चल आता उशीर होईल. आज बाळ आहे बरोबर. त्या वेळेस बंधन नसे. बाळ म्हणजे प्रेमळ बंधन. होय ना रे लबाडा? ती बाभळीची पिवळी फुले घालू का तुझ्या कानांत?”

“प्रकाशला हे डूल किती छान दिसतात ! बाबांनी त्याचे सारे केले. किती प्रेमळ झाले आहेत बाबा !”

“जसा पिकलेला रसाळ आंबा !”

तिघे घरी आली. रात्री गच्चीत बसली. प्रकाश झोपला. विश्वासरावांनी रमाबाईंच्या बाळाच्या मरणाची करूणगंभीर कथा सांगितली. आणि मग सारी स्तब्ध होती.

“बाबा, हे घर आपण विकून टाकू. या घरात सार्‍या शोकस्मृती आहेत. आणि आपण ठाणे जिल्हयात जाऊ. आश्रमात राहू. त्या आदिवासी सेवा मंडळात राहू. उदय नि मी सेवेला वाहून घेणार आहोत. तुम्ही आमच्याजवळच राहा. आता एकटे दूर नका राहू हो बाबा. आपण एकत्र राहू. होईल ती गरिबांची सेवा करू. जीवने कृतार्थ करू.”

“तुम्ही म्हणाल ते योग्यच असेल.”

एके दिवशी सरला नि उदय बाळाला घेऊन मुंबईस आली. त्यांनी आधी पत्र पाठविलेच होते. शेटजींना खूप आनंद झाला.

“ही माझी धर्मकन्या सरला, हा तिचा पती, हा त्यांचा बाळ.” अशी त्यांनी स्वत:च्या पत्नीला ओळख करून दिली. त्यांनी त्या सर्वांना वस्त्रे, भूषणे दिली. बाळाला बाळलेणे दिले. आणि आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते आले होते, उदयची नि त्यांची ओळख करून देण्यात आली. त्यांना अत्यंत आनंद झाला.

“तुम्ही आल्याने फार चांगले होईल. सरलाताईचाही फार उपयोग होईल. स्त्रियांत त्या जातील. तुम्ही येणार असे शेटजी म्हणाले होते. आम्ही वाटच पाहात होतो. एका सुंदर ठिकाणी सेवाश्रम आहे. तेथून कार्यकर्ते सर्वत्र कामासाठी जातात. तुम्ही या. तुम्हाला सुंदर झोपडी बांधून देऊ. सरलाताई शाळा चालवतील. आनंद होईल.” सारे ठरले. उदय-सरला पुन्हा पुण्यास आली. बंगला विकण्याची जाहिरात देण्यात आली. आणि चांगले गि-हाईक भेटले. बंगला विकला गेला. तिकडे नाशिकचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला होता. अणि सरला, उदय, विश्वासराव बाळासह एके दिवशी पुणे सोडून मुंबईस निघून आली. शेटजींकडे दोन दिवस राहिली.

“सरले, हे तुझे माहेर. समजलीस ना? लागेल ते मागत जा. तुझा बाळ मोठा झाला म्हणजे इकडे शिकायला पाठव. पुढे नव्या बाळंतपणासाठी इकडेच ये. लाजायला काय झाले? ऐकलेत का उदय? सरलेला पाठवीत जा हो.” शेटजींची प्रेमळ पत्नी म्हणाली.

“बाबा, त्याचे नाव का प्रकाश?”

“हो, माझ्या निराशेतला तो प्रकाश आहे.”

“आणि आमच्याही जीवनातला तो प्रकाश आहे.”

सरलेने प्रकाशला घेतले. आणि तिचे स्तन दुधाने भरून आले, दाटून आले. हृदयातील सारे वात्सल्य तेथे भरभरून आले. तिने बाळाचे तोंड लावले. आणि बाळाला गोडी लागली. अपार गोडी ! आईच्या दुधाची सर कशाला आहे? सारी अमृते त्याच्यापुढे फिकी आहेत ! तो अपार पान्हा बाळ पीत होता. मध्येच मातेच्या मुखाकडे पाहात होता. आणि तोंडातील दूध बाहेर गळे.

“पाहतोय काय राजा? तुझी आईच हो मी. पी पोटभर. आठ महिन्यांचे पारणे फेड. ओळखलीस का आई? हसतोस काय? उदय बघ तरी किती हसतो आहे तो !”

बाळराजा ते भरलेले मातृस्तन रिते करीत होता. परंतु रिते होत ना. त्याचे पोट भरले. आईच्या मांडीवर सुखाने पडून राहिला.

“उदय, तू घेतोस याला? घे.”

उदयने बाळाला जवळ घेतले. हृदयाशी धरले. त्याचे त्याने मुके घेतले.

“उदय तुझी दाढी असती तर बाळ भ्याला असता. बरे झाले त्याच दिवशी काढलीस म्हणून. प्रकाश, तुझे बाबा हो ते. हे माझे बाबा, आणि हे तुझे बाबा.”

विश्वासराव खाली पाणी घालायला गेले. उदयजवळ प्रकाश होता. सरला खाली गेली.

“बाबा, मी घालू पाणी?”

“घाल हो, तू विषवल्ली नाहीस, तू अमृतवल्ली आहेस. प्रेमगंगा आहेस. पुण्यमूर्ती आहेस. परंतु अजून नीट उजाडले नाही. जा जरा पड. रात्रीचे जागरण असेल. बाळाला कुशीत घेऊन पड.”

“आता नाही झोप येणार. आणि बाळ का आता झोपणार आहे?”

आनंदी आनंद झाला. सरलेने आज केसांत फुले घातली. किती सुंदर दिसत होती ती ! घरात आनंद होता. सरलेने सुंदर स्वयंपाक केला. जेवणे झाली. दुपारी फोनो लावण्यात आला. बाळ सारखा प्लेटी ओढीत होता, पिना फेकीत होता.

“किती रे राजा तुझी गडबड ! बाबा, तुम्हांला हा आवरता येई का?”

“आई आली म्हणून आज फारच ऐटीत आहे स्वारी !”

आणि मग सारी झोपली. पाळण्यात प्रकाशही झोपला.

सायंकाळी उदय नि सरला बाळाला घेऊन फिरायला गेली. त्या कालव्याच्या काठावर दोघे बसली. जुन्या आठवणी झाल्या. तो दगड तेथे होता.

“उदय हा बघ तो दगड.”

“ज्या दगडाने तुझी-माझी गाठ घातली तो प्रेमळ दगड. प्रणाम या दगडाला.”

“आणि तू माझ्या पदरावरचा मुंगळा उडवला होतास. आठवते का? आणि तुला ताप आला होता. मी तुझा हात धरून तुला नेले. आणि ती रात्र. घामाने आपण डवरलो होतो. प्रेमाने फुललो होतो. तापातून प्रेम फुलले. आठवते का?”

उदय नि सरला पंढरपूरला आली. त्या संस्थेत दोघे गेली. व्यवस्थापकांची भेट झाली. परंतु आजोबांनी नातवाला नेले होते. विश्वासरावांचे पत्र व्यवस्थापकांनी सरलेच्या हाती दिले. तिने वाचले व उदयला वाचायला दिले.

“देवाची दया-” उदय म्हणाला.

“आता सुखाचे दिवस येणार. सरलेचे भाग्य फुलणार. हो ना उदय?”

“होय, दु:खानंतर येणारे सुख किती गोड वाटते, रसमय वाटते, नाही?”

त्यांनी संस्थेस शंभर रूपयांची देणगी दिली. शेटजींनी पैसे दिले होते. त्यातूनच त्यांनी ते पैसे दिले. व्यवस्थापकांना प्रणाम करून दोघे पुण्याला जायला निघाली.

“उदय, बाबा एकटे आहेत. सावत्र आईही गेली. तिचा बाळही गेला. बाबांना मी एकटी उरल्ये. ते बाळाला खेळवीत असतील. आपण एकदम जाऊ. किती आनंद ! उदय, किती आनंद ! या आनंदाला आपण पात्र आहोत का?”

“अद्याप का शंका आहे?”

दोघे अति आनंदात होती. एकमेकांकडे प्रेमाने पाहात होती. फार बोलवत नव्हते त्यांना. आणि पुणे आले. टांगा करून दोघे निघाली. दोघांची हृदये शत स्मृतींनी भरून आली होती. पहाटेची वेळ होती. टांगा दाराशी थांबला विश्वासराव फुलझाडांना पाणी घालीत होते. टांग्यातून दोघे उतरली. सामान फार नव्हतेच. टांगा गेला.

“बाबा, मी आल्ये पाणी घालायला. बाबा आम्हांला आशीर्वाद द्या.”

“सरले, आलीस बाळ? आणि उदयही आला? किती आनंदाचा दिवस ! चला वर. बाळ झोपला आहे. उठेलच आता. आजच अजून निजला आहे. आई येणार म्हणून की काय?”

सारी वर आली. सरला पाळण्याजवळ गेली. बाळ झोपला होता. माता बाळाकडे पाहात होती. आणि पिताही. तिच्याने राहवेना. तिने त्याला काढून घेतले. बाळ जागा झाला. तो आजोबांकडे जाऊ लागला. आजोबांनी घेतला.

“बाळ, ती बघ तुझी आई. तिच्याजवळ आता जा. ती खाऊ देईल. जा. प्रकाश, जा आईजवळ.”

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED