Aamhi Ambeche gondhali books and stories free download online pdf in Marathi

आम्ही अंबेचे गोंधळी

आम्ही अंबेचे गोंधळी .

गोंधळ किंवा जागर ही महाराष्ट्रातली एक पारंपारिक प्रथा आहे
गोंधळी ही देवीच्‍या भक्‍तांची भटकी जात आहे.
गोंधळ हा लग्‍न, मुंज, बारसे, जावळ, अशा समारंभाचे वेळी देव – देवतांच्‍या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी सुद्धा आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी व देवीच्या आशीर्वादासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात.
प्रती वर्षाला घरी अथवा कुलदैवताच्या ठिकाणी गोंधळ घालण्याची पण प्रथा असते .
महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात.
या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात.

गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख आहेत .
यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.

लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळाच्‍या कुळाचारास अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. गोंधळ या विधिनाट्यात गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो.
त्‍यांना देवीची गाणी मात्र येत असतात. आजचे गोंधळाचे जे प्रचलित स्‍वरूप आहे त्‍यात गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते.
त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो.
आज रूढ असलेल्‍या गोंधळाच्‍या प्रकारात काकड्या गोंधळ व संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार आढळतात. काकड्या गोंधळ हे कोणत्‍याही जातीचे लोक करू शकतात, तर संबळ्या गोंधळ हा गोंधळी जातीचे लोकच घालतात. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

गोंधळ करण्‍याच्‍या पद्धतीत दोन्‍ही उपजातींच्‍या पोषाखामुळे आणि परंपरेने चालत आलेल्‍या संकेतांमुळे काही भेद निर्माण झाले आहेत. उदा. रेणुराई गोंधळी विधिनाट्याच्‍या वेळी समोर दिवटी ठेवतो. कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्‍हणतात.
ते एका हाताने संबळ वाजवतात.
कदमराई गोंधळ्यांनाच भुत्‍ये‚ राजदरबारी गोंधळी असे म्‍हणतात. गोंधळी हा गोंधळ विधी सादर करताना परंपरेने चालत आलेल्‍या सांकेतिक करपल्‍लवीने प्रेक्षकांना चकित करतात.
करपल्‍लवीच्‍या वापराने त्‍यांचे सादरीकरण न केवळ चमत्‍कृतीपूर्ण होते तर नाट्यपूर्ण व रंजकही होते.
परशुरामाने गोंधळ्याची निर्मिती कशी केली हे जसे ते कवनांमधून सांगतात त्‍याचप्रमाणे उदरनिर्वाहाची तरतूद भवानी मातेने आशीर्वाद दिल्‍यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही त्‍यांच्‍या कवनांतून गातात.
विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतीगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात.
वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात.
ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात.
गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुणा आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो.

थोडक्यात, महाराष्‍ट्रातील लोकसंगीतात गोंधळ या प्रयोगरूप लोककलेचे स्‍थान महत्त्वाचे आहे .
कुटुंबातील इतर जिवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवीतत्त्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते.
पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.

असे मानतात की या वेळी आघातात्मक तेजरूपी नादाची निर्मिती होऊन या नादाकडे शक्तीतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात.
याचा परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून त्याद्वारे वास्तूतील अनेक वाईट शक्तींचे अल्प कालावधीत उच्चाटन होते.
तसेच शक्तीतत्त्वात्मक लहरींचा दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते.
नवरात्रीमध्ये ब्रह्मांडात तेजरूपी शक्तीतत्त्व कार्यमान असते. त्यामुळे या काळात देवीचा गोंधळ घातल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो.
गोंधळी या जीवांमध्ये पिढ्यानपिढ्या देवीतत्त्वाची उपासना वसा म्हणून चालत आलेली असल्याने ते ‘देवीचे उपासक’ म्हणून गणले जातात.
यांना ‘शक्तीरूपी गण’ किंवा ‘दास’ अशीही संज्ञा दिली जाते. ते त्यांच्या तेजोमय शक्तीरूपी वाणीतून देवीला आवाहन करून तिचे मारक तत्त्व जागृत करू शकतात.

देवीचा उदोकार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांत अनेक शतके घुमतो आहे. नानाविध लोकमाता गावागावांतून, नगरानगरांतून जनतेच्या हाकेला ओ देत आहेत.
परकीय आक्रमण झाले त्यावेळी प्रसंगी जनतेसोबत त्या स्वत: चिरडल्या भरडल्या गेल्या.
परंतु जगण्याच्या उमेदीसारखीच लोकांची श्रद्धा चिवट असल्याने त्यांची ठाणी पुन्हा उभी राहिली. काही वेळा बदलत्या जाणिवा, गरजा आणि उदयोन्मुख संप्रदाय यांनी जुन्या श्रद्धाचे नूतनीकरण झाले .
या मध्ये देवतांचे पुनर्जन्म झाले

या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवतांचे नाव घेतात.त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना प्रसाद म्हणुन भोजन दिले जाते.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर येतात व हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

उदा.

अंबे जोगवा दे जोगवा दे

माय माझ्या भवानी जोगवा दे ।

हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।

एका रोज खटखटीन जी ॥

मिरची अंगी लईच ताठा ।

म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.

रत्नागिरी ज्योतिबा ।

गोंधळा या हो ।

तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।

पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते.
त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालिन।

हाती बोधाचा झेंडा मी घेईन।

भेदरहित वारीस जाईन।

असा जोगवा मागितला जातो .

असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED