Sawan re mana books and stories free download online pdf in Marathi

सावर रे मना



बेबी ब्लुज् आणि पोस्टपार्टम डिप्रेशन(प्रसुतीनंतरचे औदासिन्य)

   मला अर्चनाची आई एका जवळच्या लग्नात योगायोगानं भेटली.
मी काहीशा उत्सुकतेनं आणि काळजीनं विचारलं,

"आता कशी आहे अर्चना?"

''गोळ्या सुरू हायेत पन्  आता तशी बरीये" 
त्या म्हणाल्या.

 अर्चनाचा चेहरा दिवसभर डोळ्यापुढून जात नव्हता.एका छानशा ,खळाळत्या व्यक्तिमत्त्वाला ग्रहण लागल्यासारखं झालं होतं.मला तिची सगळी हिस्ट्री दिवसभर आठवत राहिली.

    अर्चनाची केस म्हणजे टिपिकल 'पोस्टपार्टम सायकोसीस'ची.

  .बेबी ब्लुज् आणि पोस्टपार्टम डिप्रेशन व पोस्टपार्टम सायकोसीस ह्यात थोडासा फरक आहे.बेबी ब्लुज् म्हणजे फक्त चिडचिड, विनाकारण मूड जाणे,झोप न येणे वगैरे जे बऱ्याच वेळा आपोआप नियंत्रणात येतात .मात्र जर ह्यात आत्महत्येचे विचार किंवा बाळाला इजा करण्याचे विचार आले की,ते पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे डॉक्टर्स समजून जातात. जर ते वेळीच लक्षात आलं नाही तर स्वभाव कायमस्वरूपी बदलू शकतो किंवा मानसिक विकार त्रासदायक पातळीवर जाऊ शकतो.ह्याला पोस्टपार्टम सायकोसीस म्हटलं जातं.दुर्दैवाने अर्चना सायकोसीसच्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत तिच्या मानसिक स्थितीकडे घरच्यांचं लक्षच गेलं नाही.
      खरं तर डिलिव्हरी झाल्यानंतर तीन महिने बाईची परिस्थिती मानसिक, शारीरिक पातळीवर अगदीच कमकुवत असते. ह्या अशा परिस्थितीत जर कुठला तीव्र मानसिक धक्का बसला तर मनःस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.ह्या सायकोसीसचे दुष्परिणामही दूरगामी असतात.

   अर्चनाचं उदाहरण असंच.
 तिचं लग्न झाल्यावर अगदी सहा महिन्यातच तिला दिवस गेले.आईपण झेलण्यासाठी ती मानसिक पातळीवर तयार नव्हती कदाचित.पण गावच्या वातावरणात तिला हे सगळं नीट मांडता,सांगता आलं नाही.अगदी नवऱ्याला सुद्धा.
नववा महिना नुकताच लागला आणि आठ दिवसांतच तिला कळा सुरू झाल्या.पहिलटकरीण असल्यानं तब्बल बारा पंधरा तास तिनं कळा दिल्या.
         मुलगा झाला.बाकीचे सगळे कुटूंबीय खूप खुष होते. अर्चनाच्या मनातही सगळा आनंदी आनंद असायला हवा होता. पण अर्चना मात्र उदास उदास होती. त्या उदासीचं कारण फार ठोसही नव्हतं किंवा ते तिचं तिलाही नीट उमजलेलं नव्हतं असं म्हणता येईल.
     ती जेमतेम बारावी पास झाली आणि घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं .नवीन नवीन संसारात तशी ती खूश होती .गावाकडचं एकत्र कुटुंब म्हटल्यावर काही तडजोडी कराव्याच लागतात .त्या तिनं हसतमुखानं केल्याही होत्या .बारावीपर्यंत शाळा झालेली असूनही घरातली नेहमीची कामं करून शेतीेची कष्टाची कामंही ती वाघिणीसारखी चपळाईनं करायची. लग्नानंतर लवकरच दिवस राहिले म्हटल्यावर बाकी घरचे सर्वजण खूप खुश होते.
      दिवस गेल्यानंतरही ती आराम न करता रोजची कामं करतच होती. थोडं थकल्यासारखं व्हायचं खरं पण तरीही तिला वाटायचं की,
   'मी अशी हिंडतीफिरती राहिले तर माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. उगीचच पोट कापाया लागनार नाई'
   म्हणून ती थकवा येत असतानांही कामं पटपट उरकायचा रेटा लावी. शेतात उन्हातल्या कामानं तिचा गोरा चेहरा लालेलाल होऊन जायचा .पण ती मात्र मागे हटत नव्हती. थोडीशी मळमळ ,थकवा सोडलं तर इतर काही फार त्रास नव्हता. पण तरीही तिच्या सासूबाई म्हणाल्या,

" अर्चना!!  आता उन्हातल्या कामाच्या उपयोगाची नाई राहिली तू. तू आपलं घरातलं उरकीत जा. शेतीतली कामं मी आणि तुझी मोठी जाऊ मिळून करीत जाऊ.''

 खरं तर त्या चांगल्या भावनेनं बोलल्या पण बोलणं मात्र गावरान टेचात होतं. गोडीत बोललं की , सून डोक्यावर बसेल की काय ही पूर्वापार समजुत त्यांच्या डोक्यात असावी.
   वरकरणी अर्चनानं दाखवलं नाही पण तिला एकदम वगळलं गेल्याची भावना आली. सांगोपांग विचार करून बोलणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टींचा अभाव.

मग पीळ पडायला सुरुवात झाली ती झालीच.
.  तिच्या जावेनं किंवा सासूनंही चांगल्या उद्देशानं जरी तिला  काही सांगितलं की ,
''हे काम करू नको. आम्ही करून घेऊ ".
तरी तिला उगीचच वाईट वाटायला लागलं .
सासू आणि जाऊ दोघी अनुभवी असल्यानं त्या तिला सतत सूचना देत.
''बाळंतपणात हे खाऊ नको .ते खाऊ नको ! इथे बसू नको .तिथे बसू नको. तिन्ही सांजेला नदीकडे जाऊ नको.लोकं करणी बिरणी करतील"

   ह्या अशा सतराशेसाठ सूचनांमुळे तिही वैतागून जायची. त्यात नवराही तिला जपायचं म्हणून थोडं अंतर ठेवी .खरंतर ही चांगली गोष्ट होती .किती तरी पुरुष असा संयम दाखवू शकत नाहीत .पण ह्यातही तिनं चांगलं काही शोधलं नाही. उलट ह्या लवकर उपटलेल्या गरोदरपणामूळे तिला नवरा तिच्यापासून लांब गेला असं वाटायला लागलं. 

 हे सगळं लवकर आलेल्या गर्भारपणामुळेच झालंय असं तिच्या मनाने घेतल्यानंतर तिची चिडचिड होऊ लागली .
पण तिच्यातल्या ह्या सूक्ष्म बदलांचं मोठ्या समस्येत रूपांतर होईल असं कोणालाच वाटलं नाही. कारण एकतर खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात कामं भरपूर असतात .तिथे ह्या बारीकसारीक गोष्टी मनावर घ्यायला ना कुणाला वेळ असतो ना रस .

'स्लो पॉयझनिंग ' सारखं समस्या रूप धारण करत होत्या .नववा महिना लागला. आणि तिला कळा सुरू झाल्या. बाळाचं वजन जास्त होतं .त्यामुळे बाळंतपण तिच्यासाठी बरंच वेदनादायी ठरलं. 'बाळ म्हणजे त्रास' असं समीकरण तिच्या डोक्यात तयार झालं.
       माहेरी सव्वा महिना असेपर्यंत तिची लक्षणं मर्यादित होती .त्यामुळे ती फार लक्षात आली नाहीत किंवा माहेरच्या माणसांनी ती सांभाळून घेतली .पण सासरी गेल्यानंतर अगदी थोड्याच दिवसात तिच्या लक्षणांनी चांगलंच उग्ररूप धारण केलं.
         त्यात बाळासाठी होणारी जागरणं,त्याचं सगळं करणं तिला नकोसं वाटू लागलं .सतत ती करवादलेली असायची. कुणावरही तोंड टाकायची. शेवटी सासरच ते.ऐकून ऐकून ऐकणार किती ?      पुढे कधीतरी कुटुंबातल्या एका व्यक्तीशी तिची बाचाबाची झाली. आणि त्या भांडणात अर्चनाचा तोल गेला तो गेलाच. त्या दिवशी ती अक्षरशः कुऱ्हाड घेऊन धावून गेली त्या व्यक्तीवर. सासरचे सगळे हबकले .प्रचंड रागावलेही.

  अर्चनाचा नवरा चांगला ,समजदार होता.त्याच्या मध्यस्थीमुळे प्रकरण तात्पुरतं मिटलं.पण ते तेवढ्या दिवसापुरतंच. नंतर मात्र हे असं वारंवार होऊ लागलं.फुटकळ कारणांसाठी कधी ती कुऱ्हाड घेऊन धावे ,कधी दगड घेऊन तर  कधी खुरपं घेऊन .
एकदा तर तिनं कहरच केला .अवघ्या सव्वादोन महिन्यांच्या आपल्या बाळाला तिनं गोठ्यातल्या मारक्या जनावरांपुढे नेऊन ठेवलं .मग मात्र घरच्यांचा संयम सुटला.नवरादेखील खूप रागावला. त्यादिवशी त्यांनी तिला अंगणातल्या झाडाला बांधून टाकलं आणि घरातल्या सर्वांनी जळक्या लाकडानं बेदम मारहाण केली .

     तिला झालेल्या मारहाणीची बातमी कुठूनतरी अर्चनाच्या आईपर्यंत आली .शेवटी आईचा जीव.ती लगबगीनं अर्चनाला आणायला म्हणून तिच्या गावी गेली. तिथून तिला कळालं की अर्चना खूप त्रास देते आहे. तिला सगळे घरचे मिळून अंगणातल्या बाभळीच्या झाडाला फाशी देणार आहेत. हे ऐकल्यावर अर्चनाची आई हादरली. तिच्या पोटात खड्डाच पडला. तरीही तिनं नरमाईनं सासरच्यांना विनंती केली की,

  " काही झालं तर आम्हाला बोलवा पण तिच्या अंगाला हात लावू  नका हो."

    सासरच्यांनीही उद्विग्नतेनं तिचे  प्रताप सांगितल्यानंतर बिचारी आई हतबुद्ध झाली. निरूपायानं लेकीला आणि बाळाला घेऊन माहेरी आली.
     तोपर्यंत अर्चना बेफाम, कुणालाच जुमानत नसणारी झाली होती.
त्या लहानग्या बाळाचं सगळं करणं, अर्चनाचं ताळतंत्र सांभाळणं ह्यातच दोघा नवराबायकोचा (अर्चनाच्या आईवडीलांचा)वेळ जात होता .
      तेही थोडेथोडके दिवस नव्हे .तब्बल दोन वर्षे हे दुष्टचक्र चाललं.दिवस रात्र दोघे अर्चनाजवळ बसून राहात.स्वतःच्या बाळाला तर ती जवळही घेत नव्हती. दूधही पाजत नव्हती .बाळाचीच इतकी उपेक्षा तर बाकीच्यांचं काय मोल.त्या दोन वर्षांत घरातलं कुणीच असं नव्हतं की ज्यांनी अर्चनाच्या हातचा मार किंवा शिव्या खाल्लेल्या नव्हत्या. घरातली लोकं कमी पडली म्हणून की काय ती अक्षरशः रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांशीही भांडण उकरून काढी .स्वतःच्या आईला तर तिनं एवढं मारलं होतं की, त्या आईचे,बिचारीचे सगळे पुढचे दात पडून गेले होते .शेवटी अर्चनाला कोंडून किंवा बांधून ठेवावं लागे.त्यात त्या बिचार्या लहानग्या जीवाची बरीच फरफट झाली .
    ती दोन वर्ष अर्चनाच्या जवळच्या सर्वांसाठी एखाद्या दुःस्वप्नासारखी होती.आई वडील थोडावेळसुद्धा तिला व तिच्या बाळाला सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते. नवरा बिचारा भेटायला येई. एवढ्या चांगल्या, सुंदर बायकोला हे काय झालं म्हणून खंतावे. अर्चनाची आई जावयाला म्हणे ,

"जाऊ द्या पाहुनं. तुम्ही दुसरे लग्न करा. हिचा विचार सोडून द्या.आता हिचा शेवट असाच होनार ."

     कुठली आई असं म्हणेल? पण अर्चनाच्या आईची एवढी फरपट झाली होती, की सगळे दुर्दशा बघून तिला वाटे ही मेली तर बरं होईल .सगळे सुटतील तरी तिच्या जाचातून. अर्चनाचा नवरा बिचारा समजदारच म्हणावा लागेल की त्यानं तिच्या बरं होण्याची वाट बघितली .

      लाडीगोडी,धाकधपटशा,देवधर्म ,कोंबडं, बकरू ,बाबाबुवा सगळं सगळं झाल्यानंतर डॉक्टरांच्या मदतीनं मानसोपचार तज्ञांची मदत मिळाली .आयुष्याची वाताहत झालेली असूनही,कुठलाच आशेचा किरण दिसत नसतानाही सगळं सावरण्याची दुसरी संधी नियतीने तिला दिली. बरीचशी औषधं,शॉक ट्रीटमेंट ,रेग्युलर फॉलोअप ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमुळे अर्चना त्यातून बाहेर आली.संसाराला लागली. आणि आता तिचा संसार सुरळीत सुरू आहे.

माझा खरोखर सलाम आहे त्या माय बापांना आणि तिच्या नवरा व सासरच्यांनाही .की तो इतका अवघड काळ त्यांनी परस्परांना जमेल तसं, जमेल तेवढं समजून, सावरून ,सांभाळून घेत पार पाडला .
अर्चनाची ट्रिटमेंट शेवटपर्यंत व्यवस्थित केली. मानसोपचाराबद्दल कुठल्याही शंकाकुशंका न घेता केली.ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंब.त्यांनी हताश न होता ,उशिरा का होईना जो डोळसपणा दाखवला तो खरंच कौतुकास्पद आहे.

डॉ क्षमा शेलार

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED