Matheran ani athavani books and stories free download online pdf in Marathi

माथेरान आणि आठवणी

पाऊस म्हटला जी आठवणी आल्याच. पाऊस म्हणजे आनंद. पाऊस म्हणजे जगणे. किती ही बोललं पावसाबद्दल तरीही ते कमीच. बाहेर पाऊस कोसळायला लागला की आठवणी ताज्या होऊन जातात. तशीच एक आठवण ती म्हणजे "माथेरान." मी माझ्या बहिणीच्या ग्रुप सोबत गेलेले. पावसाळा आला की चालु होतात त्या पावसाळी ट्रिप्स. तशीच आमची "माथेरानची ट्रिप."


सकाळी लवकर सकाळची ट्रेन पकडून आम्ही ठाणे स्टेशन गाठलं. सकाळची सहा पंधराची ट्रेन पकडुन आम्ही सात तेवीस पर्यंत नेरळ ला पोहोचलो. त्या ट्रेनबाहेर मला दिसत होता तो रिमझिम बरसणारा पाऊस. ट्रिप्स म्हटल्या की पाऊस हा हवाच नाही....!!

नजर जाईल तिथं पर्यंत फक्त हिरवळ दिसत होती. पावसाने सर्वांना जणू काही नवीन कपडे घेऊन दिले असावेत. त्याप्रमाणे त्यांनी हिरवे कपडे परिधान केले आहेत असच वाटत होतं. त्यावर रंगबिरंगी फुल त्याची शोभा वाढवत होती. सगळे गप्पा मारत होते, पण मी मात्र त्या निसर्गात हरवून गेलेली. तो निसर्ग मनात साठवून घेत हाती. ट्रेन सगळं मागे टाकत आम्हाला स्वप्नांच्या दुनियेत जी घेऊन चालली होती.!!

पोहोचलो आम्ही नेरळ स्टेशनवर. तिथुन बाहेर पडून आम्ही प्रायव्हेट गाडीने निघालो. जस जसे आम्ही वर चढत होतो, तो नजारा हृदय गोठवणारा होता. आकाशातले ढग आता खाली उतरले होते. कदाचित त्यांनाही कळलं असावं आम्ही येतोय त्यांना भेटायला. ते काका गाडी चालवत होते आणि प्रत्येक क्षणाला माझा जीव वर खाली होत होता. किती ती वळणं. नागमोडी वळण संपवून गाठलं बाबा एकदाच माथेरान.

"वाह...!! काय छान धुकं होतं.." म्हणजे मी तर छान त्या धुक्यात नाचत होते. ते नाही का टीव्ही मध्ये दाखवतात तसच काहीसं. भरपूर असे फोटो देखील झाले. मग चालत चालत आम्ही निसर्ग अनुभवत ट्रॅक वरून निघालो. ट्रॅक वरून चालताना आम्हाला आमच्यासमोर डोंगर दिसत होते. मग काय, झाले सगळे परत फोटोग्राफी करायला. मी मात्र निसर्गाचं ते सुंदर रूप मनात साठवत होते आणि काही निसर्गाचे फोटो मी माझ्या कॅमेरामध्ये टिपले. मग तसेच पुढे चालत आम्ही माथेरान च्या मार्केटमध्ये पोहोचलो, जिथे आम्ही नाश्ता केला. गरमा- गरम चहा आणि कांदाभजी. पण ती एवढी महाग की कांदयाची होती की सोन्याची ते त्यांनाच म्हाहित. पण काय "आली लहर आणि केला कहर", तसच काहीसं आम्ही ही केलं आणि तुटून पडलो त्या भजीवर.


आता पेटपूजा झालेली. मोर्चा निघाला तो पहिल्या पॉईंट जवळ. ते एक गार्डन होते. धुकं होताच मागे, जस की आमचा पिच्छाच करत होत ते. त्या गार्डन मध्ये थोडे फिरून आम्ही नेक्स्ट पॉइंट ला पोहोचतो. "खंडाळा पॉइंट", तिथे मोठं मोठ्या पायऱ्या होत्या आणि सोबत धुकं ही. त्या पॉईंटवर काही दिसलच नाही. कस दिसणार धुक्यामुळे सर्वकाही सफेद झालेलं. तरीही काही जणी फोटो काढतच होत्या. काही न दिसल्याने आम्ही तिथून निघालो आणि पोहोचलो एका पॉइंटला. तो होता "ऍलेंक्सझेंडर पॉइंट", तिथे पायऱ्या होत्या आणि त्यावर छान गवत कोणीही न सांगितल्या सारख स्वतःच उगवलं होत. सुंदर क्षण नाही..!!!


समोरच दृश्य रिफ्रेश करून टाकणार होत. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा स्वतःच अस्तित्व आणि सौंदर्य ऐटीत दाखवत होते. आणि तो पाऊस मात्र जरासा शांत होऊन गुपचूप कोपऱ्यात उभ्या केलेल्या मस्तीखोर मुलासारखा उभा होता.
पण कोणत्याही क्षणी कोसळू शकतो असा काहीसा आम्हाला इशारा ही करत होता. तोच आमच्यातल्या एकाला बाजूलाच एक जागा दिसली ज्यावर ते नाही जुन्याकाळात महापुरुष बसून योग धारणा करत तशीच काहीशी ती जागा वाटत होती मग काय तो पण त्यावर जाऊन बसला आणि आपण एक योग पुरुष आहोत अशी त्याची स्टाईल मारणं चालू झालं. मग आम्हीही लगेच हातोहात त्याच्या पाय पडून आशीर्वाद घेतले. त्या सोबत फोटो हवेच. मी त्या मुलाच्या बाजुला एक दासी सारखी उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रसाद देण्याची ऍकटिंग करायला लागले. त्यातल्या काही जणींनी लगेच आशीर्वाद घेत माझ्याकडून प्रसाद घेतला हा सगळा आमचा टाईमपास चालूच होता. पण त्यात लहानपण दडलं होत ते मात्र आम्ही खुप एन्जॉय केलं हा.


हा सगळा खेळ खेळुन आम्ही निघालो पुढच्या पॉइंटला बघायला. तो होता "वन ट्री हिल पॉइंट", खर तर या पॉइंटला जायचा रस्ता खुप कठीण आहे. त्यात तो पावसाळ्यात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. आम्ही काही गेलो नाही पण दुरूनच त्या पॉईंटची मज्जा घेतली. खुप स्पेसिएल अस काही कोणाला वाटणार नाही, पण जर तुम्ही ते मनाच्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्हाला दिसेल ते 'एक झाड'. म्हणजे बघा ना ते एकच झाड स्वतःच अस्तित्व खुप वर्ष तिथे जमवून बसलंय. जस की, "काही झालं तरी मी ती जागा सोडणार नाही", असच काही आपल्याला बघताना जाणवेल. मग काही फोटो घेऊन आम्ही दुसरीकडे निघालो.


तो होता, "चारलोटे लेक." शांत, निर्मळ. पाण्याने पुरेपूर भरलेला असा हा लेक. खुप लोकांच्या आकर्षणाचा होऊन बसलेला हा लेक. त्याच्याच बाजूला होत ते "शंकराचं मंदिर". त्या मंदिरात गेल्यावर मनशांती लाभली. म्हणजे काही काळ बाहेरचं सर्वकाही विसरून त्या शंभो- शंकराच्या पायावर मस्तक ठेवुन, काही काळ त्यालाच बघत राहवेसे वाटले. पण ते काही शक्य नव्हतं. कारण मंदिर बंद करण्याचा टाईम झालेला. त्यामुळे प्रसाद घेऊन आम्ही लेक जवळ पोहोचलो. त्या लेकमधले पाणी धबधब्याच्या रूपाने खाली शोधले होते आणि काही लोकं त्याचा आस्वाद देखील घेत होते. मग काय आम्हीही निघालो. बापरे...!! काय ते थंड पाणी. अंगावर बर्फाचं पाणी घातल्या सारखा अनुभव आला. त्या थंड पाण्यामुळे व तेथील थंड वातावरणामुळे आमच्या तोंडामधून वाफ येत होती. मग काय आमचं कॉमपीटेशन सुरू झालं, कोणाच्या तोंडातुन जास्त वाफ येते.


ते करत जात असताना माझी नजर गेली ती त्या बांधुन ठेवलेल्या घोड्यांवर. क्षणात चेहऱ्यावरील हसु नाहीस झाले. त्या थंड वातावरणात, पावसाच्या सानिध्यात सर्व काही मजेदार होत. पण वाईट वाटत होतं ते, त्या मुक्या प्राण्यांचं. आपल्यामुळे त्या मुक्या प्राण्यांना हाल सोसावे लागतात. भले त्यांचं ते काम असेल पण मन हळवं असली की हे असे त्रास होतातच. मी ऐकलंय की घोडा हा कधीच खाली बसत नाही. त्याच्या पायात एवढी ताकद असते की तो आपलं संपूर्ण आयुष्य हे उभ्याने काढतो. पण जेव्हा तो आजारी किव्हा म्हातारा होतो तेव्हाच तो खाली बसतो. किती ताकदवान तो प्राणी नाही...?!!

हे सगळं डोक्यात फिरत असतानाच आम्ही एका पोंइंट जवळ कधी पोहोचलो हे देखील कळलं नाही मला. तो होता "इको पॉइंट", म्हणजे त्या पॉइंट वर जाऊन तुम्ही तुमचा नाव घेतलं तर ते सर्वत्र घुमते आणि त्याचा प्रतिध्वनी सर्वत्र ऐकू येतो असा काहीसा त्याचा छोटासा इतिहास. पण आम्ही खूप वेळ नाव घेऊन देखील कसलाच आवाज काही येत नव्हता. पण आजू बाजूला बघणारे लोक मात्र आम्हाला नक्की मूर्ख समजत होते. शेवटी कंटाळून आम्ही गप्पपणे निसर्ग दर्शन घेतलं. समोर मोठं मोठ्याले डोंगर आणि त्यावर ओसंडुन वाहणारे छोटे मोठे धबधबे.


प्रत्येक धबधबा स्वतःचा मार्ग शोधुन खाली कोसळत होता, पण शेवटी खाली जाऊन एकत्र होत होता. लांबपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा सर्वाना स्वतःकडे आकर्षित करत होत्या. काही डोंगरांवर शेतीही दिसत होती. तोच एक डोंगर नागमोडया रुपात समोरून पुढे गेलेला. निसर्गाचं हे मोहक रूप कितीही कॅमेरामध्ये टिपा. डोळ्यांनी टिपलेल मात्र आयुष्यभर मनात खोलवर रुतून राहत. ते क्षण आठवले की परत एकदा जगल्यासारखे भासतात. फक्त डोळे बंद केले तरी ते क्षण आपण आता अनुभवत असल्याचे भास मनाला होतात. का कुणाचं ठाऊक पण त्या देवाने निसर्ग बनवताना खुप विचार केला असावा. पण आपण ती खराब करतोय अस देखील वाटत. म्हणजे आम्ही जिथे जिथे फिरत होती तिघे प्रत्येक पॉईंट्स जवळ कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल होत्याच. काही आम्ही फेकल्या देखील. जवळ कचऱ्याचा डब्बा असुन आपण ते त्यात का टाकत नाही हा प्रश्न मला नेहमीच पडत असतो.


या सर्वात तो शांत असलेला पाऊस परत चालू झाला. पण आम्ही भिजण्यासाठीच आलो असल्याने मस्त भिजत होतो. त्या पॉईंट्स नंतर एक ठिकाणी गरमा गरम चहा घेतला. तिथुन पूढे जात असता मला लागली भूक म्हणुन आम्ही बाजूलाच एका घराजवळ कणीस भाजून मिळत होती. आम्ही ती घेतली. खात जात होतो की आमच्यातल्या एकाच्या अंगावरून एक माकड धावून आला आणि तिच्या हातातील कणीस घेऊन जायचा प्रयत्न करू लागला. ती एवढी घाबरली की तिने घाबरूनच तो त्याच्या जवळ फेकत तिथून पळ काढला. आम्ही हे मागुन बघत हसत होतो. आधी ती देखील घाबरली नंतर स्वतःच्या घाबरटपणावर स्वतःच हसली देखील.
मी मात्र स्वतःच कणीस लपवुन लपवून खाल्ला.

सरळ चालत जात होतो तोच एकाने गाण्याच्या भेंड्या खेळायच सुचवलं. खर तर शांत वातावरणात सर्वाना भीती वाटत होती म्हणून सर्व रेडी झाले. गाणी गात, मज्जा करत आम्ही शेवटच्या पॉईंट्स ला म्हणजे "लुईस पोंइंट," ला पोहोचलो.
खर तर तो शेवटचा पॉईंट नव्हता. आमच्या प्रवासातला तो शेवटचा पॉईंट होता. बापरे किती तो लांब...!! अक्षरशः पाय दुःखु लागले माझे तर. पण जायचं तर होतच. चालत आम्ही पोहोचलो एकदाचे. पण बोलतात ना तुम्ही जेव्हा खूप मेहनत घेता आणि शेवटी त्या मेहनतीचं चीज होत तसच काहीसं त्याक्षणी मला वाटलं. फक्त वाह...!! हा एकच शब्द फुटला माझ्या तोंडून. म्हणजे त्या पॉईंट वरून निसर्गाच्या सर्वात जवळ आम्ही पोहोचलो होतो.

लाईफमध्ये कधी कधी आपण खुप मेहनत घेतो. खुप प्रॉब्लेम सामोरे येतात पण जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता तेव्हा तो आनंद वेगळाच असतो, तसाच काही आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरन ओसंडून वाहत होता. सिड्या उतरून आम्ही त्या पॉइंट जवळ पोहोचलो. डावीकडे हलका दिसणारा इको पॉईंट, तर समोर चारलोटे लेकमधल्या पाण्याचा बनलेला फेसाळ धबधबा. उजवीकडे दूरवर पसरलेल्या डोंगररांगा. एका गडासारखा दिसणारा डोंगर. खाली भीतीदायक वाटणारी दरी आणि वर निरभ्र आकाश. तो पाऊस देखील दूरवर जाऊन बसला होता आम्हाला एन्जॉय करता यावं म्हणुन. त्या डोंगरावर पसरलेलं दुःख. आजूबाजूला वाहणारा शांत पण थंड वारा. काय हवंय अजुन. सुख म्हणजे काय ते तिघे गेल्यावर कळलं. शहरात राहून हे सगळं कधीच अनुभवता आला नसतं. मी परत परत त्या निसर्गाच्या आणि पावसाच्या प्रेमात मात्र पडत होते.

मग काय चालु झालं फोटोग्राफी. सर्वजण त्या सिड्यांवर बसून फोटो काढत होते. मी देखील सर्वांमध्ये सामावून गेली. खुप फोटो काढले. अगदी मनसोक्त.
मग काही वेळ सगळे शांतपणे बसलो आणि निसर्गात रमून गेलो. आयुष्याचा खरा अर्थ अशा शांत ठिकाणी गेल्यावर कळतो. नाही...?!

खूप धमाल, मस्ती केली. त्या पावसातील प्रत्येक क्षण मी माझ्या मनात भरून ठेवत होती. सगळं मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत सगळं पार करून पोहोचलो मार्केटमध्ये. तिथून परत मेन गेट जवळ चालत निघालो. भराभर पावलं टाकत होतो. पाय घराकडे धाव घेत होते. पण मन मात्र अजूनही तिथेच रमल होत. प्रायव्हेट गाडीने जायचं असल्याने आम्ही एका गाडीत जाऊन बसलो. पावसाचे दिवस आणि त्यात हिलस्टेशन असल्याने अंधारून आलेलं. निसर्गाला बाय करत गाडी निघाली. खाली जाताना मी वळुन वळून त्या पावसाळा बघत होते. येताना सोबत आलेलो मग जाताना एकट जायचा बिलकुल मुड नव्हता. मला वाटलं की हा पाऊस काही आता सोबत येणार नाही. बसला असेल निसर्गसोबत गप्पा मारत. खूप दिवसाने त्याच्या जुन्या मित्रांना जो भेटत होता.

आम्ही स्टेशनवर पोहोचलो. भूक तर सर्वानाच लागली होती म्हणुन गरमा गरम वडापाव ही झाला. स्टेशनवर ट्रेन आली आणि आम्ही चढलो. खिडकी जवळ बसून मी मात्र त्याची वाट बघत होती. पण बघता बघताच कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली ती त्याच्या स्पर्शाने. पण डोळे काही केल्याने उघडत नसल्याने मी तशीच झोपुन राहिली. कदाचित तो पाऊस देखील सांगत होता, "की आलोय मी तु झोप शांत."

बाहेर आवाज होता तो ट्रेन चा आणि त्या पावसाचा. मी त्या आवाजात हरवून जात शांतपणे झोपून होते, माझे स्टेशन येईपर्यंत.


***

नकळत तो पाऊस आला,

बनुन सोबतीचा मित्र.

जो प्रत्येक क्षण आनंद देतो,

स्वतः रडून समोरच्याला हसवतो..?

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED