Samarpan - 21 books and stories free download online pdf in Marathi

समर्पण - २१

तेरे इस मलाल और बेरूखी का,
मुझपर कुछ ऐसा असर हुआ
यूँ लगा वजूद़ बचाने के लिए,
रीश्ते की गिरहे टूटना जरुरीसा हुआ


अभयच्या नजरेत मी केलेली चूक अक्षम्य होती....नाही.....कदाचित तो गुन्हा होता...असेलही...
अजूनही नाही समजू शकत मी की खरच माझी 'ती' चूक होती का?? विक्रमच माझ्या आयुष्यात येणं, मला त्याच्यावर एक सखा म्हणून जिवापाड प्रेम होणं हा सगळा चुकीचाच भाग आहे...आणि हे सगळं का चुकीचं आहे कारण माझं लग्न झालं होतं...मी कोणाची तरी पत्नी होती...यामुळेच ती 'चूक' नसून एक अक्षम्य गुन्हा होता.....काय बोलला होता अभय मला, "नैना तुला एकनिष्ठ नाही राहता आलं.."....हं...'एकनिष्ठ' याची व्याख्या काय आहे, हे नाही सांगता येणार माझ्या सारख्या सर्वसाधारण मुलीला...पण एक मात्र रोखठोकपणे सांगू शकते की विक्रम वर जरी मी प्रेम केलं असेल तरी अभयची जागा मी त्याला देण्याचा स्वप्नातही विचार केला नाही....एक मात्र खरं खरं सांगावंसं वाटतं की माझी अपेक्षा होती की विक्रम माझ्या आयुष्यात असावा माझा सखा बनून...असा सखा ज्याच्यासमोर मी माझ्या मनातला व्याप मांडू शकेन...आणि माझी ही अपेक्षा यासाठी होती की विक्रममुळेच माझं आणि अभयच नातं बनायला सुरुवात झाली होती....आणी राहिला प्रश्न एकनिष्ठ राहण्याच्या तर, या प्रश्नाचं माझ्याकडे तरी एकचं उत्तर आहे, "आपल्या आयुष्यात आपण एकावेळी दोन लोकांसोबत 'मनाने' एकत्र राहू शकतो, पण एकावेळी त्या 'दोन' लोकांसोबत 'शरीराने' एकत्र राहणं नक्कीच पाप आहे"...पण हे माझं मत आहे आणि ते अभयला पचेलच हे बंधनकारक तर नाही ना.....

आता असं वाटते विक्रम सारखा पुरुष कोणत्याच मुलीच्या आयुष्यात येऊ नये आणि आला तरी तिने माझ्यासारख वाहवून जाऊ नये...अभयला दुखावलं हे मान्य होत मला, पण माझ्या अभयसाठी ज्या भावना होत्या त्या खरच इतक्या कमजोर होत्या का की त्या अभयला दिसल्याच नाहीत...मी ही सर्वसाधारण मनुष्य आहे,भावना मलाही आहेत...परमात्मा तर नाही ना मी की कुठे चुकणारच नाही...त्यामुळे अभय ने बोललेले एक एक शब्द मला घाव करून जात होते आणि आत्ता ते सगळं माझ्या सहनशक्ती च्या पलीकडे जात होत...त्यामुळे आज मी माझ्या अन अभयच्या नात्याचं काय होईल हा विचारच सोडून दिला होता....मला फक्त आता माझं अस्तित्व दिसत होतं, आणि ते वाचवण्यासाठी आज अभयला उत्तर देण गरजेचं होतं, त्यामुळे मी त्याला बोलली,

"माझं अजून बोलणं संपलं नाही अभय, त्यामुळे तुझा आवाज आणि तुझी शक्ती सांभाळून ठेव, स्वतःला सावरण्यासाठी तुला गरज असेल त्याची..."

"आज फारच हिम्मत आलेली दिसते तुझ्यात नैना....काय जादू केली विक्रमने?? एवढ्या दिवसाचा 'दुरावा' भरून काढला असेल ना तुम्ही दोघांनी..? मग कुठे घेऊन गेला होता विक्रम तुला ? खूप छान वाटलं असेल ना तुला आज विक्रम जवळ??? हम्म...आता कळाल ही 'तीच' जादू आहे ना ज्यामुळे तू इतक्या निर्लज्जपणे मला उत्तरं देत आहेस..."

"हो....ही तीच जादू आहे....अगदी तसच जस तू सफियाला भेटून आल्यावर तुला व्हायच ना तसच वाटतंय मला आज.."

"खबरदार नैना....जर साफिया आणि माझ्याबद्दल एक शब्द ही चुकीचा बोलली तर....आम्हाला आमच्या मर्यादा माहीत होत्या....तू आणि विक्रम ने माहीत नाही काय काय के...."

"आम्ही काय काय केलं....हम्मम....कुठून सुरुवात करू सांगायला अभय....नाहीतर एक कामच करते ना तुला दाखवतेच मी त्याची जादू....दाखवते ना त्याने मला कुठे कुठे हात लावलाय..."

"बस कर नैना बस....थोडी तरी लाज बाळग... इतका निर्लज्जपणा कुठून शिकलीस..."

आता तर खरी सुरुवात झाली होती, अभयने विषय काढलाच होता तर त्याला माझी अन त्याची दोघांचीही जागा काय आहे हे दाखवणं गरजेचं झालं होतं...

"अरे अस काय करतोस अभय...तुझ्याकडून तर शिकली आहे मी हे सगळं...तुच शिकवलं मला हे सगळं...."

"माझी आणि तुझी तुलनाच नको करुस तू...तुझ्यासारखा नाही मी"

"पुरावा दे...."

"पुरावा...कसला पुरावा??"

"कसला पुरावा...तर अभय, पुरावा याचा की तू 'माझ्यासारखा' नाहीस, पुरावा याचा की तू आणि सफियाने तुमच्या सो कॉल्ड मर्यादा जपून ठेवल्या होत्या... आणि पुरावा याचा ही की तू तिला कुठे ही घेऊन गेला नाहीस.."

"मला तुला कोणताच पुरावा द्यायची गरज नाही, मला माहित आहे मी काय आहे , आणि माझ साफिया सोबत कस नातं होतं, त्यामुळे तू ज्या प्रकारच्या गलिच्छ गोष्टीसाठी पुरावा मागत आहेस ना, मला ते देणं गरजेचं नाही वाटत...."

आता मात्र माझी तळपायाची मस्तकात गेली... किती विचित्र स्वभाव आहे ना मनुष्याचा... आपण केलेली प्रत्येक गोष्ट बरोबर, आणि दुसऱ्याने केलेली बरोबर गोष्ट ही कशी चुकीची आहे हे किती छाती ठोकून सांगू शकतात...

"वा अभय वा....खूप छान....तुला किती झोंबल रे तुझ्या आणि साफिया बद्दल ऐकून घेताना, तुला पुरावा नाही द्यावा वाटत, तू एकदम बरोबर, तू एकनिष्ठ, तू मर्यादा पुरुषोत्तम.... आणि चुकली कोण?...फक्त नैना....हो... आहे मी निर्लज्ज...ज्या दिवशी तुझी पत्नी म्हणून या घरात आली, त्यादिवसापासून फक्त तुझ्या एका नजरेसाठी मरत होती, तू फक्त मला एकदा डोळेभरून बघावं त्यासाठी तुझ्या मागे पुढे फिरत होती .....त्यामुळे आहे मी निर्लज्ज.... आपण एका घरात राहूनही एका रूममध्ये राहत नव्हतो तरी आशा बाळगून होती की कधीतरी अभयला माझी जाणीव होईल आणि निमूटपणे माझी सगळी कर्तव्य पार पाडली... त्यामुळे आहे मी निर्लज्ज...तुला रात्री कधी घरी यायला उशीर व्हायचा, मी न जेवता तुझी वाट बघत बसायची आणि तू मात्र त्याबद्दल थोडीही विचारपूस न करता सरळ झोपायचा पण तरीही राग नाही काढला तुझ्यावर....त्यामुळे आहे मी निर्लज्ज.....विक्रम माझ्या आयुष्यात आला, मला त्याच्याबद्दल काही भावना निर्माण झाल्या आणि मी तुला त्याच्याबद्दल वारंवार सांगण्याचा प्रयत्न ही केला, तू अगदी खालच्या थराला जाऊन माझ्या चारित्र्यावर चिखलफेकही केली तरी मोठ्या मनाने तुझं आणि साफियाचं नातं स्वीकारलं....त्यामुळे आहे मी निर्लज्ज....आणि एवढं सगळं झाल्यानंतरही जेंव्हा जेंव्हा तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तरी मी तुला रोकल नाही....त्यामुळे आहे मी निर्लज्ज..."

"नैना...तू जरा जास्तच...."

आज मी थांबणारी नव्हती...डोक्यावरून पाणी गेलं होतं...आणि विचार केला जर बुडायचंच आहे तर थोडेसे हातपाय मारूनच बुडायचं... कमीतकमी मनाला थोडी शांती तर मिळेल की स्वतःला वाचविण्यासाठी नाही तर परिस्थिती चा सामना करण्यासाठी झगडली मी...

"जरा नाही खुप जास्त बोलायचं आहे...आणि बोलणारच आहे मी अभय....काय चूक केली होती रे मी...कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली मला.....प्रेम तू केलं साफिया वर, तुझ्यामुळे तुझ्या घरात अडचणी निर्माण झाल्या, तू सफियाला विसरू शकत नाही म्हणून कीतिकीती दिवस घराच्या बाहेर राहायचास...आणि या सगळ्यामध्ये मी कुठेच नव्हती, तरी मला का या गोष्टीची शिक्षा मिळाली...तरीही मी कधी तुझी काळजी करण्यात किंवा तुझ्या तुझ्या घरच्यांबद्दल कर्तव्य निभावण्यात कमी पडली नाही...बाहेर मला बायको म्हणून मिरवायच आणि घरात आलो की तू कोण अन मी कोण...रोज फक्त हाच विचार येतो की माझ्यामुळे तुला त्रास झाला...मी तुला इतक्या विनंत्या करत आहे, तुला इतकं मानवण्याचे प्रयत्न करत आहे...तुला मात्र काहीच फरक नाही पडत आहे...जेंव्हा तू मला साफिया बद्दल सांगितलं, मला खरच वाईट वाटलं... पण नंतर मी हा पण विचार केला की तुला आणि सफियाला पण किती त्रास झाला असेल...मी कधीच तुमच्या नात्याला हीन भावनेने नाही बघितलं अभय....कारण मला माहीत होतं ते तुमचं प्रेम आहे..आणि तू मला ते सगळं कबुल केल्यावर माझ्या मनात तुझ्याबद्दल खरचं खूप आदर निर्माण झाला अभय...पण या काही दिवसात तू जे काही आरोप लावलेत ना माझ्यावर किंवा जी भाषा तू मला बोलला आहेस...कीव येते मला तुझ्या मानसिकतेची.... तू जेंव्हा बोलतो ना की सफियावर तुझं प्रेम होतं, खूप आश्चर्य वाटत मला की प्रेम केलेल्या व्यक्तीला प्रेमाची भाषा कळत नाही....आणि तूला प्रेमाची कदर खरच नाही अभय... तुला फक्त तुझा 'इगो' महत्त्वाचा आहे...आणि आता तर हे विश्वासाने सांगू शकते मी की आज साफिया जरी तुझ्या सोबत असती ना तरी तू तिच्यासोबतही असाच वागला असता, कारण तू फक्त तुझ्या दृष्टीने विचार करतो...आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही आज सोबत नसावेत....."

माझा राग अश्याप्रकारच विष बनून बाहेर निघत होता की त्यामुळे अभयच्या अंतर बाह्य मनावर काय परिणाम होत असेल याचा मी विचारच केला नाही.....आणि खर सांगू, करावाही वाटला नाही...
तस तर माझ्यामुळे कोणाच मन दुखावल्या जावं हे माझ्या तत्त्वात बसत नाही, कारण कोणाचं मन दुखवण्याच्या पापाचं ओझं वाहन खूप कठीण असतं... पण अभय ज्या थराला जाऊन मला बोलत होता, त्यामुळे मला सगळं असहनिय झालं होत... कोणाला उलटून उत्तरं नक्कीच द्यायला नाही पाहिजे, पण कधी कधी समोरच्याला त्याची बोलण्याची सीमा कुठपर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे हे समजून देण्यासाठी, उत्तरं देणं गरजेचं होऊन जातं...

मी एवढं सगळं बोलल्यावर अभय वर कटाक्ष टाकला तर त्याचे डोळे भरलेले होते.... साहजिकच साफिया बद्दल तो हे सगळं ऐकू शकत नव्हता....मग माझं काय, मी तर लग्नाची बायको होती ना त्याची, माझ्याबद्दल वाटेल तो कसं बोलु शकत होता तो, त्यामुळे आज माझं मन एवढं कठोर बनवलं होतं की या अभयच्या कोणत्याच भावनेत मला माझं अस्तित्व गमवायचं नव्हतं... माझा निर्णय पक्का होता की आता मी अभय सोबत राहूच शकत नाही...हां, मला स्वतःला ही गोष्ट पटवुन घ्यायला किंवा मान्य करायला खुप कठीण जात होती, माझ्या गालावरून ओघळणारे अश्रू हेच सांगत होते की संसार एवढ्या साहजासहजी तुटत नाही पण माझं दुखावलेल मन एवढं अशांत होउन मला संकेत देत होत की अश्या अविश्वासाच्या नात्यात मला फक्त अपमान च मिळणार आहे त्यामुळे ह्या रेशीमगाठी चा गुंता मला तोडुनच सोडवावा लागेल...मी त्याला बोलली,

"माहीत आहे अभय, जेंव्हा जेंव्हा मी आणि विक्रम भेटलो आहे ना त्याने मला फक्त आपलं नात कसं चांगल करता येईल हेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला.... ही गोष्ट खरी आहे मी त्याला मीत्रापेक्षा जास्त मानते पण, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे की मला जाणीव आहे माझं भविष्य तुझ्यासोबत आहे, त्याच्यासोबत नाही...आणि हा विचार करूनच मी महाबळेश्वर ला तुझ्या सोबत आली होती...तुला तेंव्हाच सगळं सांगायचं ठरवलं होतं पण तू साफिया बद्दल सांगितलं आणि त्यापुढे काय झालं हे तुला माहीतच आहे...मला एक कळत नाही, तुला पण तर सफियाने आपलं सगळं सुरळीत व्हावं यासाठीच सल्ले दिले ना नेहमी, मग ती बरोबर अन विक्रम कसा चुकीचा झाला रे....तुझं काय झालंय माहिती आहे अभय, तू हे पचवू शकला नाही की माझं ही कोणावर प्रेम असू शकत...आणि त्यामुळेच स्वतःचा वरचा राग तु माझ्यावर काढतो आहेस..."

"नैना...साफिया वर मी लग्नाआधी प्रेम केलं आणि तू लग्नानंतर.... फरक आहे खूप आपल्यामध्ये..."

"काय फरक आहे रे, लग्न झाल्यावरही तू तिला भेटत होतासच ना, मैत्रीण म्हणून...मग मी विक्रमला माझा चांगला मित्र समजते तर काय चुकीचं आहे....आणि हो एक लक्षात ठेव...जर लग्नानंतर प्रेम करणं चुकीचं आहे तर प्रेम केल्यावर कोणी दुसऱ्या सोबत लग्न करून त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करणं ही चुकीचच आहे..."

"मग आता काय ठरवलयेस, जाणार मला सोडून...विक्रम सोबत राहणार..."

"हीच...हीच मानसिकता बदलायला हवी तुला तुझी...कस आहे ना अभय माझ्यासाठी माझा नवरा माझा मित्र यापेक्षाही मोठा माझा स्वाभिमान आहे....हो , विक्रम बद्दल खुप काही वाटत मला, पण मला त्याच्यासोबत राहायचं आहे ही अपेक्षा माझी कधीच नव्हती... माझ्या भावनांना आवर कुठे घालायचा याची 'मॅच्युरीटी' आहे माझ्यामध्ये... त्यामुळे नैनाला आयुष्य जगण्यासाठी... नाही नाही...यशस्वी आयुष्य जगण्यासाठी कोणत्याच पुरुषाची गरज नाही...मग तो विक्रम असो किंवा अभय...."

एवढं सगळं मी बोलली खरं अभयला, पण मनात प्रचंड तुफान उठत होते...एवड्या तडकाफडकी मी सगळं काही संपवायला निघाली तर होती, पण काय मला इतक्या सहजासहजी यातून सुटका मिळाली असती...माहीत नाही...तो विचार नव्हता केला त्यावेळी... पण एक नक्कीच कळाल आहे राग आपल्याकडुन काहीही करवून घेतो.....अभय...जो मला मागच्या काही दिवसांपासून धमकवत होता, माझं एवढं सगळं ऐकून मात्र सुन्न होता...असेलच ना, त्याने स्वप्नात ही विचार केला नसेल की प्रत्येक वेळी शांत राहणारी आणि त्याच सगळं ऐकून घेणारी नैना त्याला इतके प्रतिकात्मक उत्तरं देईल....प्रतिकार करणं जिकरिच झालं होतं मला कारण मी फक्त अभयचा विचार करून विक्रमशी असलेली मैत्री ही तोडायला निघाली होती पण त्याला माझे प्रयत्न दिसत नव्हते...उलटं त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत होता... मागच्या काही दिवसात खुप काही बदललं होतं...अभय जर उशिरा घरी आला तर मला त्याची काळजी वाटायची आणि मला चुकून उशीर झाला किंवा त्याचा फ़ोन नाही उचलला तर त्याचे हजार प्रश्न मला पागल करून सोडायचे....अभय एवढा फिरतीवर असायचा, खुप उशिरा घरी यायचा पण मी कधीच त्याला कोणतेच प्रश्न नाही विचारले... त्याने साफिया बद्दल सांगितलं तेंव्हा मला वाईट वाटुनही मी त्याच्या भावनांचा मान राखत त्याला सहानुभूती च दिली....मग काय कोणत्याही गोष्टीत माघार घ्यायची किंवा समजूतदारपणा दाखवायचा ही फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी का??? मी तरी आता अभयच्या कोणत्याच अग्निपरीक्षेला बळी पडणार नव्हती....त्यामुळे मी माझं सामान भरायला निघाली...अभय हे सगळं पाहत होता... जेंव्हा मी बॅग घेऊन जायला निघाली मला गरगरल्या सारखं झालं आणि अभय ने येऊन मला पकडलं आणि बोलला,

"ठेव ती बॅग... सकाळी जा कुठे जायचं, तुला बहुतेक बरं नाही वाटत आहे..."

मी जरा रागीट नजरेने त्याच्याकडे बघितलं अन बोलली,

"आता का हे उपकार? तूच बोलला ना आता हा निघ...मग जात आहे मी, आणि माझं सगळं काही तुला नाटकच वाटत ना, मग माझी काळजी करायची नाही, ठीक आहे मी..."

हे सगळं करताना मला खूप भीती वाटत होती, अंगात काही त्राण ही नव्हता, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं पण तरीही जे मी ठरवलं ते करायचंच होत मला....

"नैना...ऐक माझं आपण शांततेत बोलू शकतो, मी रागात बोललो तुला जायला, कारण मला सहन नाही झालं तू विक्रम ला भेटून आलीस ते...पण तुला खरच बरं वाटत नाही आहे.... इतका पण निर्दयी नाही मी....."

"निर्दयी नक्कीच नाहीस तू, आणि तू खरच खूप चांगला आहेस पण माझीच लायकी नाही तुझ्या आयुष्यात राहायची....नम्रता येतच असेल मला घ्यायला..."

"नैना...खरं सांगू तुला...आधीच बोललो होतो तुला मी एकदा साफिया ला गमावलय आता तुला मला माझ्या आयुष्यातुन कुठेच जाउद्यायच नाही आहे...मला नाही आवडत विक्रम च तुझा मित्र बनून ही राहणं, नाही सहन करू शकत मी ते...मी रागात बोललो तुला जा म्हणून पण तू गेल्यावर मी नाही सुखी राहू शकत आणि विक्रम तुझ्या आयुष्यात असल्यावर हे आपलं सगळं अस चालतच राहणार, मला मान्य नाही तो तुझा मित्र ही राहणं...आणि आता तू त्या विक्रम साठीच मला सोडून जायला निघालीस...."

"हेच तर नाही समजू शकत आहेस तू, मी विक्रम साठी तुला सोडतच नाही आहे...पण तुझी ही जे संशयी बुद्धी आहे ना ते मला सहन नाही होत आहे...खोटं नाही सांगणार अभय, पण विक्रम माझ्यासाठी खरच खूप खास आहे, जशी साफिया तुझ्यासाठी आहे , पण याचा अर्थ असा अजिबात नाही की त्याच्यामुळे मी जात आहे...पण मला नाही वाटत तुझ्या सोन्याच्या पिंजऱ्यात मी राहू शकते....जसा मी तुझ्यावर विश्वास ठेवला तसा तुही ठेवायला पाहिजे माझ्यावर....पण तू नाही ठेवणार हे माहीत आहे मला, त्यामुळे मला नाही राहायचं इथे..."

"नैना, विचार कर एकदा, आपल्या घरच्यांना काय सांगायचं?"

अभयच्या या प्रश्नाने मात्र मी थांबली.... खरंच, काय सांगायचं घरच्यांना... म्हणजे आहे ती परिस्थिती सांगण्यात काहिच हरकत नाही पण माझं अभय पासून विभक्त होण्याचा निर्णय घरचे पचवू शकतील??...आपला समाज कितीही 'मॉडर्न' झाला तरी एका मुलीचे पालक तिचा संसार मोडताना पाहू शकत नाही किंवा नवऱ्याने सोडलेल्या मुलीला समाज कोणत्या हीन नजरेने बघतो ते त्या मुलीचे आई बाबा सहन करू शकत नाही...माझा निर्णय तर मी घेऊन मी मोकळी झाली होती, पण घरच्यांचा विचारच केला नाही मी....
का एवढं सगळं कठीण करून ठेवलंय देवाने मुलींसाठी?? स्वतःसाठी एक पाऊल उचलताना ही स्वतःच्या आधी घरच्यांचा, समाजाचा विचार करावा लागतो....माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आई बाबांचे चित्र तरळले, किती विश्वास आहे त्यांना माझ्यावर, ते तर अजूनही याच स्वप्नात आहेत की मी सुखी आहे अभयसोबत, त्यांना हे कळलं तर काय होईल...एवढ्या सगळ्या विचारांनी माझ्या डोक्यात काहूर माचवल, माझे डोळे हळूहळू बंद व्हायला लागले आणि काही कळायच्या आत मी खाली कोसळली.....कदाचित देवालाही मंजूर नसावा माझा निर्णय... अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या बाकी होत्या... आयुष्य एका नवीन वळणावर येऊन थांबणार होतं माझं.....
--------------------------------------------------------------
क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED