तोतया वारसदार - भाग 30 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 30

तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       सारंग वकिलांचा चपराशी.

सुभाष गोखले                 बबनचा बार मधला मित्र.

भाग  ३०                  

भाग २९  वरून पुढे  वाचा....

 

बबन आणि सुभाष गोखले, कॉफी हाऊस मधे बसले होते.

बबन म्हणत होता, “गोखले साहेब, किती प्रयत्न केला संपर्क करायचा, पण तुम्ही तर अदृष्यच झाले होते. जवळ जवळ तीन हप्ते झाले, तुमचा काही निरोप नाही, भेट नाही, काय समजायचं मी? सगळंच आपल्या हातातून निसटतंय असं वाटायला लागलं होतं मला. एवढी मोठी संधी हातातून जाते की काय अशी भीती वाटायला लागली होती. काल जेंव्हा तुमच्याशी बोललो तेंव्हा जरा बरं वाटलं. मला आता सांगा की,  मागच्या वेळेस तुम्ही म्हणाले होते, की तुमच्याकडे आयडिया आहे पण सांगितलं काहीच नाही. निदान आता तरी सांगा कुठवर आली आहे प्रगती?”

“सांगतो, सांगतो जरा धीर धरा. पण आधी मला सांगा की बाकीची परिस्थिती काय आहे?” सुभाष गोखले.

बबनने मग त्याला सारंगने जी टिपणं केली होती ती वाचली होती, त्यावरून सुभाषला अपडेट दिलं.”गोकर्ण चे लक्ष्मणराव गोखले, साताऱ्याचे  विश्राम आणि अनिल गोखले,

सांगलीचे अक्षय साने, जे आता सुरतला असतात, ही सगळी मंडळी वंशावळी प्रमाणे सापडली आहेत. पण मुख्य म्हणजे त्यांच्यापैकी कोणालाच प्रॉपर्टी मधे हक्क नको आहे. जरा विचित्रच दिसताहेत ही गोखले मंडळी. एवढी मोठी इस्टेट, सरळ अजिबात इंट्रेस्ट नाही म्हणतात म्हणजे काय?” सान्यांचं अजून काही कळलं नाहीये, पण त्यांनी हो म्हंटलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही.

“म्हणजे, वंशज सापडले भरपूर, पण अजून पर्यन्त तरी कोणी संपत्ती वर दावा ठोकला नाहीये. आपलं काम सोप झालं आहे. आता मी काय केलं आहे आणि काय करणार आहे ते सांगतो.” - सुभाष.

“सांग बाबा सांग लवकर. माझी जास्त उत्सुकता ताणू नकोस.” – बबन

“आम्ही मूळचे बांग्लादेश मधले. बांग्लादेशात, आम्ही गोपालगंजला होतो. परिस्थिती खूप चिघळत चालली होती, शाळेत मला खूप  त्रास देत होते, बाबांनी मग माझं शाळेतून नाव काढून टाकलं. तिथून आम्ही कसे बसे त्रिपुराला पोचलो, तिथून गुवाहाटी आणि मग कलकत्ता. तिथे हिंद मोटर या उपनगरात राहिलो. बाबांना तिथे नोकरी पण मिळाली. तिथल्या शाळेत माझं नाव टाकलं. पण बाकीचे लोकं आम्हाला बांग्लादेशी म्हणून दूरच ठेवायला लागले. तिथे बाबांचा अपघातात मृत्यू झाला. मग एका काकांच्या सल्ल्याने आम्ही अर्ज केला आणि चंद्रपूरला बंगला शरणार्थी शिबिरात आश्रय मिळाला, रहायला जागा मिळाली आणि माझं शिक्षण सुरू झालं. तिथूनच मॅट्रिक झालो. मग कॉलेज आणि बी.कॉम झाल्यावर इथे महापालिकेत नोकरी मिळाली.”

बबनने सगळी कहाणी ऐकली पण तो सॉलिड गोंधळला होता, म्हणाला, “ही तुझी हकीकत झाली, याचा आपल्या कामाशी काय संबंध आहे, हे कळतच नाहीये.” 

“सांगतो, आता मी काय केलं ते सांगतो. पण त्याआधी माझं बॅक ग्राउंड तुम्हाला समजणं आवश्यक होतं, म्हणून ते सांगीतलं.

माझ्या वडिलांचं नाव आश्विन. गोपालगंज शाळेच्या लिविंग सर्टिफिकेट वर तेच  नाव होतं. माझ्या सोशल वर्क मुळे मी बऱ्याच बादमाश लोकांच्या संपर्कात येतो, कोणी तरी पूर्वी मला खोटे  कागद पत्र कोण तयार करतो हे सांगितलं होतं. आता काही वर्षांपूर्वी सांगीतलेलं नाव माझ्या लक्षात नव्हतं. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की कधी काळी आपल्याला या माहितीची गरज पडेल म्हणून. मग माझा एक कॉँटॅक्ट  होता, जो एका भानगडीत चांगलाच अडकला होता, माझी ओळख वापरुन मी त्यातून त्याला सोडवला. त्याच्यावर उपकार केले होते. त्या उपकाराची आठवण ठेवून तो माझं काम करेल असं वाटून मी त्याच्याशी संपर्क केला.” – सुभाष.

“माझ्या डोक्यात अजूनही काही प्रकाश पडत नाहीये. काय नेमकं केलं तुम्ही? आणि त्याचा आपल्या कामाशी काय घेणं देणं आहे? नीट खुलासेवार सांगा.” – बबन.

“:मी त्या माणसाला म्हणजे चंदूला पकडलं, आणि त्याला विचारलं की खोटे कागद बनवणारा कोणी परिचित आहे का म्हणून.” – सुभाष.

‘मग? पण कोणचे कागद” – बबन अजूनही गोंधळलेला होता.

“बाबांनी जेंव्हा शाळेतून माझं नाव काढलं तेंव्हा, माझं लिविंग सर्टिफिकेट शाळेतून बनवून  आणलं होतं. आज पर्यन्त कधी अडचण आली नव्हती, पण आता ते सर्टिफिकेट बदलणं आवश्यक झालं होतं.” सुभाष सांगत होता. “त्या शिवाय आपली योजना पढे सरकणार नव्हती.”

“अहो, तुमच्या बांग्लादेश मधल्या प्राथमिक शाळेच्या सर्टिफिकेटचा आणि आपल्या कामाचा काय संबंध आहे? सुभाषराव  फालतू गोष्टी मधे वेळ घालवू नका.” बबन आता वैतागला होता.  “आपलं काम वेळेत तडीस जायला हवं नाहीतर खर्चा परिस खर्च होईल आणि हाती काहीच लागणार नाही.”

“बबनराव तुमच्या अजून लक्षात येत नाहीये आपली व्यूह रचना?”– सुभाष.

आता बबन चिडला. त्याचा स्वर जरा त्रासिक झाला. क्षणभर तो स्वस्थ बसला. त्याने स्वत:ला सावरलं. सुभाषला दुखवून चालणार नव्हतं. त्यानी माघार घेतली तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. तो शांत पणे म्हणाला, “सुभाषशेट, मला समजेल अश्या भाषेत सांगाल का? माझ्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली आहे. तेंव्हा प्लीज कोड्यात बोलू नका.” – बबन

“बबनराव जरा शांत पणे घ्या. असं बघा आज मी शाळेचं सर्टिफिकेट बदलून घेतलं. कारण त्याच्यावर माझ्या वडिलांच नाव “आश्विन” असं लिहिलं होतं की जे खरं होतं. मी ते बदलून आश्विन च्या जागी अविनाश करून घेतलं आहे. हे बघा सर्टिफिकेट.” सुभाषने दोन्ही कागद बबनला दाखवले. बबन चकीतच झाला. दोन्ही कागद हुबेहूब सारखे होते फक्त एकावर सुभाषच्या वडिलांचं नाव आश्विन होतं आणि एकावर अविनाश. नवीन कागद सुद्धा तितकाच मळका आणि सुरकुतलेला होता, त्यामुळे नवीन कागद सुद्धा २० - २५ वर्ष जुना वाटत होता.

“किती हुबेहूब बनवलं आहे हे नवीन सर्टिफिकेट. मानलं पाहिजे तुम्हाला सुभाषराव. असं काही करता येतं हेच मला माहीत नव्हतं, आणि तुम्ही तर अगदी सहज केलेलं दिसतंय. पण मला अजूनही शंका आहे की गोपालगंज प्राथमिक शाळेचं सर्टिफिकेट बदलून काय साधलं तुम्ही?” आता बबन पुरता गोंधळला होता.

“बबनराव, हे बेसिक डॉक्युमेंट आहे. या कागदाचा उपयोग करून, अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. अजून काही सर्टिफिकेट बदलायची आहेत.” – सुभाष.

“तुम्हाला कुठे इंटरव्ह्यु द्यायचा आहे का? नाही, तुम्ही बायोडेटा तयार करायच्या मागे लागला आहात म्हणून  विचारतो आहे. तुमचं आपल्या कामाकडे दुर्लक्ष होतं आहे असं मला वाटतंय” बबन बोलला. त्याच्या स्वरात आता चीड स्पष्ट दिसत होती.

“तुमचा एक अंदाज सपशेल चुकला, आपलं कामाच्या अनुषंगानेच सर्व चाललं आहे. दूसरा अंदाज एकदम बरोबर आहे. इंटरव्ह्युचीच तयारी करतो आहे, पण नोकरीसाठी नव्हे तर सारंग सरांच्या समोर पास होण्या साठी.” -सुभाष.

बबन प्रश्नार्थक मुद्रा करून सुभाष कडे बघत राहिला. म्हणाला, “सुभाषराव, तुम्ही कोणच्या प्राथमिक शाळेत होता याच्याशी सारंग सरांना काय कर्तव्य आहे? तुम्ही  गोखल्यांचे वारसदार आहात, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे, तुम्ही कोणच्या शाळेत होता हे नाही” – बबन.

“बबनराव, सारंग सर वकील आहेत आणि आपण संपत्ती वर क्लेम करणार आहोत, जो पास करण्याचा अधिकार केवळ सारंग सरांकडे आहे. अश्या परिस्थितीत, माझ्या आयुष्याशी संबंधित कोणचाही प्रश्न विचारण्याची त्यांना मुभा आहे हे तुम्ही कसे विसरता? मला एका अत्यंत अनुभवी आणि कसलेल्या वकिलाची गोलंदाजी खेळायची आहे. एखादा जरी चेंडू माझ्या हातातून निसटला तरी त्रिफळा नक्की. बबनराव आपली तयारी अशी हवी की सारंग सरांसारखा खंदा  गोलंदाज सुद्धा हतबल झाला पाहिजे. आलं का लक्षात?” – सुभाष.

“हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. सारंग वकील तुमची कसून चौकशी केल्याशिवाय तुमचा क्लेम स्वीकारणार नाहीत.” – बबन.

“पटतंय ना तुम्हाला! बघा, म्हणूनच एवढा आटापिटा करतोय. आपली योजना अगदी फूल प्रूफ व्हायला पाहिजे.” – सुभाष.

“तुम्ही म्हणालात की ही पहिली पायरी आहे, मग पुढच्या पायऱ्या काय आहेत?”- बबन

“आता अशीच सगळी सर्टिफिकेट बदलून घेणार. तुम्ही म्हणाला होता की अविनाश बांगलादेशात गेल्यानंतर त्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही म्हणून, हे १०० टक्के खरं आहे ना?” – सुभाष.

अगदी १०० टक्के. कारण सारंग सरांच्या फाइल मधे स्पष्ट उल्लेख आहे, की अविनाशची चौकशी मिलिटरी ऑफिस मधे केली आणि अविनाश सापडत नाही यावर शिक्का मोर्तब झालं आहे म्हणून. त्यामुळे त्यांचं नाव बाद झालं आहे. मग आता पुढची चाल काय खेळणार आहात?” – बबन.

“आता मी बंगलादेश मधे त्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती यांचा अभ्यास करणार. म्हणजे आम्ही कोणच्या परिस्थितीत बांग्लादेश सोडला याचं व्यवस्थित स्पष्टीकरण देता येईल.” – सुभाष.

वा वा, सुभाष शेट. तुम्ही खरंच हुशार आहात. इतकी हुशारी असून देखील त्या महापालिकेच्या नोकरीत का सडत बसला आहात?” – बबन.

“अहो, हीच नोकरी मला जनतेच्या सर्व थरात पोचवते. माझ्या समाजकार्याला त्यामुळे अनेकांचा हात भार लागतो, माझी प्रसिद्धी होते. पुढे मागे मी निवडणुकीला उभा राहिलो तर याच ओळखी कामाला येणार आहेत.” – सुभाष.

“हो खरं आहे. पण त्यावेळी माझी पण ओळख ठेवा. राहील ना ओळख?” – बबन.

“काय बबनराव! काय बोलता, आपली ओळख ही सर्वात पक्की असणार आहे. तुमच्या पेक्षा मला कोणीच जवळचं नाहीये.” – सुभाष.

“गंमत केली हो. मग आता केंव्हा भेट?” – बबन.

“सांगीतलेली  कामं झाली की मी तुम्हाला फोन करतो. ठीक आहे?” – सुभाष.

“ठीक आहे.” बबन म्हणाला आणि मीटिंग संपली.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com