mahanti shaktipinthachi - 17 books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग १७

महती शक्तीपिठांची भाग १७

अश्विन शुध्‍द प्रतिपदेला घटस्‍थापनेने विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्‍या कुंडामध्‍ये मातृका भरुन त्‍यावर विवीध पाच प्रकारचे धान्‍य टाकले जाते.
त्‍या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवले जाते व त्‍या कुंडाच्‍या बाजूला पाच ऊस उभे करून पुष्‍पहार अर्पण केला जातो व प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवलेजातात.
त्‍याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्‍थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्‍हणजे दहिभात, पुरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो.
घटस्‍थापनेपासून चार दिवसपर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्‍ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्‍या जातात.

नवरात्रातील पंचमीस/ललितापंचमीस देवीची अलंकार पूजा केली जाते.
महापूजा व महाआरती केली जाते व सर्व भावि‍क भक्‍तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो .
सुर्यास्‍तापूर्वी देवीचे अलंकार उतरवून महाआरती केली जाते.
रात्री जागरण,गोंधळ व गायक कलावंताच्‍या हजेरीमधून उदो उदो केला जातो.
नवरात्रातील सप्‍तमीस जवळील महाकालीच्‍या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली जाते व महाकालीस महावस्‍त्र अर्पंण केले जाते .

अष्‍टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पूजा विधि झाल्‍यानंतर गुप्‍त अजबळी(बकरा ) दिला जातो व नंतर यज्ञास सुरूवात होते. सप्‍तशतीचे पारायण केले जाते.
औंदूबर, खैर, पिंपळ, वटवृक्ष, आघाडा या समिधा टाकल्‍या जातात. दहीभात, धान्‍य, पाचवृक्षाची लाकडे, आदी होमामध्‍ये अर्पण केल्‍या जातात.
या पुर्वी नवग्रहाची पूजा केली जाते.
सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरूवात होते.

नवमीस दिवसभर अष्‍टमी प्रमाणेच पूजा विधी केला जातो .
नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केला जातो व यज्ञात पुरण-पोळीचा नेवेद्य दिला जातो .
यानंतर यज्ञ कुंडात अजबळी दिला जातो व महाआरती पूजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते.
दशमीस म्‍हणजे दस-यास देवीचा मुख्‍य ध्‍वज उतरवून त्‍या पवित्र खांबास पंचामृताने स्‍नान घालून शेंदुर,हळद,कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते व त्‍या देवीध्‍वज पताक्याला नविन वस्‍त्र चढविले जाते.
पायसाचा (खिरीचा )नैवेद्य दाखऊन महाआरती केली जाते व गडावरील सर्वच देवी-देवतांजवळ पताका चढविल्‍या जातात .
रेणुकेचा पुत्र परशुरामाची पालखी सजवून त्‍या मध्‍ये परशुरामाची मुर्ती ठेवुन त्‍या पालखीची मिरवणूक काढून ती पालखी सीमोल्‍लंघना करीता वरदायीनीच्‍या पहाडावर जाते.
ही परशुरामाची पालखी जेव्‍हा रेणुका गडावर प्रवेश करते,तेव्‍हा रेणुकेच्‍या व्‍दारासमोर पालखी समोरही अजबळी दिला जातो व रेणुकेस आपटा रुपी वृक्षाची पाने अर्पण केली जातात व महानैवेद्य दाखविला जातो.
नवरात्रीच्‍या हया काळामध्‍ये रेणुकेच्‍या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.

अश्विन शुक्लपक्ष म्हणजेच कोजागरी पौर्णिमा गडावर मोठया उत्साहात साजरी होते.
त्या दिवशी देवीची संपुर्ण पुजा केली जाते व रात्री भजन, किर्तन आयोजित केली जाते.
पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून नैवेद्य म्हणुन देवीस दा‍खविला जातो व महाआरती केली जाते आणि उपस्थित भाविकास हा प्रसाद वाटला जातो.

श्रावण शुध्‍द त्रयोदशीस सकाळीच रेणुकेची पंचामृताने स्‍नान घालून विधीवत संपूर्ण पुजा केली जाते.
हया दिवशी संपूर्ण अलंकार चढवून पितांबर नेसवला जातो.
भाळी मळवट भरुन शृंगार केला जातो व पुरण-पोळीचा नैवैद्य दाखवून, मुखी तांबुल भरविला जातो .
सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो.
श्रावण समाप्‍तीस ‘ परंजण ’ असे म्‍हणतात.
विशेष म्‍हणजे हया संपूर्ण श्रावणमासा मध्‍ये देवीची सेवा करणारे पुजारी अनुष्‍ठान करतात व हया कलावधीत सप्‍तशतीचे पठण नियमीत चालू असते.
दिपावलीस संपूर्ण दिप प्रज्वलित करून रेणूकेचे मंदीर प्रकाशमय केले जाते.
संपुर्ण भक्तीने पुजा अर्चना केल्यानंतर मंदिराच्या सभा मंडपात लक्ष्मी पुजन केले जाते.

शाकंभरी नवरात्र

ह्या शाकंभरी नवरात्राचे महत्व असे आहे की, जेव्हा भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला. पाण्याशिवाय जीवमात्रांना जगणे अशक्य झाले. तेव्हा ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी देवीची अराधना केली.

तेव्हा प्रसन्न होऊन देवीने तिच्या शरीरापासुन वनस्पती म्हणजे शाक निर्माण केल्या .

ही वनस्पती विश्वातील जीवजंतूना दुष्काळात अन्न म्ह्णून पुरवून त्यांना जगवते .

देवीने उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने देवीस शाकंभरी म्हणून ओळखू लागले.

असा शाकंभरी नवरात्रोत्स दुर्गाष्टमी ह्या दिवशी प्रारंभ होतो.

नित्य नियमाने संपूर्ण पुजा झाल्यानंतर दहीभाताचा नैवेद्य व पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते.

हा उत्सव पंधरा दिवस चालतो.

शुध्द अष्टमीस काळ भैरव जयंती होते.

एकवीस वडयाची माळ घालून विधीवत पुजा केली जाते, व शुध्द नवमीस शाकंभर नवरात्र सांगता होते.

ह्या दिवसी दुध घोटून त्याचा नैवेद्य दाखवीला जातो व प्रसाद वाटला जातो.

मार्गशिष चंपाषष्ठी

मार्गशिष चंपाषष्ठीला गडावर खंडोबाचे पुजन केले जाते.बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत व पातीचा कांदा असा नैवेद्य ह्या दिवशी खंडोबास भरविला जातो.

मकर संक्रांत

पौष शुक्ल म्हणजे मकर संक्रांत ह्या दिवशी तिळ गुळाचा नैवेद्य दाखविला जातो

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.

माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूर गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे.

हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते.

मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स. १५४६ मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर अंकित केला आहे.

हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. १६२४ च्या सुमारास केला आहे.

हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे.

मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे.

गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

गाभाऱ्याचे प्रवेशव्दार चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे.

देवीचा मुखवटा हा १.५२४ मीटर (५ फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी १.२१९२ मीटर (४ फुट) इतकी आहे.

दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्यात प्रवेशव्दारातून भक्तांचा प्रत्यक्ष रेणुकेच्या मंदिरात प्रवेश होतो तेंव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल भक्तांचे चित्त केंद्रीत करते.

भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनयन असलेल्या , रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा अवर्णनीय आहे.

डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे.

पितांबर नेसल्याने ती अधिक मंगल दिसते.

विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत.

भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबुल आहे.

हजारो सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे.

देवीची नजर अत्यंत चित्तवेधक अशी आणि भेदक व सरळ आहे .

मातेला रोज दूध-पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

देवीचा जबडा खूप मोठा असून, पाचशे-साडेपाचशे पानांचा विडा त्यात मावतो. देवीच्या मुखातील विडाप्रसाद भक्तांना तांबूल म्हणून वाटला जातो, हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

तांबुलाची प्रथा येथे पुरातन काळापासून आहे.

होळी

संपूर्ण पुजा विधी झाल्या नंतर गडाच्या उत्तरेस होलीका पुजन केले जाते.

तेव्हा देवीस पातळ,खण, नारळ, बांगडया पुष्प हार अर्पण करून पुजा केली जाते व होळी पेटवली जाते.

नंतर मातृतीर्थ, वनदेवी , आणि विष्णूकवी मठ येथे ही होळी पेटविली जाते.

असेच वर्षभर येणारे विविध सण व उत्सव मोठया उत्साहाने साजरे केले जातात.

ह्या शिवाय प्रत्ये्क दिवशी गडावरील पुजारी देवीची नित्य नियमाने सेवा करतात.

प्रत्येक दिवशी भल्या पहाटे रेणुकेच्या मुखकमलावर शेंदुर लावला जातो व पंचामृताने स्नान घालून हळद कुंकू भाळी लावला जातो .

मंत्र पठण व सप्ताशतीचे पाठ केले जातात.

नंतर महावस्त्र अर्पण करून पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो व मुखी तांबुल भरवीला जातो.

विश्वा्चे कोणी आई-वडील आहेत असे समजून हीच वडीलांची व आईचे प्रतिके अनुक्रमे शिवलिंग व जगन्माता समजली जातात . ह्या विश्लेषणावरून लिंगपुजा व देवीची उपासना आर्याच्यां आधीही सिंधु संस्कृतीत चालत आलेली आहे.

रेणुकेस मातंगी हे ही नाव आहे.

विष्णुरूपी परशुरामाची माता, शिवरूपी जमदग्नी ऋषींची कांता ही रेणुका असल्यामुळे श्री रेणुका शाक्‍त व वैष्णव ह्या दोन्ही पंथांना पुजनीय आहे.

नाथ संपद्राय-पंथ, दत्‍तसंप्रदाय,शाक्‍त संप्रदाय, आनंदसंप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी(भागवत), सूफी संप्रदाय, हे सर्व येथे एकत्र येतात .
समाजाच्‍या धारणेसाठी अतिरिक्‍त अहंभावनेने धर्म संप्रदायाचे निर्माण झालेले मतभेद समाप्‍त करून सर्वधर्म संप्रदाय समन्‍वय इथे घडतो .

हा प्रयत्न फक्त श्री क्षेत्र माहूर येथे होतो , भारतात इतरत्र आढळत नाही.

अशी संप्रदाय समन्‍वयाची देणगी माहूरच्‍या भूमीचे धर्मोशाक्‍तांनी दिली.

पुरातन वस्‍तुसंग्रहालय माहूर शहरातच स्थित असून येथे आदिवासी बंजारा सांस्‍कृतिक ठेवा जपून ठेवला आहे.

पुरातन नाणी, शस्‍त, प्राण्‍यांचे सांगाडे, विविध प्राचीन दगडी व विविध धातूच्‍या मूर्त्‍या व हस्‍तशिल्‍पे येथे जतन करून ठेवलीआहेत.



क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED