32. Maharastratil kille - 7 books and stories free download online pdf in Marathi

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७

३२. महाराष्ट्रातील किल्ले- ७

७. पुरंदर किल्ला-

पुरंदर किल्याला ऐतिहासिक महत्व आहे ते संभाजी महाराजांमुळे. सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्यामुळेच पुरंदर किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. पुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच आहे आणि हा पुरंदर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. इथे ट्रेकिंग ला जाणाऱ्या ट्रेकरसची संख्या बरीच असते. त्याचे कारण म्हणजे पुरंदर किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा आहे. इतिहासाच्या खुणा जपलेल्या पुरंदर किल्ल्याचा विस्तार मोठा आहे. इतिहासात 'अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी, मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा', असे वर्णन असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला आहे. या किल्ल्यावर काही दिवस पेशव्यांची राजधानीही होती. मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात तह झाला होता. हा तह पुरंदर तह म्हणून ओळखला जातो. इतिहासात प्रसिद्ध असलेला 'पुरंदरचा तह' ११ जून १६६५ साली झाला होता.

पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावर पुरंदरचा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने मोठा असल्यामुळे तो एका दिवसांत पाहून होणे कठीणच आहे. आणि एकदम मजबूत असल्या कारणामुळे अत्यंत सुरक्षित आणि बचावासाठी उत्तम असा मानला जात होता. गडावर दारूगोळा आणि धान्याचा साठा करून दीर्घकाळ किल्ला लढवता येऊ शकत होता आणि ह्याच कारणामुळे या किल्ल्याला खास महत्त्व होते. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवतालच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येत असल्यामुळे हा किल्ला उत्तम मानला जात होता.

क-हे पठाराच्या काव्यात पुरंदर किल्ल्याचे सुरेख वर्णन आढळते. पुरंदर म्हणजे इंद्र.. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य त्याचप्रमाणे पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे इंद्रनील पर्वत असे नाव आहे. इंद्राच्या अस्त्राला वज्र म्हणले जाते म्हणून पुरंदरचा सोबत करण्याऱ्या किल्ल्याला नाव देण्यात आले ‘वज्रगड’!.. पुरंदर विषयी अजून एक प्रचलित गोष्ट म्हणजे, पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. त्याचे मूळ नाव ‘पूर’ असे होते. त्या पूर गावाचा आधार म्हणून किल्ल्याला ‘पुरंधर’ आणि कालांतराने अपभ्रंशित होत ‘पुरंदर’ असे नाव पडले असावे असे मानले जाते.

* इतिहास-

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर किल्ला मानला जातो. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला. आणि तोच हा इंद्रनील पर्वत असा समज आहे. बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला गेला. त्यांनी पुरंदर किल्ल्याच्या पुनर्निर्माणाला आरंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ यांनी किल्ल्याचे काम पूर्ण केले. इथला शेंदर्‍या बुरूज बंधाताना बुरुज सारखा ढासळत होता. त्यावेळी बाहिरनाक सोननाक यांनी आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले बुरुजात गाडायला दिली. त्यांचा बळी गेला पण हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. शिवाजी महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. परंतु, त्यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. आणि महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा शिवाजी महाराजांना उचलला आणि त्यांना किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळाले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

त्यानंतर १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासात प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार झाले. तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलला,

'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावे लागले. त्या किल्ल्यांची नावे अशी,

1. पुरंदर

2. रुद्रमाळ

3. कोंढाणा

4. रोहिडा

5. लोहगड

6. विसापूर

7. तुंग

8. तिकोना

9. प्रबळगड

10. माहुली

11. मनरंजन

12. कोहोज

13. कर्नाळा

14. सोनगड

15. पळसगड

16. भंडारगड

17. नरदुर्ग

18. मार्गगड

19. वसंतगड

20. नंगगड

21. अंकोला

22. खिरदुर्ग (सागरगड)

23. मानगड

त्यांनतर ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने हा किल्ला परत स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला आणि किल्ल्याचे नाव बदलले. ओरंगजेबाने पुरंदर किल्ल्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या बाजूने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. अश्या बऱ्याच चढ उतारांचा साक्षीदार पुरंदर किल्ला आहे.

* गडावर पाहता येण्यासारखी ठिकाणे-

पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

१. बिनी दरवाजा- पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या पाहायला मिळतात. समोरच पुरंदरचा खंदकडा सुद्धा मिळतो. पुरंदर किल्ल्याच्या आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात. त्यातील एक सरळ पुढे जातो आणि दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर पाहायला मिळते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.

२. पुरंदरेश्वर मंदिर- हे महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात इंद्र देवाची सव्वा ते दीड फुटाची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे असा अंदाज आहे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

३. रामेश्वर मंदिर- पुरंदेश्वर मंदिराच्या मागे कोपर्‍यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. पेशवाईच्या आरंभ काळात बाळाजी विश्वनाथ यांनी तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. ह्यातली एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी वाट खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येता येते.

४. दिल्ली दरवाजा- हा दरवाजा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. इथून आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा पाहायला मिळतो. डावीकडच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाते. याच वाटेने पुढे गेल्यावर पाण्याची टाकी लागतात.

५. खंदकडा- दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वे दिशेला गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्याच शेवटी एक बुरूज पाहायला मिळतो. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. याच ठिकाणी अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून गेल्यास वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या रस्त्या वरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या रस्त्याने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.

६. पद्मावती तळे- मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे पाहायला मिळते.

७. शेंदर्‍या बुरूज- पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्य दिशेला तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्या बुरुजाचे नाव शेंदर्‍या बुरूज आहे.

८. केदारेश्‍वर- केदार दरवाजाच्या पुढे मूळ वाटेने साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर काही पायर्‍या दिसतात. ह्या पायऱ्या थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत जातात. पुरंदरचे मूळ दैवत केदारेश्‍वर आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आणि ह्या मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. त्याच्या बाजूलाच दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे पुरंदर किल्ल्यावरील अत्युच्च भाग आहे. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे आणि ह्या बुरुजाला कोकण्या बुरूज असे म्हणले जाते.

९. पुरंदर माची- आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.

१०. भैरवगड- भैरवगड खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा पाहता येतो. या खिंडीपर्यंत गाडीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.

११. वीर मुरारबाजी- बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा पाहायला मिळतो. हा पुतळा इ.स. १९७० मध्ये उभारला गेला.

* पुरंदर किल्ल्यावर कसे जाल-

नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. गावातूनच गाडीचा रस्ता थेट किल्ल्यापर्यंत जातो. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालत गेल्यास गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी वाट म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचता येते.

सध्याच्या स्थितीला किल्ल्याची स्थिती चांगली नाही. सध्या पुरंदर किल्ला संरक्षण दलाच्या देखरेखीखाली आहे. इथे आर्मी चा बेस आहे. त्यामुळे तिथे फोटो काढता येत नाहीत. पण पूर्व परवानगीने इथे ट्रेकिंग ला जाता येते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED