31. Maharashtratil kille - 6 books and stories free download online pdf in Marathi

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६

* महाराष्ट्रातले किल्ले

५. सिंधुदुर्ग-

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. हा किल्ला सागरी सुरक्षा मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. नोव्हेंबर २५ इ.स. १६६४ रोजी याचे बांधकामाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख केंद्र मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा बराच विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, ही गोष्ट ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधले होते. सागरी किल्ल्यांसाठी चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी करण्यात आली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ला मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. तिथे असलेल्या बुरुजांची संख्या ५२ आहे आणि ह्या किल्ल्याला ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेल्या गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी आहेत. ह्या विहिरीमधील पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला मानला जातो. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर सुद्धा पाहायला मिळते. हे मंदिर इ.स. १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते अस सांगितले जाते. सागरी लाटांपासून किल्ल्याला नुकसान होऊ शकते आणि हे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले होते. त्याचबरोबर, घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्यावेळी शिवाजी महाराज सिंधुदुर्ग वर स्वत: हजर होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले होते. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला होता. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना सुद्धा केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते. असं म्हणते जाते की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन इतके खर्च झाले होते. किल्ला उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली होती. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके दिमाखात उभा आहे.

* सिंधुदुर्ग किल्ल्यात पाहण्यासारखी ठिकाणे-

पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात. पावसाळ्यात मात्र बोटी उपलब्ध नसतात. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजुबाजूला असलेल्या समुद्रात असलेल्या खडकांमुळे या परीसरात मोठ्या बोटी येऊ शकत नाहीत. आणि ही गोष्ट किल्ल्याच्या संरक्षणा च्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. समुद्रातले खडक चुकवत नावाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर उतरवतो. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी गोमुखी पध्दतीची आहे. या गोमुखी पद्धतीच्या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. त्यामुळे दुरुन प्रवेशद्वार नेमके कोठे आहे ते निश्चितपणे कळत नाही. महादारवाज्यात एक भग्नावस्थेतील तोफ पाहायला मिळते. प्रत्यक्ष दरवाजासमोर छोटे प्रांगण आहे. पण शत्रुच्या हत्तीला दरवाजावर धडक मारण्यासाठी पुढे मागे करण्यासाठी जागा मात्र ठेवलेली दिसत नाही. पाण्यातून तटाजवळ आलो की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हा दरवाजा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो म्हणूनच ह्याचा वापर दरवाज्या मध्ये केलेला आहे. सोबतच दाराला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. दरवाजाच्या बाजूला बुरुज आहेत आणि हे बुरुज घडीव दगडाचे आणि चिरेबंदी बांधणीचे आहेत. बुरुजात जागोजागी जंग्यांची रचना केलेली दिसून येते. त्यातून शत्रूवर सहज हल्ला करता येतो.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज्यांच्या कारकिर्दीत ह्या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही केली नव्हते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारातून किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दगडात कोरलेला मारुती पाहता येतो. दरवाज्याच्या वर नगारखाना आहे. महाव्दारापासून तटबंदी सुरु होते. ह्या नागमोडी तटबंदीची लांबी अंदाजे ४ किमी आहे आणि तटबंदीची रूंदी ३ ते ४ मीटर आहे. तटबंदीत ४२ बुरुज आहेत. किल्ल्याच्या तटबंदीत ४५ अरुंद जिने आहेत व ४० शौचकुप आहेत. या शौचकुपांमुळे समुद्राच्या मध्यभागी असलेला किल्ला स्वच्छ रहात असे. किल्ला बांधतांना किल्ल्यावर रहाणाऱ्या सैनिकांच्या आरोग्याचा विचारही शिवाजी महाराजांनी केला होता आणि ही गोष्ट सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यावर लक्षात येते.

प्रवेशद्वारामधून किल्ल्याच्या आत आल्यावर उजव्या बाजूस पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या चढून गेल्यावर तटबंदी मध्ये दोन छोट्या घुमट्या पाहायला मिळतात. ह्या २ घुमट्या मधील खालच्या घुमटीत महाराज्यांच्या डाव्या पायाचा ठसा आणि वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा पाहायला मिळतो. किल्ल्याच्या बांधकामाची पाहाणी करता असतांना ओल्या चुन्यात महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटला होता. आणि त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या. शिवाजी महाराजांच्या हात आणि पायाचे ठसे पाहून परत प्रवेश द्वारापाशी यावे लागते. तेथून सिमेंटने बनवलेल्या रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर पाहता येते. तिथून पुढे गेल्यावर श्रीशिवराजेश्वराचे मंदिर लागते. हे मंदिर पूर्ण महाराष्ट्रतात एकमेव असलेले मंदिर आहे. शिवरायांचे पुत्र राजाराम यांनी नावाड्याच्या वेशातील वीरासनात बसलेली शिवप्रतिमा येथे स्थापन केली आहे. मूर्तीच्या पुजेची जबाबदारी संकपाळ घराण्याकडे आहे. मूर्तीला पूजेनंतर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा आणि वस्त्र चढवले जाते. त्यामुळे मुळ मुर्ती पाहता येत नाही.

शिवराजेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला श्री महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिरातच असलेली विहीर आहे. ह्या मार्गावरून पुढे गेल्यावर साखरबाव, दुधबाव आणि दहीबाव ह्या तीन गोड्या पाण्याच्या विहीरी आजही पाहायला मिळतात. चारही बाजूंनी समुद्र असून सुध्दा ह्या विहीरींचे पाणी गोड आहे. हा एक चमत्कार सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहायला मिळतो. या विहीरींच्याच पुढे शिवाजी महाराजांच्या वाड्याचे जोते आहे. वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिम दिशेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा आणि आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणाले जाते. ह्या बुरुजाचा मुख्य उपयोग टेहाळणी करण्यासाठी केला जात असे.

याशिवाय सिंधुदुर्ग किल्ल्यात भगवती देवीचे मंदिर पाहायला मिळते. त्याचबरोबर इथे महापुरुष मंदिर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी ४ किल्ले बांधले होते. त्यापैकी पद्मगड हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच समुद्रात बांधलेला दिसतो. राजकोट हा किल्ला मालवण मध्येच समुद्र किनारी होता परंतु आज त्याचा फक्त एक बुरुज अस्तित्वात आहे. किल्ल्याच्या जागेवर आता "रॉक गार्डन" बनवलेले आहे. तिसरा सर्जेकोट हा किल्ला मालवण पासून ४ किमीवर असलेल्या समुद्र किनारी कोळंब खाडीच्या मुखावर आहे. तर चौथा किल्ला निवतीचा किल्ला आहे. मालवण पासून १६ किमी वर असलेल्या निवती गावाच्य़ा समुद्र किनारी असणाऱ्या डोंगरावर हा किल्ला बांधला आहे. मालवण मध्ये मुक्काम केला तर त्या मुक्कामात हे चारही किल्ले पहाता येऊ शकतात.

गेल्या काही वर्षात मालवण शहर हे महाराष्ट्र पर्यटनात पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. मालवण शहराजवळ भर समुद्रात गेली ३४६ वर्ष म्हणजे ३ दशके ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या लाटा यांच्याशी झुंज देत आजही खंबीरपणे उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा मालवण मधल्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र बिंदू बनलेला आहे. किल्ल्यावर दाखल झाले की तटबंदीचे अनोखे बांधकाम पाहायला मिळते. सिधुदुर्ग हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. याशिवाय जवळच असलेल्या तारकर्ली - देवबाग चे सुंदर समुद्र किनारे ह्याचा सुद्धा आनंद घेता येतो. त्याचबरोबर स्कुबा डायविंग, स्नॉर्कलिंग इत्यादी वॉटर स्पोर्ट्स मुळे तारकर्ली पर्यटकांच विशेष आवडीच ठिकाण बनत आहे. ह्या बरोबर, सुवर्ण गणेश मंदिर आणि चमचमीत मालवणी जेवण वेगवेगळ्या वयोगटातल्या पर्यटकांना नेहीच आकर्षित करतांना दिसतो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED