पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. तोतया वारसदार तोतया वारसदार
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
सुधा - विश्रामची बायको.
दिनेश आणि प्रांजल -विश्रामची मुलं.
मालती - अनिलची बायको.
विनय - अनिलचा मुलगा
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय सहावी
पिढी. सुरतला स्थायिक.
भाग २८
भाग २७ वरून पुढे वाचा....
“विश्रामपंत शोध लागला हो. कुलवृत्तांतात स्पष्ट उल्लेख आहे. त्यांच्या पुढच्या वंशाचा पण उल्लेख आहे. आता जे हयात आहेत त्यांचं नाव अक्षय साने आहे. आता तो कुठे आहे हे माहीत नाही. मी तुम्हाला कुलवृत्तांतच्या ऑफिस चा पत्ता पाठवतो आहे, सध्या ते कार्यालय पुण्याला आहे. तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की हे अक्षय साने सध्या कुठे आहे म्हणून.” – साने म्हणाले.
“धन्यवाद साने साहेब. उद्याच जाऊन चौकशी करतो. ठेवतो आता.” विश्राम काका.
“दादा, मी विचार करतो आहे की.....” अनिल.
“मी पण तोच विचार करतो आहे, तुझ्याजवळ नंबर आहे?” – विश्राम
“अरे कसला विचार? काही कळलेय का तुम्हाला? मग आम्हाला पण सांगा की.” लक्ष्मण म्हणाला.
“अरे आम्हाला जे हीरे पाठवतात त्यांची सुरतला पेढी आहे. कोहिनूर नावाची. त्या पेढीचे एक भागीदार अक्षय साने आहेत. आमच्याशी तेच व्यवहार करतात. दादा, आपल्या हे आधी कसं लक्षात आलं नाही?” अनिल बोलला.
“नाही आलं खरं, पण तुझ्याजवळ जर नंबर असेल तर कर फोन आत्ताच.” – विश्राम.
“नंबर आहे, पण आत्ता साडे नऊ वाजले आहेत, या वेळी फोन करणं बरं दिसेल का? कटकट केली तर भारी पडेल. दादा, मोठी माणसं आहेत ती.” अनिल म्हणाला.
“अरे सूरत आहे ते, आणि ही मंडळी व्यापारी आहेत, अर्ध्या रात्री सुद्धा बोलतील, तू कर फोन, नाही तर असं कर, मीच बोलतो, तू लाव.” – विश्राम.
“नमस्कार, साने साहेब, मी विश्राम गोखले बोलतो आहे साताऱ्यावरून. वेळ आहे का पाच मिनिटं बोलायला.” – विश्राम.
“अरे, विश्राम काका, बोला न.” – अक्षय.
मग विश्रामने त्यांना हरीपंत साने आणि रेवती यांच्याबद्दल सांगितलं. म्हणाले “दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, चिपळूणहून हे साने दाम्पत्य सांगलीला नोकरी निमित्त आले. पण ही गोष्ट आम्हाला आत्ता इतक्यांतच कळली. त्यांच्या बद्दल थोडी माहिती हवी होती. सांगलीला आमच्या ओळखीचे एक साने आहेत, त्यांनी कुलवृत्तांत बघून सांगीतलं की हरीपंत सान्यांचे आताचे वंशज अक्षय साने आहेत. मग लक्षात आलं की तुमचं नाव पण अक्षय साने आहे, म्हणून तुम्हाला फोन केला. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित व्हावा म्हणून हा प्रपंच.” – विश्राम काका.
“तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं, पण तुमचा काय संबंध? तुम्ही का चौकशी करता आहात?” – अक्षय.
“सांगतो. थोडं भूत काळात शिरावं लागणार आहे. वेळणेश्वर च्या सखारामपंतांना चार मुलं होती. रंगनाथ, भास्कर रेवती आणि अंबिका. सखारामपंतांचा धाकटा भाऊ, विश्वनाथ. त्यांची आम्ही म्हणजे मी आणि अनिल पांचवी पिढी. भास्करचा आत्ताचा वंशज विनायक तीन महिन्यांपूर्वी वारला. त्याचा मुलगा लंडनला स्थायिक झाला आहे. त्याचा मुलगा म्हणजे विनायकाचा नातू लंडनहून इथे आला आहे, विनायकने वंशावळी लिहून ठेवली होती, ती वाचल्यावर त्याचा नातू शोध घ्यायला निघाला, आणि शोधत शोधत आमच्या कडे आला. रेवती हरीपंतां बरोबर लग्न होऊन सांगलीला गेली एवढंच वंशावळीत लिहिलं होतं. त्यावरून मी सांगलीला चौकशी केली तेंव्हा अक्षय साने बद्दल माहिती मिळाली पण पत्ता मिळाला नाही, मी म्हणून सहज तुम्हाला फोन केला की कदाचित तुम्हाला माहीत असेल म्हणून.”
“विश्राम काका, तुमचा रेवती आणि हरीपंत हा संदर्भ बरोबर आहे. आम्हीच सांगलीला होतो, माझे वडील सुरतला आले, आणि मी आता हीर्यांच्या व्यापारात आहे हे तुम्हाला माहीत आहेच. पण तुम्ही जे काही सांगता आहात, ते फारच गोंधळात टाकणार आहे, या सगळ्यांचा अर्थ आपण नात्यात आहोत असा काढायचा का?” – अक्षय.
“अरे, प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे, तुम्ही साताऱ्याला येऊ शकता का? तुमची सर्व व्यवस्था करतो आम्ही. इथे सगळेच जमले आहेत आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की तुम्ही इथे यावं, सर्वांची ओळख होईल, आणि एका गहन प्रश्नाचं उत्तर पण सापडेल.” विश्राम काका.
“असा काय प्रश्न उभा राहिला आहे तुमच्या समोर की, तुम्ही मला तिथे बोलावता आहात? जरा समजेल असे सांगा?” – अक्षय.
“अहो हे सगळं फोन वर सांगता येण्या सारखं नाहीये. तुम्ही याच म्हणजे सर्व गोष्टी स्पष्ट होतील.” – विश्राम काका.
“ठीक आहे,” अक्षय म्हणाला. “तुमच्या आवजावरून असं वाटते की खरंच मी तिथे यायला पाहिजे. मी उद्या माझी डायरी बघून कामाची फेर मांडणी करतो आणि तुम्हाला कळवतो. चालेल?”
“चालेल. मी तुमच्या फोनची वाट बघतो.” – विश्राम काका.
“हे तर मारुतीच्या शेपटा सारखं झालंय. वाढतच चाललंय, काका, मला आता आणखी थांबता येणार नाहीये, मी उद्याच निघतो आता.” – लक्ष्मण
“लक्ष्मणा, दोन दिवस मंदिरात जायला उशीर झाला, तर मंदिरातली तुझी जागा कोणी घेईल अशी परिस्थिती आहे का?” विश्राम काका.
“नाही, असं काही नाहीये, पण मलाच करमत नाही त्याचं काय?” लक्ष्मण.
“हे बघ लक्ष्मण उद्या त्या सान्यांचं काय उत्तर येतं ते बघू आणि मग ठरवू. तुला जास्त दिवस राहता येणार नाही हे आम्हाला पण कळतंय पण उदयाचा दिवस थांब ना. आपण सगळे इथे जमलो आहोत, अनिल काका आणि विनय सुद्धा इथे आले आहेत, अरे, याच्या अगोदर आपण कधी इतके एकत्र आलो होतो का? मला तर सगळ्याचं अप्रुपच वाटतंय” रोहन म्हणाला.
“खरंय तुझं म्हणण. ठीक आहे उद्या बघू.” लक्ष्मणने हार पत्करली. निशांतला सर्वात जास्त आनंद झाला. तेवढाच जास्त वेळ वर्षा बरोबर घालवता येईल म्हणून तो खुश झाला. वर्षांचा पण चेहरा फुलला. तिची अवस्था पण काही वेगळी नव्हती.
“मी काय म्हणतो रोहन, तू बाबांना फोन लावला का? बोललास का त्यांच्याशी?, नसशील तर मग आत्ताच बोल. या म्हणावं इथे.” – विश्राम काका.
रोहनने मग फोन लावला, सगळी परिस्थिती नीट समजावून सांगता सांगता रात्रीचे बारा वाजले तरी त्यांचं बोलणं चालूच होतं. सगळे जण चूप चाप बसून ऐकत होते. स्पीकर वर फोन असल्याने सर्वांनाच बोलणं कळत होतं.
त्यांचं बोलणं संपल्यावर सर्वांना कळलं की त्यांची पण भारतात यायची इच्छा. आहे. त्यांच्या जवळ PIO कार्ड असल्याने त्यांना विसाची जरूर नाहीये आणि ते केंव्हाही इथे येऊ शकतात. उद्या ते त्यांच्या दादांशी म्हणजे व्यंकटेशशी बोलून फायनल सांगणार आहेत.
झालं, मग काय आनंदी आनंदच झाला. मग बरीच चर्चा झाली या विषयावर. दोनदा कॉफी पिऊन झाली मग सगळ्यांनाच झोप यायला लागली होती. दुसऱ्या दिवशी रात्री व्यंकटेशचा विश्रामला फोन आला.
“हॅलो, मी लंडनवरून व्यंकटेश बोलतो आहे. मला विश्रामशी बोलायचं आहे.”
“मी विश्रामच बोलतो आहे. तू फोन केलास याचा खूपच आनंद झाला. काय खबर आहे?”
“मी आणि सौमित्र बोलत होतो, आणि एका बाबतीत आमचं एकमत झाले. ते म्हणजे आपण सगळे एकत्र येऊन गेट टुगेदर करायचं ही कल्पना आम्हाला खूपच आवडली. फंक्त आमचं हे म्हणण आहे, की ज्यांच्या मुळे हे शक्य होतं आहे, त्या आमच्या बाबांच्या वाड्यातच आपण जमलो, तर ते जास्त सयुक्तिक होईल. १९ खोल्यांचा वाडा आहे, सारंग वकिलांना सांगून संपूर्ण वाडा रंगरंगोटी करून घेतो. निशांत आणि रोहन जातील नागपूरला देखरेख करायला, आणि हव्या तश्या सोई पण करून घेतील. कशी वाटते ही कल्पना.?” व्यंकटेशनी त्यांचा विचार सांगीतला. विश्रामने रोहन कडे पाहिलं आणि भुवया उडवून विचारलं. रोहननी मान हलवून दुजोरा दिला.
“निशांत आम्ही वाड्यातच लहानाचे मोठे झालो, पण त्याला जवळ जवळ ३० वर्ष उलटून गेली आहेत त्यामुळे, आता वाड्याची नेमकी अवस्था काय आहे, हे तूच सांगू शकशील.” – व्यंकटेश.
“सारंग सरच सांगू शकतील. मी कधीच त्या वाड्यात गेलो नाहीये. मी सारंग सरांना फोन करून विचारू का?” – निशांत.
“नको आता तिथे बरीच रात्र झाली असेल, उद्या दिवसा विश्राम फोन करेल. मग तुम्ही दोघं नागपूरला जा. वाडा तयार व्हायला किती वेळ लागणार आहे ते बघा, मग आम्ही लगेच इथून निघायचं प्लॅनिंग करतो.” – व्यंकटेश.
“व्यंकटेश, एक मेंबर अजून जुळणार आहे.” विश्राम सांगत होता. “वंशावळी बघ. त्यांच्यात रेवती चा उल्लेख असेल. रेवती साने. तिचा वंशज सापडला आहे. अक्षय साने. सुरतचा मोठा हीऱ्यांचा व्यापारी आहे. कालच त्यांच्याशी बोलणं झालं. आपली भेटायची योजना पक्की झाली की त्याला फोन करतो. तसे आमचे व्यवसाईक संबंध आहेतच, पण नातं इतके दिवस माहीत नव्हतं.” फोन वरचं संभाषण संपलं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com