Lakshmi - 1 books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 1

शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू असतानाच त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहन चा जन्म झाला होता त्यावेळी त्याच्या बाने सर्व गावाला जेवू घातलं होतं. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोल मजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने वागायचे. एका मुलावरच त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचा विचार केला. आपण लेकराला पोसू शकत नाही तर जास्तीचे लेकरं कशाला. मोहनालच चांगलं शिक्षण देऊ आणि मोठा साहेब करू असा त्याचा विचार होता. मोहन सहा वर्षाचा झाला की त्याला घेऊन शाळेत गेला आणि पहिल्या वर्गात दाखल केला. गुरुजी ला म्हणाला, याला खूप शिकवायचं आहे. गुरुजी तुम्हीच याचे माय बाप चांगलं शिकवा असे म्हणून तो निघून गेला. मोहनला शाळेतला पहिला दिवस खूप कठीण गेलं. तो घरात मोकळेपणाने खेळला, इकडे तिकडे फिरला, शाळेत मात्र एकाच जागी बसून राहावं लागलं म्हणून तो खूपच कंटाळला होता. पण हळूहळू त्याला त्याची सवय झाली. नित्यनेमाने तो शाळेत जाऊ लागला. अक्षरे, अंक गिरवू लागला आणि घरात येऊन अभ्यास करू लागला. हे पाहून मोहनच्या बाला खूप आनंद होऊ लागला. शाळेत जाताना त्याची आई मोहनला रोज तयार करायची. गरम पाण्याने अंघोळ घालायची, छान स्वच्छ कपडे टाकायची, केसाला तेल आणि तोंडाला पावडर लावून छानपैकी टिळा लावायची. त्याचा टापटीपपणा पाहून तो शाळेतील सर्वांचा आवडता विद्यार्थी बनला होता. मोहन तसा हुशारच होता, त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो चटकन लक्षात ठेवायचा. दिवसा मागून दिवस सरले मोहन चांगला अभ्यास करत वरच्या वर्गात जात होता. त्याचे आईवडील देखील मोहनच्या सुखासाठी खूप कष्ट करत होते. त्याने मागेल ती वस्तू त्याला आणून देत असत. एकुलता एक मुलगा म्हणून आई खूप लाड करायची पण बाबा मात्र जास्त लाड न करता चुकल्या ठिकाणी मोहन ला समज देत असत. त्यामुळे मोहन बाबाला जरासा घाबरत होता. तो सातवी पास झाला. आठवी वर्ग गावात उपलब्ध नव्हते त्यामुळे जवळच्या शहरात जाणे गरजेचे होते. त्यांच्यापुढे मोहनच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरात खोली घेऊन राहण्याची ऐपत नव्हती. काय करावे सुचत नव्हते. शाळेतल्या गुरुजीला त्यांची समस्या कळाली. तेंव्हा त्यांनी मधला मार्ग काढला. स्वतः गुरुजीनी मोहनला एक सायकल भेट म्हणून दिली आणि सायकल द्वारे शाळा करण्याचा सल्ला दिला. गुरुजींनी समस्या सोडविली म्हणून ते खूप धन्यवाद दिले. मोहनची शहरातील शाळेला सायकलवर जाणे येणे सुरू झाले. तो हुशार होता, अभ्यासू होता आणि मेहनती देखील होता त्यामुळे काही दिवसातच त्याने त्या शाळेतील शिक्षकांची मने जिंकली. चांगल्या गुणाने तो आठवी आणि नववी वर्ग उत्तीर्ण झाला होता.दहावीचा महत्वाचा वर्ग होता. सर्वचजण गावात खोली घेऊन राहत होते आणि त्यांचा अभ्यास जास्त होत होता. मोहन मात्र सायकलवर जाणे येणे करत असल्याने दहावीचा अभ्यास कमी होऊ लागला. म्हणून त्याने शहरात राहण्याचा विचार केला. आई बाबांना त्या विषयी तो बोलला मात्र आई बाबाजवळ तेवढे पैसे नव्हते की त्याला शहरात खोली घेऊन ठेवता येईल. तेंव्हा मोहनने मी पैश्याची काही व्यवस्था करतो तुम्ही फक्त होकार द्या. काळजावर दगड ठेवून त्यांनी मोहनला होकार दिला. सारी सामानाची बांधाबांध करून मोहन आणि त्याचे बाबा सायकल वर शहराकडे निघाले. मोहनला निरोप देताना आईच्या डोळ्यात गंगा यमुना भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी तिने मोहन ला बाय बाय केले. शहरातल्या खोलीत सर्व सामान टाकून बाबा ही सायकल घेऊन घरी परतले. आता मोहनला सायकलची काही आवश्यकता नव्हती कारण शाळेच्या जवळच त्याने खोली घेतली होती. खोली घेतल्यापासून त्याचा अभ्यास चांगला चालू झाला होता. सकाळी तो शहरात पेपर टाकायचा आणि त्यानंतर शाळा करायचा. मोहन पेपर टाकण्याचे काम करत आहे हे कोणाला कळू न देता करत होता. त्याच्या बदल्यात जे काही पैसे मिळत होते त्याने त्याचा खोलीचा किराया निघत होता. प्रथम सत्र आणि सराव परीक्षेत तो उत्तम प्रकारे गुण घेतले होते. आज दहावीचा पहिला पेपर होता. भल्या पहाटेच त्याचे बाबा सायकल घेऊन शहरात आले. मोहनला परीक्षा केंद्रावर सोडला, चांगले लिही म्हणून शुभेच्छा दिला आणि आपल्या गावाकडे परतला. गावी परत जातांना मागून आलेल्या एका वाहनाने मोहनच्या बाबांच्या सायकलला धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्या पडल्या मोहनला ही वाईट बातमी कळाली. तसा तो धाय मोकलून रडला. मित्रांच्या मदतीने तो गावी गेला. तो खूप रडला. त्याचे बाबांवर खूप प्रेम होते, तोच त्याचा एकमेव आधार होता. त्याला काही एक सुचेना. तो वेड्यासारखा काही बोलत होता. त्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला. त्याने काही पैसे देण्याचे ही कबुल केले पण याने बाबांचा जीव थोडाच परत मिळणार होता. अंत्यविधी पार पडला. तो शून्य नजरेने छताकडे पाहत होता. पुढे काय ...? या प्रश्नाने तो चिंताग्रस्त झाला होता.

क्रमशः

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED