Lakshmi - 10 - last part books and stories free download online pdf in Marathi

लक्ष्मी - 10 - अंतिम भाग

त्यागमूर्ती लक्ष्मी

माईने लक्ष्मीच्या लग्नाचा विषय मोहनजवळ देखील काढला. मोहनने ते सर्व लक्ष्मीच्या मनावर ठेवलं होतं. कारण मोहनला माहीत होतं की, लक्ष्मी अशी ऐकायची नाही, तिला नोकरी करत करत अजून शिकायचं होतं. म्हणून तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देखील घेतला होता. आपली शाळा करत ती पुढील शिक्षणाचा अभ्यास ही करत होती. राजू मेडिकलच्या शिक्षणासाठी दूर गावी होता. दर महिन्याला ती राजूला पैसे पाठवत होती. मोहन आणि राधा आपल्या शेतीकामात व्यस्त होते. माय एकटी घरात रामनामाचा जप करत बसून राही त्याशिवाय तिच्याकडे अन्य कोणता पर्यायच नव्हता. ती घर सांभाळण्यासाठीच शिल्लक राहिली आहे जणू असे तिला कधी कधी वाटायचे. पण करणार तरी काय ? शेतात जाऊन काम करण्याची तिच्यात आता शक्ती उरली नव्हती. इकडे लक्ष्मीच्या शाळेत माधव नावाचे एक शिक्षक होते जे की दोन वर्षांपूर्वी त्या शाळेत रुजू झाले होते. तो दिसायला सुंदर, हुशार आणि अविवाहित होता. काही दिवसांत लक्ष्मीची आणि माधवची छान गट्टी जमली. माधवदेखील गरीब कुटुंबातला होता. तो आपल्या आई वडिलांसोबत त्याच शहरात राहत होता. लक्ष्मी त्या शाळेत रुजू झाल्यापासून तो लक्ष्मीचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याच्याकडे काही महत्वपूर्ण नोट्स असल्याचे कळल्यावर लक्ष्मी त्यांच्याकडे त्या नोट्सची मागणी करायला गेली. तो खरोखरच खूप हुशार होता हे त्याच्या नोट्सवरून लक्ष्मीला लक्षात आले. त्याच्या नोट्सचा फायदा तिला झाला ती चांगल्या प्रकारे पास झाली. म्हणून तिने माधवचे मनस्वी आभार मानले. नोट्स देवाणघेवाणीत त्यांचे दोघांचे एकमेकांवर कधी प्रेम जडले हे दोघांनाही कळले नाही. संपूर्ण शाळेत त्यांच्या प्रेमाची चर्चा चालू झाली होती. समाजात वाईट संदेश जाण्यापेक्षा आपण लग्न करू या असा प्रस्ताव माधवने लक्ष्मीसमोर ठेवले. पण लक्ष्मीला लगेच होकार देता येणे शक्य नव्हते. कारण तिच्यावर राजुच्या मेडिकलच्या शिक्षणाची जबाबदारी होती. तो शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू या असे लक्ष्मीने माधवला सांगून ठेवले. तिच्या शिक्षणामुळे एक फायदा झाला की, तिला ज्युनियर कॉलेजवर नेमणूक मिळाली. पगार देखील वाढला.

लक्ष्मीने माधव विषयी आपल्या घरी सांगून ठेवली होती त्यामुळे राजुचे मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यावर घरात लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मुलगी पाहण्याचा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. माधवचे आई-वडील सुशिक्षित होते. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता लक्ष्मीला पसंत केले. काही दिवसांनी लक्ष्मीचे धुमधडाक्यात लग्न झाले. या लग्नात सारेच सगेसोयरे , नातलग, मित्रमंडळी, लक्ष्मीला शिकवलेले गुरुजन वर्ग साऱ्यांची उपस्थिती होती. लक्ष्मी आपल्या सासरी आली. तिकडे राजू आपले मेडिकल शिक्षण पूर्ण करून घरी आला होता. सर्व काही आनंदात चालू होते. हा आनंद देवाला पाहवेना म्हणून की काय एके दिवशी रात्री झोपेतच मोहनची आई देवाघरी गेली. त्यादिवशी लक्ष्मी माईची आठवण करत खुप रडली. खरं तर माय हीच तिची पहिली गुरू होती. तिने लक्ष्मीला अनेक संस्कार दिले. ती होती अडाणी, पण खूप समंजसपणाच्या गोष्टी सांगायची, तिनेच लक्ष्मीला लहानाचे मोठे केले होते. दोघींचे एकमेकांवर अपार प्रेम होते. तिच्या जाण्याने लक्ष्मीच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती. आठवडाभर राहून दुःखी मनाने ती परत आपल्या सासरी गेली. काही दिवस ती अस्वस्थ होती. तिचे कुठेही मन लागत नव्हते. एके दिवशी लक्ष्मीला खूपच अस्वस्थ वाटू लागले म्हणून माधवने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सर्व तपासणी केली आणि लक्ष्मी आई होणार असल्याची गोड बातमी दिली. ही बातमी ऐकून लक्ष्मी जरा सुखावली, आनंदी झाली.
दिवसामागून दिवस जात होते. राजूला देखील मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी लागली होती. तो ज्या दवाखान्यात काम करत होता त्याच दवाखान्यात लक्ष्मीने एका गोंडस व गुटगुटीत मुलीला जन्म दिला होता. मुलगी जन्मली हे पाहून लक्ष्मीला खूप आनंद झाला, ती मनातल्या मनात माझी माय माझी मुलगी बनून आली असे म्हणू लागली. राजूला देखील मामा झाल्याचा आनंद झाला होता. मोहन आणि राधा आजी-आजोबा बनले होते. सर्वजण आनंदात होते मात्र लक्ष्मीची सासू नाराज होती. तिला पहिला नात हवा होता. तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण ही नाराजी जास्त काळ टिकली नाही. सारेच आनंदात आहेत तर आपण एकटे नाराज राहून कसे चालणार ? हळूहळू ती देखील या नवजात मुलीचे स्वागत केली.
घरात राजुच्या लग्नाविषयी चर्चा चालू झाली होती. त्याचे ही आत्ता लग्नाचे वय झाले होते. त्याला एक सुंदर स्थळ आलं, मुलगी डॉक्टर होती. सर्वाना मुलगी पसंत आली. थोड्याच दिवसांत राजुचे लग्न झाले. मोहनचे पदवीपर्यंत शिक्षण झाले तर राधा दहावी उत्तीर्ण होती. त्यांच्या घरात डॉक्टरबाई सून म्हणून आली होती. ती जरी खूप शिकलेली होती तरी ती सुशील होती. राजुच्या दवाखान्यातच ती डॉक्टर म्हणून काम पाहत होती. रोज सकाळी ते दोघे दवाखान्यात जात असत आणि सायंकाळी परत येत असत. मोहनने त्या दोघांना शहरात राहण्याचे सुचवले होते मात्र दोघांनीही शहरात राहण्यास नकार दिला.
एका सामाजिक संस्थेला मोहनच्या कुटुंबाची सर्व कहाणी कळली होती. तेंव्हा त्या दोघांची आदर्श आई-वडील म्हणून निवड झाल्याची बातमी त्यांच्या कानावर आली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोहन व राधाने आपल्या मुलांना शिकवून चांगले नागरिक घडविले म्हणून त्यांची आदर्श आई-वडील म्हणून निवड केल्याची बातमी पेपरमधून झळकली. त्यात मोहनच्या जीवनातील अनेक घटनांचा परामर्श घेण्यात आला होता. इतकी खोलातली माहिती त्याचा मित्र भोसले सर याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हती. म्हणून मोहनने भोसले सरांना फोन करून विचारलं, " पेपरमध्ये आलेली माहिती तूच दिलीस ना !" यावर भोसले सरांनी देखील होकार दिला आणि म्हणाले, " त्या सामाजिक संस्थेला देखील मीच माहिती दिली. सर्व समाजाला कळले पाहिजे की शिक्षणाने जीवनात कसे परिवर्तन होते ?"

अखेर मोहनच्या जीवनातील तो सुवर्ण दिवस उजाडला. ते सभागृह लोकांनी खचाखच भरले होते. ज्या शहरातील लोकांनी मोहनला नावे ठेवली होती, ती सर्व मंडळी त्या सभागृहात दिसत होती. लक्ष्मी, तिचा नवरा, तिचे सासू-सासरे, राजू आणि त्याची बायको, हे सर्वजण पहिल्या रांगेत बसले होते. मोहन आणि राधा व्यासपीठावर विराजमान झाले होते. टाळ्यांच्या गजरात आदर्श आई-वडील पुरस्कार त्यांना देण्यात आले. भोसले सर स्टेजवर बोलत होते. " यानंतर आदर्श वडील मोहन यांना विनंती करतो की, त्यांनी दोन शब्द बोलावे." मोहन बोलण्यासाठी आपल्या जागेवरून उठला आणि माईक हातात घेतला. अगदी सुरुवातीला त्याच्या तोंडून शब्ददेखील फुटेना. आपल्या आई-वडिलांना वंदन करून त्याने भाषणास सुरुवात केली. " खरं तर हा माझा सन्मान मुळीच नाही, तर हा सन्मान आहे माझ्या आई-वडिलांचा. ज्यांनी मला घडवलं. माझ्या बा नी मला एकच शिकवलं होतं, जोपर्यंत तुझ्या मनगटात दम आहे, तोपर्यंत कुणासमोरही हात पसरू नको. ज्या दिवशी तू हात पसरशील त्यादिवशी तुझे जीवन समाप्त झाले असे समज. माझे बा अडाणी होते पण त्यांनी मला म्हटलं होतं की, जीवनाचा विकास करायचा असेल तर शिकावं लागेल. कमवा व शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वाक्य नेहमी लक्षात राहू दे. मी शिकलो म्हणून शहाणा झालो. म्हणून हा सन्मान माझा नाही तर तो माझ्या आई-बाबांचा आहे. माझ्या जीवनात माझी मुलगी लक्ष्मी आली नसती तर आजचा सुवर्ण दिवस मला पाहायला मिळाला नसता. म्हणून हा सन्मान माझा नाही तर माझ्या लक्ष्मीचा आहे. ती एक मुलगी, परक्याची धन, तिला जास्त शिक्षण देऊन काय फायदा असे अनेक लोकांनी मला टोमणे मारले. पण मला तिला खूप शिकवायचं होतं आणि तिला डॉक्टर करायचं होतं. तिच्यात ती गुणवत्ता होती, पण माझ्या कुटुंबासाठी तिने डॉक्टर होणे त्याग केली. स्वतः कष्ट करून तिने आपल्या भावाला राजूला डॉक्टर केली. आपलं स्वप्न तिने भावाच्या स्वरूपात साकार केली. ती त्यागमूर्ती लक्ष्मी हीच खरी या सन्मानाची हक्कदार आहे." असे म्हणताना मोहनच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. हे सारे ऐकून राजूसह सारेचजण उभे राहून लक्ष्मीसाठी टाळ्या वाजवू लागले. भोसले सरांनी लक्ष्मीला स्टेजवर बोलावलं आणि सर्वांसमक्ष तीचेही सन्मान करण्यात आले. " शिक्षणाने माणसाचे जीवन नुसते सुकर होत नाही तर सुसंस्कारी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कुणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची कास सोडू नये " असा संदेश लक्ष्मीने आपल्या छोटेखानी भाषणातून दिला.
दुसऱ्या दिवशी सर्वच वृत्तपत्रांत त्यागमूर्ती लक्ष्मीची कहाणी प्रसिद्ध झाली. मुलगी असावी तर लक्ष्मीसारखी असे प्रत्येकांच्या ओठांवर होते.

समाप्त

नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

ही कादंबरी आपणांस कशी वाटली हे जरूर कळवा. मी आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे.

धन्यवाद ....!

इतर रसदार पर्याय