श्री दत्त जयंती Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री दत्त जयंती

दत्त जयंती

दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.
दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, आदी ठिकाणी आहेत. श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो

दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होते .
तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे.
श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले.
ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली. महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.

भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात.
दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.

दत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन होते.
संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते.
देवळावर रोषणाई केली जाते.
पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते.
भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते.
या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.
अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.
केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.
दत्तजयंती माहिती अणि दत्त जन्म कथा

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.
त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
श्री गुरुदेव दत्त

या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.
दत्ताचा वार गुरुवार असतो ,या दिवशी दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवत नाहीत .
जणु काही याचकाच्या रुपात स्वतः दत्तात्रेय समजून भिक्षा घातली जाते .

दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

श्री दत्त संप्रदायातील साधक 'अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त' असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे- नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमानकाळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे.
श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे, अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु माणून आपला देह हा क्षणभंगूर आहे, अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती.
अशाप्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे. ते पाहण्यासाठी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते.

श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला अगाध आहेत.

महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करताना दिसतो. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते.
भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हारपले मन झाले उन्मन ..ही अवस्था प्रत्येक दत्त भक्त अनुभवत असतो .