Anemiyavar Kara Mat books and stories free download online pdf in Marathi

अनेमियावर करा मात..

अनेमियावर करा मात..

तुम्ही अनेमिया बद्दल बऱ्याच वेळा ऐकल असेल. पण अनेमिया कधी होतो? अनेमिया अर्थात रक्तक्षय.. हा हल्ली आढळणारा आणि तस पाहायला गेल तर दुर्लक्ष केला जाणारा रोग आहे. अनेमिया म्हणजे शरीरात असलेल्या लाल पेशी कमी होणे! रेड ब्लड सेल शरीरात ऑक्सिजन पुरवतात. रक्तात असलेल्या हिमोग्लोबिनच प्रमाण कोणत्याही कारणांनी कमी होऊ शकते. जास्ती करून स्त्रिया या आजाराकडे दुर्लक्ष करतातच! महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण आठ ते दहा ग्रॅम या दरम्यान असले तर त्या अवस्थेला सौम्य अनेमिया म्हणजेच सौम्य रक्तक्षय असे म्हटले जाते. चांगली तब्येत हवी असेल तर रक्तातल हेमोग्लोबिन च प्रमाण चांगल पाहिजे. सामान्यत: पुरुषांत 14 ते 18 ग्रॅम्स तर स्त्रियांमध्ये 12 ते 16 ग्रॅम्स असावे. हे आकडे शंभर मिलिमिटर रक्‍तासाठी असतात. या हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य पेशींना लागणाऱ्या प्राणवायूचा (ऑक्‍सिजनचा) पुरवठा करणे असते. जेव्हा यापेक्षा हिमोग्लोबिनचे प्रमाण घटले, तर तुम्हाला अनेमिया किंवा रक्‍तक्षय झाला आहे अस तुम्ही समजू शकता. रक्तातल हिमोग्लोबिन च प्रमाण कमी झाल कि साहजिकच थकवा येतो! आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांना विचारून महिलांनी ठराविक काळाने हिमोग्लोबिनची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. याद्वारे रक्तक्षय असल्यास त्यावर वेळीच उपाय करणे शक्य होईल.

*तुम्हाला रक्तक्षय झाला आहे हे कसे समजू शकेल?

अनेमिया ची लक्षणे-

१. अशक्‍तपणा, थकवा

२. त्वचा फिकी दिसू लागते.

३. थोड्या श्रमानेही धाप लागते,

४. छातीत धडधड सुरू होते.

५. चक्कर येते.

६. नजरेत दोष असल्याचे जाणवू लागते.

७. डोके दुखू लागते,

८. रात्री झोप नीट लागेनाशी होते.

ह्यातली कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसल्यास तुम्ही रक्ताची चाचणी करून घेऊन तुमच हिमोग्लोबिन किती आहे ते पाहू शकता. जर हिमोग्लोबिन कमी झाल असेल तर वेळीच काळजी घेतलेली चांगली. म्हणजे त्यापासून होणाऱ्या त्रासापासून तुम्ही वाचू शकता. अनेमियाकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केल जात पण जरा जरी शंका आली तरी त्यावेळी हिमोग्लोबिन ची टेस्ट करून घेत हितकारक असत. अनेमिया झाला असेल तर घाबरून जायचं काही कारण नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गोळ्या असतात आणि त्याचबरोबर घरगुती उपचार करून अनेमियावर मात करता येऊ शकते. किंवा अनेमिया टाळायचा असेल तर नेहमीच आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे!

* अनेमिया वर घरुगुती उपचार-

१. पालक-

पालकामध्ये लोहाच प्रमाण जास्ती असत. त्यामुळे रोज थोडा पालक खाऊन तुम्ही अनेमिया वर मात करू शकता. पालक व्हिटामिन ए, बी ९, सी, लोह, फायबर, कॅल्शियम आणि बीटा कॅरेटीन नी समृद्ध असत. म्हणजेच पालक फक्त लोह वाढवण्यासाठी नाही तर शरीरातलं संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे रोजच्या आहारात पालक घ्यायला विसरू नका आणि अनेमियाला दूर ठेवा. तुम्ही पालकाच सेवन तुम्हाला हवे त्या पद्धतीनी करू शकता. त्यात तुम्ही तुमच्या कल्पना वापरू शकता.

*आहारात पालक कसा घेऊ शकाल-

१. पालकाच सूप करून- पालकाची पानं आणि टोमाटो घेऊन तुम्ही तुम्हाला आवडेल तस सूप करून ते दिवसातून २ वेळा घेऊ शकता.

२. सॅलड करून- तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालून तुम्ही सॅलड खाऊ शकता.

३. पालक ज्यूस- पालकाच्या ज्यूस मध्ये २ चमचे मध घालून तुम्ही दोनदा पिल तर तुम्ही नक्कीच अनेमियाला दूर ठेऊ शकता.

२. अनेमिया वर मात करण्यासाठी टॉमॅटो-

आहारात फक्त लोहाच प्रमाण वाढवून उपयोग नसतो. चांगले इफेक्ट मिळण्यासाठी ते लोह शरीरात शोषून घेतलं गेल पाहिजे. लोह असलेल्या पदार्थांबरोबर आहारात टॉमॅटो चा वापर केला तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. टॉमॅटो लेकोपीन आणि व्हिटामिन सी मध्ये समृद्ध असते. शरीरात लोह शोषून घेण्यासाठी व्हिटामिन सी ची आवश्यकता असते.

*तुमच्या आहारात टॉमॅटो कसा घेऊ शकाल-

१. कच्चे टॉमॅटो तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर, सॅलड मध्ये सुद्धा टॉमॅटो चा समावेश करू शकता.

२. ग्लास भरून ज्यूस रोज प्या.

३. पदार्थांमध्ये टॉमॅटो चा समावेश करा.

३. बीट-

अनेमिया वर मात करण्यासाठी बीट अत्यंत उपयुक्त आहे. बीट लोहामध्ये संपन्न असत. बीट मध्ये फोलिक अॅसिड असत. त्याचबरोबर, फायबर आणि पोटॅशियम सुद्धा असत. बीट चा उपयोग लाल पेशींच काम सुधारण्यात मदत करत. त्यामुळे शरीरात ओक्सिजन च प्रमाण वाढत आणि शरीराच्या सगळ्या भागामध्ये ऑक्सिजन पुरवला जातो. त्यामुळे साहजिकच तुम्ही फ्रेश राहता. बीट चा समावेश जेवण्यात नियमित केल्यानी तुम्ही अनेमिया वर सहज मात करू शकता. तुम्ही बीट आणि सफरचंदाचा ज्यूस पिला तर त्याचा डबल परिणाम दिसून येईल.

* आहारात बीट कसा घेऊ शकाल-

१. बीटाची कोशिंबीर खाऊ शकता.

२. कच्च बीट खाल्लं तरी त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.

३. टॉमॅटो, बीट इत्यादी घालून त्याच सूप करून पिल्यानी हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते.

४. तीळ-

तीळ हे सुद्धा लोहामध्ये संपन्न असते. त्यात काळे तीळ हे अजूनच चांगले. तील आपण वेगवेगळ्या पद्धतीनी आहारात समाविष्ट करू शकतो.

* तीळ कसे खाल-

१. तिळाची चटणी करून जेवणात खाऊ शकता.

२. तीळ आणि गुळाच्या वड्या करू शकता.

३. थालपीठा ला तीळ लाऊन तीळाच सेवन करू शकता.

५. खजूर-

खाजुरामध्ये लोहाच प्रमाण खूप जास्ती असत. त्यामुळे तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन कमी झाल तर खजूर खाण्यानी ते वाढण्यास नाकी मदत होऊ शकते. आणि तुम्ही अनेमिया वर अगदी सहज मात करण्यात यशस्वी होऊ शकता. खजुराच्या प्रत्येक १०० ग्राम मध्ये ०.९० मिलीग्राम इतक लोह असत. खजूर हा कॅल्शियम , मॅनग्नीज, कॉपर, मॅग्नेशियम मध्ये संपन्न असतो. कॉपर चा उपयोग लाल रक्त पेशी बनवण्यासाठी होतो. त्यामुळे अनेमिया शी लढायला खजुराच सेवन नियमित करा.

* खजूर काय वेगवेगळ्या प्रकारांनी खाऊ शकाल -

१. खजूर नुसता खाल्लं तरी त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पण रिकाम्यापोटी खाल्ल्यानी त्याचा प्रभाव नक्कीच वाढू शकतो.

२. वाळलेला खजूर म्हणजेच खारीक रात्री दुधात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यानी शरीरातले रक्त वाढण्यास मदत होते. आणि खारीक भिजत टाकलेलं दुध टाकून न देता ते सुद्धा प्यावं.

३. कोमट दुधात १-२ खजूर भिजवून ते पाणी गार झाल्यावर प्या. ज्यांना दुध वर्ज्य असेल त्यांना अश्या प्रकारे खजूर खाल्लं तर नक्कीच फायदा होऊ शकेल.

६. मनुका-

नियमित मनुका खाल्ल्यानी शरीरातलं लोह नक्की वाढण्यास मदत होईल. मनुका मध्ये कॅल्शियम, प्रोटीन, सोडीयम, पोटॅशियम, फायबर आणि लोहाच प्रमाण भरपूर असत. १०० ग्राम मनुकांमध्ये १.८८ मिलीग्राम लोह असते. म्हणजेच मनुकांच नियमित सेवन केल्यानी अनेमियावर तुम्ही सहज पणे मात करू शकता.

* मनुका कश्या खाऊ शकता-

१. रात्री पाण्यात मनुका भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते मधाबरोबर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक लोह आणि त्याचबरोबर इतर पोषक तत्व मिळण्यास उपयोग होतो.

२. खजूर, मनुका, बदाम घालून त्याची बर्फी करून खाल्ली तर शरीराला योग्य पोषक तत्व मिळण्यास फायदा होईल.

७. डाळिंब-

डाळिंब हे एक सुपर फळ आहे अस म्हणतात. डाळींब हे बऱ्याच पोषक तत्वांनी संपन्न असत. डाळींबात प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फॅट, फायबर आणि साखर असते. अजून महत्वाच म्हणजे डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियम सुद्धा असते. त्याचबरोबर, पोटॅशियम, कॉपर, व्हिटामिन सुद्धा भरपूर प्रमाणत असतात. डाळिंब खाल्ल्या मुळे हिमोग्लोबिन तर वाढण्यास मदत तर होतेच त्याचबरोबर, ब्लड फ्लो सुद्धा सुधारतो. नियमित डाळिंबच सेवन केल्यानी अनेमिया ची लक्षणे कमी झाल्याच नक्कीच दिसून येईल.

* डाळिंबाचा समावेश आहारात कश्या प्रकारांनी करू शकाल-

१. सकाळी रिकाम्या पोटी मध्यम आकारच डाळिंब तुम्ही खाऊ शकता.

२. रोज ब्रेकफास्ट मध्ये डाळींबाचा ज्यूस पिऊ शकता.

८. पार्स्ले-

तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पार्स्ले चा समावेश नियमित केला पाहिजे. कारण पार्स्ले मध्ये लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असत. १०० ग्राम पार्स्ले मध्ये ५.५ मिलीग्राम लोह आढळून येत. म्हणजेच आहारात पार्स्ले चा समावेश केला तर अनेमिया दूर ठेवण्यास मदत मिळू शकते. पार्स्ले चे फक्त हेच फायदे नाहीत.. लोह आणि फॉलिक अॅसिड बरोबर पार्स्ले मध्ये व्हिटामिन सी सुद्धा आढळून येत. त्यामुळे लोह शरीरात शोषले जायला मदत होते.

* पार्स्ले चा उपयोग कसा करू शकाल -

१. पार्स्ले चा उपयोग तुम्ही सॅन्डविच किवा सॅलड मध्ये करू शकता.

२. सूप किंवा ज्यूस बनवतांना त्यात पार्स्ले घालू शकता.

३. चहात पार्स्ले घालून हर्बल चहा बनवून तो पिऊ शकता. गरज लागली आणि जर चहा गोड हवा असेल तर त्या चहा मध्ये मध सुद्धा घालू शकता.

तुम्हाला उत्साही वाटत नसेल किंवा अजून काही लक्षणे दिसत असतील ती आजच तपासून बघा! जर तुम्हाला अनेमियाची लक्षणे आढळली तर योग्य आहार घ्या म्हणजे अनेमिया वर सहज मात करता येऊ शकेल. त्याचबरोबर अनेमिया ची लक्षणे आढळल्यास वेळीच त्यावर उपाय करा. गरज पडल्यास आहार थोडा बदलुन पहा. तुमच्या आहारात लोह असलेल्या अन्नपदार्थांच सेवन वाढवा. आणि अनेमियावर मात करा. पण जर गरज असेल तर तुम्हाला डॉक्टर च्या सल्ल्यांनी गोळ्या घ्यायला विसरू नका. आणि अनेमिया ला दूर ठेवा.

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED