perjagadh - 1 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - 1

पेरजागढ- एक रहस्य....

भाग...१...

१) पवनचे सोनापुरात आगमन...



मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ...? तीने आत्महत्या तर केली नसेल ....? माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील ....?आज दिवस कोणता आहे? कोणता वार आहे? काहीच सुचत नव्हते. सगळ्या मनाची घालमेल झाली होती. पण स्वतःची घृणा मात्र होऊ लागली होती.मी तुच्छ आहे आणि असणारच. कारण सत्व म्हणजे परब्रम्ह आहे. त्याची उपासना, त्याचे अस्तित्व असे शब्दात सांगायचे नाही. त्याचे आवाहन म्हणजे माझे फक्त कुतुहुल होते पण त्यापोटी मी काय करून बसलो होतो? स्वतः चे अस्तित्व विसरुन गेलो होतो.विसरून गेलो होतो की ज्याने आम्हाला घडवले आहे,त्याच्या समोर आपण एक तुच्छ प्राणी आहोत.आणि आपण त्यालाच शोधायला निघालो होतो.ते पण मनात निगेटिव्ह विचार ठेवून.कदाचित हीच ती चुकी असेल ज्याने माझे आयुष्य असे अंधारात गेले होते.

सत्य जेवढ गुपित असेल तेवढंच बरं, हे आज माझ्या लक्षात आलं होतं. निर्धारीत मनाने सर्वसाधारण माणसाचा ही शक्तिमान बनु शकतो, याची मला प्रचिती आली होतीच.पण ते तिथेच व्यवस्थित आहे, असेही वाटायला लागले होते. उत्सुकतेने मी बऱ्याच नियमांचं उल्लंघन केलं होतं.आणि त्याची शिक्षा पण अशी अतोनात मिळाली होती.जी आजतागायत एक कोडंच उरली असती.

गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो... दुर कुठूनतरी कुबट असा मांस सडल्याचा वास येत होता.... थरकाप सुटत होता ... कसं करावं? काय करावं?... काही सुचत नव्हतं.नवीन नव्हतं माझ्यासाठी.कारण इतक्यात बरंच काही सोसले होते.उतरतीच्या खडकाळ पायऱ्या असुनही तेवढाच दम छातीत भरू लागला होता ... अचानक पैजनांची छम छम एकामागोमाग एक अशी कानामागे येत होती..मी घाबरत होतो.कित्येक दिवसांनी हा उजेड माझ्या डोळ्यांना आधीच प्रखर वाटत होता.आणि त्या भासाने कपाळावर घामाचे ओघळ वाहू लागले होते.आता कसंही करून इथून निघायला हवे.हेच मला सुचत होते.

आभासी वास्तव्य कदाचित यालाच म्हणत असतील असं मला निदान त्यावेळी तरी स्पष्टपणे वाटत होतं... पण मागे बघावं तर रिकामी पायवाट आणि हळूवार वाऱ्याच्या झोकाने हलणारे शिलेवरील गवत मात्र डोलत होते. प्रत्येक पावलावर मला ते छम छम माझ्या कानाशी स्पष्ट ऐकू येत होते, कि माझ्या मागे कुणी पैंजण लावुन चालत आहे. त्यामुळे मी अजुन थोडासा घाबरुन गेलो होतो. आवाजानजिक सारखं इकडे तिकडे माझ्या नजरा वळत होत्या.आणि हृदयात एक कंपन झाल्यासारखं जाणवत होतं.

जिवाची आकांती मला तिथून पळ काढण्यास भाग पाडत होती... उतराई मध्ये दगडाळ वाटेवरून पळायला पण जमत नव्हते... कारण चुकुन जरी का मला तोल सावरता आला नसता तर वरून आपण बघु पण शकत नाही.. इतक्या खोल दऱ्या तिथे होत्या...त्यामुळे सारखं इकडे तिकडे बघत मी लवकरात लवकर गाव गाठण्याच्या तयारीत होतो.कारण इतक्यात मी एकही मानवाचं रूप बघितलं नव्हतं.तरसलो होतो आता एखाद्या मानवाला बघण्यासाठी.

बाजुलाच नागोबाची मूर्ती दिसली ... त्या मुर्तीला मी नजरेनंच घेरलं .. कारण त्याचीच कृपा म्हणावी की त्यानं स्वतःचं असं दर्शन दिलं होत. आणि पावलानजिक वाढणारी छम छम मला माझ्या मृत्यूच कारण असल्याचं चिन्हं दाखवत होती... आणि मागे बघावं... तर निसर्गाचा देखावा फक्त तेव्हढा दिसत होता... मग हे अदृश्य आवाज मलाच का येत असावा...?काय असावं त्याचं कारण?जे तेव्हाही एक कोडं होतं,आणि आत्ताही एक कोडेच आहे...

मग येणारी ही चाहुल यमराजाची तर नसेल ... पण तो पैंजण कशाला घालुन येणार? विधात्याने त्याला म्हैस साधन म्हणुन दिलं आहे ... तो त्याचाच वापर करणार ना!!एकीकडे जीवाची आकांत होती आणि एकीकडे परत जिज्ञासा. तरीही मनात विचारांचे काहूर ताजेच होते.पण उत्तर अजूनही मिळत नव्हते.कारण मी एक प्रश्नचिन्ह आहे हे तेव्हा तरी मला कळणार नव्हते.

शेवटी थकत भागत दोन किलोमीटर जंगल उरलं असेल. खालचं मंदिर यायला ... तिथ पर्यंत मी आलो होतो ... कोपऱ्यावर एक दत्ताची मुर्ती दिसली .. आता त्यालाही जगण्याची भिक्षा मागावी याव्यतिरिक्त माझ्याकडे काहीच साधन नव्हतं ... कारण शेवटी जीव मेटाकुटीला आला होताच.आणि क्षणक्षणाला ती चाहूल माझं जीव घेण्याचं प्रयत्न करत होती.

घामाने पुर्ण अंग ओलचिंब झाले होते ... आंघोळ झाली होती माझी ... शेवटी धावून धावुन थकलेला मी ... असं वाटतं होत ...की चक्कर येऊन आता पडेल की नंतर पडेन...आणि घरंगळत जावून नक्कीच कोणाचंतरी भक्ष्य बनेल.. छाती इतकी भरून आली होती, की दोन मिनिट कुठे थांबुन श्वास घेण्याची माझी ताकत नव्हती...आणि जसजसं मी गड उतरत होतो,तसतसं मागे फिरून बघण्याची पण हिम्मत होत नव्हती.

उतराईचं अर्धा टप्पा मी गाठला होता. जेव्हां जलकुंभावर माझी नजर गेली. तेव्हा मला वाटलं,पण जाऊन थोडं पाणी प्यावं ही सुद्धा हिम्मत होत नव्हती.अख्खं जंगल,ते गड मला खायला उठलं आहे,आणि ते कशाचंही निमित्त होऊ शकते.आणि ते जलकुंभ गडाच्या पायथ्याशीच होतं.ज्या दगडांची ठेवण,रचन बघायला मला जिथे थांबायचं होतं. तिथूनच माझा आता पळ काढण्याचा विचार चालु होता.

समोर आता उतरायला अजुन खडकाळ वाट होती .. आणि पावसाळा सुरू असल्यामुळे शेवाळ जिथे तिथे उगवले होते ... ज्यामुळे पाय घसरून पडण्याची दाट शक्यता होती ... पैंजणांचा आवाज मात्र कानोकान तितकाच स्पष्ट मला येत होता .. वर कुणी किंकाळत होतं .. तर कुणी ओरडत होतं.. त्या आर्त स्वरांनी माझी क्षणाक्षणाला जगण्याची हिम्मत कमी होत होती... आणि मी पण तेवढ्याच चिकाटीने पळत होतो..एका पिंजऱ्यातून सुटलेल्या जनावरासारखा.

ट्रॅकिंग करत असताना मी कित्येक जंगल तुडविली असेल पण या जंगलात मला विचित्र वाटायला लागले होते .... तितक्या दुपारची वेळ असुनही मी अजुन एकाही प्राण्याचा किंवा पक्ष्याचा आवाज ऐकला नव्हता.रात्रीला असलेल्या शांततेत सुद्धा रातकिड्यांचा गजरणाद सुरु असतो.परंतु इथे कमालीची भयानक शांतता होती.जीवाला वाचवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होतो. धावू धावू पोट खोलावर गेलं होतं... जीभ पण लोंबायला लागली होती... पण आतापर्यंत कसलाही प्रतिकार माझ्यासोबत होत नाही हे बघुन मी थोडा सावरलो...आता मी सुटकेच्या अंतिम टप्प्यावर आहे असे मला वाटायला लागले होते.


क्रमशः

इतर रसदार पर्याय