corona books and stories free download online pdf in Marathi

कोरोना

कोरोना कादंबरी
अंकुश शिंगाडे नागपूर






ते गाव फारच सुंदर होतं. सुसंपन्नता त्या गावात नांदत होती. गावातील लोकंही चांगले होते. तसं पाहिल्यास गावात सुसंपन्नता असल्यानंच की काय, गावातील लोकं एकमेकांना मदत करीत असत.
गावात एक नदी होती. त्या नदीचं नाव इरावती होतं. ही नदी बारमाही वाहात होती. त्यामुळं की काय, त्या नदीच्या आजूबाजूला जी जागा पसरली होती. त्या जागेवर सदैव हिरवळ राहात असे. तसंच आजूबाजूला जी झाडं होती. तिही हिरवीकंच होती.
लोकं या नदीच्या किना-यावर शेती करीत. कोणी कोणी नदीतही शेती करीत. जी मंडळी नदीत शेती करीत. त्या शेतीत ते कलिंगड, डांगरं, खरबुज लावत असत. कोणी कोणी तर दोडके अन् गलगल्यांचंही पीक घेत. तर नदीकाठावर धान व गहू. जी पीक पाण्यावर अवलंबून होती. ती पीक शेतात घेतांना फार मजा येत असे.
त्या गावातील जमीनही चांगली भुसभुसीत होती. त्या मातीत जिप्समचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं पीक जास्त यायचं. परंतू पावसाळ्यात या नदीला पूर येत असल्यानं मात्र या पुरात उभं पीक वाया जायचं. कधी एखाद्या वेळी लवकर पूर ओसरल्यानं नदीच्या काठावर असलेली पीकं वाचायची. पण जर नदीचं पाणी उतरलंच नाही तर सगळं पीक नेस्तनाबूत व्हायचं. त्यातच ते पीक धान का असेना.
धानाचं पीक त्या जागेत किफायतशीर वाटत होतं. या धानाच्या पीकांना पाणी भरपूर लागत असे. नव्हे तर त्याला पाणी जास्त लागत असल्यानं पीक चांगलं व्हायचं. समजा पूर आलाच तरी धानाचं पीक पाहिजे त्या प्रमाणात नुकसान करायचं नाही. मात्र कधी कधी या नदीला पूर आला आणि त्या पुरानं गाळ वाहात आणला, तर तो गाळ धानाच्या पीकावर बसायचा. त्यामुळं धानाचं पीक नष्ट व्हायचं. मात्र तसं जर घडलं नाही तर धानाची फसल चांगली राहायची. त्यामुळं गाव खुश होतं. त्याचबरोबर स्वयंपुर्णही.
श्यामराव असाच एक शेतकरी. त्याचीही शेती ही नदीजवळच होती. ती शेती चांगली पीकत होती. तो आपल्या शेतात धानाचंच पीक घेत असे. तसं धानाचं उत्पादन चांगलं यायचं. त्यामुळं की काय, तो संपन्न होता. त्याचा गावात तो श्रीमंत असल्यानं दराराही होता.
श्यामराव नावाचा तो माणूस. त्याला दोन मुलं व तीन होत्या. मुली आणि मुलं असा भेदभाव जरी तो करीत नसला तरी त्याच्या मुली जणू भेदभाव केल्यागत दहावी शिकून कामाला जात होत्या. त्यामुळं त्यानं आपल्या मुलींचे विवाह लवकर उरकविले होते. त्या आपआपल्या घरी सुखी होत्या. आता मुलांचा प्रश्न होता. मुलं मात्र लहान असली तरी शिकत होती. मोठ्या मुलाचं नाव आकाश होतं तर लहान मुलाचं नाव अभिलाष.
सुसंपन्न असं ते गाव. पण त्या गावावर कोणाची नजर लागली ते कळलं नाही. थोड्याच दिवसात त्या गावावर संक्रात आली. त्या संक्रातीत पूर्ण गावालाच बरबाद करुन टाकलं होतं.
सरकार गावखेड्यासाठीच नाही तर शेतक-यांच्या समृद्धीच्या दृष्टीकोणातून योजना आणत होते. त्या योजना म्हणजे कल्याणकारी योजना असत.
आज अशीच एक योजना सरकारनं त्या गावांसाठी आणली होती. ती म्हणजे त्या नदीवरचं धरण.सरकारला वाटत होतं की जर या इरावती नदीवर धरण जर बांधलं तर ते धरण पुष्कळ कामात येईल. पर्यायानं सरकारनं नकाशा पास केला व या भागात नदीची पाहणी केली.
धरणाची भानगड. सरकारनं पाहणी करताच धरण बांधणं सुरु केलं. ते धरण वरच्या भागातील लोकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. लोकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. ज्या ठिकाणावर पाणी जात नव्हतं. त्या ठिकाणी पाणी नेलं जाणार होतंं. त्यातच ज्या भागात ते पाणी जाणार नव्हतं. त्या भागातही ते पाणी येणार म्हणून लोकं खुश होते.
सरकारनं ठरविलेल्या योजनेनुसार धरण बांधलं. आजूबाजूचे शेतकरी आनंदी झाले. शेतक-यांचं उत्पन्न वाढलं. आजूबाजूला पाणी कालव्याच्या साहाय्यानं मिळायला लागलं. त्यातच सरकार फायद्यात राहिलं.
या धरणाच्या पाण्यानं कित्येक एकर सिंचनाचं क्षेत्र लाभान्वीत झालं. आजूबाजूला शेती चांगली पीकू लागली. शेतात वेगवेगळे पीक डोलू लागले. रानपक्षी कित्येक मैलावरुन येवू लागले. ते या भागात येवून फेर धरुन नाचू लागले.
ज्याप्रमाणे त्या भागात शेती पीकत होती. त्याप्रमाणे त्या धरणाचा खालचा भाग. ह्या भागात शेती पीकत नव्हती. त्याचं कारणंही तसंच होतं. त्याचं कारण म्हणजे ह्या भागात वाहात असलेल्या नदीला आता पाणीच नव्हतं. जे पाणी दरवर्षी नदीला वाहात असायचं, तेच पाणी धरणानं अडल्यानं खालच्या भागात पाणी येणार कुठून! त्यामुळं आता या भागात जी पीकं दरवर्षी डोलायची. ती पीक पाहिजे त्या प्रमाणात आता पीकत नव्हती. पावसाळ्याचा चार महिण्याचा हंगाम जर सोडला, तर बाकी हंगाम शेतक-यांचा कोरडा जात होता. त्यामुळं की काय,शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली होती. याच एकमेव कारणानं गावातील काही लोकं शहराकडं स्थलांतरीत झाले होते. ते शहरातील कारखान्यात लागून गब्बर पैसा कमवीत होते. काही रोजमजूरी करीत होते. पण खुश होते. कारण ते रोजमजूरी जरी करीत असले तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली नव्हती. त्यांना पोट भागविण्यापुरता तरी रोजगार मिळत होता.
गावच्या नदीला पाणी नाही. तसं पीक पीकत नाही. पोट भरत नाही. सतत उपासमारीचा सामना करावा लागतो. उपासमारीची सारखी वेळ येते. हा भाग विचारात घेवून मोठा मुलगा आकाश हा कामाच्या शोधात शहरात आला. त्याला वाटत होतं की उद्या जावून आपण आपल्या लहान भावालाही शहरात आणू. त्याचं पोट भरायचंही साधन निर्माण करुन देवू.
गावच्या मातीतील चमकता तारा आकाश शहरात राहायला आला होता. तो कंपनीत नोकरीला लागला होता. तसा तो साधारण आपल्या पोटाला पुरेल एवढे पैसे कमवीत होता. तसा तो शहरात रुळावला होता. त्यातच आता तो आपल्या धाकट्या भावाला म्हणजे अभिलाषला शिक्षणासाठी आणू पाहात होता. त्यातच कोरोनानं प्रवेश केला.
कोरोनानं जगात थैमान घातलं होतं. जो तो कोरोनानं त्रस्त होता. लोकांना कोरोनाचं भय वाटत होतं. शिक्षणासह सर्व गोष्टींची ऐसीतैसी झाली होती. कोरोना काही केल्या थांबता थांबत नव्हता. असं वाटत होतं की हा कोरोना सर्व जगच नष्ट करते की काय?
कोरोनाला रोखता येत नव्हते. लोकं किड्यामुंग्यांसारखे मरत होते. केव्हा कोरोना आपल्याकडे येईल आणि केव्हा कोरोना आपल्याला भुतांसारखा पछाडेल याचा काहीच नेम नव्हता. कोरोनाबाबत सरकारही वेगवेगळी भुमिका घेत होते.
कोरोना पंख फैलावत पसरत होता. त्याचं पसरणं मुंगी किंवा कासवाच्या पावलाचं नव्हतं, तर तो अगदी सशाच्या आणि हरणाच्या चालीनं चपळ वेगात पसरत होता. असं वाटत होतं की हा कोरोना संपायला हवा. पण कोरोना काही केल्या संपत नव्हता.
सरकारनं कोरोनाला रोखण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी लाकडाऊन लावून पाहिलं. वाटलं की कोरोना संपेल. पण लाकडाऊन लावूनही काहीच उपयोग झाला नाही. कोरोना काही केल्या संपला नाही. उलट वाढतच चालला होता.
सरकार जवळ जेवढा खाण्यापिण्याला पैसा होता. तेवढा पैसा लोकांचे पोट जगविण्यासाठी वापरला. पण ज्यावेळी असा सरकारजवळचा पैसा संपला. तेव्हा मात्र लोकांची उपासमार होवू लागली. तसेच लोकांचे हाल होवू लागले.
लाकडाऊन लागलं होतं. ज्यांच्याजवळ पैसा होता. त्यांची काही समस्या नव्हती. पण ज्यांच्याजवळ पैसा नव्हता. त्यांची मात्र त्रेधातिरपीट उडत होती. त्यांना काय करावं असं वाटत होतं. अशातच आकाशचे सोबती गावाकडं जायला निघाले होते.
लाकडाऊन लागलं होतं. सर्व रहदारी बंद होती. प्रवासही बंद होता. लोकांना केव्हा लाकडाऊन उघडेल याची शाश्वती नव्हती. त्यातच लोकांनी गावाकडं जायचं ठरवलं.
गावाकडं काही पीकत नव्हतं. पण गावाला काही नातेवाईक होते. कोणाचे मायबाप होते. कोणाचे भाऊबहिण होते. गावाकडं पैसा नव्हता. पण गावातील माणसं उपाशी राहूच शकत नाही हे या शहरातील लोकांना माहित होतं. प्रसंगी इथं मरण्यापेक्षा गावातच मरावं असं लोकांना वाटत होतं. म्हणून की काय, ते गावच्या रस्त्यानं निघाली होती. तेही साधनं उपलब्ध नसल्यानं पायी पायी रस्ता कापत होती.
अगदी लहान लहान मुलं पाठीवर घेवून ही शहरातील माणसं डोक्यावर खाण्याचं सामान घेवून अगदी पंढरीला वारी निघते. तशी वारी काढत ही मंडळी आपल्या गावाला निघाली होती.
गावाला निघालेली ही मंडळी सकाळीच सुर्योदयापासून उठून जवळ असणा-या वस्तूंपासून लवकर लवकर स्वयंपाक करुन तसेच दोन घास लेकराच्या पोटात कोंबून स्वतः मात्र अर्धपोटी उपाशी राहून सकाळी सुर्योदयापुर्वीपासूनच तर रात्री उशिरा सुर्यास्ताला वेळ होईस्तोवर ते चालत होते. रात्री सुर्यास्त होताच ते एका ठिकाणी थांबायचे, ज्याठिकाणी पाण्याची सोय असायची. तिथं ते थांबायचे व स्वयंपाक करुन दोन घास कसेबसे पोटात कोंबायचे. त्यानंतर दिवसभर चालून चालून थकलेल्या शरीराला पुरेसा आराम देण्यासाठी त्याच जमीनीवरच्या मातीभरल्या जागेत साप, विंचूची भीती न बाळगता ते झोपायचे. दिवसभर रस्त्यानं उन्हातान्हात चालल्यानंतर जो थकवा यायचा. त्या थकव्यावर विरंजण म्हणून ते जेव्हा त्या अंथरुणावर लवंडवत. तेव्हा त्यांना दिवसभर थकव्यामुळं केव्हा झोप यायची तेही माहित पडायचं नाही.
आकाशनं अभिलाषला शिक्षणासाठी शहरात आणलं होतं. तो वेतन कमवीत होता. त्यातच त्याला कंपनीत त्रास होता. ते पाहून त्याला वाटलं होतं की आपल्या भावाला पुढे असा त्रास होवू नये. म्हणून की काय, त्याला उच्चतम शिक्षण शिकविण्यासाठी अभिलाषला त्यानं शहरात आणलं. पण जसा कोरोना शहरात प्रवेशला व आकाशसह अभिलाषचीही उपासमार होवू लागली. तसा आकाशनं निर्णय घेतला. आपण आपल्या भावाला गावाला पाठवावं. कमीतकमी जीवंत राहिलाच तर गावची शेती तर सांभाळू शकेल. पण या शहरात राहून जगता जगता कधी कोरोनानं पछाडलंच तर मरणाला मीठी मारावी लागेल आणि समजा कोरोनानं सोडलंच तर आपल्याला होणारी उपासमारी सोडणार नाही. उपासमारीही महामारीच आहे.
कोरोनाची महामारी लोकांना स्वस्थ बसू देत नव्हती. आज एवढे गेले. एवढे बाधीत झाले अशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला येत होत्या. जे रुग्णालयात भरती होत होते. ते मात्र धास्तीनंच मरत होते. त्यांना तर केव्हा पोत्यात गुंडून केव्हा शवपेटीत जीवंतपणीच ठेवतील याची काही शाश्वती नव्हती. तसं पाहता कोरोनाचा रुग्ण हा बेशुद्धच असायचा.
एकदा कोरोना घरच्यांना झालाच तर भेदभाव केल्यागत अख्खं कुटूंब त्याला वाळीत टाकत असे. त्याला जेवनखावन स्वतं त्याच्या हातात देत नसून ते दुरुन सरकवून दिलं जाई. मग एखाद्या भिका-यागत ते जेवन शरीरात कशाचंच त्राण नसतांना केवळ इच्छाशक्तीच्या भरवशावर ते जेवन रुग्ण उचलून खात असे. त्यातच ज्या रुग्णांना ऑक्सीजनची कमी होत असे. ते रुग्ण व्हेंटीलेटरवर असत. त्यांची सेवा करण्यासाठी पी पी टी किट घातलेली एक व्यक्ती असे. समजा एखाद्या रुग्णांचा मृत्यू झालाच तर तो मृतदेह त्याच्या परिजणांना न देता त्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली जात असे.
कोरोना कसा होतोय. हे लक्षात येत नव्हतं. कोरोनाची लक्षणंही साधीच होती. ती लक्षणं म्हणजे सर्वसाधारण आजारांची लक्षणं होती. सुरुवातीला सर्दी,खोकला व हलकासा ताप यायचा. तो ताप क्षणातच वाढायचा आणि ताबडतोब उपचार केला तर ठीक. नाहीतर रुग्ण सेंकदाच्या अवधीत पापणी झपकते न झपकते, तोच रुग्ण यमसदनी पोहोचायचा.
कोरोनाचा हा काळ फार भयानक काळ होता. लोकांमध्ये कोरोनाबाबत एवढी दहशत वाढली होती की काही अफवाही पसरल्या होत्या. लोकं म्हणत होते की ह्या कोरोनात डॉक्टर मंडळी साधारण सर्दी ताप असणा-या रुग्णांना कोरोना झाल्याचं सांगतात आणि इंजेक्शन देवून मारुन टाकतात. मग त्यांच्या शरीरातून गुडदे, किडण्या आणि इतर मानवी शरीर अवयव काढून घेतात व त्याची तस्करी करतात. परंतू याबाबतीत अशी जरी अफवा पसरली असली तरी, त्या अफवेत एवढासाही खरेपणा नव्हता. परंतू लोकं त्यामुळच धास्तावले होते हे तेवढंच खरं होतं.
कोरोना व्हायरसने देशातच नाही तर जगात थैमान घातलं होतं. शेकडोच नाहीतर लाखोंच्या संख्येने जगभरातील लोक या रोगाच्या सावटाखाली येत होते. एवढेच नाही तर या रोगाने आपली दहशत पुर्ण भागात निर्माण केली होती. या रोगाची मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यानं या रोगाला लोक घाबरत असलेले दिसत होते.
जागोजागी नाही तर सार्वजनिक स्थळीही लोकं नाकाला रुमाल बांधून तसेच मास्क घालून वावरत असलेले दिसत असून या रोगाने जुन्या काळातील प्लेगची आठवण करुन दिलेली होती.
जुन्याकाळी प्लेग,देवी,डांग्या,विषमज्वर या रोगाच्या साथीच्या साथी यायच्या. या साथीत रोगाच्या लसी उपलब्ध नसल्यानं शेकडोंच्या संख्येने लोकं मृत्युमुखी पडत असत. पण ज्यावेळी त्याची लस निघाली.त्यावेळी मात्र त्या रोगांचा संपूर्ण नायनाट झाला.आता ते रोग सापडत नाहीत.
मध्यंतरीच्या काळात पोलिओने जोर पकडला होता. जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी धडधाकट माणसे पोलिओंनी अपंग होत. पण सरकारनं पोलिओ मोहीम राबवल्याने आता पोलिओ दिसत नाही. हा रोग हद्दपार झाल्याचे दिसते. याच पोलिओ सोबतच चिकनगुनिया, डेंगू, बर्ड फ्लू, नागीन, चिकन क्राप्स इत्यादी रोग आलेत व गेलेत. त्याही रोगाची दहशत होतीच कोरोनासारखी. पण त्यावर वेळीच उपचार सापडल्याने आज ते रोग दिसत नव्हते. त्यापैकीच हा कोरोना रोगही होता.
कोरोनाचा विषाणू हा थोडासा आकाराने मोठा असून तळहातावर पंधरा मिनीट तर आपल्या संपूर्ण शरीरावर नऊ तास जीवंत राहात होता. तो संसर्गजन्य विषाणू असून केवळ साध्या स्पर्शानेही त्याची लागण होत होती. तो उष्णता सहन करणारा नसून अति उष्णतेत त्याचा टिकाव धरत नव्हता. तो जरी जीवघेणा विषाणू असला तरी आता जास्त घाबरण्याचे कारण नव्हतं. तरीही लोक घाबरत होते. कारण आता त्या रोगाची लस निघाली नव्हती. काही दिवसानं लस निघाली. यात महत्वाचा मुद्दा हा की ती लस विपुल प्रमाणात उपलब्ध नव्हती. ती विपुल प्रमाणात उपलब्ध होईलच यात शंका नव्हती. मात्र स्वतःची थोडी काळजी तेवढी घ्यावी लागत होती. यासाठी गर्दीची ठिकाणे, पर्यटन टाळणे भाग होते आणि शक्यतोवर घरी उष्णतामानावर शिजलेले पदार्थ सेवन करणे भाग होते.
मुळात कोरोना व्हायरस कितीही मोठा असला तरी घाबरण्याचे कारण नाही असं काही लोकं म्हणत होते. स्वतः हिंमतवान बनावे, तसेच दुस-यांनाही हिंमतवान बनवावे. असंही लोकं म्हणत होते. कारण कोरोना तर बाजुलाच राहिला. कधीकधी या कोरोनाच्या दहशतीनेही हार्टअटँक येवून मृत्यू येवू शकत होता.
कोरोना काही प्लेग,लविषमज्वर, डेंगू, नागीन, बर्ड फ्लू, चिकनगुनिया पेक्षा मोठा नाही. ज्याप्रमाणे जगाने हे रोग हद्दपार केले. तसा कोरोनाही यावर्षी हद्दपार होईलच. पण तो रोग हद्दपार होण्यापुर्वी स्वतःची काळजी घेतलेली बरी.तोंडाला रुमाल किंवा मास्क लावलेले बरे. थंड पदार्थही खावू नये हे तेवढेच खरे. कदाचित पुढील आयुष्य जगण्यासाठी. जे आयुष्य आपल्यासाठी बहुमोलाचे आहे. त्यासाठीच त्याचा प्रतिकार करायला हवा.घाबरुन जावू नये.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने दस्तक दिली आणि पाहता पाहता संपूर्ण जग या व्हायरसने व्यापून टाकले. न्यूयॉर्क, इटली, स्पेन, फ्रान्स यासह या व्हायरससने आमच्या देशातही दस्तक दिली होती. आज आमचा भारतही याच कोरोनाच्या दहशतीत वावरत होता.
आमच्या देशात या कोरोनाने दस्तक देताच सर्व ठिकाणी आटोकाट बंदोबस्त लावला गेला.काही दिवसासाठी का असेना, शाळा, महाविद्यालये, कारखाने, दुकाने, चित्रपटगृहे, बिगबाजार नव्हे तर बाजारपेठा बंद झाल्या. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. त्यानुसार आमचं अतोनात नुकसानही झालं. जे नुकसान झालं, ते कधीही भरुन निघणारं नसलं तरी आम्ही ते सोसलं. कदाचित होत असलेलं नुकसान आम्ही पुढील काळात कोरोनावर जय मिळाल्यावर भरुन काढू. ही आमची संभावना.
याच कोरोनाचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यावर होवू नये म्हणून शिक्षणाधिकारी साहेबांनी एक परीपत्रक काढून शाळांना पंधरा दिवसपर्यंत सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. पण काही शाळांनी तो आदेश न जुमानता, त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील मुख्याध्यापकाने सुट्टट्या दिल्या. कारण दंडात्मक कार्यवाही होणार होती. पण दि.१६/०३/२०२० ला काही शाळा मा.शिक्षणाधिकारी साहेबांचे आदेश डावलून सुरु होत्या.त्यानंतर सुट्ट्या दिल्या. पण त्या दि.३१/०३/२०२० पर्यंत न देता दि.२५/०३/२०२० पर्यंत दिल्या. त्या आदेशाला न जुमानता सुट्ट्यांमध्ये ही कटूता. त्या शाळा दि.१६/०३/२०२० ला पुुर्णवेळ घेतल्या गेल्या.जणू विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करीत........
आजही काही अशा शाळा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सुट्ट्या लागलेल्या असल्या तरी शिक्षकांना वेठीस धरुन शाळेत बोलावत होते.त्यांना धमकी देत होते.नव्हे तर विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून.......त्यांनी शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून त्यांना वस्तीत पाठवत होते. गर्दीच्या ठिकाणी देखील फिरायला लावत होते. अशावेळी या कोरोनाचा प्रादुर्भाव जर शिक्षकांना झालाच तर त्यांचं होणारं नुकसान कोण भरुन देणार. शिक्षणाधिकारी की मुख्याध्यापक.........मुख्याध्यापकाचं ठीक होतं की ते स्वतः वस्तीत प्रवेश करण्यासाठी जात नव्हते.पण शिक्षकांचं काय? त्यांना तर वारंवार वस्तीत जावं लागत होतं प्रवेशासाठी. विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्या. छान झालं. तशा सुट्ट्या सर्वच शाळेने शिक्षकांनाही देण्याची गरज होती. शाळा प्रवेश असो की अजून कोणती कामे. तुर्तास ती स्थगीत ठेवायला हवी होती. ज्याप्रमाणे कारखाने बंद ठेवले. करोडो रुपयाचे नुकसान सहन करीत. मग ही तर शाळा होती. खरं तर अशा शाळेवर कार्यवाही व्हायला हवी होती. जी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत होती. व्यतिरीक्त शिक्षकांच्याही जीवाशी खेळत होती.
आम्ही कोरोनाचा प्रतिकार करु म्हणत होतो. त्यासाठी जनजागृती करीत होतो. ती जनजागृती करण्यासाठी शिक्षक सिंहाचा वाटा उचलत होते. पण जिथे शिक्षकाला मुख्याध्यापक असा त्रास देत लाचार बनवीत असेल आणि शिक्षकही जर लाचार बनून अशा जीवघेण्या अवस्थेवेळीही लाचार बनून आपल्या नोक-या करीत असतील.तर त्यांना काय म्हणावे बरे. अडाणी माणसाच्या मतानुसार जर विचार केला तर 'आम्ही शिकलो पण पिकलो नाही' असे नक्कीच म्हणता येईल तशी कोरोनाच्या साथीत शिक्षकांची परिस्थीती होती. कारण सध्याच्या परिस्थीतीत साध्या अनपढ व्यक्तीलाही कोरोनाची दहशत कळत होती. तोही घराच्या बाहेर पडत नव्हता. पण शिकलेल्या या शिक्षक वर्गाला कळत नव्हतं की कोरोनाच्या या जीवघेण्या साथीत कसं वागायला हवं. काय करायला हवं. ते न चुकता शाळेत येत होते नव्हे तर यात त्यांनाच प्रादुर्भाव झालाच, तर त्यांच्या विद्यार्थ्यांनाही दि.३१/०३//२०२० नंतर होणार नाही असं सांगता येत नव्हतं.
आम्ही शिक्षक म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल विचार करावा. त्यांना कोरोना होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आम्हालाही कोरोना होवू नये याचीही काळजी घ्यावी. जर आम्ही असेच मुख्याध्यापकाच्या आदेशाचं पालन करीत कोरोना ग्रस्त झालोेच तर आम्हाला कोणीही वाचवणार नाही.त्यातच आमच्या विद्यार्थ्यांनाही.कारण दहा दिवसाच्या सुुट्टट्या असो की एक महिण्याच्या. कोरोना अजून संपलेला नव्हता. त्यामुळे प्रत्येकालाच स्वतःची काळजी घेणे गरजेेचे होते. हे शिक्षणाधिका-यांनाही समजायला हवं होतं. मुख्याध्यापकालाही समजायला हवं. त्यानुसार आतातरी आपलं डोकं जाग्यावर ठेेेवून विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ शिक्षकांनाही सुट्ट्या द्यायला हव्या होत्या. शिक्षकांच्या जीवाशी खेळू नये. त्यांच्या जीवाचा खेळखंडोबा करु नये. असं शिक्षकांचं म्हणणं आणि मानणं होतं.
ते चेक पोस्टचं ठिकाण........त्या ठिकाणीही शिक्षकांच्या नोक-या लागल्या होत्या. पोलिसांसह ते शिक्षकही चेकपोस्टवर आपली शिप करीत होते. अशाचवेळी अभिलाष ज्या लोंढ्यात गावला जाण्यासाठी सहभागी होता. तो लोंढा त्या चेकपोस्टपाशी येवून धडकला. त्या पोस्टपाशी असलेल्या सावलीत आडोशाला बसला.
लखलखतं तप्त उन्हं. अंगाची लाही लाही होत होती. त्या तप्त उन्हात ती मंडळी चालत चालत आली होती. डोक्यावर सामानाचं गाठोडं. एका काखेत एक लेकरु तर दुस-या काखेत पाण्याची बाटल. बाटलमधील पाणी गरम आलेलं. उन्हातून चक्क चालत आल्यानं बहुतेकांचे गळे सुकलेले होते. तसा त्या चेकपोस्टवर ज्युटी करणारा एक मास्तर त्यांच्याजवळ जावून उभा राहिला. क्षणभर त्यानं निरीक्षण केलं. तसा तो म्हणाला,
"कुठं राहता जी? अन् कुठं चालल्या?"
आधीच दमलेली ती माणसं. त्यातील एकजण म्हणाला,
"कुठं म्हंजी?"
"कुठं म्हणजे? मला नाही समजलं?"
"अवं आम्ही पहिलं राहात असलेलं ठिकाण सांगावं का आताचं?"
"अहो, जिथून आले ते ठिकाण सांगा."
"आम्ही ममईहून आलो जी." त्यातील एकजण म्हणाला.
तो शिक्षक क्षणभर विचार करीत बसला. त्याला काही कळत नव्हतं. तसं त्याला काही वेळानं समजलं की हे ममई म्हणजे मुंबई म्हणत असावेत कदाचित. तसा तो म्हणाला,
"मुंबईहून आलो म्हणता का जी?"
"हो, तेथूनच आलो."
"अन् कुठं चालल्या जी?"
"बदलापूर."
"कुठं आहे जी बदलापूर?"
"लई दूर हाये जी. अजून अर्धे बी नाय आलो."
"पण कशाला चालले असाल तुम्ही?"
"कोरोना हाये न जी. कोरोनानं समद्याची उपासमार करीत हाये न सायेब. लाकडाऊन हाये ना. कामं नाही. म्हून हितं उपासानं मरण्यापक्षा गावाले निगालो आतंच."
तो शिक्षक........त्या शिक्षकाचं नाव महेश होतं. महेशची चेकपोस्टची ड्यूटी. रोजच अशी मंडळी यायची व पायी पायी निघून जायची. महेश मात्र दररोज ते चित्र न्याहाळायचा. त्यांचे हालहवाल विचारायचा. त्याला फार दुःख व्हायचं. तो हळहळायचा. पण त्याचेजवळ काही उपाय नव्हता.
तीन चार महिण्यापासून अस्तित्वात आलेला कोरोना व्हायरस.त्याने केवळ भारतातच नाही तर जगावर राज्य करण्याचा चंग बांधला होता. त्याने केवळ भीतीच निर्माण केलेली नव्हती, तर तसं प्रात्यक्षिकही ते करुन दाखवत होते. जगात या व्हायरसच्या संसर्गाने मरणा-यांची संख्या जास्त असून पुरेशा औषधसाठा उपलब्ध नसल्याने लोकं सगळे घाबरायला लागले होते.
कोरोना आजार. पण लोकं नेमके फटकून वागत होते. एखाद्याला साधा खोकला किंवा सर्दी असेल तर त्याला कोरोना झालाय अशी लागलीच शंका घेवून आपल्याला तो संसर्ग होवू नये म्हणून जणू त्याला अपराधी बनवत त्याच्यापासून फटकून वागणे, त्याला वाळीत टाकणे, त्याला मदत न करणे, त्याला सहकार्य न करणे. ही गोष्ट जणू भेदभाव केल्यासारखी होती. लोकांचे हे वागणे हे शोभण्यासारखे नसले तरी त्याला लोकं शोभादायक बनवत होते.
कोरोनाची जी ही दहशत होतीे. त्यानुसार त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतांना सामान्य माणसाला मात्र त्रास भोगावा लागत होता. जिथे जास्त गर्दी होईल अशी स्थानं बंद केली होती. कारण या व्हायरसची प्लेगसारखी साथ पसरु नये.
आज कारखाने बंद होते. बाजारपेठा बंद होत्या. एवढंच नाही,तर छोटी छोटी दुकानं बंद होती. जिथं मजूर वर्ग काम करत होता. ज्या मजूरावर केवळ तोच मजूर नाही तर त्याचं अख्खं कुटूंब पोसल्या जात होतं. ज्या मजूराने एक दिवस जरी कमविलं नाही तर त्याचं अख्खं कुटूंब उपाशी मरत होतं. अशा अवस्थेत सामान्य मजूरावर कोरोनामुळे संक्रात निर्माण झाली होती. प्रत्येकजण कोरोना गो कोरोना गो म्हणत होता.
महत्वाचं म्हणजे कोरोनाची लागवण इतर देशाच्या मानाने जरी भारतात कमी प्रमाणात असली तरी भारताला सावधानी बाळगणे काळाची गरजेचे होते. मात्र काही लोकं म्हणतात की जे नशीबात असेल ते होईल. त्यासाठी काय गरज आहे घाबरायची.कशाला हवं बंद आणि कशाला हवे आम्हाला कामावर येवू न देणे. पण ही बाब विचार करण्यालायक होती.
एक सांगू इच्छितो की आपल्या घरात एखादा पाहुणा आलाच आणि त्याला आपण आपल्या घरी येवूच दिलं नाही तर तो दरवाज्याजवळ थांबेल.पण दरवाजेही आपण उघडले नाही तर तो किती दिवस वाट बघणार. तो निघून नाही का जाणार! सरकार कोरोनाच्या बाबतीत तेच करत होतं.कोरोनाला आम्ही काही दिवस आमच्या घरात शिरुच देवू नये. असं सरकार सांगत होतं. अर्थात त्यांच्या जंतूला मानवी शरीरात वाढायची जागाच मिळू देवू नये असं सरकारचं मत होतं. तसंच आपोआपच त्याचे जंतू नष्ट होतील. असंही सरकार म्हणत होतं. किती दिवस ते बाहेरच्या वातावरणात जीवंत राहणार. असा दृष्टिकोण ठेवून भारतीयांची ही लढाई कोरोनाशी सुरु होती. कोरोनाही हार मानायला तयार नव्हता. लोकंही हार मानायला तयार नव्हते.
या कोरोनाबाधीतांचा उपचार करतांना एक गोष्ट आवर्जून समजली ती ही की कोणतंही संकट देशावर येत असेल तर लोकं एकजुटीने एकत्र येवून आपली मानसिकता तयार करतात आणि संकटांशी लढतात.त्यासाठी ते फायद्या- तोट्याचा विचार करीत नाहीत. शिवाय कोरोनासारख्या आजाराला नेस्तनाबूत करण्यासाठी कंबर कसतात. पण एक गोष्ट अशीही जाणवली की आपल्याला काय करायचे?
महत्वाचं म्हणजे देश संकटात होता. कोरोना महाभयंकर आजार होता, नव्हे तर महामारी. लोकांनी या महामारीचा सामना करायलाच हवा. हार मानू नये. रागही मानू नये. संतापू नये आणि संयम बाळगावे. कोरोना आपला मित्र नव्हे शत्रू आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहावे.एकमेकांना सहकार्य करावे नव्हे तर संकटातही धावून जावे. मग ते कोरोनाबाधीत का असेना. तसेच कोरोनानेही कोणाचा अंत पाहू नये असं सरकारचं मत होतं. लोकांना एका धीराच्या शब्दाने न सुधारणाराही कोरोनाबाधीत व्यक्ती सुधरु शकेल. असंही सरकार सांगत होतं.
अभिलाष आपल्या गावाला पैसे पाहिजे तेवढे नसल्यानं उन्हातान्हात पायी निघाला होता. पण जो त्याचा मोठा भाऊ आकाश गावाला थांबला होता. तो आकाश लोकांचे सांत्वन करीत होता नव्हे तर आकाश सरकारच्या बाजूनं उभं राहून लोकांची मदत करीत होता.
कोरोना व्हायरसने जग धास्तावले असून लोकं आजही त्याची भीती बाळगून होते. कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असतांनाही व काळजी घेत असतांनाही कोरोनाच्या रुग्नसंख्येत वाढ होतांना दिसत होती. परिस्थिती विचित्र स्वरुपाची असून खरंच कोरोना मानवासाठी घातक होता.
कोरोनाची व्याप्ती पाहता कोरोनाची लागण बहुतःश सर्व जगात झालेली असून काही देश व्यवस्थीत काळजी घेत असून त्या देशात तो विषाणू आटोक्यात आला होता. त्यासाठी तेथील देशही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत होते. भारत सध्या तरी याबाबतीत आघाडीवर होता.
कोरोनावर उपचार सांगतांना कोणी वेगवेगळे उपाय सांगत होते. कोणी दारु प्यायला सांगत होते. कोणी गाईचं गोमुत्र प्राशन केल्यानं कोरोना होत नाही असं म्हणत होते तर कोणी कापडात कापूर, लवंग याची पुळचूंडी बांधायला लावत तर कोणी गरम पाण्याच्या गुळण्याही टाकायला लावत. कोणी प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी असे सांगत. त्यासाठी आंबट पदार्थ खायला लावत.
खरंच असे उपाय केल्यानं लोकांमध्ये फालतूचा संभ्रम निर्माण होत होता. जो तो आपआपले वेगवेगळे उपाय करण्यात मग्न होता. तसंही पाहता आपला देश हा मेंढ्यांचं अनुकरण करणारा देश आहे असे वाटत होते. कारण आपण स्वतः आपल्या मनाने विचार न करता बाजूचा काय करीत असतो, ते पाहात असतो. त्यानुसार वागत असतो. तसेच भीतीमुळे जो माणूस जेही खायला असेल, तेही खायला आपण बाध्य होतो. मग ती वस्तू योग्य असो की नको. यात विचार करीत नाही. पण यात विचार केलेला बरा.यात विचार असा की ज्या वस्तू पचवायची बाजुच्या माणसाची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तीच वस्तू पचवायची प्रतिकारशक्ती दुस-या माणसाची असू शकते असे नाही. समजा एखाद्या गाईच्या गोठ्यात राहणारा, गाईची अहोरात्र सेवा करणारा व्यक्ती जर गाईचं गोमुत्र पित असेल तर साहजीक आहे. कारण त्या गोमुत्रातील जंतूंना त्याच्या शरीराची सवय आहे. पण तेच गोमुत्र एका शहराच्या माणसानं जर प्राशन केलं तर त्याला अपाय होवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ते गोमुत्र शुुद्ध केलेलं नसतं.
अलिकडे लोकं रुमाल बांधलेले दिसत. पण खरंंच रुमाल शुद्ध स्वरुपाची असते का? आपण ज्या भागातून रुमाल बांधतो. तीच बाजू परत बांंधताना वापरतो का? तसेेच त्या रुमालाने नाक, कान तरी झाकलेे असते का? ती जर दुस-या बाजूनं वापरली गेली तर त्या रुमालाचे जंतू शरीरात प्रवेश करणार नाहीत का?
महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्याला सहज शंका येत असेल, कोरोना झालाय. त्यांनी कोणीही कोणतेही उपाय सांगीतलेले पाळू नये. घरी साबनाने हातपाय धुऊन घ्यावे किंवा गरम पाण्याने हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करावा. रुमाल वापरण्याऐवजी हाताने शिवलेला मास्क वापरावा. कोणीही कोणतेही उपाय न करता त्यांनी आपल्या मताने विचार करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भोंदूबाबांकडे कोणीही जावू नये. कोणी कोणतेही उपचार सांगीतलेले ऐकू नयेे. कारण जर का असे उपाय केल्याने समस्या आलीच किंवा निर्माण झालीच तर तो कोरोना होण्यापुर्वीच निघून जाईल. मग त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. काही लोकं अर्थात समाजसुधारक अशा स्वरुपाची जाणीवजागृती करीत होते.
आकाश हा शिकलेला तरुण होता. त्याचा भोंदूबाबावर विश्वास नव्हता. त्याचा डॉक्टरांवर विश्वास होता. पण त्याच्याजवळ आज काही उपाय नव्हता. कारण अफवा अशा उडत होत्या की डॉक्टर मंडळी जाणूनबुजून कोरोनाच्या नावानं रुग्णांना मारतात. तसेच त्यांचे शरीरअवयव जास्तीत जास्त पैशांना विकून पैसा कमवतात.
कोरोना व्हायरस, लोकं फार घाबरले होते. सगळं जग धास्तावलेले होते. रुग्नांची आकडेवारी वाढत होती. सगळीकडं हाहाकार. आपलंं कसं होणार. यासंदर्भात खोट्या अफवाही पसरत होत्या.
लाकडाऊन लागला होता. मा. पंंतप्रधानांनी आव्हान केलं होतं की लाकडाऊन उघडेपर्यंत कोणीही बाहेर पडायचं नाही. कोरोना कंन्ट्रोल होईल. पण त्यावर कोणी ऐकायला तयार नव्हतं. लोकंं सर्रास बाहेर पडत होते. पोलिस मारतही होते........तरीही कोणीही ऐकायला तयार नव्हतं.
काही लोकं खरंच घरात बसले होते, तर काही लोकं म्हणत होते की त्यांना घरात करमत नाही. ते सरकार काळजी घ्या.वेगवेगळे राहा, घरातच राहा असं सांगत असूनही ती मंडळी वेळ घालविण्यासाठी मैदानावर जात होते. क्रिकेट खेळत होते. कोणी कोणी ऐकायला तयार नव्हते वा काळजी घ्यायला तयार नव्हते वा घरात राहायला तयार नव्हते. हीच मंडळी ख-या अर्थाने कोरोनाचा प्रसार करत होते.
कोरोना ही महाभयंकर आपत्ती असून महामारी आहे. ही महामारी पाऊस वादळ आणि भुकंप घेवून आली होती. अशीच महामारी जगात जे महायुद्ध लढलं गेलं, त्या महायुद्धाच्या वेळीही आली होती. जर्मनी प्रत्येक आघाडीवर सरसावत असतांंना अशाच एका आजारानं त्यांच्या सैनिकांना घेरलं. सोबत पाऊस वादळं. मग जर्मन सैनिक युद्ध लढत असतांना दुसरं युद्ध आजाराशीही लढत होते.त्यातच त्या सैनिकांची उपासमार. हेच घडलंं आझाद हिंद फौजेच्या बाबतीत. आजाद हिंद फौज सिंगापूरवरुन जपानला पोहोचली तेव्हा तिथंही भारतीय आझाद हिंद सेनेबाबत असच घडलं. त्यातच हिरोशिमा नागासाकीवर बाँबस्फोट. त्यातच विमान अपघात. कोणी म्हणत नेताजी मरण पावले, कोणी म्हणत नेताजी जीवंत आहेत. पण काही का असेना, जर नेताजी जीवंत असते तर भारताचं चित्र काही वेगळंच असतं. विषय हा होता की एवढी मोठी महामारी. महामारीची सुरुवात खुप जोशानं होते,पण जसजसे दिवसं जातात. महामारीचा जोशही तेवढ्या प्रमाणात कमी होत असतो. म्हणून जीवनाचं जे होईल ते होईल, त्यासाठी घाबरण्याची गरज नव्हती.काळजी तेवढी घेण्याची गरज होती.
या काळात आपण या महामारीपासूून काहीतरी शिकण्याची गरज होती. ती गोष्ट म्हणजे संयम. संयम पाळत घरातच राहणे. दुसरी गोष्ट ही की लोभ न करणे.
आज आपण लोभ करीत असतो. लोभाच्या आहारी जावून आपण आपल्या जीवनाचा सत्यानाश करीत असतो.एक एक फुटासाठी भांडत असतो. ही महामारी अशांना सांगत होती की लोभ करु नका. आज कोणाला केव्हा कोरोना होईल ते सांगता येत नव्हते.
साहित्यीक मंडळी हे सांगत. खरंच या काळात आपण घरी राहून वेळ कसा जाईल याच बुचकळ्यात पडून न राहता मिळालेल्या वेळात एक दैनंंदिनी लिहावी. इतिपासून इतंपर्यंंत. त्या दैनंदिनीत आपण लहानाचे मोठे कसे झालो? काय काय अनुभव आले आणि आपण आजपर्यंत कसे जगलो? कोणाशी भांडलो? कोणाशी कसे वागलो हे लिहून काढा आणि यापुढे आपण कसं वागायला हवं तेही लिहून ठेवा. तसंच राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर यावर विजय मिळवायचा नव्हे तर त्या गोष्टी मनातून हद्दपार करण्याच्या गोष्टी मनात तयार करा. रागाच्या जाग्यावर दयेला स्थान द्या.सत्य,अहिंसा,अस्तेय या गोष्टींना जीवनात स्थान द्या. हिंमत मनामध्ये तयार करा. जी हिंमतच तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकेल. घरीच राहा पण आनंदी राहा. परीवारासोबत वेळ घालवा. सरकारनं रामायण,महाभारत लावून तुमच्या वेळ घालविण्याचा मार्ग शोधून दिलाय. त्या मालिका पाहा. पण निव्वळ टाईमपास म्हणून पाहू नका तर त्यापासून बोध घ्या. घराजवळचीच मंथरासारखी माणसं कसं घर तोडतात. ते शिकण्याची गरज आहे.तसेच सर्व असूनही विद्यार्थी रुपातील रामाने भेदभाव केला नाही हे शिका. भिक्षा मागितली. तसेच आई, मग ती सावत्र का असेना, तिचा आदेश पाळून राम वनवासात कसा जातो, अर्थात लोभ करु नये असं रामायण शिकवतं. तसंच आई वडीलांची आज्ञा पाळा असं रामायण सांगतं. तेच तुम्ही करा. महत्वाचं सांगायचं झाल्यास कोरोनाला जागेवर ठेवून आम्ही आमची जीवनशैली कोरोनाच्या रुपानं का असेना बदलवायला हवी.जेणेकरून आम्ही पुढील काळात चांगली माणसं बनू व वाटचाल करु शकू.
साहित्यीक मंडळींचंही बरोबर होतं. ती साहित्यीक मंडळी ही लोकांना वेळेच्या सदुपयोगाबाबत मार्गदर्शन करीत होते. लोकांनी आपला वेळ कसा घालवावा यावर या कोरोनाच्या काळात साहित्यीक मंडळींनी खास उपाय सांगीतला होता.
कोरोना.......कोरोना म्हणजे कोणी रोडवर नाही, कोणाला रोजगार नाही. कोणाला रोशनी नाही अर्थात सर्वांच्या घरी अंधार. आजारी पडलेच आणि मरण पावलेच तर कोणाला रोशनी नाही असाच अर्थ सर्वसाधारणपणे अभिप्रेत.
बावीस तारखेपासून लॉकडाऊन झालं होतं. त्यानुसार लोकांनी रस्त्यावर निघू नये असा निर्णय होता. कोणी पाळत होते, तर कोणी पाळत नव्हते. पण जे पाळत होते, त्यांच्यामुळेच कोरोनाची गती बससारखी होती. पण गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्या वाढली. हजार वरुन तीन हजारावर गेली. याचं कारण मरकजचं प्रकरण. कोरोना मज्जीदमध्ये काहीच करत नाही असं लोकांचं बेजबाबदारपणाचं वागणं. तसेच सेलिब्रेटीही वाढदिवस साजरा करत होत्या. कोरोनाचे भय असतांना जाणूनबूजून जबरदस्तीनं........खरंच कोरोना पसरणार नाही तर काय? यासाठी सरकारला पोलिस लावावे लागले होते. मिलिटरी बोलवावी लागली होती. तरीही लोकं लॉकडाऊन पाळायला तयार नव्हते. त्यामुळं कोण मरेल व कोण जगेल हेही सांगता येत नव्हतं. जर असा लॉकडाऊन लोकं पाळत नसतील तर लॉकडाऊन करण्याचा काय उपयोग? असं वाटत होतं. खरंच आजपर्यंतच्या काळात कोरोना वर विजय मिळवता आला असता.पण आपलेच लोकं ऐकायला तयार नव्हते. ते आजही घरात राहायला तयार नव्हते. पोलिसांच्याही लाठ्या हिसकावत होते. कोणी त्यांना मारतही होते. कोणी काहीबाहीही बोलत होते. कोरोनाला भीषण संकट मानत नव्हते. त्यामुळे कोरोना जायलाच तयार नव्हता. मात्र त्यावेळी असं वाटत होतं की अशांना गोळ्याच मारुन टाकाव्या. अशी भाषाही काही राजकारणी बोलत होते. तेही बरोबरच होतं.
कोरोना संकटच होतं. बिकट संकट. लॉकडाऊन केलं सरकारनं. कोणी त्या निर्णयाला चुकलं म्हणत तर कोणी त्या निर्णयाचं समर्थन करत. कारण त्यामुळं सर्वांची हालत खस्ता झाली आणि होणार का नाही. कारण रोजगार बुडाले. कोणाला रस्त्यावर या कोरोनान निघूच दिलं नाही. निघू देतही नव्हतं.
या कोरोनाच्या काळात काही लोकांनी दानधर्म केला. कोणी घरोघरी गेले. त्यांनी गरीब कुटूंबाना अन्नधान्य पुरवलं. कोणी जेवनखावण पुरवलं. सर्वांनी त्यावर विश्वास केला. पण जेव्हा मी स्वतः याचा प्रसंग पाहिला, तेव्हा मात्र दंग राहिलो. लोकं कसे कसे राहतात याचा प्रत्यय आला.
प्रसंग असा होता. एका ठिकाणी याही कोरोनाच्या साथीत महाप्रसाद वाटणं सुरु होतं. दोन तीन फुटाच्या अंतरावर लोकं उभी होती. सगळी गरीब मंडळी रांगेत होती. प्रत्येकाला अपेक्षा होती की मलाही या अन्नाचं पाकीट मिळेल.
त्यांच्या एकंदर पेहरावावरुन वाटत होतं की ते अंत्यंत गरीब असावेत. केसं विस्कुटलेले, साड्या फाटलेल्या, लहान लहान पोरं, त्यांच्या नाकातलं शेंबूड वाहात होतं. सर्व लाचार आता मिळेल आपल्याला पाकीट याची वाट पाहात उभे होते.
आतमध्ये अन्न पँकींग करणं सुरु होतं. अशातच त्या रांगेजवळ एकजण आला. म्हणाला,
"हे जेवन तुमच्यासाठी नाही आहे. हे चालंलय एम आय डी सी तील गरीब लोकांना. जा तुम्ही आता. कोणालाच पाकिट मिळणार नाही. इथं गर्दी करु नका. कोरोना आहे."
त्या माणसाचं बोलणं.लोकांनी रांग मोडली. तसा एकजण म्हणाला,
"हे का सेवा करतीन. ह्याईलेच तं कमी हाये. म्हणतेत एम आय डी सीतल्या गरीब लोकांयसाठी जेवन हाये. एम आय डी सीत का गरीब लोकं रायतेत का? ते तोंड पावून देत असतीन पाकीट."
खरंच त्या माणसाचं बोलणं रास्त होतं. कारण तिथं रांगेत गरीब मंडळी. सेवा करायचीच असेल तर गरीबाची करायला हवी होती. जे त्या रांगेत होते. एम आय डी सी सारख्या कालनीत काय गरीब लोकं राहात होते काय? याचं उत्तर नक्कीच नाही असं होतं. पण त्या माणसाचे शब्द. इथं गर्दी करु नका. हे जेवन तुमच्यासाठी नाही. खरंच याला सेवा म्हणावी काय? ती सेवा नाही तर तो त्यांचा एक स्वार्थ होता. दान किंवा मदतीच्या नावावर त्यांनी मांडलेला बाजार होता.
किराणा दुकानातही हीच हालत दिसून येत होती. वस्तूंचे दर वाढलेले होते. जी वस्तू काल नव्वद रुपये किलो होती, ती आज एकशे तीस रुपये किलो झालेली होती. नशेच्या वस्तूंची तर गोष्टच सोडा, त्यांचा दर डबल आहे. तंबाखू तर मिळेना झाला होता. साखर तर साठच्याही वर तर तेल एकशे तीसच्याही वर विकणे सुरु होते. पेट्रोल व डिझेलही महाग होवून शंभरच्या घरात गेलं होतं. एकंदरीत सांगायचं झाल्यास या वस्तूंची झळ गरीबांना पोहोचलेली असून श्रीमंतांना तेवढी पोहोचलेली नसावी असं वाटत होतं. कारण त्यांना फारसा फरक पडला नव्हता. वीजेचं बिल दुप्पट तिप्पट दरानं वाढून आलं होतं. राजकारणी ते बिल कमी करण्यासाठी आंदोलन करीत होते. पण वीज बिल काही केल्या कमी झालं नव्हतं.
गरीबांनी जर एक दिवस घरी राहतो म्हटलं तर त्यांच्या घरी चूल पेटत नसतांना आज त्यांना बावीस तारखेपासून घरी राहावे लागले होते. कारखाने बंद असल्यानं वस्तूंचं उत्पादन बंद होतं. त्यामुळे काही काही वस्तू मिळणंही बंद झालेलं हो तं. ज्या वस्तू जीवनावश्यक होत्या.
कोरोना हे संकटच होते. एकतर उपासानं मरा नाहीतर रोगाच्या प्रादुर्भावानं मरा असं कोरोनानं करुन टाकलं होतं. पण यावर उपाय नव्हता. संशोधक औषधी शोधण्यावर संशोधन करीत होते. ते दिवसरात्र त्यावर मेहनत करीत होते. पण त्यांना यश येत नव्हतं. आज उपाय नव्हता.
देशात एकत्रीकरणाचं वारं सुरु होतं. देश कसा चालवायचा हा प्रश्न सरकारला पडलेला होता. पण तेही हतबल झालेलं होतं. परंतू चूप बसलं नव्हतं. सरकार काही ना काही उपाययोजना काढत होतं. ज्या दशरथाचे दोन वर कैकेयीनं मागून घेताच जी स्थिती दशरथाची झाली, तीच स्थिती आज सरकारची झालेली होती. त्यांना तळ्यात की मळ्यात उभं राहावं ते सरकारला कळेनासं झालं होतं. तरीपण ते मेणबत्तीच्या रुपानं उर्जा नाही पण एक एकत्रीकरणाची भुमिका पार पाडत होते. कोणी याला राजकारण म्हणत. पण हे राजकारण नसून कोरोनाशी लढण्यासाठी उचललेलं एक शस्रच होतं. त्यामुळं त्यांच्या मेणबत्ती किंवा दिवा लावण्यावर शंका घ्यायची गरज नव्हती तर सहकार्य करण्याची गरज होती.
सरकारनं लोकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी म्हणून टाळ्या वाजवणे, घंटानाद करणे, मेणबत्ती जाळणे इत्यादी उपक्रम केले. पण काही मंडळी त्यालाही हसत होते. जणू खिल्लीच उडवीत होते. मेणबत्ती लावणे हा कोरोनावरील उपाय नव्हता. पण लोकांना आत्मीक समाधान देणारी ती एक वस्तू होती. सरकार सर्वांनी मेणबत्ती लावा.कोणी दिवे लावा तर कोणी मोबाईलचा टार्च.......ज्याला जे जमेल त्यानं ते लावा. ज्याला लावायचे नसतील, त्यानं लावू नका. पण उगाच कोणाला नाव बोटे ठेवू नका आणि कोरोनाला वरचढ करु नका. ही लढाई आहे, कोरोनाशी लढतो आहो आपण. असं सांगत होतं. तसेच सरकारच्या पाठीशी राहून आपण लढूया. शांत संयमी आणि शितल राहून. कोरोना बिकट संकट आहे. म्हणून मेणबत्तीने फरक पडणार आहे का? असं कोणीही म्हणू नये.कारण एक मेणबत्ती लोकांना एकत्र आणून लोकांच्या विचारावर संयम आणू शकते नव्हे तर लॉकडाऊन पाळण्याविषयी बाध्य करु शकते. म्हणून एक मेणबत्ती खरंच परिवर्तन घडवून आणू शकेल काय? असं म्हणू नये.पावसाळ्यात सुर्य जरी दिसला नाही पाच दिवस म्हणून कोणी मरत नाही.तीच कार्य आज मेणबत्ती करणार आहे. एकत्रीकरणासाठी माध्यम बनून. याचा तुम्ही सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. अशीही भुमिका घेत सरकार लोकांना तयार करीत होतं.
आकाश आपल्या भावासोबत गावाला निघून गेला नाही. त्याचं घर त्या राज्यात नव्हतं. तो आपल्या राज्यातून रोजगारासाठी दुस-या राज्यात आला होता. इथल्या मातीशी त्याची नाळ जुळली होती. त्याला असं वाटत होतं की ज्या मातीनं आपल्यावर प्रेम करुन आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. आपल्याला रोजगार दिला. त्या मातीशी आपण बेईमान होवू नये. आपली ही माती आज संकटात असतांना आपण हिला सोडून जाणे ही बाब त्याला खटकत होती. म्हणून की काय, तो इथंच थांबला होता, लोकांची सेवा करण्यासाठी. त्याला लोकांची सेवा करतांना आत्मीक समाधान वाटत होतं.
कोरोना व्हायरस, भल्याभल्यांचे मनाला थरकाप सोडणारा व्हायरस, निव्वळ या व्हायरसच्या भीतीनं जीव जाईल अशी अवस्था. या व्हायरसने नात्यांवरही परीणाम केलेला असून कोणी पाहूणा घरी बोलावण्याच्या लायकीचा उरलेला नव्हता.
उन्हाळी हंगाम, या काळात पाहूण्यांची सारखी वर्दळ राहायची. कोणी विवाहानिमित्यानं एकत्र यायचे तर कोणी उन्हाळी सुट्ट्या साज-या करण्यासाठी बाहेरगावी जायचे तर कोणी देवदर्शनासाठी निघायचे. पण कोरोनाने ह्या सर्व पाहुण्यांच्या येण्याजाण्यावर ब्रेक लावला.
अशीच एक घटना.नागपूरातील असाच प्रसिद्ध एक भाग. तिथं संशयीत कोरोनाग्रस्त सापडल्याने व त्या घरची मंडळी ही कोरोना पाजिटिव्ह निघाल्याने त्या भागाला संपुर्ण लाकडाउन केलं गेलं होतं. मग त्या घरापासून काही अंतराचा पट्टा तपासला गेला तर असं आढळलं की एका घरची मुलगी धाकानं आपल्या आईच्या घरी गेलेली होती. त्यामुळे पोलिसांनी शोध लावत त्या मुलीसह तिच्या मायबापांनाही उचलून दक्षता विभागात ठेवलं.
दुसरी अशीच एक घटना होती. याही ठिकाणी असंच घडलं. मुलांना जन्म देणारा बाप. पण अलिकडे मी, माझी पत्नी व माझी मुले एवढीच संस्कृती उरली. अशा संस्कृतीत बाप माय चालत नाही.त्यातच काही महाभाग आपल्या मायबापाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात तर काही महाभाग परीस्थितीशी जुळवाजुळव करतात.अशाच एका घरची गोष्ट. त्या घरी एका दांम्पत्याला तीन मुलं. पण तीन मुलांपैकी एका एका मुलानं एक एक महिना मायबापाची सेवा करायची असं ठरलं. त्यातच त्या दांम्पत्यातून एक सदस्य मरण पावला. बाप उरला. आता हा उरलेला एकमेव बाप, तोही एकाच मुलाने पोसावा हे तत्व. एका पोटला किती अन्न लागणार होतं. पण मीच पोसावं का? यातून त्या बापाचीही तशाच तीन भागात विभागणी. एक एक महिना.
अशातच कोरोना आला. याच कोरोनाच्या काळात पाहूण्यांची रेलचेल बंद झाली. काही शहरात लाकडाऊन अचानक झाल. त्यामुळे पाहुणे आपल्या गावाला जायचे थांबले. काही नवरदेव नव-याही अडकल्या. काही बहिण भाऊही. पण शहरातल्या शहरात असल्यानं हा बाप अडकू शकला नाही.
ज्या मुलाकडे बाप होता, त्या मुलाच्या घरी त्या बापाचा महिना पुर्ण होताच त्यानं याच कोरोना काळात आपल्या बापाला जबरदस्तीनं हाकललं तर ज्या मुलाचा पोसायचा नंबर होता. त्यानं तो कोरोना पाजिटिव्ह आहे की निगेटिव्ह वा त्याच्या बापाला कोरोना आहे की नाही याची शहानिशा न करता त्याला कोरोना कोणालाही राहू शकते या भीतीनं घराच्या बाहेरुनच हाकललं. आता त्या बापानं जावं कुठं? तो बाप या कोरोनाच्या काळात रस्त्यावर भीक मागतोय. तो स्वतःला कोरोना व्हायला हवा असं म्हणत होता. जगून काही अर्थ नाही असं मानत होता. पण त्याला कोरोना होत नव्हता. वय वर्ष पंच्याहत्तरच्याही पलिकडं असून तो विचार करतोय की यापेक्षा मी पुत्रच होवू नसते दिले तर बरं झालं असतं.
कोरोना व्हायरसने अशाप्रकारच्या नात्यांवरही परीणाम केलेला होता. ज्या मायबापाची सेवा करायला मुलं कचरत होती. कशीबशी परीस्थिती जुळवून घेवून ज्या मुलांनी एक एक महिना पोसायचं ठरवलं. त्यातच हा कोरोना व्हायरस म्हणजे त्या बापासमोर विघ्नच नाही का? जेव्हा कोरोना नव्हता तरी मायबापाला सन्मानानं न जगवणारी माणसं............त्या माणसांना कोरोना आजार म्हणजे टाळूवरचं लोणीच वाटलं. पण जी त्या म्हाता-या बापासारखी कित्येक माणसं दररोज मरण मागत होती. त्यांना कोरोनाच काय कोणताही आजार शिवत नाही असंच वाटत होतं.
भाग्य यालाच म्हणता येईल. अशी भरपूर माणसे आहेत की जी मंदीराच्या बाहेर भीक्षा मागत होती, नव्हे तर त्यावर जगत होती. पण आता कोरोनात तसं अन्न मिळणं बंद झालं असून आज मंदीर बंद होती. खानावळीत अशा माणसांना भीक्षा म्हणून चार दोन रुपये मिळायचे, कधी नाश्ताही.......त्या खानावळी आज बंद होत्या. अशा माणसांची कोणीच पोटापाण्याची सोय करीत नाही. कशीतरी ती मंडळी जगत होती. अन्न त्यालाच मिळताना दिसत होतं. राशन मिळत नव्हतं. कारण त्यांच्याजवळ कोणत्याच स्वरुपाचं राशन कार्ड नव्हतं. एपीएल, बीपीएल इत्यादी. ते कार्ड त्यांना काढताच येत नव्हतं वा काढलं नव्हतं. अन्न वा राशन त्यालाच मिळत होतं की ज्यांच्या मोठमोठ्या इमारती होत्या. एपीएल बीपीएलची कार्ड होती.भरपूर संपत्ती होती. जी मंडळी ते राशन खात नव्हते. उचलत होते आणि गरीबांना चक्क विकत होते. त्यांचं पितळंही उघडं कोणी करु शकत नव्हतं. कारण त्या त्या भागात त्यांची दहशत होती.
सामान्य लोकांना वाटत होतं की खरं तर राशन वाटतांना सरकारनं उतावीळपणा न करता सर्वे करुन मगच धान्य वाटावं.आधारकार्ड तर बँकेशी जुळलेलं आहेच. खरं तर आर्थिक निकष त्यावरुन लावून ती लिस्ट सरकारनेच पाठवावी. तसेच त्याही लिस्टची अंमलबजावणी करतांना वस्ती वस्तीत जावून जर त्या लिस्टमधील माणसांची टोलेजंग इमारत असेल त्याला राशन देवूच नये आणि दिलेही असेल तर कोरोना संपल्यावर अशा स्वरुपाच्या माणसांवर कार्यवाही करावी. ज्यांनी गरजूंचे धान्य पळवले आणि शासनाला भुर्दंड पाडला.
असं वाटत होतं की गरजूंना धान्य मिळायला हवे. सरकारने उचललेले पाऊल रास्त आहे. कोरोनात सरकारनं लाकडाऊन केलं, त्यामुळं आमच्या देशातील जनता खाणार काय? असा विचार करुन एवढ्या जनतेला जगवण्यासाठी सरकारनं राशन वाटपाचं पाऊल उचललं. त्यासाठी सरकार कर्ज काढत आहे.पण यात ज्यांना खरंच गरज आहे. त्यांना राशन मिळत नसून भलतीच मंडळी याचा फायदा घेत आहेत. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे.
कोरोना व्हायरसच्या सावटाखाली अख्खा देश वावरत असतांना बहुतेक जण दहशतीत होते. काय करावे? कसे जगावे? काय खावे? असे प्रश्न प्रत्येक जनमाणसांच्या मनात होते. लोकावर उपासमारीची वेळ आली होती. आता असं वाटायला लागलं होतं की उपासमारीनं मरण्यापेक्षा लॉकडाऊनच मरावे. कारण उपाय सुचत नाही. कोरोनाचं कमी व्हायचं लक्षणच दिसत नव्हतं.
कोरोना कमी करण्यासाठी मा.पंतप्रधानासह सर्व यंत्रणा कामी लागली.सुरुवातीला दि.३१/०३/२०२० व नंतर १४/०४/२०२० पर्यंत लॉकडाऊन जे झालं. तरीही कोरोना आटोक्यात आला नव्हता. दरम्यान घंटानाद केला गेला.त्यानंतर मेणबत्ती उपक्रम.पण कोरोनाला फरक पडलाच नव्हता. उलट तो वाढला आणि नाईलाजाने ०३/०५/२०२० पर्यंत लॉकडाउन वाढवावं लागलं. तरीही कोरोना आटोक्यात येत नव्हता. याला जबाबदार लोकं स्वतःहाच होते. लोकं जाणूनबुजून कोरोना वाढवत चालले होते.
घरीच बसा. घरातून बाहेर पडू नका. असे संदेश वृत्तपत्र, दुरदर्शन आणि इतर जाहिरात माध्यमातून प्रसारीत होत होतं. पण लोकं ते ऐकत नव्हते. लोकं घरातून शुल्लक शुल्लक गोष्टीसाठी बाहेर पडले. त्यातच ते मरकजचं प्रकरण. ज्या कोणाला त्या मरकज प्रकरणातून कोरोना झाला. ती माणसं अद्यापही क्लोरोंटाईनमध्ये आली नव्हती. त्यातील एका एका माणसानं अख्ख्या वस्तीवस्तीत कोरोनाचा प्रसार केला. लोकं रस्त्यावरुन फिरत असतांना घरात न बसल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तरीही लोकांनी न ऐकल्यानं पोलिसदलही थकलं आणि सरकारही थकलं होतं. सरकारनं आणि स्वयंसेवी संस्थांनी आपली काळजी म्हणून आपल्याला धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. जेवनंही पुरवलं. पण लोकं तरीही घरी बसायला तयार नव्हते. मग सरकार तरी जीवनावश्यक वस्तू केव्हापर्यंत पुरवणार आणि लोकांचे लाड केव्हापर्यंत करणार! कारण करोडो रुपयाचं नुकसान होत होतं, झालं होतं. त्यातच लोकांना टोमण्याची भाषा येत असल्याने लोकं सरकारलाच टोमणे मारुन धारेवर धरत होते. आता सरकारलाही वाटत होतं की आपलंच चुकलं. जनता ऐकायलाच तयार नाही. तेव्हा सरकार हळूहळू लॉकडाऊन उघडत होतं. त्यामुळं आता मात्र आपण सावध व्हायला पाहिजे आणि लक्षात ठेवायला पाहिजे की आता कोरोनाला आपल्या व्हायरसचा प्रसार करण्यासाठी मार्ग मोकळा झालाय. आता तो दिवस दूर नाही की घराघरात कोरोना असेल नव्हे तर आज कोरोना ज्या दोन नंबरच्या स्टेजला आहे. ती स्टेज चार नंबरला जायला वेळ लागणार नाही. तेव्हा आतातरी आपण बोध घेवून आपली सुरक्षा आपणच करावी. असं लोकांना वाटत होतं. सरकारनं लॉकडाऊन उघडलं असलं तरी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. वेळोवेळी हातपाय धुवून घ्या. तोंडाला मास्क लावा. सॉनिटायझरचा वापर करा. कारण तुमच्या एका जणांच्या बाहेर पडण्याच्या चुकीनं कोरोना तुमच्या परीवारासह तुमची अख्खी वस्ती गारद करु शकते. ठीक आहे तुम्हाला वस्ती आवडत नसेल. कारण वस्तीचा काही जणांना राग असतोच. पण परीवार तर आवडतो ना. मग सुरक्षा आपल्या परीवाराचीच करा. आपली पत्नी मुलबाळ त्यांच्यासाठी तरी स्वतःला लॉकडाऊन करा. जेणेकरुन कोरोनावर तुम्हाला मात करता येईल व कोरोना देशातून हद्दपार करता येईल. अशा प्रकारच्या सुचना सर्व यंत्रणा लोकांना देत होत्या.
आकाशचं काम बंद होतं. पण तो तरुण असल्यानं सेवाकार्य करण्यासाठी ज्या ठिकाणी अन्नवाटपाचे स्टाल लागले होते. त्याठिकाणी अन्न वाटप करायला जात असे. तो अन्न वाटप करायला सहकार्य करीत असे. त्याचं हे कार्य बरंच दिवस चाललं. पण ज्यावेळी या अन्नवाटप करणा-या लोकांचं कोरोना टेस्टींग झालं. त्यावेळी त्याच गटाचा एक हट्टाकट्टा मुलगा कोरोनाबाधीत ठरला होता. म्हणून की काय, त्या ठिकाणची अन्नवाटप योजना बंद झाली. ज्या ठिकाणी आकाशला अन्न मिळत होतं. आता मात्र अन्नवाटप योजना बंद झाल्यानं आकाशला जेवन मिळेनासं झालं होतं. जवळचा सर्व पैसा खर्च होत होता. त्यामुळं की काय, त्याच्यासमोर प्रश्न उभा राहिला होता. तो म्हणजे आता आपलं पोट कसं भागवायचं. त्याच एकमेव विचारात व चिंतेत तो गढला जात होता नव्हे तर त्याला आता ती चिंता सतावत चालली होती.
लालच बुरी बला सगळेच म्हणतात. मानतातही. पण कोणीही लोभ सोडलेला नाही. सगळीच माणसं लोभ करीत असतात. त्यातच गडगंज संपत्ती गोळा करीत असतात. प्रसंगी या लोभापायी एकमेकांचे मुदडेही पाडत असतात.
सर्वांना माहित अाहे की लालच बुरी बला आहे.तरीही आम्ही लोभ का करतो? ते आम्हाला कळत नाही. कळणारही नाही. ते का बरे कळत नाही हे समजायला कारण नाही.
संत सांगून गेले की लालच बुरी बला आहे.तरीही आम्ही लालच करतो आणि आपला विनाश करुन घेतो. एवढंच नाही तर महाभारतातही लोभाचा परीणाम दाखवलेलाच आहे.
पांडवांनी फक्त पाच गावं मागितली होती.पण सुईच्या टोकावरही मावेल एवढीही जागा मी पांडवांना देणार नाही. असं म्हणणा-या नव्हे तर लोभ करणा-या दुर्योधनाला धडा शिकवून त्या दुर्योधनालाच पराभू्त केलं नाही तर संपूर्ण राज्याचं नुकसान झालं. दुर्योधन मरण पावला नव्हे तर अख्खी कौरव सेना. कितीतरी प्रमाणात अतोनात नुकसान झालं. ते नुकसान कधीच भरुन निघणारं नव्हतं. म्हणून अति लोभ बरा नाही.
आजही कर्ण मरण पावला जरी असला तरी कर्ण अजरामर आहे. कारण त्या कर्णानं आपलं कवचकुंडल दान केलं. हा इतिहास आहे. तसेच याला दानाचा परीणामही म्हणावे लागेल. पण आज आपण दान करीत नाही. गडगंज संपत्ती गोळा करतो. कोणासाठी तर आपल्या मुलांसाठी. जी मुलं त्यांची पत्नी आल्यावर आपल्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवत असतात. मग तो एखादा न्यायाधीश का असेना.
आज आपण पाहतो की निव्वळ सगळी माणसं लोभ करीत असतात. लोभानं हानीही होते तरी लोभ. त्यातच मरण सत्य आणि अटळ आहे हे आपल्याला माहित आहे. तरीही आपण लोभ करीत असतो. माणसं मरणाच्या दारात असतात, तरीही लोभ सुटत नाही. त्यातच इंच इंच जागेसाठी भांडण करतात. मेल्यावर कधीच मालमत्ता मिळणार नाही हे माहित असूनही भांडण. महाभारतात प्रसंगी युद्ध झालं. पण पाच गावं पांडवांना दिली नाही. हाच लोभ. मेल्यावर एक अंगावरचा पोशाख व शाली शिवाय काहीच मिळत नाही. सोनं टाकतात तोंडात पण किती.......तुकडा. तो तुकडाही राखेमधून शोधून परत घेतात. जी मालमत्ता आम्ही गोळा करतो. ज्या मालमत्तेसाठी आम्ही एवढा लोभ करतो. तो लोभ असा म्हणत नाही की बापू तुला जगायला मी दोन वर्ष जास्त देतो. कारण तू जी मालमत्ता गोळा केली. ती मालमत्ता तू उपभोगलेली नाही किंवा त्या मालमत्तेचा तू उपभोग घेतलेला नाही.
अलिकडे माणसात एवढा स्वार्थ वाढला आहे की माणूस या ना त्या कारणाने मालमत्ता गोळा करीत आहे. त्यासाठी भ्रष्टाचार करीत आहे. त्यासाठी भांडण काेर्ट कचे-या. त्याला माहित असते की मी ज्याच्यासाठी एवढं करतो. तो मुलगा उद्या या मालमत्तेचा वापर कसा करेल.
आम्ही मोठ्या मेहनतीनं या ना त्या कारणानं पैसा गोळा करतो. पण ती मालमत्ता उपभोगणारी आमची मुलं तर चांगली निघायला हवी ना. जर ती मुलं आम्हाला वृध्दाश्रमात टाकत असेल तर त्या मालमत्ता जमविण्याचा फायदा कोणता? एका माणसाची गोष्ट सांगतो.
एक व्यक्ती असा होता की ज्याला घर बांधायचे होते. त्यासाठी त्याला पैसा हवा होता. पैसा मिळेल कोठून? तो विचार करीत असतांना त्याला सहज आठवलं की गावाकडं जमीन आहे. गावची जमीन विकावी व पैसा आणून घर बांधावं. तो गावाला गेला.
हा व्यक्ती मायबापाची सेवा करीत नव्हता. कारण पत्नी बरोबर नव्हती. तिला सासूसास-याबद्दल प्रेम नव्हते. पण घर तर बांधायचेच होते. कसे करावे? तो विचार करु लागला.
असाच विचार करीत असतांना तो गावाला गेला. पण तो गावाला गेला खरा, मायबापानं सांगितलं. आमची सेवा कर. आम्ही मरण पावल्यानंतरच तुला शेती विकायला मिळेल. त्या मुलाला वाईट वाटलं. तो आल्यापावली परत गेला.
तो परत येताच त्याच्या पत्नीला राग आला. पत्नीनं वकीलाचा सल्ला घ्यायला लावले. त्यानं वकीलाचा सल्ला घेतला. वकीलानं खटला टाकायला लावला.
मुलगाच तो.......मुर्ख मुलगा. त्यानं पत्नीचं ऐकून व वकीलाच्या सल्ल्यानं मायबापावर खटला भरला. कोर्टाची केस सुरु झाली. त्यातच तारखावर तारखा पडू लागल्या. न्यायालयालाही निकाल कसा द्यावा याचा विचार येवू लागला. त्यातच न्यायालयानं निकाल दिला. त्या शेतीचे अर्धे अर्धे तुकडे करावेत. अर्धा मायबापाचा व अर्धा पोराचा.
शेतीची वाटणी केली गेली. जी शेती मायबापानं काबाडकष्ट करुन घेतली होती. आपल्या म्हातारपणाची शिदोरी म्हणून. ती शिदोरी आज विभाजीत झाली होती.
मायबापाचं थकतं वय. म्हातारपणी सेवा करायला मुलगा नाही. त्यातच हाय खावून मायबाप मरण पावले. आता काय पोरासमोर रान मोकळे झाले होते. मुलानं लागलीच संपुर्ण शेती विकली आणि त्यानं घर बांधायला पैसे आणले. घर बांधण्यासाठी बाहेर झोपडं टाकण्यात आलं. घर तयार झालं. आता फक्त घरात गृहप्रवेशच बाकी होता.
गृहप्रवेश बाकी होता. अशातच त्या गृहस्थाचा अपघात झाला. उपचार करता येत होता. पण पैसा खर्च होईल म्हणून घरच्या लोकांनी त्याचा उपचार केला नाही. त्यातच तो गृहस्थ मरण पावला.
प्रेत.......प्रेत रुग्णालयातून घरी आणले गेले. कोणी म्हणत होते. ते प्रेत नवीन घरी ठेवायला हवं. पण घरच्यांनी म्हटलं की नको. कारण गृहप्रवेश व्हायचा आहे. होमहवन, शांती व्हायची आहे. प्रेत त्याच रस्त्यावर बांधलेल्या तुटक्या झोपड्यात ठेवण्यात आलं. तिथूनच त्याची मैयत आटोपवण्यात आली. ज्या घर बांधण्यासाठी लोभ करुन ज्या माणसानं प्रसंगी मायबापासोबत खटला लढला. काय मिळालं त्याला? तर मेल्यानंतरही त्याच्या प्रेताला काही क्षण विसाव्यासाठी रस्ता. रस्त्यावरचा अपघात अन् रस्त्यावरुनच पलायन. साधं घर त्या प्रेताच्याही नशीबात नव्हतं आणि ते गृहशांतीत अडकलं होतं.
अलिकडे कोरोना असाच होता. कितीही लोभ करुन पैसा मिळविलेला असला, तरी हा कोरोना त्याला सोडत नव्हता. तसेच ज्याच्याकडे काही नव्हते. त्यालाही कोरोना सोडत नव्हता. शिवाय कितीही पैसा असेल तरी त्याची मैयत ही जास्त लोकांच्या साक्षीनं होत नव्हती. मैयतीला केवळ पाचच लोकं असत. मुलगा असेलच अशी शाश्वती नव्हती. शिवाय ती मैयत घरच्या लोकांना मिळेलच असं नव्हतं. कारण जी माणसं आज कोरोनानं मरत होती. त्यांच्या प्रेताची विल्हेवाट रुग्णालयातीलच कर्मचारी करीत होते. ते प्रेत घरच्यांना मिळत नव्हते. मग काय फायदा एवढ्या मोठ्या मालमत्तेचा की जी मालमत्ता मरतांनाही आपल्या कामात येत नव्हती.
आम्ही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करुन एवढी प्रचंड मालमत्ता गोळा करतो. ती मालमत्ता जर आमच्या कामात येत नसेल तर त्या मालमत्तेचा आम्हाला उपयोग कोणता? त्यापेक्षा आमच्याकडे मालमत्ता नसलेली बरी. कोरोना आला होता. विदेशी प्रवाशांकडून आला होता. विदेशात कोण जातो? साधारण माणूस जात नव्हता तर श्रीमंत माणसं जात होती. तो अजून गरीबांच्या झोपडीत पोहोचायचा होता. तेव्हा कोरोनाकडून हेच शिकायला मिळत होतं की लोभ सोडा, मालमत्ता जोडू नका. भ्रष्टाचार करु नका. सन्मानानं वागा.सन्मानानं वागवा. कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्याचा दिवस कसा निघेल हे काही सांगता येत नाही.स्वच्छ राहा. हातपाय धुवा तसंच मनही स्वच्छ करा.
काही लोकं शिकले होते. ते नशीबाला मानत नव्हते. अंधश्रद्धा तर त्यांना अजिबात चालत नव्हत्या. आकाशही पाहिजे त्या प्रमाणात अंधश्रद्धा मानत नव्हता. तो नशीबही मानत नव्हता. पण आता त्याचेजवळ उपाय नव्हता. कारण कोरोनाची दिवसेंदिवस दहशत वाढत चालली होती. त्यातच तो लोकांना म्हणायचा की अंधश्रद्धा प्रसंगी मानू नका. दगडाच्या मुर्तीवर कोंबडे, बकरे कापू नका. पण नशीबावर विश्वास ठेवा. नशीब माना. जे नशीबात असेल, ते होईल म्हणा. जर नशीबात जर कोरोनानं मरणं असेल तर मराल. नसेल तर नाही.
त्याचं असं म्हणणं बरोबर होतं. कारण लोकं विनाकारण त्याचा बाऊ करीत होते. विनाकारण कोरोनाची अफवा जास्तीत जास्त प्रमाणात पसरवीत होते नव्हे तर लोकं नशीब मानत नसल्यानं त्यांना कोरोनाची भयंकर भीती ही वाटतच होती.
आकाश लोकांना सांगायचा की कोरोना व्हायरस आला आहे आणि या ना त्या प्रकारे सत्यानाश करुन राहिला असून आपल्याला सावध राहाणे गरजेचे आहे. हा व्हायरस वूहानसारख्या शहरातून शेकडो किमीचा प्रवास करुन भारतात आला आहे. या व्हायरसची दहशतच माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास लोकं पाखरासारखे मरत आहेत. लोकांना सावरायलाही जागा नाही. कारण या व्हायरसवर निदान करण्यासाठी लस अजूनही प्राप्त झाली नाही.
त्रेतायुगात रामाला ज्यावेळी कैकयीने वनवास दिला. त्यावेळी लक्ष्मण कैकेयीला दोष देत होता.पण रामानं म्हटलं,
"हे लक्ष्मणा, माता कैकेयीला दोष देवू नकोस. कारण वनवास होणं हे विधीलिखीत होतं. तो वनवास आपल्या नशिबात होता."
द्वापरयुगात द्यूत खेळल्यानंतर व द्रोपदीही हरल्यावर याच प्रकारच्या द्रोपदीच्या प्रश्नाला उत्तर देतांना युधीष्ठीर तेच म्हणतो,
"द्रोपदी, दुर्योधन हा आपला अनुज असून हा वनवास व अज्ञातवास विधीलिखीत आहे अर्थात आपल्या नशिबात आहे."
असे असतांना या कलियुगात एखाद्या द्रोपदी किंवा एखाद्या लक्ष्मणाने जर कोरोना का आला? असा प्रश्न केल्यास कोणीतरी म्हणतात की हा कोरोना येणे विधिलिखीत होते. तो आपल्या नशिबात होता. मी बरेचदा काही लोकांच्या तोंडून हेच ऐकलंय.
अडाणी मत. देव चमत्कार करतो. या सगळ्या अंधश्रद्धा भरलेल्या. त्या चमत्कारापुढं माणुसकी हरलेली असून कोरोना जगातील कित्येक राक्षसासारखे माणसे मारत सुटलेला होता. तरी आजही आमचे डोळे उघडलेले नव्हते. आज आमचा देव कुलूपात बंद होता. तरीही आमचे डोळे उघडलेले नव्हते. आम्ही आजही दिव्य चमत्कारावर विश्वास करत होतो. होमहवनाला मानत होतो. कोणी होम हवन करायला सांगत तर कोणी गाईचं मुत्र प्यायला सांगत. तुपही लावायला सांगत. कोणी टाळ्या वाजवायला सांगत तर कोणी घंट्या वाजवायला, मेणबत्ती जाळायलाही सांगत. सरकारही तेच सांगत होतं. मात्र सरकारचा त्यामागं हेतू वेगळाच होता.
टाळी वाजवणे ठीक होतं. कारण त्यातून हातात उर्जा निर्माण होवून हातावरील जंतू मारले जातात. तसेच पंतप्रधानाने लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच एकत्रीकरण करण्यासाठी मेणबत्ती,लटाळीचा वापर केला. काहीतरी करण्यासाठी काहीतरी माध्यम हवं म्हणून. पण होमहवन करणं हे माध्यम नव्हतं किंवा अंधश्रद्धेचा वापर करणं हेही माध्यम नव्हतं. ते सरकारनं सांगीतलेलं नव्हतं. तूप किंवा गाईचं गोमुत्र कोरोना हटविण्याचं माध्यम नव्हतं. तसंच कोरोना काही विधीलिखीत नव्हता. तो नशिबाचाही खेळ नव्हता. त्यामुळं तो येणे नशिबात होता. विधिलिखित होता. असे म्हणणे धांदात खोटे होते. अशा अफवांना कोणीही बळी पडू नये व त्यावर विश्वास करुन वावरु नये. असं आकाश सांगत असे.
मात्र कोरोना काळात अडाणी मत असंच सांगत असून परिसरातील लोकं म्हणत,
"कोरोना नशिबाचा खेळ हाये जी, तो येणार होता. म्हून आला. त्याले का घाबराचं एवळं. ज्याच्या नशिबात मरणं असन, तो मरणच. मरण चुकणार तरी आहे का जी ?"
लोकांचं एकप्रकारे बरोबर होतं. नशीब मानावे. त्यामुळंच ग्रामीण भागातील लोकं बिनधास्त वावरत होते. कोरोनाला लोकं नशीब मानत होते. त्याला विधीलिखीत म्हणत होते. कोरोनानं मरण असेल तर कोरोनानं मरण येईल अन्यथा नाही. असंही म्हणत होते. पण आकाश म्हणायचा की होय, ज्याच्या नशिबात मरण असेल, तो मरेलच. मरण चुकणार नाही. पण थोडी काळजी घेतल्यास मरण काही काळ तर पुढं ढकलता येईल नं तुमचं. तुम्ही जर हाच विचार करुन बिनधास्तपणे वावरत राहिले तर कोरोनाचे वाहक बनणार नाही का? कोरोना तुम्हालाही लागेल व तुमच्या घरातील लोकांनाही आणि तुमच्या परीसरातील लोकांपाठोपाठ तुमच्या देशालाही. कोरोनाची लागण तुम्हाला होणे हे काही तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही. ज्या मनूस्मृतीत माणसानं कसं वागावं हे कित्येक पिढ्यांपुर्वी लिहिलं होतं.त्या कित्येक पिढ्यांपासून तशाच प्रकारे माणसं वागत होती. कोणी विरोध करीत नसत. ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी एका झटक्यात जाळून टाकली. वेळ लावला नाही. नशीब माणसालाच घडवता येतं. कोणी चमत्कार करीत नाही वा कोणाला घडवता येत नाही. मात्र एक गोष्ट नक्की करता येईल की नशीब मानून नक्कीच कोरोनावरील भीती नष्ट करता येईल.
आकाश म्हणायचा की आपण केवळ नशिबाला हवाला देवून डॉक्टरकडे गेलो नाही तर आपण उद्या मरायचे ते आजच मरु. नव्हे तर कित्येकांना मारुन मरु मानवी बाँब बनून. ठीक आहे, तुम्हाला मरायचे आहे तर खुशाल मरा. पण ज्यांना मरायचे नाही. त्यांना मारु नका जबरदस्तीनं नशिबाच्या नावावर. कारण तुमच्यासारखंच नशिब सर्वांचंच लिहिलेलं नाही. नशीब बदलता येतं. कोरोना वाहक बनून नाही तर घरातल्या घरात बसून. हातपाय स्वच्छ ठेवून. त्यामुळं नशिबाला दोष देवू नका. नशीब घडविण्याची ताकद याक्षणी तरी तुमच्याजवळ आहे. तुम्ही घरातच बसल्यास वा स्वच्छता बाळगल्यास या कोरोनावर मात करुन वागलात काही दिवस तर काहीतरी नक्कीच करु शकाल. नशीबही तुम्हाला तुमच्या मनानुसार घडवता येईल. यात काही दुमत नाही. फक्त त्यासाठी नशीबावर अवलंबून राहू नका. अन् नशीबावर विश्वासून बाहेर पडू नका. नाहकच कोरोना वाढवून डॉक्टर, नातेवाईक, पोलिस आणि आपले सरकार यांना त्रास देवू नका.
कोरोना दहशत रान माजवल्यासारखी भावना.सगळे घाबरलेले. कोणी कोरोना गो म्हणत. पण कोरोना जा म्हटल्यास जावू शकत होता का? याचं उत्तर नाही असंच होतं. कोरोना कधी जा म्हटल्याने जाणार नव्हता. ये म्हटल्यानं येणार नव्हता.
कोरोनावर लसी काढण्याचं काम हमखास सुरु होतं. इटलीनं दावा केला होता की कोरोना लस काढली व अमेरिकेला टेस्टींग साठी पाठवली. लस शोधण्याचे प्रयत्न प्रत्येक देश हिरीरीनं सर्वतोपरी करीत होते. सर्वतोपरी होत होते. पण असे असतांना हा कोरोना लोकांची सुटका जन्ममृत्यूच्या फे-यातून करेल काय की बस सर्वांनाच यमसदनी पोहोचवेल. हा प्रश्न जनमाणसासमोर उभा ठाकलेला होता.
जन्म आणि मृत्यू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून जो जन्म घेईल, तो मरणार असा नियमच आहे पुर्वीपासून. मग तो प्राणी असो की जीवजंतू. सगळा नशिबाचा खेळ. कोणी म्हणत की कोरोना विधीलिखीत होता. तो येणार होता.त्याची दहशत माजणारच होती. त्याच्यानं माणसं मरणारच होती. हे सगळं लिहिलेलं होतं. जन्माच्या सहाव्या दिवशी येवून सटवीनं नशिबात जी अक्षर लिहून दिली. ती अक्षरे कोणी मिटविणार नाहीत. ते घडेल ते घडेलच. कोरोनान मरणं असेल तर मरेलच. बरोबर होतं त्यांचं मत एका अर्थानं विचार करता.
आकाशला वाटायचं की जन्म आणि मरण हे सटवीनं लिहिलेली अक्षरे. मग कोरोनाच्या साथीत लोकं मरणार हेही सटवीनं जर लिहिलं तर लोकांनी खुशाल बाहेर पडावं. लाकडाऊनची गरज नाही. लोकांना उपासमारीनं मरण्याचीही गरज नाही. तसेच लोकांसाठी जेवनाची व्यवस्था करण्याची गरज नाही.
डॉक्टर बाबासाहेबांनी जर विचार केला असता की आम्हा दलितांचा जन्म हा सटवाईनं लिहिलेला असून तो जन्म बदलविण्याची आम्हाला गरज नाही तर ते समाजसुधारणा करुन अस्पृश्यता निवारण करु शकले नसते.
आज कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले होते. लाकडाऊन जरी असला तरी लोकं सुरक्षीत अंतर पाळत असलेले दिसत नव्हते. एकमेकांना हाथ लावत होते. कोणी जाणूनबुजून तर कोणी नजरचुकीनं. कोणी लोकं एकमेकांच्या घरी जात जाणूनबूजून पाहुणे म्हणून नव्हे तर या माध्यमातून कोरोना पसरवत असत. कोरोनाची साथ जरी महाभयंकर असली तरी ह्या कोरोनाला रोखता येत असतांना लोकं त्याला रोखण्याचा विचार न करता वाढविण्यास मदत करीत होते. काय होते म्हणत तसेच नशिबाचा खेळ म्हणत लोकांचं असं वागणं. त्यातच प्रचंड गर्दी करणं हे कुठतंरी डोक्याला विचार करायला लावणारी बाब होती. असंच जर सुरु राहिलं तर कोरोना आमच्यावरही वार करेल.मग सटवीनं आमचं कितीही चांगलं नशीब लिहिलं तरी जाणूनबूजूनच्या लोकांच्या वागण्यानं काही बेगुन्हेगार लोकंही जन्ममृत्यूच्या फे-यात सापडून मरुन जातील हे विसरता कामा नये. असं आकाशला वाटत होतं.
मस्तकावर कोणतीही सटवाई अक्षर टाकत नसून कोरोनाच्या लढाईत तसं समजण्याची गरज नव्हती. असं जर असतं तर आजही त्याच जुन्या परंपरा रुढी सुरु राहिल्या असत्या. लोकांनी ऑपरेशन न करता दहा दहा, बारा बारा मुलं पैदा केली असती. बालविवाह झाले असते व कित्येक लहान मुलींना लोकांनी सती म्हणून पतीच्या चितेवर पाठवलं असतं.
कोरोनाला हद्दपार करायचे होतेे. सामुहिक ताकद लावून. निव्वळ कोरोना गो म्हटल्यानं कोरोना जाणार नव्हता. त्यासाठी कोरोना गो चे सर्व नियम पाळावे लागत होते. जेणे करुन अल्पावधीतल्या मृत्यूपासून तरी लोकांची सुटका करता येवू शकत होती.
देशातच नाही तर जगात प्रदुषण फार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. प्लास्टीकवर बंदी जरी असली तरी चोरुन लपून लोकं प्लास्टीकचा वापर करीत होते. अशातच कोरोना आला व संपूर्ण जगात लाकडाऊन लागलं गेलं. हे लाकडाऊन बरंच काळ चाललं. त्यामुळं काय पृथ्वीवरील ओझोनच्या आवरणाला जे छिद्र पडलेलं होतं. ते छिद्र........ज्या छिद्रातून जी सुर्याची अतिनील किरणं घातक होती. ती पृथ्वीवर यायची. ती येणं बंद होणार होतं नव्हे तर त्या गोष्टीनं पृथ्वी वासीयांची सुरक्षा होणार होती.
देशात खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढलेलं होतं. ध्वनीप्रदुषण, वायूप्रदुषण, पाणीप्रदुषण,त्याचबरोबर मनप्रदुषणही. त्यामुळं कुठं ध्वनीतून आजार, कुठं श्वसनातून आजार, तर कुठं थुंकण्यातून आजार निर्माण होत होते. कुठं मनप्रदुषणातून चो-या, डकैती, खुन, फसवेगीरीही.......प्रदुषणानं कहर माजवला होता. त्यामुळं पृथ्वीच्या आवरणावर त्याचा परीणाम झाला होता. पृथ्वीवरील रहिवाशी लोकांवरही. महत्वाचं म्हणजे प्रदुषणाचे जे प्रकार आहेत. त्यात वाढ झाली होती.
आवरणाचे तीन प्रकार आहेत. वातावरण, जलावरण, शिलावरण. या तीनही आवरणात प्रदुषण आहे. कारखान्यात वाढ झाली. त्या कारखान्यातून निघणारा जो धूर होता. त्या धुरातून सल्फर डाय आक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड निघून व वातावरणात पोहचून वातावरण विषारी झाले. तसेच त्याच कारखान्यातून निघणा-या सांडपाण्यानं पाणी प्रदुषीत झाले नव्हे तर त्या कारखान्यातून निघालेल्या पांढ-या राखेतून जमीनही प्रदुषीत झाली. त्यानुसार पाणीप्रदुषण, पाणीप्रदुषण अतोनात वाढलं. याचा परीणाम शेतीवर होवून शेती पीकत नव्हती.
आता आणखी एक समस्या वाढली होती. ती म्हणजे ध्वनी प्रदूषण. आता शहरातच नाही तर गावागावातही प्रदुषण वाढलं होतं. पाणी, वायू, त्याचबरोबर ध्वनीही........
परंतू हे जरी खरं असलं आणि यामुळे झालेल्या पृथ्वीच्या वातावरणावरील परीणाम लक्षात घेता आता अशातच कोरोना व्हायरस आला. त्यात संबंध देशच काय, जगही प्रदुषणमुक्त झाले असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरेल काय तर याचं उत्तर नाही असं येईल. कारण कोरानाच्या या संकटातून देशाला वाचविण्यासाठी पुर्ण जगात लाकडाऊन लागलं. सर्व जगानं आपआपली शहर लाकडाऊन ठेवली. त्यानुसार लोकं घरातच राहायला लागले. जगाने विमान उड्डाण, रेल्वे, बसप्रवास सारं बंद केलं. त्यामुळे गाड्या बाहेर पडल्या नाहीत. कारखान्यातून दुषीत हवा निघाली नाही. या लाकडाऊन च्या काळात कारखान्यातलं सांडपाणी निघालं नाही. तसेच राखही जमानीवर पसरली नाही.लोकं रस्त्यावर आली नाही. गाड्यांचा आवाज नव्हता. लग्नात बँडचा आवाज नव्हता. डीजे दिसला नाही. मोबाईल रिचार्ज बंद झाले. कारण पैसे संपण्याची भीती लोकांच्या मनात होती. याचा परीणाम हा झाला की ध्वनी प्रदूषण काहीअंशी का होईना, ध्वनीप्रदुषण थांबलं. पाणीप्रदुषण बंद झालं आणि वायूप्रदुषणही. कारण हे प्रदुषीत करायला जे घटक जबाबदार होते. ते घराच्या अंदर होते.याचाच सर्वात मोठा परीणाम हा झाला की ज्या सुर्याच्या अतिनील किरणानं पृथ्वी वाचू शकत नव्हती. या सर्व प्रकारच्या प्रदुषणानं पृथ्वीच्या आवरणात जे छिद्र पडलं होतं. जे सुर्याचे तापमान या ओझोन वायूच्या वातावरणीय छिद्रानं जास्त जाणवत होतं. ते आता कमी जाणवलं. सुर्याच्या अतिनील किरणाच्या विषारी प्रभावानं ज्या पृथ्वीवरील वातावरणीय बदलाला घायाळ केलं होतं. ते या कोरोनाच्या निमित्ताने का होईना बंद झालेलं होतं. कारण वातावरणाला पडलेलं छिद्र बंद झालेलं आहे असा दावा शास्रज्ञांनी केलेला होता.
महत्वाचं सांगायचं म्हणजे खरंच पृथ्वीच्या या वातावरणातील छिद्राला कोरोना संकट फायदेशीर ठरले काय? खरंच याने छिद्र बंद झाले होते काय? पण ते पाहणे लोकांचे काम नव्हते. ते शास्रज्ञाचे काम होते. परंतू एक गोष्ट नक्की की हा बदल जो झाला, तो बदल अतिशय चांगला झाला. कारण बहुतःश जगातील सगळी मंडळी घरात होती. त्यांनी या काळात काहीच प्रदुषण केले नाही व तेच तत्व उद्याही टिकवून ठेवायचे आहे. असं शास्रज्ञ मानत होते.
प्रदुषण जरी तीन प्रकारचं असलं तरी चवथाही प्रकार आम्हाला आज पाहायला मिळत होता. तो प्रकार म्हणजे मनप्रदुषण. लोकांची आजच्या काळात मनही प्रदुषीत झालेली होती, ज्याप्रमाणे मोबाईलवर बोलण्याने ध्वनीप्रदुषण होवून पक्षांवर परीणाम होवून पक्षी मरण पावले. त्याचाच परीणाम हा झाला की माणसावर या मोबाइल वर बोलण्याचा परीणाम झाला. कुठे याच मोबाईलच्या माध्यमातून हत्यासत्र घडलं. केवळ मोबाईलवर बोलण्यानं नाही तर या मनाच्या माध्यमातून कुठं कुठं खुन, बलत्कार इत्यादी प्रकार घडले. त्या मनाच्या प्रदुषणालाही रोखण्याची आज गरज होती. ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटातून पाणी, वायू आणि ध्वनीप्रदुषणाला आपण काही अंशी थांबवलं. त्याचबरोबर आपल्या मनाच्या प्रदुषणालाही आपण याच कोरोना संकटातून थांबवलं होतं. परंतू आता जास्त काळ' लाकडाऊन ठेवता येणार नव्हतं. कारण उपासमारीनं लोकं मरु शकतात. असं सरकारला वाटत होतं. कोरोना संकट जरी असलं तरी लोकांना उपासानं मरु द्यायचं नाही. सरकारजवळ धान्य जरी असलं तरी करोडो रुपयाचं जे नुकसान होत होते. ते नुकसान कधीही भरुन निघू शकणार नव्हते. तेव्हा कोरोना संकट जरी असलं तरी ते संकट मानून न घेता आता कामं करावी. पण सावधानता बाळगून. तसेच कुठेही पुर्वीसारखे खर्रे खावून थुंकू नका. थुंकीनं भींती रंगवू नका. कारण त्यातून कोरोना पसरु शकतो. तसेच कामावरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा. जमेल तर अंघोळ करुन घ्या.लत्याबरोबर मनही स्वच्छ ठेवा. मनालाही धुवून घ्या.पाण्यानं नाही तर चांगल्या विचारानं. कोरोनापासून नक्कीच हा बोध जरुर घ्या. चांगल्या विचारानं मनाचं प्रदुषण थांबवा. तेव्हाच बलत्कार, खुन आणि फसवाफसवीचे प्रकार बंद होतील. असं पदोपदी समाजसेवक म्हणत होते.
अभिलाष गावला गेला होता. त्याला भावाची चिंता होती. मोबाईल बंद असल्यानं संपर्क होत नव्हता. तसं पाहता मोबाइल आकाशजवळ असला तरी त्यात रिचार्ज करायला पुरेसा पैसा नव्हता. कारण पोटाचा प्रश्न सोडवितांना जो पैसा लागत होता. तो पैसा आज आकाशजवळ नव्हता.
कोरोना व्हायरस लोकांना छळत होता. सरकारन लाकडाऊन करुन पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. काही काही लोकांनी तर लाकडाऊन जबरदस्तीनं तोडलं. लोकं महिनाभर घरात राहिल्यानं उपासमार होवू लागली. त्यातच आंदोलनंही. कारण लोकं त्रासले होते. म्हणून सरकारनं लाकडाऊन खोलायचं ठरवलं.
लोकं ऐकत नाहीत. म्हणून सरकारनं लाकडाऊन उघडायचं ठरवल्यावर लोकं आनंदित झाले. त्यांना आता कोरोनाचं भय राहिलं नाही. त्यातच आता उपासानं मरण्यापेक्षा कोरोनानं मरु अशी हिंमत लोकांनी आपल्या मनात निर्माण केली. तसेच प्रतिकारशक्तीही अशाच प्रकारची तयार झाली. पण खरंच कोरोना लोकांच्या हिमतीला ऐकेल काय? असं वाटायला लागलं होतं. मग काय, लाकडाऊन उघडताच कोरोनाला मोकळे रान भेटले आणि देशात तीव्र गतीने कोरोना वाढायला लागला. नागपूरचं उदाहरण द्यायचं झालं तर आकडा आटोक्याबाहेरच होता. काय करणार. सरकारपुढेही पेच निर्माण झाला.
कोरोना संक्रमीत होणारा रोग आहे. तो लाकडाऊन करा की उघडा. त्याला फरक पडणार नव्हता. लाकडाऊन केले तर कासवगतीने आणि उघडले की सशाच्या वेगाने. तसेच त्यावर सध्या तरी उपाय न निघाल्याने त्याची भीती. त्यातच वादळं, पाऊस भुकंपही.......
ही महामारी होती. ही महामारी त्या पुराण कथेची आठवण करुन देत होती की हे मनु,महाप्रलय येणार आहे. तेव्हा सावध हो. मी नाव तयार करुन ठेवणार आहे. त्या नावेत जे जे कामाचे आहे. ते ते घे. पशुपक्षी सारं काही. कारण महाप्रलय तो. कोण वाचेल कोण नाही, हे सांगता येत नाही. महाप्रलयाचे वेळी मी मासा बनून येईल. तू माझ्या शिंगांना नाव बांध. मी तुला मेरु पर्वतावर घेवून जाईल.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही दंतकथा आहे की नाही कुणास ठाऊक, पण या कथेची आठवण सर्वांना होत असेल. कारण या कोरोनाच्या महामारीत परिस्थितीच तशी दिसून येत होतीे.
एकीकडे कोरोनाची जागतिक महामारी सुरु असतांनाच महाराष्ट्रात वादळ आलं. तसेच त्या वादळानं मुंबईसह भरपूर ठिकाणची घरं पडली. टिना, कौलं फुटले. झाडंही जमीनदोस्त झाली. खुप वित्तीयहानी झाली. त्यातच कोरोनात महाराष्ट्राचा आकडा इतर राज्याच्या मानाने जास्तच होता. त्यातच तो अजून वाढतच चालला होता. त्यामुळं लोकांना आश्चर्य टाकणा-या या घटना. निसर्ग एकीकडे कोरोनासारखा आजार देत आहे आणि दुसरीकडं वादळं, भूकंप देत आहे अर्थात निसर्गाला सगळं नष्ट करायचं आहे की काय असं वाटत होतं. अशावेळी लाकडाऊन ही उघडले होतेे.
सरकारने माँल, चित्रपटगृहे उघडले होते. दुकानही सुरु केले होते आणि आता शाळा सुरु करणार असाही निर्णय ते घेण्याच्या संभ्रमात होते नव्हे तर घेणारच होते.
कोरोनाची साथ सुरु असतांना समजा लहान मुलांना शाळेत आणलंच आणि पुरेसं अंतर पाळत शाळा सुरुही केली. तरी काय कोरोना वाढणार नाही काय? ठीक आहे. वर्गात मुले सुरक्षीत अंतर पाळून बसवली. त्यांना लवकर सुटी दिली. तरी ती लहान लहान मुलं एकमेकांना हात लावणार नाहीत काय? समजा यामधील एखाद्याला कोरोना असला तर तो कोरोना इतरांना होणार नाही कशावरुन?
लहान मुलांचे नुकसान होत होते अभ्यासाचे, त्यामुळे त्यांच्या वाट्याला जावू नये. असं सरकार विचार करीत असेल की त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होते.पण ते जीवंत जर असतील तर भरपूर काही शिकून घेतील. त्यासाठी ते जीवंत असणं गरजेचं होते. शिवाय एकवर्ष नाही गेली शाळेत तर काय बिघडणार होते. ते शिकणार नाहीत असं सरकारला वाटत होते. त्यांचं नुकसान होईल असं सरकारला वाटत होते. पण नुकसान कसे होणार?
एक आपण ऐकले असेल की अनुभव हा देखील एक गुरु असतो. विद्यार्थी हे सतत शिकत असतात. शाळेत ते किती वेळ असतात. फक्त पाच ते सात तास. त्या पाच तासात ते जेवढे शिकत नाहीत. त्याहीपेक्षा जास्त ते परीसरातून शिकतात. घरची सगळी कामं ते बिनाबोलानं शिकतात. जे काही काही विद्यार्थ्यांच्या पोट भरायच्या कामात येते. निसर्गातील सर्वच फुलपाखरांची नावं पुस्तकात नसतात. तरीही विद्यार्थ्यांना माहित असतात. कोणत्या झाडाचं रोपटं हे कसं असतं हे शिक्षकांना देखील माहित नसतं, ते विद्यार्थ्यांना माहित असतं. सापाची निरनिराळी नावं ते पटकन सांगतात. आम्ही आमच्या पुस्तकातून दोन चारच जाती शिकवतो. जे त्यांना शिकवतो ना आम्ही. ते आम्ही नाही शिकवले तरी विद्यार्थी अनुभवातून शिकत असतात. त्यामुळं त्यांचं नुकसान होत आहे. हे कुणीही समजून घेण्याची गरज नव्हती.
आमची शिक्षण पद्धती ही साचेबंद आहे.आम्ही चौफेर शिक्षण देत नाही. फक्त साचेबंद शिक्षण शिकवतो. पाण्याला उष्णता दिल्यास ते गरम होतं असं आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. पोळ्या बनवणे, भाजी, भात बनवणे हे शाळेत शिकवले जात नाही. तरीही आम्ही शिकतोच.
पुर्वी तर आश्रम पद्धती होती. मुले शिकत नव्हती विशिष्ट वयात आल्याशिवाय. जेव्हा मुलांची कानाला हातं पुरायची, तेव्हा मुलं आश्रमात प्रवेश मिळवीत. त्यांना आश्रमात सर्वच कामं करावी लागायची. झाडांना पाणी घालणे. पीक पिकवणे. आपले जेवन बनवणे, स्वतःचा ताट स्वतःच धुणे, जंगलात जाणे, जडीबुटी शोधणे, तसेच लाकडे आणणे. यातूनच मुलं पुर्ण शिक्षण शिकायची. पण जसाजसा काळ बदलला. तसंतसं शिक्षण बदललं. शिक्षणाच्या कक्षा बदलल्या.
शिक्षणाच्या कक्षेबरोबरच लोकसंख्या वाढली व महागाईही. त्यातूनच पोट भरण्यासाठी माय बाप दोघंही कामाला जावू लागली. मुलं परिसरात खेळू लागली. दंगामस्ती करु लागली. तेव्हा त्या मुलांना वळण लावायचं कसं? मुलं ठेवायची कोणाजवळ? म्हणून शाळेचे अवास्तव महत्व वाढले.लते एवढे वाढले की फँशनच झाली. आज तीन वर्ष झाले की मुलांना शाळेत घातलं जातं. त्यांच्या बालमनाची हत्याच केली जाते. जे वय खेळायचं असतं. त्या वयापासून त्याला शाळा, शाळेतील शिक्षीका. तो वर्ग, वर्गात चूप बसण्याचं दंडक, सर्व काही. त्याचं स्वातंत्र्य जे थोड्या दिवसांसाठी का होईना ते हिरावलं जातं. खरंच त्या वयात शिकण्याची तरी मानसिकता असते का? तरीही आम्ही या फँशनच्या काळात आम्ही कुठे कमी नाही म्हणत शिकवतो व शाळा बंद असल्यास नुकसान होत आहे असे समजतो. हे काही बरोबर नाही.
कोरोनानं तर पालकांच्या मनावरही राज्य केलं होतं. मुलांच्या इवल्याशा वयातलं हिरावलेलं स्वातंत्र्य कोरोनानं मिळवून दिलं होतं. जणू कोरोना हेच सांगत होता की क्षणभर विचार करा. पालक या नात्याने. सरकारनेही पालकांचा पालक या नात्याने विचार करावा व कोरोनाच्या या महामारीत शाळा सुरु करायची घाई करु नये. कारण बालकाची सुरक्षा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शिक्षण होईलही पुढे. पण जीव असेल तर. जीव जर नसेल तर शिक्षण कुचकामाचे ठरेल याचा विचार करण्याची गरज आहे.
शिक्षणतज्ञ म्हणत होते की फुलपाखरांना फुलपाखरासारखं काही दिवस स्वच्छंद उडू द्यावे.कोरोनावर उपचार निघू द्यावा. मगच शाळा उघडाव्या. विनाकारण नुकसानीच्या नावावर निरागस मुलाचा जीव धोक्यात घालू नये. त्यांचंही बरोबर होतं. कारण जेव्हा शाळा उघडल्या गेल्या, त्यावेळी परत एकदा लाकडाऊनची स्थिती निर्माण झाली होती नव्हे तर पुन्हा काही ठिकाणी लाकडाऊन लागलं होतं.
कोरोना व्हायरस आला आणि सर्वच क्षेत्र बहुतःश निकामी झालं. मग ते व्यापारी क्षेत्र असो की अजून कोणते. त्यानं कोणत्याच क्षेत्राला सोडलं नव्हतं. अजुनही काही दुकानं उघडलेली नव्हती आणि काही प्रतिबंधीत क्षेत्र खुली झाली नव्हती.
हे तर इतर क्षेत्रातील झालं. शिक्षण क्षेत्रातही शिक्षणाचा बोरा वाजलेला दिसत होता बरेच दिवस शाळा सुरु झालेल्या नव्हत्या. सरकार म्हणत होतं की कोरोना अजुनही आटोक्यात आलेला नसून आम्ही या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवू. योजना बरी होती.बरोबरही होती. कारण आजच्या काळात सर्वांजवळ स्मार्टफोन होता. त्यांचे फोन ऑनलाईन नेटवर असायचे. पण हे जरी वरवर खरं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे खरं नव्हतं. कारण अजुनही ब-याच लोकांजवळ ऑनलाइनचे मोबाईल नव्हते.
ऑनलाईन वर्ग शिकविण्याच्या दृष्टीकोनातून विचार करीत असतांना ज्यावेळी प्रत्यक्षात ऑनलाइनचे मोबाईल नंबर जेव्हा पालकांना मागीतले, तेव्हा उत्तरं मिळालीत की सर आमच्याकडे ऑनलाइनचे मोबाईल नाहीत. बाजूचे नंबरं द्या असं विचारताच त्यांनी सांगीतलं की बाजूची मंडळी साधा फोन आल्यावर देत नाहीत. काही जणांनी सांगीतलं की सर इथं पोटाची सोय करायला पैसे नाहीत. कामधंदे बंद आहेत. कुठून टाकणार मोबाईल मध्ये पैसे. महागाई वाढली आहे. नेट पैकेज काही फ्री नाही की प्रत्येक पालक आपापल्या मोबाईल मध्ये नेट पैकेज टाकेल. तसेच कोरोनानंतर बाजार जरी उघडला असेल तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगणाला पोहोचले आहेत. पेट्रोलमध्ये ही वाढ झाली आहे. त्याचबरोबर सर्वच वस्तूंमध्ये वाढ झाली आहे.
कोरोनाच्या या काळात सामान्य माणसाची गोची झालेली असून सामान्य माणूस याच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सतत घरात बसलेला होता. तो नुकताच कामाला जरी लागला असला तरी त्याला आतापर्यंत रिक्त झालेली तिजोरी नव्हे तर झालेले नुकसान भरुन काढायचे होते. अशावेळी लोकांच्या जवळ मोबाईल जरी असले तरी लोकांच्या मोबाईल मध्ये नेट टाकायला पैसे नव्हते. काहींजवळ तर ऑनलाइनचे मोबाईलच नव्हते तर काहींजवळ साधे देखील मोबाईल नव्हते. अशावेळी ऑनलाईन शिक्षण जरी घ्याायचे झाले तर ते घ्यावे कसे? हा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला होता.
ऑनलाईन शिक्षण द्यावे कसे? हा प्रश्न शिक्षकांनाही पडलेला होता. पण आपल्याला पगार मिळतो ना हाच एकमेव उद्देश घेवून तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत परिस्थितीशी जुळवून घेत हो ला हो करीत शिक्षकही गप्प होते. खरंच यातून शिक्षणाची ऐसीतैसी होत जरी असली तरी दोष कोणाला द्यायचा हा ही नवा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. यातून मार्ग कसा काढता येईल यावर विचार करणे सुरु होते. कारण कोरोना आजच संपणारा आजार नव्हता. त्याला संपवायला बरेच दिवस लागणार होते. त्याला शमविण्यासाठी अजून लोकांची मानसिक तयारी झालेली नव्हती. ज्यावेळी मानसिक तयारी होईल,तेव्हा नक्कीच कोरोना संपेल. असं वाटत होतं. तोपर्यंत शिक्षणाची ऐसीतैसी जरी होत असली तरी ती ऐसीतैसी आपल्याला सहन करावी लागेल. घाई करु नये.नाहीतर ह्याच कोरोनाला संपवीत असतांना कोरोनाच आपल्याला संपवून जाईल हे ही लक्षात घेण्याची गरज होती. प्रत्येकजण शहाणे हेच सांगत होते. मात्र अर्धशहाणे त्यांचं ऐकतील तेव्हा ना.
कोरोना व्हायरस पाहुणा म्हणून आला असला तरी आता स्थिरावण्याचा प्रयत्न करीत होता. या पाहुण्यानं हळूहळू करीत देशातील सर्वच बाबीवर परीणाम केलेला होता. त्यामुळं व्यापार, उद्योग, खाजगी काम, घरगुती काम, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रावर परीणाम झालेला दिसून येत होता.
सरकारनं या कोरोनाच्या पसरणा-या बाबींचा विचार करुन काही काही खासगी क्षेत्र सुरु केलेली होती. त्यातच कोरोना होवू नये म्हणून दक्षता ही घ्यायला लावली होती. मास्क बांधणे, सुरक्षीत अंतर पाळणे इत्यादी निर्बंध लावले होते. तरीपण लोकं आज हा आजार एवढा वाढत असला तरी काळजी घ्यायला तयार नव्हते. सुरक्षीत अंतरही पाळायला तयार नव्हते. तसेच काहीतर तोंडाला मास्क बांधायला तयार नव्हते. सानिटायझर लावणं तर दुरच.
सानिटायझरच्या शंभर एम एलची बाटल शंभर रुपये असल्यानं व जवळ लॉकडाऊनमुळं पैसे नसल्यानं लोकं सानिटायझर वापरायला तयार नव्हते. तसेच पाहून घेवू असे म्हणत साबनानं हात धुवायलाही तयार नव्हते. एवढंच नाही तर नशीबावर या सगळ्या गोष्टी सोडून लोकं सैरावैरा फिरत होते. ज्यांना कोरोना झाला, तो मात्र आपली आपबीती सांगत होता. त्यातच त्वचा कोरडी होते असा बहाणा करुन काही लोकं वारंवार साबनानं हात धुवायला तयार नव्हते.
लोकं आपल्याला काय होते असे म्हणत वावरत. मास्क बांधत नव्हते. म्हणून सरकारनं त्यावर कडक निर्बंध म्हणून एक हजार रुपये दंड ठेवला होता. परंतू लोकं दंड स्विरारायला तयार होते. पण मास्क बांधत नव्हते. त्यातच सरकारनं काही काही क्षेत्र सुरु केल्यानं त्याचा परीणाम गर्दी वाढण्यावर झाला व हल्ली झपाट्यानं कोरोना पसरायला लागला होता.
सरकारी क्षेत्राची तर गोष्ट वेगळीच होती. सरकारी क्षेत्रातही कर्मचा-यांची आता पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य केलेली होती. त्यातच पंच्चावन वर्षापेक्षा जास्त वयाचे, सतत आजारी पडणारे, मधुमेह व रक्तदाब असणारे कर्मचारी अनिवार्य केलेले नव्हते. तरीपण काही सरकारी क्षेत्रे पंचावन वर्षापलिकडील कर्मचा-यांना त्रास देण्याच्या मानसिकतेनं कामावर बोलावतांना आढळत. वेगवेगळ्या आजारानं त्रस्त असलेल्याही लोकांना सरकारी कामावर बोलावतातच. असे चित्र दिसत होतेे.
शाळेच्या बाबतीतील विचार केल्यास काही लोकांना शाळेची मोठी घाई येवून पडली होती. आपली मुले घरीच राहू नये. असं समजून तीन वर्षही व्हायच्या पुर्वीच शाळेत नाव टाकणा-या व बालपण हिरावणा-या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी नव्हती. पण त्यांच्या अभ्यासाची काळजी होती. ते सतत विचारत होते की शाळा केव्हा सुरु होईल.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा कशी सुरु करावी हा विचार सर्व शिक्षकवृंदच नाही तर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सरकारलाही पडला होता. पण निर्णय घ्यायचा कसा? कारण हा तर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न होता. म्हणून काही लोकांनी यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाची योजना मांडली. त्यातच काही भागात विद्यार्थ्यांच्या पालकांजवळ ऑनलाइनचे मोबाईल नव्हते तर ज्यांच्याजवळ होते, ते शिकायला तयार नव्हते. कारण नेटच्या किंमती ह्या अशा पालकांना परवडणा-या नव्हत्या. याचे कारण जिथे आज लॉकडाऊनमध्ये खायला पैसे नव्हते, तिथे नेट टाकायचा कुठून? हा प्रश्न उभा होता. अशातच काही लोकांनी काही सुशिक्षीत पालक जमवून ऑनलाईन शिक्षण शिकवायला सुरुवात केली. परंतू त्याच ग्रुपवर काही महाभागांनी अश्लील मेसेज पोस्ट केल्यानं गडबड झाली. मग अँडमीन असलेल्या शिक्षकासह त्या ग्रुपवर कारवाई झाल्यानं शिक्षकही धास्तावले की मुलांना शिकवावे कसे? यातच सरकारच्या हालचाली दिसत होत्या. कोणी मुक्ताफळे उधळत की ऑगस्ट महिण्यात शाळा सुरु करु. कोणी सप्टेंबरही लागत.
शाळा कशी सुरु करता येईल. ऑनलाईनही कसं शिकवता येईल? यावर खरंच विचार करण्याची गरज होती. ऑनलाईन शिकवलं तर काही लोकांकडे स्मार्टफोन नव्हते. काहींकडे होते तर ते नेट टाकू शकत नव्हते. काही टाकत होते तर त्यांचे ग्रुप बनवून शिकविल्यास काही महाभाग अश्लील मेसेज पोस्ट करत. कारवाई करतांना ज्याने तो मेसेज पोस्ट केला,त्याच्यावर न करता संपुर्ण ग्रुपवर व अँडमीनवर होत होती. तसेच या अश्लील मेसेजमध्ये चूक मेसेज करणा-याची असूनही बदनाम शिक्षकच होत होता. त्यातच ग्रुपवर ज्या विद्यार्थ्यांची नावं असत. त्यांना वैयक्तीकपणे मुलांचे मेसेज जात. ते मेसेज पालकांना दिसल्यावर कारवाई तर होणारच होती.
कारवाई व्हायला हवी. पण अँडमीन वर नको. कारण त्यांचा यात कोणता दोष? जिथे आपण आपल्या जन्म दिल्या मुलांच्या मनातील भाव ओळखू शकत नाही.तिथं या तरुण विद्यार्थ्यांच्या मनातील भाव कसे ओळखणार! अर्थातच ऑनलाईन शाळा सुरु करणे शक्य नाही. असं ग्रुप अँडमीन म्हणत होते. जो तो अशा अश्लिलतेमुळं व कारवाईमुळे ऑनलाइन शिक्षण शिकवायला तयार नव्हता.
काही लोकं निर्णय की ऑनलाईन शाळा जरी सुरु केली तरी ते समजणार कसं? त्यापेक्षा अशा सार्वजनिक शाळा सुरु कराव्या. ज्यात मुलांना शाळेत बोलवावे. तीन तीन दिवसाची, तीन तीन तासाची शाळा घ्यावी. मुलांना स्वतःच्या चटया आणायला लावाव्या.सुरक्षीत अंतर पाळायला लावावं. सानिटायझर किंवा साबण वापरायला लावावं. मास्क बांधायला लावावं. पण हे तरी शक्य नव्हतं. जिथं आपण मोठीच माणसं सानिटायझर वापरु शकत नाही. एक हजार दंड भरतो. पण मास्क वापरत नाही. पोलिस दिसले की मास्क लावतो. पोलिस गेले की काढून फेकतो. तिथं ही तर मुलं. लहान वयापासून तर मोठे वय असलेली मुलं. त्यांना यामधील काय कळतं? तेव्हा तुर्तास तरी शाळा बंदच ठेवावी. जेव्हापर्यंत कोरोनावर हमखास उपाय सापडत नाही. विनाकारण मुलांच्या जीवाशी खेळून कोरोनाच्या महामारीत त्यांच्या जीवाचा अंत करायला नको. एक वर्ष घरी बसल्यानं काही होणार नाही. पण जर का हा व्हायरस अंगावर चालून आलाच तर ते जीवावर बेतेल. कारण कोरोना ही महामारी असून ती जग संपवायला लागली आहे. हे जागतिक कोरोनाच्या आकड्यावरुन लक्षात येते.हे विसरुन चालणार नाही. असं जो तो सांगत होता. महत्वाचं म्हणजे स्वच्छता पाळा, सुरक्षीत अंतर ठेवा व मास्क वापरा. अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच आनंदी जीवन जगा. ही आपली कोरोनाची लढाई आहे. ही आपण नक्कीच जिंकू. पण तुर्तास कोणत्याही गोष्टीची घाई न करता संयम पाळायला शिका. कोराना हा पाहुणा म्हणून आला आहे. तो कधी ना कधी एक दिवस निघून जाईलच हे लक्षात ठेवा. असेही काहीजण म्हणतच होते.
कोरोना व्हायरसनं नाकी नव आणलं होतं. दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत होती. तसेच भीतीच्या सावटाखाली देशातील जनमानस वावरत होते. असे असतांना शाळा सुरु करण्याची घाई पालक करीत होते.
पालकाचे शाळा सुरु करण्यावरुन दोन गट पडले होते. एक म्हणजे शाळा सध्या सुरु करु नये असे म्हणणारा गट व दुसरा शाळा सुरु करा म्हणणारा गट. सरकारही शाळा सुरु करण्यावर विचार करीत होतेे. पण त्यांना वाटते की जर शाळा सुरु केलीच तर आधीच वाढणारी कोरोनाची साथ. त्यात शाळा सुरु केल्यास दुपटीने वाढ होईल. काही पालकांनाही तेच वाटत होते. म्हणून ते शाळा सुरु करण्याच्या पलिकडचे होते. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार शाळा सुरु व्हायला नको. शाळा सुरु झाल्यास संक्रमण एवढं वाढेल की त्याला थांबवणं वा त्याच्यावर रोक लावणं कठीण होवून बसेल. कारण लहान मुलांना कितीही सांगीतलं, तरीही संक्रमणाचा धोका टाळताच येवू शकत नाही. मग विद्यार्थ्यांचं नुकसान नको, ते विसरतात म्हणणारे काही श्रीमंत पालक ऑनलाइन शाळा सुरु करा म्हणत होते. त्यासाठी सरकारवर दबाब आणत होते. सरकारला पेचात पाडत होते नव्हे तर आपल्याच पाल्यांचा जीव धोक्यात घालत होते. ते शाळेला आणि शिक्षकांना वेठीस धरुन ऑनलाइन शिक्षण द्यायला भाग पाडत होते. याच भुमिकेतून काही शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरुही केले. पण यात संभाव्य धोक्याचा विचार केलेला नव्हता.
कोरोना काळात संभाव्य धोके पुढीलप्रमाणे होते.
१) लाकडाऊन कालावधीत प्रत्येकजण घरी होता. त्यांना कामधंदे नव्हते. त्यामुळं जवळ असणारा पुर्ण पैसा खाण्यात खर्च झाला होता. आता पालकांजवळ पैसे नवेहते. त्यामुळं त्यांना पोट भागवतांना मोबाईलमध्ये रिचार्ज टाकायला पुरेसे पैसे नव्हते. तसेच ऑनलाइन शिक्षण घेतो म्हटलं तर स्मार्टफोन घ्यायलाही पुरेसे पैसे नव्हते.
२)मोबाईल वापराबाबत सुविधा नव्हत्या. कारण प्रत्येकानं ऑनलाइन शिक्षण घ्यायचा विचार केलाही, तरीही शिक्षकांच्या शिकविण्याच्या वेळेस मोबाईलचीे इतर कामे पडतात. कोणाला मोबाईल ऑफिसला(कामावर) न्यायचा असतो किंवा कोणाला अर्जंट फोन करायचा असतो. ती कामं करता येत नव्हती. त्यामुळे खंड पडतो असं लोकांना वाटत होतं.
३)स्म्रार्टफोनवरुन अभ्यास करतांना मुले एवढी हुशार झाली होती की ते आपल्या वडीलांना काही समजत नव्हते. असा विचार होता. ते पबजी सारखे खेळ खेळत बसत. अभ्यासात मन न लावता. तसेच पालकांना समजतही असेल मोबाईल तरीही त्यांच्याजवळ पुरेसा वेळ नव्हता की ते पालक आपल्या मुलांजवळ पुर्ण तासीका होतपर्यंत बसतील. अशावेळी चांगली मुलेही बिघडण्याची शक्यता होती.
४)कधी कधी नेटही बरोबर चालत नव्हता.त्यावेळी ऑनलाइन वर्ग दिसत नव्हते. अशावेळी विद्यार्थ्यांचे नुकसानही होत होते.
मोबाईल चांगला वापरला तर चांगलाच उपयोग आहे. पण तरुण होत असणा-या मुलांना कोण सांगेल. ते अभ्यास करीत असतांना तरुणही होत असतात. हेही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात खटलेही दाखल केले होते. खाजगी शाळेनं ऑनलाइन वर्ग शिकवणं सुरु केलं होतं. कारण त्यांना भीती होती की जर त्यांनी शिकवणं सुरु केलं नाही तर त्यांना वेतन मिळणार नाही.त्यांचंही बरोबर होतं. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलेच नाही तर पालक शाळेचे शुल्क कसे भरतील, अन् पालकानं पैसे भरले नाहीत तर शिक्षकांना वेतन कसे मिळेल. म्हणून ऑनलाइन शिक्षण मिळायलाच हवं अशी पालकाची भुमिका होती.
महत्वाचं म्हणजे विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण देण्याऐवजी ऑफलाइन शिक्षण द्यावे. शिकविण्यात येणारा भाग विद्यार्थ्यांना जेव्हा वेळ भेटेल, तेव्हा ते पाहतील व शिकतील. पालकांनाही जेव्हा वेळ भेटेल. तेव्हा ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतील. असे काही शिक्षक म्हणत. त्यानुसार काही शाळा हे मीटसारख्या, झुमसारख्या अँपवर ऑनलाइन शिक्षण शिकवीत होते. तर काही शाळा ऑफलाइन शाळा शिकवीत होते. त्यात शिक्षक मेहनत करुन ऑफलाइन व्हिडीओ बनवून पोष्ट करीत असले तरी ते पाहायला मुलांजवळच नाही तर तो अभ्यास घ्यायला मुलांच्या पालकांजवळ वेळ नव्हता. त्यांना विचारलं असता ते आमचं मुलं ऐकतच नाही असा बहाणा करीत वा आम्हाला वेळच मिळत नाही असा बहाणा करीत. त्यातच पालकांचा वचक नसल्यानं मुलं चक्क फिरत असत. उनाडक्या करीत असत. पण शिक्षणाचं त्यांना जीवनात महत्व वाटत नव्हतं.
कोरोना व्हायरस, शासन लोकांचा जीव घेणार की काय असे वाटत होते. सर्व वस्तू वाढत चालल्या होत्या. त्यातच पेट्रोल, डिझेलचेही दर वाढलेले होते. खाण्याचे तेल व भाजीपाल्याचे दर आसमानात पोहोचले होते.
कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असतांना शासनही लोकांचा जीव घेणार काय अशी स्थिती आज निर्माण झाली असतांना लाकडाऊन उघडणं ठीक होतं. कारण पैसे आणणार कुठून? लोक लाकडावून लावल्यानंतर त्या लोकांना काम नसल्यानं त्यांना पुरेशा सोयी करुन देणं हे सरकारचं काम होतं. जेणेकरुन जनतेला त्याचा फटका बसू नये.
प्रत्येक शहरात लाकडावून लावलं गेलं. बरेच दिवस लोकं घरी राहिली. त्यात त्यांची उपासमार होवू लागली. त्यातच सरकारनं काही ठिकाणी अन्नछत्रही उघडली. कसं तरी लोकांना जगवलं. पण लाकडाऊन जरी लावलं असलंं तरी कोरोना जायला तयार नसल्यानं कोरोनानं जनतेला मारायचं की उपासानं जीव घ्यायचा ही स्थिती निर्माण झाल्यानं लाकडाऊन उघडलं. मग काय? ज्याप्रमाणे दोन दिवस उपाशी पोटी राहिलेल्या माणसाला जशी सपाटून भूक लागते, तशी जनतेची स्थिती झाली व लोकं न ऐकता कामासाठी गर्दी करु लागले. सोशल डीस्टींगचा जरी नियम असला तरी त्याची धज्जी उडवू लागले. त्यातच काहीजण मुजोर मास्क न लावताही फिरु लागले.
सरकारनंही नागरीकांना माफ केलं नाही. लाकडाऊनच्या काळात बरेच दिवस लोकं घरी असूनही व त्यांच्या हाताला काम नसूनही सरकारनं महागाईवर नियंत्रण आणलं नाही. लाकडाऊन उघडल्यानंतर ज्या व्यापारी संकुलांनी दुकानं उघडली, त्या दुकानातून वस्तू ग्राहकांना महाग विकल्या जावू लागल्या. अर्थातच महागाई वाढली. बरं हे दुकानदार खाजगी होते. ज्या गोष्टीवर सरकारचे नियंत्रण होते.त्या पेट्रोल डीझलच्या दरातही वाढ झाली असल्यानं मग काय जिथे वस्तूच्या दळणवळणाला पेट्रोल डीझल लागतं, तेच पेट्रोल डीझल वाढल्यानं वस्तूच्या किमती वाढणे साहजिकच होते. त्या वस्तूच्या किंमती दुपटी तिपटीनं वाढल्या होत्या.
दुसरी महत्वाची गोष्ट सरकारनं केली. ती म्हणजे वीजेची व पाण्याची बिलं. लाकडाऊनच्या काळात माणूस घरी होता. हाताला काम नव्हतं. जवळ होता नव्हता सर्व पैसा संपला. तरीही वीज कंपन्यांनी वीजेची बिलं अमाप शनाप पाठवली. सगळं कारस्थान व योजनाबद्ध रितीनं जनतेला त्रास देण्यासाठी केलेली योजना. ते वीज बिल पाहिलं की भल्ल्याभल्यांना घाम फुटेल असे होतं. पुर्वी तीन महिण्याचंही बिल एवढं नसायचं. पण आता त्या मागील तीन महिन्याच्या येणा-या रकमेच्या दुप्पट तिप्पट बिल होतं. तेच पाण्याच्याही बिलात झालं होतं.
सरकारनं लाकडाऊन लावलं. काही जनतेनं म्हटलं नव्हतं लाकडाऊन लावा. तरीही लाकडाऊन लावलं गेलं जबरदस्तीनं. तसं पाहता गरजही होती. पण लाकडाऊन लावल्यानं कोरोना थांबला काय? हं थोडा त्यात बदल नक्कीच करता आला. पण हे जरी खरं असलं तरी सरकारनं अशा बिलावर नियंत्रण आणणं गरजेचं होतं.
काही लोकं म्हणतात की कर्मचा-यांनी काम केलं त्या काळात. त्यांना वेतन द्यावं लागलं. ठीक आहे वेतन दिलं गेलं. पण देश कोरोनाच्या खाईत सापडला असतांना त्यांना पुर्ण वेतन द्यायलाच नको होते. नव्हे तर त्यांनी स्वतः संकटात सापडलेल्या लोकांना मदत म्हणून तसेच सेवा म्हणून वीजेच्या बिलाच्या यूनिट ती प्रत्येक महिण्यानुसार फारकत करुन वीज आकारणी करायला हवी होती. पण वीज कंपन्यांनी अशी फारकत न करता सरसकट वीजेचं युनिट जोडून बिल आकारणी केल्यानं एवढं बिल आलेलं असून काही लोकांना ते भरणं शक्य नव्हतं. काही राजनितीक पार्ट्या आंदोलन करीत होत्या. पण ते केवळ दाखविण्यापुरते होते. तू मार मी रडल्यासारखा करेल अशी राजनीतीक पार्ट्यांची आंदोलनं. साध्य काहीच झालं नाही. काल सत्तेवर असणारी मंडळी आज ओरडत. पण सत्ता जेव्हा असते, तेव्हा मात्र नेत्यांची तीच हालत असते. जी आजच्या सत्ताधा-यांची होती. निव्वळ आश्वासनच.काम मात्र कवडीचंही नव्हतं.
आता सरकार परत लाकडाऊनचा विचार करणार की काय अशी स्थिती दिसत होतीे. पण सरकारला जनता लाकडाऊन लावण्यापुर्वी आवर्जून सांगत होती. आधी महागाई कमी करा.पेट्रोल डीझलचे दर उतरवा. वीजेची व पाण्याची दरं कमी करा आणि आम्हाला जगविण्यासाठी काय उपाययोजना केली ते सांगा. मगच लाकडाऊन लावा. कारण उपासानं मरण्यापेक्षा कोरोनाशी लढताना मरण येत असेल,तर ते चांगलं. पुरी झाली उपासमार सहन करणं, आता परत उपासमार नकोच. असा जनतेचा प्रश्न होता. पण जनतेनं तरी या गोष्टी विचारात घेण्याची गरज होती. कामावर जातांना पुरेसा रुमाल तोंडावर बांधावा, ज्याला मास्क म्हणतात. पुरेसं अंतर पाळावं व गर्दी टाळावी. सरकारनंही जनतेला राहात द्यावी. पुरेशी महागाईची व बिलाची बंधनं टाळून. नाहीतर शासन लोकांचा जीव घेत आहे अशी जनतेची सरकारबद्दल धारणा होईल व सरकारला शासन चालवणं कठीण जाईल.
आकाशलाही या सर्व गोष्टीबद्दल विचार होता. कारण त्यानं या शहरात काम करता करता एक घर विकत घेतलं होतं. नळंही विकत घेतला होता.वीजही होती त्याच्या घरी. त्यालाही पेट्रोल दरवाढीचा फटका बसला होता. जवळ पैसा नव्हता. काय करावे सुचेनासे झाले होते.
दिवसेंदिवस भाजीपाल्यांचे वाढते दर. त्यातच दिवसेंदिवस वस्तूंच्या वाढत्या किंमती त्याला छळत होत्या. अशातच श्रावण महिना उजळला.
श्रावण महिना आला. हा महिना सुखसमृद्धी आणेल असं वाटलं. कारण आधीच कोरोनानं जनता त्रस्त होती. त्यामुळं राहत मिळेल असं वाटत होतं. शाळा सुरु होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल असंही वाटलं होतं. पण लोकांचा भ्रमनिराश झाला. कारण लोकांना श्रावण उजळूनही राहत मिळाली नाही. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. त्यातच ब-याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलेलं दिसत होतं.
विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासाबाबत शिकविण्याचा विचार केल्यास असं जाणवत होतं की शिक्षकांनी ऑनलाइन शिकविणे सुरु केले आहे. त्यातच मोबाईलवर मुले शिकत आहेत. पण ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांची गोची होतांना दिसत होती. त्यांच्या अभ्यासाचं होणारं नुकसान कसं भरुन निघेल यावर प्रश्नचिन्ह लागले होते.
शिक्षक अभ्यास शिकवितांना अॉफलाईन शिकवायला तयार नव्हते. त्यामुळं अजून प्रश्न निर्माण झाले होते. कारण पालकांना दोन मुलं असल्यास व एकाच वेळेला दोन मुलांचे अभ्यास सुरु असल्यास एका मुलाचं या ऑनलाइन शिक्षणातून नुकसानच होणार होतं. कारण दुस-याला मोबाइल अभ्यासाला मिळणार नव्हता.
लॉकडाऊन मध्ये आधीच पैशानं तुटलेली मंडळी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल घेतील कुठून? जिथे पोट भरु शकत नव्हते. तिथे मोबाइलचा प्रश्न. अशातच लोकं कशीबशी कामाला लागलेली असताना दररोज सायंकाळी घरी कामावरुन आल्यावर मोबाइल साठी मुलांचे ओरडणे तसेच पत्नीची कटकट ऐकून माणसांचा तिळपापड होत होता. त्यालाही कळत होतं की मुलाचे नुकसान होत आहे. ते टाळावे कसे? शिक्षकांना विचारणा केल्यास तेही हेकड बोलून अपमानच करीत. मग अशावेळी नुकसानाचं काय? ते नुकसान कोण भरुन काढेल हा प्रश्न पालक वर्गाला पडलेला होता.
श्रावण जसा आला, तसाच होता. यावर्षी तो दरवर्षीप्रमाणे आनंद घेवून आलेला नव्हता. या महिन्यात येणारी सण जशी येत होती. तशीच आताही आलेली होती. पण जी मजा पुर्वी यायची. ती यावेळी येत नव्हती.
श्रावणाचं एक वैशिष्ट्य आहे. एक दोन सरी आल्या की ऊन दिसणे. ते कोवळे ऊन असते. अंगाला चटका जाणवू देत नाही. ज्याला या उन्हाचा त्रास होतो.त्याच्यासारखा नाजूक नाही.
कधी कधी पाऊस जाताच कडेला लांब लचक इंद्रधनूही दिसतो. तो पाहतांना फार मजा वाटते. त्यातच या श्रावणात नागपंचमी तसेच राखीच्या यात्रा असतात. नागद्वारच्या यात्रेतून परत आल्यानंतर राखीपासून लोकांच्या कढया सुरु होतात. मग जोरजोरात महादेवाची गाणी म्हटली जातात. ते यावेळी दिसत नाही. नागपंचमीच्या दिवशी म्हटल्या जाणा-या बा-या यावेळी दिसल्या नव्हत्या नव्हे तर राखीला राखी बांधायला फिरणा-या बहिणी आता दिसत नव्हत्या.
या महिण्यात मांस खाणं काही लोकं टाळतात. त्याचं कारणंही तसेच आहे. रिमझीम येणारा पाऊस. ह्या पावसानं नदी नाल्यांना पूर असतात. त्यामुळं लोकं मासे पकडायला जाऊ शकत नाहीत. वाहून जाण्याचा धोका असतो. म्हणून मासेमारी बंद असते. तसेच प्राण्यांना पायखु-या, तोंडखु-याच यासारखे आजारच नाहीत, तर वेगवेगळे जास्तीत जास्त आजार असतात. ज्या आजाराचे जंतू उष्णतेनंही मरु शकत नाहीत नव्हे तर आजारी पाडणा-या सुक्ष्म जंतूनाही याच काळात सुगीचे दिवस असल्याने मांस या काळात वर्ज असते.
श्रावण महिण्यात होणारी दहीहंडी आता दिसणार नव्हती. कारण कोरोना गर्दीमध्ये जास्त वाढत होता नव्हे तर पोळा भरवला जाणार नव्हता. तसेच पोळ्याला निघणारी मारबत तसेच बडग्यावरही याच काळात संक्रात होती.
ज्याप्रमाणे श्रावणातल्या सणांना या कोरोनानं अडथडा आणला होता. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडीपच्या प्रकारालाही या कोरोनानं ब्रेक लावला की काय असे वाटायला लागले होते. कारण या महिन्यात येणारे संततधार पाणी बहुतेक ठिकाणी दिसले नव्हते. पुढे दिसतील काय? ते सांगता येत नव्हते. तसेच वातावरणात या झाडावरुन त्या झाडावर उडणारी फुलपाखरे व फुलचुख्या यावर्षी दिसल्या नव्हत्या. याच काळात कानात गुंजणारे ते बेडकाचे डराव डराव आवाज तसेच रस्त्यावरुन चालतांना अलगत आडवे जाणारे ते सापाचे पिल्लू दिसले नव्हते. बहुतःश प्राण्यांनीही कोरोनाचा धसका घेतला असावा असं वाटत होते नव्हे तर पोळ्याला निघणारी घाणमाकड आता दिसणार नव्हती. पुढे श्रावण संपल्यावर काजळतीज आणि गणपती उत्सव दिसतो की काय? ह्यावर ही प्रश्नचिन्ह लागले होते.
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहिला की काय? ते ऐकायला आले नव्हते. बहिणींचे सामुहीक मेहंदी लावणे अदृश्यच झाले की काय? असे वाटत होते.
एकंदरीत सांगायचं झाल्यास श्रावणाच्या ज्या विविध छटा असतात. ज्या छटांनी माणसांना तसेच जगातील वेगवेगळ्या सुक्ष्म जीवापासून अवाढव्य प्राण्यांपर्यंतच्या जीवांना आनंद प्राप्त होतो. तो आनंद या कोरोनानं लुटून नेला होता. साहजिकच लोकांचे फिरणे बंद असल्यानं घर एके घर व घर दुणे नुकसान हेच गणित लोकांना कळायला लागले होतेे. तेही या श्रावण महिण्यात. आषाढ गेलेला होता हिरमुसले करुन. आता श्रावण उजळला होता नव्या आशा पल्लवीत करुन. पण हा श्रावण ही निराश करीत जात होता. कदाचित भाद्रपद कसा उजळतो ते माहित नव्हते. त्यामुळं लोकांना या कोरोनामुळं आला श्रावण गेला श्रावण म्हणण्याची वेळ आली होती.
सध्या देशात तसेच जगात कोरोनाचा संसर्ग चरणसीमेवर होता. आकाशला आता करमत नव्हतं. त्याला गावची आठवण येत होती. पण जाणार कसा, गाड्या अजूनही खुल्या झाल्या नव्हत्या.
प्रवासाला बंदी होती. त्या अनुषंगाने लोकांनी गर्दी करु नये व कोरोना पसरु नये म्हणून सरकार नवनवे नियम लावत होते. त्यातच ज्या भारतीय सणाला लोकांची गर्दी जमते. ते सण साजरे करण्यासाठी देशाने काही नियम बनवले होते. याच नियमाच्या अनुषंगाने कोरोनाच्या चक्रव्युहात बैलाचा पोळाही फसला होता. हे कोरोनाचे चक्रव्युह केव्हा भेदता येईल हे सांगणे कठीण आहे.
पोळा......बैलाचा सण. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा होतो. लोकं जी बैलजोडी शेतीकामाला शेतक-यांना वर्षभर मदत करते. त्या बैलाच्या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षी विदर्भातील शेतकरी श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी तो दिवस बैलपोळा म्हणून साजरा करतात नव्हे तर हा बैलपोळा साजरा करुन त्याचा उत्सव मनवितांना त्या बैलाला सजवून (चौरा मटाट्या,बाशिंग बांधून) गावच्या एका चौरस्त्यावर नेतात. इथून बैलाची मिळवणूक काढतात. मग या बैलांना घरोघरी फिरवून पुरणपोळीचं नैवैद्य खावू घालतात. त्याचबरोबर काही ठिकाणी मोहफुलांची राबही. विदर्भात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मग हा सण पाहण्यासाठीही लोकांची प्रचंड गर्दी होते.
या पोळ्याच्या पहिल्या दिवशी पळसाच्या झाडाची कत्तल करुन त्याच्या फांद्या लोकं आपआपल्या घराच्या दरवाज्यावर लावतात नव्हे तर यात शेकडो झाडांची कत्तल होते. पर्यावरण समतोल ढासळतो. एवढंच नाहीतर या पोळ्याच्या दुस-या दिवशी कित्येक कोंबड्या बक-याची कत्तल होते. आपले जीभेचे चोचले पुरविण्यासाठी. बिचा-या निरपराध कोंबड्या बक-यांना ठार केलं जातं. ते पाहिलं की पोळा हा आनंदाचा सण आहे की दुःखाचा असा प्रश्न काही लोकांना नक्कीच पडत असतो.
या वर्षी कोरोनाचं संकट जरी असलं तरी या वर्षी झाडांची कत्तल होणार नाही असं वाटत असलं तरी झाडांची कत्तल झाली. लोकांनी जागे मारबत म्हणत पळसाच्या डहाळ्या तोडल्या. त्या पळसाच्या डहाळ्या घराच्या समोर लावण्यासाठी झाडं तोडली. तसेच दुस-या दिवशीही निरपराध कोंबड्या बक-यांचा जीव घेवून आपल्या जीभेचे चोचले लोकांनी पुरवलेच.
पोळ्याचा जेव्हा दुसरा दिवस निघतो. ज्या दिवशी मारबत निघते. त्याचबरोबर बडगाही. बडगा माणसाचं प्रतिक तर मारबत बाईचं प्रतिक. ज्यांनी वाईट कामं केलीत, त्यांचा निषेध म्हणून ही मारबत व बडग्याची मिळवणूक काढण्याची प्रथा आहे. ही प्रथा ब-याच दिवसापासून विदर्भात सुरु असून नागपूरमधील पिवळी मारबत अधिक प्रसिद्ध आहे.
सध्या देशात तसेच जगात कोरोना थैमान घालत असतांना पोळ्यावरही कोरोनामुळं संक्रांत आली असून वरील बाबी ख-या असल्या तरी पोळा हा सण कसा साजरा करावा हा एक न उलगडणारा प्रश्न होता. तो प्रश्न प्रत्येक जनमाणसाला पडलेला होता. त्यातच त्या बैलाचा काय दोष? असे वाटत होते.
पोळा आम्ही साजरा करीत असतांना आमच्या भागातील शेतकरी या बैलाला पोळ्यात तर नेतात. त्या दिवशी मारत नाहीत पोळ्यात नेईपर्यंत बैलाला. पण जेव्हा पोळा फुटतो. अर्थात तोरण तुटतं. तेव्हा मात्र त्या बैलाच्या मालकांच्या अंगात शैतान संचारतो व तो मालक 'मला भेटते की माझ्या कुत्र्याला मिळते' या वृत्तीनं त्या बैलाला मारत मारत वा परानी टोचून आपल्या घरी आणतो व रात्री पर्यंत पैसे गोळा करण्यासाठी बैलाला लोकांच्या घरी फिरवतो. परंतू यात हे समजत नाही की हा सण बैलासाठी ना.मग त्याला घरी नेण्यासाठी या दिवशी तरी पराणी टोचण्यासारखा उपक्रम का? पण लवकर जर बैलाला घरी नेलं नाही, तर त्या बैलांना घरोघरी फिरवून पैसे कुठून मिळणार? पण यावर्षी कोरोनानं याची दखल घेतली होती. त्यानं असं ठरवलं होतं की लोकांनी पोळाच भरवू नये. गर्दी तर सोडा. आपल्याला ही कोरोना मारबत जरी वाटत असला तरी बैलाच्या दृष्टीकोनातून बैलांसाठी बरोबर वाटत होता. कारण कोणी असा पैसा गोळा करण्यासाठी मारणार तर नाही. असे बैलालाही वाटले असेल त्यावेळी. तसेच दरवर्षी पोळ्यात सजून जाण्याची काही बैलाची इच्छा असते. काहींची नक्कीच नसते.पण माणूस त्यांना गुलाम समजत त्यांना जबरदस्तीनं पोळ्यात नेतो. तेच कोरोनानं यावर्षी टाळलं होतं. याचबरोबर दुस-या दिवशी येणारा तान्हापोळाही या वर्षी भरणार नाही असे संकेत होते.
पोळा हा बैलाचा सण असला.......पोळ्याला लहान मुलांना नंदीबैल फिरवितांना मजा वाटत जरी असली........लोकांना बडग्या व मारबतची मजा येत जरी असली तरी या पोळ्यावर कोरोनानाच्या मारबतीनं कहर केला होता. लोकांची गर्दी सोडा. लहान मुलांचा पोळा भरलाच नाही. 'जागे कोरोना मारबत' म्हणत प्रत्येक घराघरातून नक्कीच सुर गुंजले. लोकं बाहेर पडले नसले तरी त्यांनी नक्कीच अशी पळसाच्या डहाळ्यांनी मारबत हाकलून ती जाळली. लोकांना वाटत होतं की अशानं तरी कोरोना जाईल. पण ती एक अंधश्रद्धा होती. लोकांनी कोरोनाचे प्रतिकात्मक पुतळे बनवून ते पुतळे प्रत्येक ठिकाणी जाळले. मग कोरोनाच काय? कोरोनाच्या पिल्लावळींनाही नाईलाजानं देशातून जावं लागेल असं लोकांना वाटलं.
लोकांनी बैलाला अवश्य सजवलं. पोळाही साजरा केला. पण स्वतःची सुरक्षा अवश्य करीत. घरीच पोळा साजरा केला व आपल्या बैलाला स्वतंत्र्यता देवून त्याचे उपकार मानले. मात्र कोरोनाला जागे मारबत म्हणत देशातून तसेच जगातून अवश्य हाकलण्याचे प्रयत्न झाले.
हरतालिका व्रत, कोरोनाकाळात स्रीयांवर बंधन ठेवू नये. असं काही लोक आपलं मत मांडत होते. कारण कोरोना जरी असला तरी स्रीया हरतालिका व्रत करणार होत्या. त्यामुळं गर्दी वाढणार होती.
हरतालिका सण. दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात. कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. ही अंधश्रद्धा मनात असल्यानं व आपण मानत असल्यानं. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका,तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात.
या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
सध्या कोरोनाचा कहर सुरु होता. कोरोना सध्या चौथ्या स्टेजवर होता. घरोघरी रुग्ण होते. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती तेवत ठेवण्याची आवश्यकता होती. पण याच कोरोनाच्या काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो देवही वाचविणार नाही. असंही मत काही विचारवंत मांडत होते.
हरतालिका व्रताची कथा काहीशी अशी आहे. पर्वतराजाची मुलगी ही भगवान शंकरावर प्रेम करीत होती. पण पित्याची इच्छा होती की तिनं श्रीविष्णूशी विवाह करावा. मग आपले वडील आपल्या मनात असलेल्या आपल्या पतीला मिळू देणार नाही. जबरदस्तीनं आपला विवाह विष्णूशी लावून देतील या संभाव्यानं पार्वती मैत्रीणीच्या माध्यमातून पळून गेली. पण भगवान शंकर हे तपश्चर्येत लिन होते. ते काही तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पार्वतीनं भाद्रपद तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले. त्यावेळी हस्त नक्षत्र होतं. त्यानुसार भगवान शंकर प्रसन्न होवून पार्वतीशी त्यांनी विवाह केला.
या व्रतामागचा उद्देश असा की जर हा व्रत केल्याने भगवान शंकर पार्वतीला मिळू शकते तर मग आपण जर हा व्रत केला तर आपल्याला इच्छित वर का मिळणार नाही. म्हणून त्या वेळपासून हा व्रत करण्याची प्रथाच सुरु झाली. या व्रतामागे कल्पना आहे की हर म्हणजे महादेव, प्रत्यक्ष शंकर. हरिता म्हणजे म्हणजे जिला नेले. ताली अर्थात यामध्ये आली म्हणजे सखी असा अर्थ घेवून सख्यांच्या मदतीने नेली. असा अर्थ घेवून हरतालीका या शब्दाचा अन्वयार्थ लावला आहे. काही लोक याला हरतालिका आणि हरितालिकाही म्हणतात. पण हरि चा अर्थ विष्णू होत असल्यानं या व्रताला प्रक्रिया हेच नाव आहे.
पृथ्वीवर घडणारे पाप लक्षात घेवून या सणाला हिंदू स्रीया दरवर्षी साजरा करीत असतात.त्यांच्या मतानुसार हा व्रत केल्यानं इच्छीत वर तर मिळेलच. तसेच सौभाग्यही तर अखंड राहील. तसेच आपल्या हातून घडणारे पापही नष्ट होईल. याच उद्देशानं द्वापर युगात इंद्रप्रस्थचं वैभव पूर्णतः द्यूतक्रिडेत पांडव हरल्यानंतर जेव्हा ते वनात गेले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने द्रोपदीला म्हटले की तिनं हे व्रत करावे. जेणेकरुन तिच्या हातून घडलेले पाप नष्ट होईल व तिला परत राजवैभवाची प्राप्ती होईल. द्रोपदीनं ज्यावेळी हे व्रत केलं. त्यानुसार तिला परत राजवैभव प्राप्त झालं असं लोकांचं मानणं.
दरवर्षी वटपौर्णीमा, हरतालिका व्रत येत असते. मग हा व्रत करण्यासाठी स्रीयाच पुढाकार घेत असून त्या आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, तसेच आपल्या कुटूंबात सुख, शांती व समृद्धी नांदावी. आपला पती तसेच आपली मुलंबाळं सुखी राहावी. म्हणून सारख्या अशा प्रकारचे व्रत करुन राबत असतात नव्हे तर कडक उपवासही करीत असतात. पुरुष मात्र ते करीत नाही. तरीही अशा प्रकारचे व्रत करुनही असे पुरुष त्या स्रीयांना काय देतात तर वेदना, क्लेष, अपमान. सतत दुःखात झिजत असतात त्या अबला.कोणासाठी? तर आपला पती सुखी व्हावा. आपली मुलंबाळं सुखी व्हावी!
सारीच बंधनं स्रीयांवरच. स्रीयांनी हे करावं, हे करु नये. असं वागावं, असं वागू नये आणि स्रीयाही हे सगळं सहन करुन अशा प्रकारची व्रतं करीत असते सातत्यानं. रुढी, परंपरा, चालीरीती, जप तप, व्रतवैकल्ये सारंच ती करीत असते. मात्र एवढं सगळं केल्यानंतरही ज्या भगवान शंकरासाठी ती व्रत करते. तो भगवान शंकर तरी तिला पावतो का, तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण ही व्रतं केल्यानंतरही त्या स्रीचा पती तिला मारझोड करतो. कोणी तिला जाळतो. सतत दारु पिवून येणे आणि पत्नीला शिव्या देणे हे सगळं येतं पतीला.
पुर्वीही या पतींसाठीच असे सण उत्सव साजरे व्हायचे. तरीही सतीप्रथा, बालविवाह, केशवेपन, विधवा पुनर्विवाहाला बंदी होती. ह्या वाईट प्रथा समाजात जोर धरुन होत्याच. माणूस त्या प्रथांना विरोध करु शकत नव्हता. कारण ज्या माणसानं किंवा स्रीनं या प्रथांना विरोध केला, तर त्या कुटूंबांना वाळीत टाकण्याची किंवा त्यांची घरं जाळून टाकण्याचीही एक कुप्रथा समाजात अस्तित्वात होतीच. कारण समाजावर जुन्या परंपरा व रुढींचा पगडा होता. मग काय चितेवर महिलांना त्रास होवो की अजून काही होवो. जीवंतपणी तिला पतीच्या चितेवर जळावंच लागत होतं. कल्पना करा की त्यावेळी तिला कसं वाटत असेल. म्हणूनच संयुक्त कुटूंबात राहतांना स्रीयांना अशा प्रथा पाळाव्याच लागत. हे झालं सतीप्रथेचं. पण यावरुनही मोठी प्रथा होती. ती म्हणजे केशवेपन. ती तर महाभयंकर प्रथा. सतीप्रथेतून एकदाचे मरण पत्करुन स्रीया मरुन तरी जात. आपल्या आयुष्यात पुढे येणा-या संभाव्य वेदना समाप्त करीत. पण या समाजात जीवन जगतांना व वावरतांना केशवेपनात आपली स्वतःची टक्कल करुन गावात फिरणे, त्यातच लोकांचं टाँगटिंग ऐकून जीवन कापणे नव्हे तर एखाद्या वेळी एखाद्या नराधमाकडून बलत्काराचे शिकार होणे. त्या बलत्कारानंतरही तो झालेला बलात्कार उजागर न करणे. यासारख्या गोष्टी सतत तिच्यासोबत घडतांना नाकीनव यायचं. त्यातच काही काही स्रीया असं दुःख सहन न झाल्यानं आत्महत्याही करीत. पण त्या आत्महत्येबाबत कोणी जाब विचारत नव्हता वा कोणी त्या आत्महत्या रोखू शकत नव्हता.
बालविवाह प्रथेतही तिच गोष्ट होती. अगदी कौमार्य काळात स्वतःचे मायबाप आपल्या मुलीचा विवाह जबरदस्तीनं तिला समजदारीपणा येण्याच्या पुर्वीच एखाद्या म्हाता-या माणसाशी लावून देत. मग काय त्यावेळी समजत नसतांनाही काही सासरकडील मंडळी त्या बालिकांना छळत. त्यांच्याकडून आपल्या पुरुष असणा-या पतीसाठी व्रतवैकल्ये करुन घेत. त्यांना समजत नसतांनाही. कारण या व्रतवैकल्यातून पुरुषाचं आयुष्य वाढते असा गैरसमज होता. ती मुलगी परायाघरची असल्यानं तिचं आपल्या मुलासाठी काहीही नुकसान होवो. चालेल अशी भावना ठेवून अगदी लहान वयापासून या प्रथा स्रीयांच्या अंगवळणी पाडल्या गेल्या. मग ह्या प्रकारची व्रतं केल्यानं त्या काळातील स्रीया सुखी झाल्यात का? तर याचंही उत्तर नाही असंच आहे.
आजही प्रथा परंपरेनुसार स्रीया अशा प्रकारची व्रतं करतात. पण किती स्रीया सुखी आहेत असा जर सर्वे केलाच तर त्यांची संख्या बोटावर मोजण्यासारखी येईल. मग विचार येतो की देश जरी स्वतंत्र्य झाला असला तरी स्रीयांवर आजही अशा गुलामीपणाच्या प्रथा परंपरा का लादाव्या? हं, एक गोष्ट ठीक आहे की हा सण साजरा करावा. पण कशासाठी? तर आनंद म्हणून. पण जबरदस्तीनं ह्या प्रथा पाळून घेणे आणि स्रीयांना मुळात बंधनात ठेवणे. प्रथा परंपरेंचं हे भूत पाठीमागे लावून. हे काही बरोबर नाही. तेव्हा हरतालिका व्रताच्या निमित्यानं काही तज्ञांचं व अंधश्रद्धा न पाळणा-यांचं सांगणं होतं की शरीराला झेपेल तेवढंच करावं. विनाकारण पुरुष म्हणतात म्हणून व्रत करु नये. नाहीतर या कोरोनाच्या काळात ग्लानी येवून जीव धोक्यात येईल. कारण उपवासानं जीव नेहमी चक्रावत असतो. हे लक्षात घ्याव. पुरुषांनाही सांगणं होतं की सारीच बंधनं स्रीयांवर लादू नये. नाहीतर तुम्हालाही ह्या कोरोनाच्या काळात समस्या येवू शकतात. मग वाचविणाराही कोणी भेटू शकणार नाही. कारण सध्या रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांनी गच्च भरलेले असून तुम्हाला त्या रुग्णालयात प्रवेशाला जागाच उरलेली नाही.
त्यांचंही म्हणणं बरोबरच होतं. कारण रुग्णालयात मुळातच जागा नव्हती. तसेच स्रीया या मुळात नाजूक असल्यानं कोरोनाच्या लागटपणाला बळी पडू शकणार होत्या. हे तेवढंच खरं होतं.
भारत स्वावलंबी देश आहे. या देशात राहणारी बरीचशी मंडळी ही देखील स्वावलंबी आहेत. त्यामुळं नक्कीच ते शक्यतोवर कोणाची मदत घेत नाहीत. आजारांच्या बाबतीतही तेच आहे.
भारतातील बरीचशी मंडळी ही गरीब असून दारिद्र्यात जीवन जगतात. त्यांच्याजवळ गाठीला जास्त पैसा राहात नाही. पण कधी कधी पोटातही अन्न कोंबायला पैसे नसतात. मग उपाशी पोटीच पाणी पिवून दिवसं काढावे लागतात. त्यातच हा कोरोना व्हायरस आलाय.
कोरोना व्हायरस येण्यापुर्वीही ही भारतीय मंडळी आजारी पडत असत. कोणाला किरकोळ सर्दी खोकला व्हायचा. तर कोणाला तापही यायचा. त्यातच अशा सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून ही मंडळी थेट डॉक्टरकडे न जाता औषधालयात जायची व तेथून दोन रुपयाच्या गोळ्या घेवून आपली प्रकृती सुधारायची. अशातच यावर्षी कोरोना आजार आलाय.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लोकांना सर्दी, खोकला होतच होता, तापही येतच होता. हा सर्दी खोकला आणि ताप कोरोनाचाच होता असे नव्हते. हा आजार इतरही आजाराचा असू शकत होता. त्यावर औषधालयातून काही जेनेरीक औषधी घेवून लोकं कमी पैशात आपला आजार सुधरवू शकत होते. पण आता औषधालयांनी संभाव्यतः कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांची चिठ्ठी आणा, मगच औषधी देतो. हे बंधन घातलं होतं. त्यामुळं सामान्यांची गोची होत होती. कारण काही डॉक्टर हे चांगले होते. ते सढळ हातानं कमी पैशात चिठ्ठी लिहून देत. उपचार करीत. पण काही डॉक्टर मात्र हीच वेळ लुटायची आहे असा विचार करुन लुटायला मागंपुढं पाहात नसत.
एकीकडे लाकडाऊन मुळं खायला पैसा नसतांना साध्या सर्दी खोकल्या साठी डॉक्टर कडे जाणं परवडत नसतांना नाईलाजानं लोकांना डॉक्टरांकडे जावंच लागत होतं. त्यातच डॉक्टरांची चांदी झालेली असून काही काही डॉक्टर हे मनमानी शुल्क वसूल करीत होते. ती औषधाची रक्कम सामान्यांना परवडणारी नव्हती.
महत्वाचं म्हणजे जिथे चार दोन रुपयात काम होत होतं. तिथे शंभर रुपये मोजावे लागत असल्याने ह्या कोरोनाच्या दहशतीत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असं लोकांना वाटू लागलं होतं.
कोरोनानं एवढी दहशत निर्माण केली होती की संभाव्य परीस्थिती सांभाळणं कठीण होतं.घरात किंवा घराशेजारी कोणालाही साधा सर्दी खोकला ताप आला आणि तो कोरोनाचा नसला तरी मंडळी धास्तावून जात असत. त्यांना कोरोनाच झाला असेल असे सांगून आजुबाजूची मंडळी त्या घराशी संपर्क तोडत होती नव्हे तर त्याला भरती करा. डॉक्टरकडे न्या. असे सल्ले देत असत. त्यातच जर डॉक्टरकडे नेलंच तर तो बंदूकीच्या सहाय्यानं ताप मोजून सरळ त्याची रवानगी मोठ्या इस्पितळाकडे करीत असत. तेही साध्या ताप, सर्दी, खोकल्यासाठी कोरोना तपासणी मागत.मोठे इस्पितळवालेही अशा रुग्नाला कोरोना होवो अगर न होवो. परीवारालाही भेटू देत नसत. त्यातच काही इस्पीतळातील डॉक्टरांनी जीवंत माणसांचेच यकृत आणि किडन्या डॉक्टरांनी काढल्या, असे व्हिडीओ व्हाट्सअपवरुन फिरत असल्यानं अजून धास्ती मनात शिरली होती. यावर काय उपाय करावा हे कोणालाही समजेनासे झाले होते.
कोरोना माणूस जर असता, तर त्याला रोक लावता आली असती तर कोरोना काही माणूस नाही की ज्याच्यावर रोक लावता येईल. सध्या इंजेक्शन बरोबर निघालेले नव्हते. लस यायला बराच उशीर आहे. यावर उपाय एकच की गर्दी टाळणे. शक्यतोवर बाहेर फिरायला न जाणे. पण हे तरी कोण लक्षात घेतो! लोकं कोरोनाच्या छत्रछायेत कोरोना वाढत जरी असला तरी बिनधास्त लोकं फिरत होते. कोरोनाची भीती बाळगतांना दिसत नव्हते.
महत्वाचं म्हणजे डॉक्टरांची चांदी जरी असली तरी सामान्य माणसांना आता डॉक्टरकडे जाणं भागच होतं. नाहीतर ह्या कोरोनाच्या दहशतीत कोरोना बाजूला राहिल,आम्ही दुस-याच आजाराचे बळी पडू व कोरोना नाही,तर दुसराच आजार आपल्याला नेस्तनाबूत करेल ही शक्यता नाकारता येत नाही.कोरोनामुळे काही काही डॉक्टरांची चांदी जरी असली काही काही डॉक्टरं खरंच चांगले आहेत. ते रुग्णांची काळजी घेत आहेत. तसेच सामान्यांना दिलासा देत आहेत. असं लोकांनाही वाटत होतं.
मुख्यतः कोरोनाची दहशत जरी असली तरी खरं तर औषधालयातून लोकांना दिलासा मिळायला हवा. कधीकधी जो आजार दोन रुपयात संपतो, तो आजार डॉक्टरकडे जावून व जास्त पैसे मोजूनही संपत नाही. तेव्हा औषधे देतांना औषधालयांनी डॉक्टरच्या चिठ्ठीचं प्रावधान ठेवू नये. सरकारनेही तशी बंदी आणू नये. जेणेकरुन सामान्यांवर आर्थीक भुर्दंड पडणार नाही. डॉक्टरांनीही लोकांना कोरोनाचा फायदा घेवून लुटू नये नव्हे तर कोरोना निकष लावून लोकांची दिशाभूल करु नये. जेणेकरुन लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण होईल. असं काही तज्ञ म्हणत.
आकाशला वाटत होतं की आपण कोणत्याच आजारानं आजारी पडू नये. तो त्यासाठी व्यायाम करीत होता. बाहेरच्या कोणत्याच वस्तू खात नव्हता. त्यातच त्याला वाटत होतं की आपण इथं एकटेच राहतो. वेळेवर कोण धावेल. शेवटी आपण जर आजारी पडलोत तर आपल्याला कापडात गुंडून जीवंतपणीच आपल्या परीजनांना माहित न करता डॉक्टर मारुन टाकतील व कोरोना रुग्ण म्हणून जाहिर करतील. म्हणून तो एकाकी असल्यानं स्वतःची अतिशय काटेकोरपणे काळजी घेत होता.
कोरोनानं जग धास्तावलेले होतं. लोकांमध्ये भीती पसरलेली होती. केव्हा कोणाला कोरोनाचा संसर्ग होईल व केव्हा कोण बाधीत होईल ते काही सांगता येत नव्हतं. अशातच मुलांचं ऑनलाइन शिक्षण. सर्वत्र गोंधळच उडत चालला होता.
कोरोना व्हायरस जगातून शेकडो मैलाचा प्रवास करीत करीत भारतात आला होता. त्यातच पहिली स्टेज, दुसरी स्टेज करीत करीत त्यानं चौथी स्टेज पार केली होती. औषध काही निघाले नसल्याने शाळा कशा सुरु कराव्यात हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यातच ऑनलाइन शिक्षण सुरु झालं.
ऑनलाइन शिक्षण शिकवीत असतांना कोणी गुगल मीट, कोणी दिक्षा, तर कोणी झुम वापरु लागले. त्यातच लोकांचा कामाचा व्याप लक्षात घेता व वेळेची उपलब्धता लक्षात घेता अॉफलाईनलाही काही शिक्षक पसंती देवू लागले. त्यानुसार ते यु ट्यूब वरुन काही व्हिडीओज डाऊनलोड करुन मुलांना टाकू लागले. काही प्रश्नही टाकू लागले. विशेषतः मुलांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षक मेहनत घेवून आपआपल्या पद्धतीनं शिक्षण मोबाइल द्वारे मुलांना पोस्ट करु लागले. त्यातच काहींना असं वाटलं की हे सगळं रेडीमेड आहे. यामुळं विद्यार्थ्यात आत्मीयता वाटत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना आत्मीयता वाटावी यासाठी स्वतःच स्वतःचे व्हिडीओ बनवून पोस्ट करु लागले. पण यातून अध्ययन निष्पत्ती काय निघाली? तर काहीच नाही. शिक्षकांनी मेहनत केली. सडेतोड अगदी जीव लावून मेहनत केली. पण याचं फलित पाहिजे तेवढं रास्त निघालेलं नव्हतं. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण पचनी पडलं नाही.
ऑनलाइन शिक्षणातून काही मुलांचा फायदा नक्कीच झाला. पण काही मुलांचं अतोनात नुकसान झालं. ते म्हणजे त्यांच्याजवळ मोबाइल नसणे. तसेच ज्यांच्याजवळ मोबाइल आहे. त्यांच्यावर पालकांचे नियंत्रण नसल्याने त्यांचे मोबाइल वर सतत खेळ खेळणे.
आम्ही मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होवू नये म्हणून ऑनलाइन का असेना, कौशल्यविकास करायला निघालो होतो. पण मुलं ख-या अर्थानं अभ्यास करतात का? हे मात्र पाहिलं नाही. विचारातही घेतलं नाही. खरं तर यासाठी आठवड्यातून कधी चाचणी घेतली नाही. किती मुलांनी प्रश्नांची उत्तरं सोडविली? त्याचंही उत्तर आमच्याकडे नव्हतंच. हं, शिक्षकांनी फोन करुन विचारलं पालकांना की अमुक अमुक तुमचा मुलगा अभ्यास करतो काय? पालकही होय म्हणत. कारण त्यांना मुलगा मोबाइल वर अभ्यास करतांना दिसत होता. मायबाप जवळ आले की मुलगा अभ्यासाचं काढत होता आणि ते दूर गेले की खेळ. मायबापांना वाटत होते की माझा मुलगा किती अभ्यास करतो. अन् मायबापही मुलांजवळ का चोवीस तास बसून राहणार! त्यांना काय तेवढा वेळ होता का? नाही. ते मात्र लाकडाऊनं पैसा संपल्यानं व महागाईनं त्रस्त झाल्यानं सदैव व्यस्त होते. तेव्हा शिक्षकांनीच हवा तेवढा कस लावून आपली मुलं अभ्यासाकडे कसे काय वळतील यासाठी प्रयत्न करायला हवे होते. त्यानुसार शिक्षक प्रयत्न करीत होते.
शिक्षक हा कलाकार असायला हवा. त्याला नाटककला जमायलाच हवी. त्याला हसवून शिकविता यायला हवं. तसेच त्याला मुलं खिळवून ठेवता यायला हवी. त्यानुसार या ऑनलाइन शिक्षणात त्यानं विदुषकाची भुमिका पार पाडायला हवी. असं वाटत असतांना तो शिक्षक सर्वतोपरीनं प्रयत्न करीत होता. जेणेकरुन विद्यार्थी वर्गाला पाठ समजेल व शिक्षणातून कौशल्यविकास साधता येईल. तसेच हास्यविनोदानं अभ्यासात रुची वाढेल. एवढेच नाही तर मुलांना ते प्रश्न विचारत होते कधीकधी. त्यांची उत्तरं लिहून पाठवायला लावत असत. त्यातच ती प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी पाठवली की त्या शिक्षकांना आनंद वाटत असे.
मोबाइल द्वारे शिकवीत असतांना निव्वळ व्हिडीओ बनवून व्हायरल करतांना केवळ पाठ वाचन करुन चालणार नाही तर त्यासाठी चित्रांचाही वापर करावा.चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्त कळतं.तो अनुभव चिरकाल टिकतो. शिवाय एक अखंड पाठ किती प्रमाणात लघू करुन शिकविता येईल, याचा विचार शिक्षकाला करण्याची गरज होती. त्यासाठी चित्र काढून शिकविणे व छोटे छोटे प्रश्न तयार करुन शिकविणे चांगले. असं शिक्षकांना वाटत होतं. त्यानुसारच ते शिकवीत होते.
ऑनलाइन शिक्षण मोबाइल द्वारे शिकवीत असतांना छोटे छोटे प्रश्न, चित्र व मधामधात हास्यविनोद करुन बनविलेले स्वतःचे छोटे छोटे व्हिडीओ मुलांना पोस्ट केल्याने मुले अभ्यास करतीलच. त्यातच आठवड्यातून एक दिवस शिकवून झालेल्या पाठ्यांशावर एक पाच दहा गुणांची चाचणी घ्यावी.जेणेकरुन ती सोडवली का? किती सोडवली? हे पाहता येईल नव्हे तर अध्ययन निष्पत्ती मोजता येईल. त्याचबरोबर आपल्याला जे अपेक्षीत आहे. त्याचं फलीत मोजता येईल. अशाप्रकारे शिकविल्या गेल्यास ऑनलाइन अभ्यासातून कौशल्यविकास नक्कीच साधता येवू शकतो. पण हे सर्व तेव्हाच घडू शकते,जेव्हा पालकांचं आपल्या पाल्याच्या मोबाईल हाताळण्यावर पुरेपूर नियंत्रण असेल.पालकांनीही मुलांना फक्त अभ्यासापुरता मोबाइल द्यावा. तसेच जेव्हापर्यंत अभ्यास सुरु असेल.तेव्हापर्यंत बाकीची कामं बंद करुन पालकांनी स्वतः पाल्याजवळ बसावे. जेणेकरुन तो पाल्य निव्वळ अभ्यासच करु शकेल.फालतुच्या गोष्टी करायला वाव मिळणार नाही.
पालक मात्र उदासीन असले तरी शिक्षक अतिशय जीव तोडून जणू आपल्या स्वतःची लेकरं असल्यासारखं शिकवीत होता. तसाही शिक्षक हा वेतन घेत असला तरी तो आपल्या मुलापेक्षाही कितीतरी चांगल्या पद्धतीनं मुलांना शिकवतो. तो कितीतरी पुढं गेला आहे हे ऐकताच तो एवढा आनंदीत होतो की त्याला आपण जमीनीवर आहो की गगणात आहो, तेही कळत नाही. अगदी कोरोना काळातही आपल्या मुलाचं ज्याप्रमाणे नुकसान होवू नये असं शिक्षकांना वाटलं. तेच प्रयत्न त्यानं आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही केलेच.
आकाशचा विवाह झाला होता. त्यालाही दोन मुलं होती. त्यालाही वाटत होतं की आपला मुलगा शिकावा. आपल्या मुलांचं नुकसान होवू नये. पण तुटपुंजे पैसे. त्यातच मोबाईलचं ऑनलाइन शिक्षण. काय करावं, काय नाही असं त्याला वाटत होतं. मोबाईल तर घ्यावाच लागेल. कारण मोबाईल नाही घेतला तर आपल्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होईल असं त्याला वाटत होतं. शेवटी तो मोबाईलच्या दुकानात गेला. कागदपत्र गहाण ठेवली व एक दहा हजाराचा मोबाईल त्यानं आपल्या मुलाला घेवून दिला. आता त्याचा एक मुलगा मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करु लागला. पण दुस-याचं मात्र अतोनात नुकसान होवू लागलं. काय करावं हे त्यालाही समजत नव्हतं. सुचतही नव्हतं.
दि.५ सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होता. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जात असे. कारण ते आधी शिक्षक होते. पण ते पुढे देशाचे राष्ट्रपतीही बनले. त्यामुळे साहजिकच शिक्षकांचा सन्मान वाढला. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षकांचा सन्मान म्हणून हा दिवस सा-या भारतभर शिक्षकदिन म्हणून लोकं साजरा करीत असत.
शिक्षकदिन म्हणून हा दिवस साजरा करीत असतांना या दिवशी विद्यार्थी स्वतः शिक्षकांचा वेष परिधान करुन शाळेत येत. शिक्षकांना आराम देत. तसेच त्यांना एखादं पुष्प देवून वा एखादं बक्षीस देवून ते विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करत. तसेच त्या शिक्षकांना एक दिवस का होईना आराम देवून स्वतः शिकवीत असत.
सध्या जगात कोरोना आजार वाढतच चालला होता. त्यानुसार राज्यातच नाही तर देशातही आजार वाढत होता. अशावेळी लहान मुलांना धोका होतो, म्हणून कोरोनाच्या या पाश्वभुमीवर शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. शाळा सुरु कशा कराव्यात हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.
या शाळा सुरु करण्यावर तोडगा म्हणून शासनानं उपाय शोधला व ऑनलाइन शिकवा असं सांगीतल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविणे सुरु झालेले होते. तेव्हा मुलं शिकत होते. पण यावर पालकांच्या तक्रारी होत्या आणि संभाव्य धोके होते.ते म्हणजे
१)काही मुलांजवळ मोबाइल नव्हतं. त्यांचं अतोनात नुकसान होत होतं.
२)काही मुलांजवळ मोबाइल होतं. पण ते शिकण्याऐवजी खेळ खेळत होते.
३)मोबाईलची व्यवस्था होती. पण मुलं अभ्यास करीत नव्हते. ते पालकांना ऐकत नव्हते.
४)मुलांना कंटाळा येतो. म्हणून मुलं अभ्यास करीत नव्हते.
५)मोबाइल वापरामुळं मुलांच्या डोळ्यावर परिणाम होत होता. तसेच आरोग्यावरही परिणाम होतच होता.
अनेक अडचणी.......ज्याप्रमाणे पालकांसमोर होत्या. त्याचप्रमाणे शिक्षकांसमोरही होत्या.शिक्षकांची या कोरोनाकाळात सत्वपरीक्षाच सुरु होती. मोबाईल तंत्रज्ञानानं मुलं शिकविणं म्हणजे सत्वपरीक्षा नाही तर काय?
मोबाईलवर शिकविणं ही शिक्षकांसाठी तारेवरची कसरत होती. त्यातच सर्व मुलं शिकली पाहिजे हा शिक्षकांचा मानस असतो. पण मोबाईलवर शिकवितांना मुलं दिलेल्या वेळेच्या वेळी उपस्थीत होतात का? हा पहिला प्रश्न शिक्षकांसमोर उभा होता. मुलं जर उपस्थीत राहात नसतील,तर त्यांना उपस्थीत कसे करावे हाही प्रश्न शिक्षकांना सतावत होता. त्यातच काही मुलांजवळ चक्क मोबाईलच नाही तर त्यांच्यासाठी काय करावं? हाही प्रश्न शिक्षकांसमोर उभा होता.
ज्या ठिकाणी विद्यार्थी साध्या ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहू शकत नव्हते. तिथे ते विद्यार्थी शिकू शकत असतील का किंवा जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. पण ते लक्ष देतात का? अन् ऑनलाइन वर्गात दिलेला अभ्यास घरी स्वतः सोडवतात का की घरी कोणाकडून सोडवून घेतात. हे सगळे प्रश्न.
मोबाइल वापरुन ज्यांनी अभ्यास केला. त्यांचं ठीक होतं. पण ज्यांनी मोबाइल वापरुन मुळात अभ्यासच केला नाही किंवा ज्यांच्याजवळ मोबाइलच नव्हता. त्यांचं झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा असतांना आता मोठा पेच शिक्षकांसमोर उभा होता.
ही शिक्षकांची सत्वपरीक्षा जरी असली तरी यातून संभ्रमही निर्माण झाला होता. कारण मुळात विद्यार्थी अभ्यासात किती मागे राहिले किती नाही, हे तपासण्याला मार्ग नव्हता. कारण शिक्षक प्रत्यक्ष त्याची परीक्षा घेवू शकत नव्हते.
पाच सप्टेंबरला शिक्षकदिन होवू घातलेला होता. हा दिवस म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस होता. पण इथे शिक्षकांचेच हालहाल होत होते. ऑनलाइन शिक्षण.........त्यातच काही काही काँन्व्हेंटच्या शाळेत शिक्षकांच्या पगारातही कटूता केली होती. कारण त्यांचं वेतनच मुळात पालकांवर अवलंबून होतं. लॉकडाऊन मुळं पालकांचीही स्थिती डबघाईला आली होती. ते पैसे कुठून भरणार? त्यातच शाळेत पैसा न आल्यानं ते शिक्षक जरी शिकवीत असले मोबाइल द्वारे, तरी त्यांना वेतन कसे द्यावे हा प्रश्न शाळा संचालकावर येवून पडलेला होता आणि मोबाईलमध्ये पैसा कसा टाकावा शिकविण्यासाठी हाही प्रश्न खाजगी शाळेतील शिक्षकांना पडलेला होता. पालक त्यांना शाळेचं शुल्क कमी करायला लावत होते. कारण मुलांचं नुकसान होवू नये म्हणून पालकांनी नवीन मोबाइल घेतलेले असून त्यासाठी अनाठायी खर्च झालेला होता. शिवाय त्यात दरमहा टाकण्यात येणारा रिचार्जही पालकांचे कंबरडे मोडत होता. सरकार यासाठी सोई करण्याकडे कल देत नव्हते. तेव्हा या निमित्याने शिक्षकांसमोर जे प्रश्न उपस्थीत झाले होते.त्यावरुन स्वतः शिक्षकालाच हा शिक्षकदिन, दिन नाही, तर दीन वाटायला लागला होता. कारण हा कोरोना व्हायरस कोणाची नाही तर शिक्षकांचीच सत्वपरीक्षा घेत असल्याचे दिसून येत होता.
कोराना व्हायरसनं देशच नाही, तर जग धास्तावले होते. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. तसाच मृत्यूचाही आकडा वाढत होता. अनेकांचे रोजगार बंद होते. त्याचबरोबर अनेक रुग्ण पॉजिटिव्ह निघतच होते. काही लोकं आताही काळजी घेत होते तर काही लोकं आताही काळजी घेतांना दिसत नव्हते.
कोरोना होवू नये म्हणून काहीजण जनजागृती करीत होते. ते करणे साहजीकही होते. पण काही मात्र त्यात आतिशयोक्तीही करतांना दिसत होते. ती गोष्ट न आवडणारी गोष्ट होती.
आतिशयोक्ती याचा अर्थ दुस-याला आवश्यकता नसतांना ज्ञान सांगणे. बालिश बहू बायकात बडबडल्यासारखं. स्वतःत मात्र कोणतंही कर्तृत्व नसतांना माझ्यात कर्तृत्व आहे असा विचार करुन ती कर्तृत्वाची गोष्ट फुगवून सांगणं.
आम्ही शिकलो.कोणी उच्च शिक्षण घेतलं. त्यांना तर असं शहाणपण मोठ्या प्रमाणात आलं. कारण या शिक्षणासोबतच आमच्यातील माणूसकी नष्ट झाली. त्याचं कारणही तसंच घडलं. या उच्च शिक्षणासोबतच आम्हाला मिळालेल्या नोकरीनं पैसा वाढल्यानं आमच्यात जो अहंकारीपणा आला. तो अहंकारीपणा माणूसकीची खिल्ली उडवीत सुटलाय अशी गत समाजात झाली होती. तसेच जी मंडळी सामान्य शिकली होती.तीही मंडळी अर्ध्या हरकंडात पिवळी झाल्यागत वागतांना दिसत होती.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतात. जो पिणार तो गुरगुरणार. तशी आजची पीढी शिकून जास्तच गुरगुरायला लागली होती. ज्या ठिकाणी गुरगुरायचं त्या ठिकाणी आजची पिढी गुरगुरत नव्हती. ज्या ठिकाणी आवश्यकता नाही, त्या ठिकाणी आधी गुरगुरतांना दिसत होती. कार्यालयात नोकरी करतांना बॉस जर बदमाश असेल तरी ही शिकलेली मंडळी तो अन्याय जरी करीत असला तरी तो अन्याय मुकाट्यानं सहन करीत. आवाज उठवीत नव्हते. मात्र त्याच्या हाता खालच्या कर्मचा-यांना ते अनन्वीत वेदना देत असत गुलाम असल्यागत. त्यामुळं यालाच शिक्षण म्हाणायचं का? असाही प्रश्न पडत होता.
मृत्यू.......मृत्यू हा आज ना उद्या येणारच.तुम्ही घाबरलात तरी मृत्यू येणार. अन् नाही घाबरलात तरी मृत्यू येणार. तुम्ही काचबंद पेटीत जरी लपून बसलात, तरी मृत्यू येणार. मग तो कोरोनाच्या रुपानं असो की इतर बाबीनं असो. कोणाजवळ कितीही मोठं शिक्षण असलं, कितीही पैसा असला तरी मृत्यूनं त्याला सोडलेलं नाही. मृत्यूची वेळ आणि घटिका ठरलेली आहे. तशी मानसिकता कोरोनाबाबतही आपल्या मनात निर्माण करायला हवी. इतर आजारानं मृत्यू येत नव्हता काय? हाही प्रश्न आपल्या मनात निर्माण करुन कोरोनाशी दोन हात करायला हवं. यामुळंच मृत्यूवरील व कोरोनावरील भीती नष्ट होवू शकेल असं काही लोकं मानत होते.
कोरोनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक व्यक्ती दुस-याला मार्गदर्शन करतांना सांगत होता.
''काळजी घ्या बरं.कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना रुग्णाचे फार हाल होतात. रुग्णालयात खाटा शिल्लक नाहीत. मास्क लावा. सानिटायझर लावा. सारं काही. तुम्ही जर काळजी घेणार नाही तर तुमच्यापासून आम्हालाही होईल. कोरोनाच्या संपर्कात येवू नका.''
असे असतांना डॉक्टरांनी तसा विचार जर केला तर कोरोना रुग्ण सुधारणार काय? त्याच्यामते, ते फार स्वतःची काळजी घेत असतील असे वाटत होते. मग काळजी जर घेत आहे.तर मग घरातून बाहेर पडलेच कसे? हा प्रश्न जे त्याचं ऐकत होते. त्याला पडला होता. कारण लॉकडाऊन सुरुच होतं. काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊन उघडलेलं नव्हतं.
वर्तमानकाळात अशी पिढी निपजली आहे की 'जे लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण' असल्यागत वागत असतात. आपण स्वतः तसे वागत नाही. पण शहाणपणा नक्कीच सांगतात. तसेच जे शहाणपणा सांगत होते. कोरोना त्यालाच छळत होता. सामान्य माणसांपेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात. आज नट नटी, क्रिकेटरलाही कोरोना झालेला होता. मग त्यांना का व्हावा कोरोना? कारण ते तर दूरदर्शनसारख्या माध्यमातून मास्क वापरा. सानिटायझर वापरा अशी जाहीरात करीत होते.
कोरोना हा आजार जरी असला तरी काही प्रमाणात हा आजार मानसिकतेचं खच्चीकरण करीत होता. ह्या आजारानं लोकात दहशत होती. एखाद्याला कोरोना झालाच तर त्याला वाळीत टाकलं जात होतं. आपल्यालाही होईल ही भीती होती. सर्वत्र कोराना रुग्णाबाबत भेदभाव आणि बहिष्कार. जर असाच भेदभाव डॉक्टर आणि परीचारीकांनी केला असता, असाच भेदभाव पोलिसांनी केला असता, असाच भेदभाव शिक्षकांनीही केला असता........तर खरंच कोराना आजार बरा झाला असता की वाढला असता.........ही विचार करायला लावणारी बाब होती. नक्कीच वाढणारच होता. मग हे दुर्बलीकरण का? मानसिकता सबळ करण्याचं काम कोणीच करीत नाहीत. उलट कोरोनाच्या रुपानं मानसिकतेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. असं आकाशला वाटत होतं.
कोरोनाबाबत अपप्रचार करु नये म्हणून मिडीया व प्रशासन जागृत असावं. सामान्य पातळीवर कोरोनाचा अपप्रचार सुरु नसावा. कोरोना होवू नये म्हणून बहुतःश सर्वच लोक स्वतःची काळजी घेत होते. असं असतांना काही लोकं उगाच त्याचा बाऊ करीत असतांनाही दिसत होते. कोरोनाच्या आजाराबाबत मानसिकता तयार करण्याचं काम कोणीच करतांना दिसत नव्हते. कोरोना झालाच तर घाबरण्याचं कारण नाही असं कोणी सांगत नव्हते. मात्र घाबरवण्याच्या गोष्टी मुळात जास्त प्रमाणात सुरु असलेल्या दिसत होत्या. लॉकडाऊन लावायचं! केव्हापर्यंत लावायचं. उपासानं मरत असेपर्यंत. हे असं उपासानं मरण्यापेक्षा कोरोनानं मरण पावलेलं चांगलं. कारण कितीही कोरोनाला घाबरवून स्वतःला कैदेत ठेवलं, तरी कोरोनाचा संपर्क होवून आपण केव्हा कोरोनाबाधीत होवू हे काही सांगता येत नव्हतं. तेव्हा माणसानं कोरोनाला न घाबरता हिंमतीनं कोरोनाशी लढायला हवं. जमेल तेवढी काळजी घ्यायला हवी. बाकीच्या गोष्टी नशीबावर ठेवाव्यात. असं जर आपण करणार नाही. तोपर्यंत आपण कोरोनाशी लढू शकणार नाही व देशाला कोरोनामुक्तही करु शकणार नाही. कारण कोरोनाच्या संपर्कात आल्याशिवाय आपल्या शरीरात कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती तयार होणार नाही. म्हणून कोरोनाच्या पाश्वभुमीवर कोणी कोणाचं खच्चीकरण करु नये. असं मत आकाशचं होतं.

देशात शेती करायला कोणी पाहात नव्हतं. लोकं शेत्या विकत होते. कारण शेती पाहिजे त्या प्रमाणात पीकत नव्हती. आत्महत्येचं सत्र सुरु होते. सरकारी मदत पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यानं शेतक-याचं अतोनात नुकसान होत होते. त्याचबरोबर देशात कोरोनाचं सत्र सुरु होतं. सर्वत्र भीतीचं वातावरण. लाकडाऊनचा असर अजूनही देशात होता. कामधंदे सुरु झाले होते. पण अजूनही ब-याच लोकांना कामं मिळालेली नव्हती. काही लोकं अजूनही खाली होते.
देशातील बराचसा भाग हा शेतीवर अवलंबून होता. लोकांनी आपल्या शेतात शेतमालाची पेरणी केली होती. शेतात पीकं चांगलीही होती. मात्र जेव्हा सोयाबीन फुलावर आलं.तेव्हा मात्र पाऊस सुरु झाला. तो पाऊस टिपीर टिपीर सुरु झाला. त्यामुळं पीकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. अर्थात त्या पावसानं पीक कोमेजण्यास मदत झाली.
पीकांच्या वाढीला लागणारा सुर्यप्रकाश. या काळात सुर्य निघालाच नसल्यानं त्यामुळं या सुर्यप्रकाशानं वनस्पतीच्या पानात जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते. त्यातून वनस्पती जे अन्न निर्माण करतात. ते वनस्पतींना करता न आल्यानं वनस्पतींना पुरेसं अन्न मिळालं नाही. महत्वाचं म्हणजे यातून रोपांची पानं पिवळी पडली. त्यातच अख्खं झाड करपलं. तसंच काहींची फुलं करपली. काहींना शेंगा लागल्या. पण त्याही पोचट. त्यामुळं काही भागात ही सोयाबीन कापता येणं शक्य झालं नव्हतं. अशी स्थिती एकंदर ब-याच लांबपर्यंत दिसत होती. त्यावरुन असं वाटत होतं की शेतक-यांच्या शेतात यावर्षी कोरोना तर शिरला नाही.
एकीकडे हा कोरोना घरी राहिल्यास लोकांना उपासानं मारत होता. दुसरीकडे हा कोरोना कामावर गेल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव होवून आजारानं मारत होता. अशावेळी काय करावे लोकांना सुचत नव्हते. अशातच सरकारपुढेही पेच निर्माण झाला होता. या कोरोनासारख्या आजारावर मात कशी करावी? हा प्रश्न सरकारपुढे उभा होता. लाकडाऊन लावलं तरी लोकं मरतात. नाही लावलं तरी लोकं मरतात. त्यामुळं सरकारलाही सुचेनासे झाले होते. त्यातच आता शेतक-यांच्या पीकांचं नुकसान. कदाचित हे होत असलेले नुकसान कदाचित कोरोनाचं तर लक्षण नाही. कदाचित कोरोनानं पीकांना तर छळलं नसावं असं वाटायला लागलं होतं.
शेतकरी आत्महत्या.........अशाच शेतकरी आत्महत्या होत असतात. शेती करण्यासाठी बियाणे खते घेण्यापासून तर पुढं पीक हातात येईपर्यंत सतत शेतक-याला पैसा लावावा लागतो. नांगरणी करणे, बीयाणे घेणे, ती पेरणे, त्यानंतर खते टाकणे,निंदण करणे, डवरा मारणे, पाणी देणे, किडनाशक तणनाशक मारणे, कापणे, मळणी यंत्राने धान्याचे विलगीकरण करणे, ते बाजारपेठेत नेणे इत्यादी सर्व कामे शेतकरी आपल्या शेतात करतात. या सर्वच गोष्टीला पैसा लागतो. मग आशा असते की धान्य विकल्यावर हा पैसा निघेल. पण असा पैसा जर निघत नसेल तर शेतकरी जगणार कसा? कर्जही काढेल. पण ते कर्ज केव्हापर्यंत मिळेल. कोण केव्हापर्यत कर्ज देईल. सततचा दुष्काळ जर पाचवीलाच लागला असेल शेतक-यांच्या तर शेतकरी कसा जगेल? हाही प्रश्न होता.
शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगेल तर देश जगेल. पण जिथे अख्खा देश कोरोनाच्या संकटात असतांना व पीकांचीही अशा स्वरुपाची अवस्था असतांना देश तरी कोणते पाऊल उचलणार हा न उलगडणारा प्रश्न होता. देशालाही वाटत होतं की शेतकरी जगावा. पण अशा शेतक-यांची संख्ख्या बोटावर मोजण्याएवढी असते का? याचं उत्तर नाही असंच होतं.
महत्वाचं म्हणजे सरकारला जरी वाटत असेल की शेतकरी जगला पाहिजे तर सरकारनं एक काम कमी करावं आणि ज्या भागात असं नुकसान झालं, त्या भागातील लोकांना सरकारनं नुकसान भरपाई द्यावी. कारण शेतकरी जगेल तर देश जगेल. जर अशी नुकसान भरपाई शेतक-याला मिळाली नाही तर असे शेतकरी आत्महत्येने मरतील. मग शेती करायला कोणी वाली उरणार नाही. शेती होणार नाही. धान्य पीकणार नाही. कोणी पीकवणार नाही. मग जिथे शेतीच पीकणार नाही. तिथे पोटाला अन्न तरी कोठून मिळणार. तेव्हा ही परिस्थिती येवू नये. म्हणून त्याला जगविण्यासाठी सर्व समाजातील घटकांनी मदत करावी. जेणेकरुन शेतकरी जगेल तर देश जगेल असं म्हणता येवू शकेल.
शेतकरी कोरोनाच्या काळात असाच संकटात असतांना सरकारनं शेतक-यांसाठी एक योजना आखली होती. त्या योजनेनुसार कोणताही माल बाजारपेठेत न नेता व दलालांकरवी न विकता तो माल व्यापा-यांकरवी करार करुन थेट विकायला भाग पाडणारा कायदा सरकारनं बनवला होता. पण हा कायदा शेतक-यांना हिताचा वाटत नसल्यानं शेतकरी आपल्या हक्कासाठी थंडीच्या दिवसात थंडीत कुडकुडत लढत होते. एवढेच नाही तर कोरोनाच्या संकटातही सरकारशी ते संकट न बाळगता लढत होते.
आकाशचेही वडील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनाही तशीच समस्या होती. शिवाय नदीला पाणी येत नसल्यानं फक्त पावसाळी पीक येत होतं. बाकीचा हंगाम कोरडा जात होता. त्यातच आता सरकारचं धोरण. त्यांना वाटत होतं की आपण आपला माल करार न करता बाजारपेठेतच विकावा. करार करुन उद्योगपतींना विकू नये. त्यात नुकसान आहे. म्हणून ते इतर शेतक-यांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते.
मंदीर........आजही कुलूपबंद होती. गणपती उत्सव गेला, आता नवरात्र आला. गणपती जसा थंड तसाच नवरात्रही थंडच जात होता. महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरस आला आणि सर्वांना त्रासदायक ठरला. या व्हायरसनं भल्याभल्यांची वाट लावलेली होती. आताही काही लोकांचा रोजगार बंदच होता. त्यात मंदीर आणि मंदीरातील कर्मचा-यांचा समावेश होता.
कोरोना येण्यापुर्वी बहुतःश मंदीरातील पुजा-यांच्या व ट्रष्ट वाल्यांच्या बोटात दोन दोन सोन्याच्या अंगठ्या दिसायच्या. तसेच अंगावर जाडजाड सोन्याच्या साखळ्याही दिसायच्या. आता मंदीर बंद असल्यानं त्यांची चिंता वाढत होती. पोटाचा प्रश्न त्यांच्याहीपुढं निर्माण झाला होता. त्यांनाही जगायचे कसे हाच प्रश्न होता.
पुर्वी देव्यांच्या नावावर व्यापार होत होता. लोकं लुटत होते. पण देव्यांना बदनाम केलं जात होतं. त्या मंदीरात एवढं महाग आहे. खरंच देव्या काय खात होत्या काय? नाही तर ह्या देव्यांच्या नावावर मंदीरातील पुजारी व्यापार करीत होते. म्हणूनच दोन दोन बोटात सोन्याच्या अंगठ्या व गळ्यात सोनसाखळ्या. त्यातच त्या भावीक स्थळावरील लोकं किरायाची खोली देतांना अक्षरशः महागडी देत होते. जणू या देशातील गरीबांनी दर्शनालाच जावू नये.
आज मात्र चित्र वेगळं होतं. कारण देव्या रुष्ट झाल्यासारख्या वाटत होत्या.
कोरोनाच्या आगमनानं जनजीवन प्रभावीत झालेलं असून आजही मंदीरं खुली करण्यात आलेली नव्हती. त्यातच राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद चव्हाट्यावर आला होता. मग राष्ट्रपती शासनाची शिफारस झाली. वाद एवढा शिगेला पोहोचला की इथे राष्ट्रपती शासन लावावं म्हणून काही विरोधी पक्ष न्यायालयात गेले. न्यायालयानं निर्णय दिला की महाराष्ट्र म्हणजे एकटी मुंबई नाही तर महाराष्ट्र कितीतरी दूरवर पसरलेला आहे. त्यानुसार मंदीरं सुरु झालेली नाही.
नवरात्रोत्सव........या नवरात्रात लोकांची धुमधाम असायची. लोकं नटूनथटून देव्यांच्या मंदीरात जात होते नव्हे तर त्या देवीच्या नावानं गरबा खेळून मनोरंजन करीत होते. तसेच काही लोकं आपलं दुकान थाटून चार पैसेही कमवीत होते. काही काम न करणारे लोकं नवही दिवस देवीच्या मंदीरात जावून आपले नव दिवस भरपेट खावून अन्नाची गरज भागवीत होते. काही मंदीर चालक तसेच पुजा करणारी मंदीराधीश माणसं या मंदीरात येणा-या दानावर आपला वर्षभराचा चरितार्थ चालवत होते. काहींनी हा धंदाच बनवला होता. या देव्या आज मात्र कुलूपात बंद असल्यानं आता मंदीरावर अवलंबून असलेले पुजारी, कर्मचारी तसेच काही दुकानदार यावर संक्रांत आली होती नव्हे तर या उत्सवानिमित्य नटणं थटणं बंद असल्यानं महिलांना कंटाळवाणं वाटत होतं नव्हे तर या गरबाच्या नावानं या भोळ्याभाबड्या मुलींना फसविणारे महाभाग आता दिसणार नव्हते.
नवरात्र हा खरा तर देवीचा. दरवर्षी नवरात्रात देव्या दगडाच्या जरी असल्या तरी त्या साक्षात पृथ्वीवर येतात असे काही लोकं मानतात. मग असे असतांना व देव्या साक्षात अस्तित्वात असतांना आज कोरोना कसा शिरजोर होत होता. ते कळत नव्हतं. त्यातच या नवरात्रात गरबा खेळणा-या कित्येक भोळ्याभाबड्या मुलींच्या भावना देवीनं का ऐकल्या नव्हतं ते कळत नव्हतं. तसेच ह्याच देव्या आजपर्यंत पुजाविधी करणा-या पुजा-यांवर तसेच ती पुजा करुन घेणा-या कर्मचा-यांवर का रुसली तेही कळत नाही. याचं कारण तसंच होतं.
आज आमचा समाज बळजबरीनं व आपल्याच मनानं काही कृत्य करीत असतो. काही मुली नटूनथटून ज्या नवरात्र निमित्यानं गरबा खेळायला मंदीरात येतात. अशा मुलींना फुस लावून पळवून लावणारे लोकं देव्या आपल्या उघड्या डोळ्यानं पाहात असतात. ते देव्यांना सहन होत नाही. काही मुलींवर बलत्कार होतांना देवी प्रत्यक्ष डोळ्याने पाहते. तेही तिला सहन होत नाही. एवढंच नाही तर देवीच्या या मंदीरातच काही महाभाग हे प्रत्यक्ष स्रीयांना जाळतात. बलत्कार करुन जाळतात. म्हणूनच कदाचित कोरोनानं आज असे प्रकार घडू नये म्हणून मंदीरं बंद केलेली असावी असं वाटत होतं.
हे विश्व म्हणजे देव्यांचा गाभारा असतांना या विश्वात आजही स्रिया हुंड्यासाठी छळल्या जातात. आजही लोभामुळं पुत्र बापाची हत्या करतो तर रागामुळं बाप पुत्राची. माणुसकी राहिलेली नाही. ती मेलेली आहे. खरं तर या देव्यांना मंदीर पुजारी आणि ट्रष्ट वाल्यांनी गुलाम केलेलं असावं असं वाटत होतं. कारण जो जास्त पैसा दान म्हणून देईल. तो तेवढा श्रीमंत आणि सतत नापिकीनं त्रस्त असणारा शेतकरीही जेव्हा मंदीरात आशा घेवून जातो आणि या देवीस फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून देवीला पाच रुपयाची वस्तू वाहतो. तरीही त्याची आत्महत्या. कारण देवी श्रीमंतांची गुलाम आहे असेच वाटत होतं. देव्या या आत्महत्या का वाचवत नाही. कारण पाप बरेच वाढले आहेत असंही वाटत होतं. म्हणून गरीबांनाच वर नेणे सुरु होते पृथ्वीवरील ओझं कमी करण्यासाठी. कारण गरीबांजवळ मोठमोठ्या रुग्णालयात उपचार करायला पैसे नसतात.
देव्याही आज कंटाळल्या आहेत असे करतांना. असं वाटत होतं. कारण आज पुजारी तसेच मंदीर ट्रस्ट मालकाच्या गुलाम असल्यासारखी वागणूक देव्यांना मिळत होती. कधीही मालकाच्या म्हणण्यानुसार मंदीराला कुलूप. प्राणी, पक्षी मंदीरात जावू नये. आज पैशाच्या भुकेल्या देव्या जरी नसल्या तरी या देव्यांच्या नावावर लोकांचा व्यापार करणे सुरु होते. 'तुम्ही अमुक गावावरुन आले. जरा जास्त दान टाका." "तुम्ही शंभरचा हार घ्या. दहाचा काय घेता राव." "साहेब ही पुजा सातशे रुपयाची आहे. ह्यानं हे होईल. त्यानं ते होईल." असे म्हणून लुटणारी मंडळी पाहून देव्याही कंटाळल्या होत्या. त्यामुळं देव्यांना कुठंतरी सुरक्षा हवी होती. त्यातच कामाचं सततचं ओझं असल्यानं देव्यांना आराम नव्हता. म्हणूनच आज या नवरात्रात देव्यांनी आराम करायचं ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनाही आराम करु द्या. त्यांच्या आरामात विघ्न वा व्यत्यय आणू नका. असा संदेश आज कुलूपात बंद ठेवून कोरोना देत होता. कोरोनामुळंच देव्याही आनंदीत झाल्या की काय असे चित्र दिसते होते नव्हे तर या चित्रामधूनच ज्यांनी कोणी देव्यांना गुलाम मानलं. त्यांना आज देव्या धडा शिकवीत आहे अस चित्रं दिसत असून हे मंदीर बंद असल्यानं पुजारी व ट्रष्ट कंगाल होतांना दिसत होतेे. म्हणूनच मंदीर सुरु करा असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा कोरोनाच्या रुपानं त्यांनी बोध घ्यायला हवा.जेणेकरुन कोणावरच संक्रांत निर्माण होणार नाही नव्हे तर जेवढं पचते तेवढंच भाविकांना लुटावं. जास्त अतिरेक केल्यास आज कोरोना आला. उद्या अजून कोणता रोग येईल.त्यातच आज केवळ उपासमार होते. उद्या मात्र महामारी निर्माण होवून कोणतेच औषध त्या महामारीवर चालणार नाही व अख्खी पीढी गारद होईल गव्हासोबत सोंडा पिसल्यागत.........हेच कोरोना पदोपदी सांगत होता एखाद्या वेड्यासारखा........असं क्षणाक्षणाला वाटत होतं.
कोरोना व्हायरस आला. त्यानुसार शाळा बंद ठेवल्या गेल्या होत्या. तसेच शाळा बंद असल्यानं ऑनलाइन तीन दिवसाचं प्रशिक्षण झालं. मुलांची कशी सुरक्षितता करावी यासंदर्भात माहिती होती. त्यांचे हक्क काय? इत्यादी माहिती होती. तसेच बालकांची अस्मिता दुखावू नये याबाबतही माहिती सांगीतली होती. त्यानुसार त्यांचं बरोबर होतं.
बालकांची सुरक्षा? खुप मोठा ऐरणीचा प्रश्न. कोणं करावी? हाही प्रश्न. शिक्षकांनी अपशब्द बोलू नये. ठीक आहे. पालकांनीही अपशब्द बोलू नये. ठीक आहे. समाजानेही अपशब्द बोलू नये. याबाबतीत ठीक आहे असं म्हणता येणार नाही. कारण कोणाकोणाची आपण तोंड बंद करणार आहो. खरं तर इथेच प्रश्न पडतो आहे.
बालकाची सुरक्षितता जोपासतांना त्या बालकानं गुन्हा जरी केला एखादा, तरी त्याला रागावू नये तर त्याला तुझा गुन्हा नाहीच असे म्हणून हळूहळू त्याचे मन बदलण्याचा प्रयत्न करायचा होता. बरोबर आहे. हे साधारणतः ज्यांचे घरी मायबाप दोघंही जीवंत आहेत. तिथं ठीक होतं. ज्यांना सर्व सुविधा मिळतात. त्यांच्यासाठी ठीक होतं. पण प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी होती. विद्यार्थ्यांच्या मानसिकता फक्त त्याला अपशब्द बोलण्यानंच बिघडत नव्हत्या तर त्या मानसिकता कशाप्रकारे बिघडतात, त्याची कारणे खालीलप्रमाणे देता येतील.
१) त्यांना कोणी काही म्हटलं तर........
विद्यार्थी हे शिकत असतात. त्यांना स्तुती आवडते. त्यांना कोणी वाईट म्हटलेलं आवडत नाही. जर एखाद्यानं कधी वाईट म्हटलंच तर ते त्यांना आवडत नाही. त्यातच ते जास्त माया शिक्षकांवर करीत असतात. त्यामुळं शिक्षकांचं रागावणं त्याला अजिबात आवडत नाही. त्यातूनच त्याला काही म्हटल्यास तो आपली मानसिकता बदलवतो व तो शिकू शकत नाही असा विचार मानसशास्रज्ञांनी केला. त्यातूनच उपाय सुचवून शिक्षकांनी विद्यार्थी वर्गाला अजिबात रागावू नये. हा उपाय आणला. परंतू यातून दुरगामी परीणाम झाले. ते म्हणजे असा विद्यार्थी एवढा वाया गेला की त्याला कोणी काही बोललेलं अपमानच वाटायला लागला. त्यातूनच एखाद्या वेळी नकळत अपशब्द बोलल्यास तो अपशब्द सहन न झाल्यानं तो अात्महत्याही करु लागला. शिक्षक ठीक आहे नोकरी वाचविण्यासाठी बोलणार नाही. पण इतरांची तोंड कशी झाकता येतील! त्यामुळं हे असं घडलं.याचा विचार मानसशास्रज्ञांनी केलेला नव्हता.
२) त्यांच्या शिक्षकांना कोणी काही म्हटलं तर.........
विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आईवडील आवडतात. त्याचप्रमाणे त्याला त्याचे शिक्षकही आवडतात. तो आपल्या शिक्षकांबद्दल अपशब्द ऐकत नाही. जर एखाद्या वेळी आईनं वेगळी रीत जरी उदाहरणांची सांगीतली तरी तो विद्यार्थी आईबाबानं सांगीतलेली सोपी रीत वापरत नाही तर शिक्षकांनी शिकविवेली कठीण रीत वापरतो. एवढं घट्ट प्रेम विद्यार्थ्यांचं शिक्षकांवर असते. तो शिक्षकांबद्दलही अपशब्द ऐकू शकत नाही. पण खासगी शाळेत मात्र याच विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांचा पदोपदी अपमान केला जातो. ते देण म्हणून संचालकांना पैसे देत नसल्यानं शिक्षकांचा विद्यार्थ्यांसमोर अनन्वीत छळ केला जातो. रोजच वारंवार अपशब्द बोलले जातात. ह्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना तसे बोललेले आवडत नाही व ते विद्यार्थी आपल्या मनात न्युनगंड निर्माण करु शकतात. ही शक्यता नाकारता येत नाही.
३) त्यांच्या आईवडीलांना कोणी काही म्हटलं तर......
विद्यार्थी वर्गाला ज्याप्रमाणे आपल्या शिक्षकांना काही बोललेले चालत नाही, त्याप्रमाणे त्यांच्या आईवडीलांनाही काही बोललेले चालत नाही. त्यांच्या आईवडीलांना कोणी अपशब्द बोलल्यास ते सहन होत नाहीत. त्यातूनच कधीकधी भांडणं होतात. मुडदे पाडली जातात.
४) त्यांच्या मित्रांना कोणी काही म्हटलं तर........
विद्यार्थी अपशब्दाबाबत एवढा भावूक असतो की त्याला एखादा अपशब्द आईवडील जरी बोलले तरी ते त्याला सहन होत नाहीत. त्यातच त्याचं एखाद्या मुलीवर प्रेम असेल आणि त्या मैत्रीणीला त्याचे आईवडील जरी काही बोलत असतील तरी ते त्या मुलाला सहन होत नाही. ते आईवडील त्याला समजवितात की हे कोवळं वय आहे. असं प्रेम केल्यानं करीअर नष्ट होतं. पण ती मुलं ते करीअर न पाहता खुद

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED