निरोप - भाग-२ Ishwar Trimbak Agam द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निरोप - भाग-२

भाग २ : निरोप

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

फुलाजीचा दरडावणीचा स्वर ऐकताच बाजीने फुलाजीचा आलिंगन दिले अन आपसूकच त्याच्या तोंडून, "दादा ss" शब्द बाहेर पडले अन डोळ्यांत अश्रू दाटले. बाजीने फुलाजीचा निरोप घेतला अन राजांची पालखी घेऊन पुढे धावू लागला. जौहरचा वेढा पार झाला होता. सोबतीचे पाच सहाशे वीर बहिर्जीने ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नजरबाज दाखवतील त्या दिशेने अन त्यांच्या मागे मागे उर फुटेतो खेळणा गडाच्या दिशेने धावत होते. राजांच्या पालखीचे हशम त्याच वेगाने आदलाबदली होत होते. मध्यरात्रीचा प्रहर सरला होता. पहाटेचा प्रहर चालू झाला होता, अजूनही सगळे धावतच होते. पन्हाळ्यापासून विशाळगडाचं अंतर वीस कोसांच्या आसपास, त्यापैकी पंधरा एक कोस अंतर पार झालं असेल कदाचित. अजूनही बरच अंतर बाकी होतं. बाजीने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला. थोडा वेळची विश्रांती अन लगेच पुन्हा धावायचं होतं.

पावसाची रिपरिप आता कमी झाली होती. सगळे झाडांच्या , खोडाच्या, दगडांच्या आडोशाला विश्रांती घेत होते. अचानक एक हेर धावत येताना पाहून बाजी ताडकन उठून उभा राहिला.

"बाजी, निघा. मसूद खान आपल्याच दिशेने घौडदौड करत यितुय. हजार दोन हजार हशम अस्त्याल. घाई करा बाजी, न्हायतर घात हुईल."

बाजीने मोठ्याने आवाज दिला, "चला रं, निघा."

त्यासरशी राजांची पालखी उचलली गेली. अचानक पालखी उचलल्यामुळे राजे जरा दचकलेच. पालखीचा पडदा जरा बाजूला सारून म्हणाले,

"बाजी, काय झालं?"

बाजी राजांच्या पालखी जवळ येऊन म्हणाला, "राजं, निघावं लागल, मसूद खान यितुय मागणं."

राजे, "हं.. म्हणजे सुगावा लागलाच तर. चला बाजी, लवकरात लवकर खेळणा गाठावा लागेल."

"जी म्हाराज."

राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा दौड चालू झाली. राजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते.

'कोण आपण????
अन कोण हि माणसं???
राजे म्हणवून घेणारे आपण...
आपण कसले राजे???
खरे राजे लोक तर हे...
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या घनदाट जंगलातून, काट्याकुट्यातून, दगडा धोंड्यातून, आपला जीव वाचावा, आपण सुखरूप राहावं म्हणून उर फुटेतो धावणारी हि माणसं....
ना जात ना पात बघून आपल्यासाठी जीव देणारी ही माणसं....
आपला घरदार वाऱ्यावर सोडून स्वराज्यासाठी लढणारी, झगडणारी हि माणसं...
शिवा...
फुलाजी...
बहिर्जी...
बाजी...
आपल्यासाठी जीवावर उदार होणारी हि माणसं...
हीच तर खरी राजा माणसं...
आपण कसले राजे...?
आपण तर फक्त नावाचेच राजे...'

तांबडं फुटायची वेळ होऊ लागली होती. पाऊसही पूर्णपणे थांबला होता. पहाटेचा थंडगार वारा घामाने चिंब भिजलेल्या अंगावर विसावत होता. तेव्हढाच काय तो शरीराला थंडावा मिळत होता. पण कुणालाच त्याची फिकीर नव्हती. धावून धावून सगळ्यांची छाती खाली वर धपापत होती. थोड्याच वेळात सगळे गजाखिंडीपाशी येऊन पोहोचले होते. मसूद खान मागावरच होता, कोणत्याही क्षणी तो आपल्याला गाठेल अन तुंबळ लढाई जुंपेल अशी परिस्थिती होती. बाजीने थोडं बाजूला होऊन आसपासच्या झाडीचा अन खिंडीच्या उंचच उंच दरडींचा अंदाज घेतला. बाजीच्या मनानं एक विचार पक्का केला. दुसऱ्या क्षणी धावणाऱ्या मावळ्यांवर नजर फिरवली अन थांबण्याचा इशारा केला. राजांची पालखी खाली ठेवण्यात आली. पटापट सगळे मावळे आडोसा शोधून आपलं अंग टाकून विसावू लागले. बाजी राजांच्या पालखी जवळ आले. राजेही पायउतार झाले.

राजे, "काय झालं बाजी, असं अचानक का थांबलात?"

बाजी, "राजं.. मागून मसूद खान यितुय, कवा बी आपल्याला गाठलं. त्याच्याकडं दोन तीन हजार हशम असत्याल, आधीच आपलं मावळ पळून पळून दमल्यात, अशा परिस्थितीत त्येला आपण तोंड न्हाय देऊ शकत."

राजे,"बाजी.. मग आपण हि खिंड लढवू. जागा मोक्याची आहे."

"न्हाय राजं.. तुम्ही तीन चारशे मावळा घेऊन खेळण्याच्या वाटनं निघा. आम्ही दोनशे मावळे हि खिंड अडवून धरू."

"नाही बाजी. आम्हीही इथेच थांबणार."

"न्हाय राज, उशीर करू नगा. निघा राजं.."

"तुम्हाला एकट्याला सोडून...? ते शक्य नाही."

राजांचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच बाजी दरडावणीचा स्वरात म्हणाला,
"ऐकावं राजं.. माँसाहेबांची आण हाय तुमास्नी.. हितं वाद घालत बसाय येळ न्हाय. आन, आता कितीस अंतर राहिलंय, चार पाच कोस फक्त. गडापातूर आपण पोहोचे पर्यंत मसूद खानानं आपल्याला मधीच गाठलं तर लय अवघड होऊन बसल राजं. म्हणून म्हंतुय तुम्ही फूड निघा अन गडावं पोहोचल्याव तोफचं बार करा. म्हंजी आम्हास्नी कळलं की तुम्ही सुखरूप पोहोचलाय ते."

राजांचा उर भरून आला होता. राजे एकटेच बाजीला सोडून जाण्याच्या मनस्थितीत नव्हते. कसेबसे राजे बोलले,

"ठीक आहे बाजी. पण लक्षात असू द्या, जसे तोफेचे बार ऐकू येतील, आसपासच्या जंगलात पसार व्हा अन लागलीच आम्हाला येऊन भेटा."

"जी राजं.. आता निघावं.. येळ नका दवडू."

राजांनी साश्रु नयनांनी बाजींना आलिंगन दिले अन निरोप घेतला. राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा विशाल गडाच्या दिशेने तीन साडे तीनशे मावळे धावू लागले.

क्रमशः

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"