Strange wedding story - (Part 4) books and stories free download online pdf in Marathi

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ४)


बघता बघता शनिवार आला.अग्निहोत्रींकडे पाहुणे येणार म्हणून सगळी तयारी झाली होती.जानकी मात्र मनातल्या मनात मात्र देवाकडे प्रार्थना करीत होती की हे लग्न जुळू नको देऊ..

" सुन सुन सुन दीदी तेरे एक रिश्ता आया है " गाणं म्हणत ओंकार जानकी जवळ आला..

"ओंक्या.. माकडा गप बस न .मी इकडे टेंशन मध्ये आहे अन गाणी सुचत आहेत " जानकी ओंकार कडे उशी फेकत म्हणाली..

" ओय टेंशन कशाला घेते? लग्न तर करावंच लागणार होतं न एक ना एक दिवस मग .." ओंकार म्हणाला..

" हो पण इतकी काय घाई आहे घरच्यांना , तू बघ एकच वर्षाने लहान आहे माझ्या पेक्षा तुझ्या लागलेत का मागे लग्न कर म्हणून " जानकी म्हणाली

" अग वेडे मुलींची लवकर होतात लग्न मुलांच्या तुलनेत..आणि मला सांग पहिले जी तीन मुलं येऊन गेलीत त्यातल्या दोन मुलांना तू नकार दिला तर एकाची पत्रिका जुळली नाही म्हणून अण्णांनी नकार कळवला.. विचार कर यालाही अस कुठलं कारण देऊन जर टाळता आलं तर??" ओंकार म्हणाला.

" यावेळी कारणंच नाही न द्यायला.. मागच्या वेळी दोन्ही मुलं खूप लांब गावचे होते म्हणून मला निदान हा मुद्दा तरी मांडता आला की ,इतक्या दूर जर मी गेली तर मग मला नाही इकडे येणं होणार आपली कुणाची भेट होणार नाही ,असं इमोशनल केलं होतं न त्यावेळी सगळयांना पण यावेळी अस कुठलंच कारण नाही. अमरावती जवळ आहे,पुन्हा माईच्या मैत्रिणी चा नातू आणि पत्रिका ही जुळली त्यामुळे मी काहीच करू शकणार नाही" जानकी हतबल होऊन म्हणाली..

" मग एक काम कर त्या मुलालाच जर सांगितलं की तूला नकार द्यायला .मग तर काहीच प्रॉब्लेम नाही" ओंकार म्हणाला.

"अरे पण त्याला कस सांगणार मला नकार दे म्हणून आणि त्याने घरच्यांना सांगितलं म्हणजे, अण्णा किती चिडतील माझ्यावर " जानकी म्हणाली

" ट्राय तर करून बघ एकदा" ओंकार म्हणाला..

" जानू काय चाललंय ह तुमचं.. ओंकार अरे काही काय सल्ले देतोय तिला" मनु त्यांच्या जवळ येत म्हणाली

" वहिनी अग ते ..." ओंकार मनुला बघून घाबरला..

" नीट ऐकून घ्या दोघेही ,अजिबात कुठल्याही फालतू आयडिया लढवून त्या मुलाला नकार द्यायचा नाही. घरी जर कळलं न तर काय होईल याची कल्पना असेलच तुम्हाला आणि जानू रुख्मिणी आजीचा फोन येऊन गेलाय उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ती मंडळी येतील आपल्या कडे ..जानू एकदा मुलाला बघून घे ,बोल त्याच्याशी जर तुला खरोखर आवडला तरच लग्नाला होकार दे पण सगळं चांगलं असतांना उगाच काही कारणं काढून नकार नको देऊ..मला माहिती आहे हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून म्हणतेय योग्य तोच निर्णय घे ..घरच्यांना त्रास होईल असं प्लिज वागू नको.." मनु जानकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली..

मनुच बोलणं ऐकून जानकी विचारात पडली आता काय करावं हे तिला ही कळत नव्हतं..तिकडे रघुवीरची ही अशीच मनःस्थिती होती..
त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणजे त्याचे दिग्या काका रघुवीर सोबत बोलायला त्याच्या खोलीत जातात..

" काय मग रघु उद्या ला अर्धा डझन मुली बघून पूर्ण होतात तुला.. आता हिला तर पसंत कर बापा.. " दिगंबर काका म्हणाले

" नाही रे काका माझी इच्छा नाही अजिबात कुणाशीही लग्न करायची" रघुवीर म्हणाला

" म्हणजे अजूनही रागिणी गेलेली नाही तुझ्या मनातून, रघु हे बघ भूतकाळा ला विसरून पुढे जाणं खूप गरजेच आहे..एकतर मग तू तेंव्हा स्टँड घ्यायचा होता ,तेंव्हा तू काही केलं नाही मग आता का तिच्या आठवणीत स्वतःच आयुष्य खराब करतोय.. अन सोन्या जिजी तुझ्यासाठी चुकीचा निर्णय घेणार नाही.. तिने त्यावेळी जे केलं ते योग्यच होत आणि जो पुढेही तुझ्या लग्नाचा जो निर्णय घेईल तोही योग्यच असेल बघच तू." दिगंबर काका म्हणाले

" जिजी बद्दल कसलीच तक्रार नाही माझी,तिचा शब्द प्रमाण आहे माझ्यासाठी पण मनाच काय त्याला समजावता येत नाही." रघुवीर म्हणाला

" रघ्या ही मुलगी चांगली वाटली रे फोटोवरून, पुन्हा एकत्र कुटुंबात वाढली आहे आपल्या कडे सहज मिक्स होईल..चल आता झोप खूप रात्र झाली आहे,बघू पुढे काय करायच ते" दिगंबर काका म्हणाले.

रघुवीर विचार करून करून शेवटी झोपून गेला.सकाळ झाली अकोला जायची गडबड सुरू झाली. मुलगी पाहायला घरातली सगळी जेष्ठ मंडळी आणि रघुवीर असे जाणार होते. आठच्या सुमारास सगळे निघाले..रघुवीर ब्लॅक पँट वर लाईट पिंक कलर चा फॉर्मल शर्ट घातला होता .किंचित दाढी वाढली होती .तरीही तो खूप छान दिसतं होता..गोकुळात तर नुसती धावपळ सुरू होती जणूकाही आजच जानकीच लग्न आहे..

" जानू चल पटकन मी तुला तयार करून देते" मनु म्हणाली

" वहिनी अग होते न थोडयावेळाने " जानकी कंटाळा करत म्हणाली..

" नाही हा जानू थोड्यावेळाने नाही आताच .मला माईंनी सांगितलं की जानूला तयार कर पटकन ते लोकं कधीही पोहचतील..आपण तयार असायला हवं" मनु म्हणाली

मनूने जानूला पिवळी लाल काठ असलेली तिची साडी नेसवली..मुळातच गोऱ्या असलेल्या जानकीच रूप त्या पिवळ्या साडीने अधिक उजळून निघालं..तिच्या लांब सडक केसांची गुंफून छान वेणी घातली. काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांत हलकस काजळ भरलं,हातात दोन दोन बांगड्या घातल्या, कपाळावर लहानशी टिकली , कानात लहान झुमके आणि गळ्यात नाजूकशी मोहनमाळ घातली. आज जानकी दिसायला तशीही खूप सुंदर होती आणि तितकीच साधी..आज तिच्या साधेपणातल सौंदर्य आज खुप खुलून दिसत होतं..

" जानू किती सुंदर दिसतेस ग थांब काळा टीळा लावू दे तुला नाहीतर माझीच दृष्ट लागेल तुला" मनु तिला काजळाचा टीळा लावत म्हणाली..

तितक्यात माई ,अरुताई आणि जयश्री ताई पण तिथे आल्या..

" खरंच ग बाई काय सुंदर दिसतेय आपली जानू" माईंनी तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवून कडकडं बोटं मोडली..

" माई अग पाहुणे आलेत " चैतन्य धावत सांगायला आला..

" अगबाई आले का? अरु,जयु,मनु चला पटकन ,जानू तू इथेच बस हो" माई आणि बाकीच महिला मंडळ पाहुण्यांच्या स्वागतासाठी बाहेर गेले..पुरुष मंडळी सगळे हजरच होते..देव कुटूंबीय गाडीतून उतरले आणि आत आले..अण्णांनी सगळ्यांच स्वागत केलं..पाहुणे घरात आले..माईंनी आणि जिजींनी तर एकमेकींना घट्ट मिठी मारली..लहाने मोठ्यांच्या पाया पडले..

" नमस्कार मी प्रभाकर अग्निहोत्री ,ही माझी पत्नी शारदा,हा माझा मोठा मुलगा अनंत ही मोठी सून अरुंधती ,हा लहान मुलगा जयंत ही लहान सून जयश्री,हा चैतन्य मोठा नातू ,ही नातसून मानसी , ओंकार आणि मंदार हे नातू ..आणि हे आमचे दोन पणतू बरका अनय आणि चिन्मय" अण्णांनी सर्वांची ओळख करून दिली..पण मीनाक्षी ताई तिथे असूनही त्यांची ओळख करून दिली नाही.

" नमस्कार नमस्कार मी विठ्ठल देव ही माझी पत्नी रुख्मिणी, मोठा मुलगा नारायण सुनबाई रमा, दोन नंबरचा वल्लभ सुनबाई गौरी आणि हा धाकटा दिगंबर आणि ही सुनबाई राधा ,आणि हा रघुवीर आमचा थोरला नातू बँकेत मॅनेजर आहे..बायोडाटा तर तुम्ही वाचला आहेच..पत्रिका ही जुळली आहे ..हा योग जुळून आला तर फारच छान होईल " आप्पांनी सगळ्यांची ओळख करून दिली..

" वा छान! आमच्या कुटूंबासारखच तुमचेही कुटुंब मोठे आहे, हो आम्हाला ही तसंच वाटतयं की हे लग्न जमाव ..बघू आता पोरांना काय वाटत ते" अण्णा म्हणाले.

"हो बरोबर बोलतात मुलांची आवड महत्वाची आपण आपले निर्णय नाही लादू शकत त्यांच्या वर.. बाकी घर फार छान आहे तुमच जुन्या पद्धतीच बांधकाम अहो हल्ली कुठे पाहायला मिळतात अशी घर ..आवडले मला" आप्पा म्हणाले..

सगळी मंडळी गप्पांमध्ये रमून गेली..मनु आणि जयश्री ताईंनी पाहुण्यांना चहापाणी दिलं. महिला मंडळी स्वयंपाक खोलीत जाऊन गप्पा करत होत्या . माई आणि जिजी तर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत बसल्या..बैठकीत बसलेले पुरुष मंडळी तर जुने मित्र असल्यासारखे बोलत होते..दोन्ही कुटुंब असे काही गप्पात रमले की आपण कश्यासाठी एकत्र जमलोय हेच विसरून गेले.तिकडे रघुवीर आणि जानकीच्या जीवाची घालमेल होत होती.पहिल्यांदा अस झालं होतं की फोटो न बघता प्रत्यक्षपणे ते एकमेकांना बघणार होते..नाही म्हंटल तरी उत्सुकता तर दोघांनाही लागून होती. काही वेळाने सगळे पुन्हा बैठकीत जमले आणि आप्पांनी मुलीला बोलवा म्हणून सांगितले.मनु जानकी ला घ्यायला आत गेली..

" जानू चल बोलवत आहेत बाहेर" मनु म्हणाली.

" वहिनी खूप भीती वाटतेय ग आज मला" जानकी मनुचा हात घट्ट धरत म्हणाली.

" घाबरते कश्याला ..खूप छान लोक आहेत ग जानू..आणि मुलगा तर खूप हँडसम आहे बर का" मनु म्हणाली.

"काही हँडसम नाही ग दाढी वाढली आहे त्याची आणि तिरळ बघतो" ओंकार डोळे तिरळे करत म्हणाला.

" ए गप न ओंकार ,जानू तो गंमत करतोय ..तू चल पटकन" मनु म्हणाली..

रघुवीर इकडे तिकडे बघत होता.ह्रदयाची धडधड वाढली होती अन अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या जानकीवर स्थिर झाली आणि तो तिला बघतच राहिला..तीच लाघवी ,मोहक सौंदर्य त्याला दिपवत होत..रागिणीपेक्षा जानकी सुंदर होतीच पण तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा त्याला भावतं होता..तो एकसारखं तिच्याकडे बघत होता ..दिगंबर रावांच्या हे लक्षात आलं त्यांनी हळूच त्याला धक्का दिला.रघुवीर लगेच भानावर आला आणि आपल्याला कुणी अस जानकीकडे बघतांना पाहत तर नाही आहे न बघू लागला..


इतर रसदार पर्याय