Saint Best Woman Part 4 books and stories free download online pdf in Marathi

संतश्रेष्ठ महिला भाग ४

संतश्रेष्ठ महिला भाग ४

गोरक्षनाथांच्या कृपेचा देखील मुक्ताबाईंवर वर्षाव झाला होता.

या कृपेनंतरच मुक्ताबाईंना “अमृत संजीवनीची” प्राप्ती झाल्याचे सांगीतले जाते.

समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपुर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग निर्मीती आहे
. त्यांच्या सर्वच अभंगांमधुन प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अश्या त्या रचना असल्याची जाणीव होते. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते.
मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणुन आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो.

संत मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी गेल्या .

विवेकबुद्धी तर मुक्ताबाईंकडे अत्यंत दृढ होती .

म्हणूनच जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन

ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ बसले.

त्यावेळी केवळ नऊ वर्षांच्या लाडीवाळ मुक्ताबाईने

कर्तव्यदक्ष पित्याची कठोर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून

आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन केली होती .

दु:खी अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगातुन सांत्वन केले होत्व .

त्यांच्या मनाला उभारी दिली होती .

ताटीच्या अभंगात मुक्ताबाईचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी,
उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे.

त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत
ती मूर्तिमंत त्यांच्या व्यक्तित्वात दिसून येतात.

शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला l

अवघी साधन हातवटी l मोले मिळत नाही हाटी l

कोणी कोणा शिकवावे l सारे शोधुनिया घ्यावे ll

लडिवाळ मुक्ताबाई l जीव मुद्यल ठायीचे ठायी l

तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l

मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत.

मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी
त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांची प्रज्ञा,

विचाराची “भव्यता” आणि उत्तुंग कल्पनेची “दिव्यता” अनुभवायला मिळते.

त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार,
योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते.

तसेच त्यांनी हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत.

हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे “अनुभवकणच” आहेत.

आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.

मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले l मुक्तची घडले हरीच्या पाठी l

रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता l तरले पतीत युगायुगी l

कृष्णनामे जीव सदा झाले शिव l वैकुंठ राणिव मुक्त सदा l

मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे l जाल पै निवाडे हरिरूप l

मुक्ताबाईंनी मराठी अभंगरचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली आहेत.

वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी

लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l

पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l

सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l

जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l

सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l

एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l

ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे.
सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील
बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता.

ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप म्हणजे मुक्ताबाई होय.

मुक्ताबाई चा काल १२७७ किंवा १२७९–१२९७ असावा .
त्यांना एकूण वीस वर्षांचे आयुष्य लाभले होते असे म्हणतात

या चारी भावंडांच्या जन्मस्थळ कोणी ते आपेगाव मानतात, तर कोणी आळंदी मानतात.

ज्ञानदेवांच्या भेटीस जाण्यापूर्वी त्यांना कोरे पत्र पाठविणाऱ्या

चांगदेवाला अनुलक्षूनच तिने चांगदेव इतकी वर्षे जगून कोरा तो कोराच असे म्हटले होते;

पण तेच चांगदेव पुढे त्यांचे शिष्य झाले

व दोघांतील हा गुरु-शिष्य-संबध दोघांनीही आपापल्या अभंगातून व्यक्त केला आहे.

मुक्ताबाईंच्या चरित्रातील दुसरी विशेष गोष्ट म्हणजे

त्यांनी ज्ञानदेवांच्या भेटीस आलेल्या अहंमन्य नामदेवांचे उघडे केलेले अज्ञान.

त्या प्रसंगी जाणवलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व पाहूनच नामदेवांनी त्यांच्याविषयी

'लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी ।

केले देशोधडी महान संत ...असे उद्‌गार काढले.

पुढे नामदेव-चांगदेव ह्या दोघांनी तिचा गौरव केला .

त्या निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतक्या एकरूप झाल्या होत्या, की त्यांचा वेगळा निर्देश केला जात नाही .

या चार भावंडांत त्या वयाने सर्वांत लहान असली, तरी त्यांनी समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी.

त्यांचे समाधिस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय

असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जाते.

गाथेत मुक्ताबाईंच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत.

त्यांची एकुण अभंगरचना पाऊणशेच्या घरात जाईल.

त्या सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहेत.

मुक्ताबाईंच्या काव्यात त्यांच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात.

अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताबाईंना निवृत्तिनाथांनी सावध केले होते व त्यामुळे

'मुक्तपणे मुक्त ।मुक्ताई पैं रत ।

हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।'

अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे त्या सांगतात .

त्यांच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत,

त्याबरोबरच त्यात हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे.

त्यांचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड होता .

निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपानदेवांच्या त्या भगिनी असल्या तरी देखील

त्यांच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व होतं.

त्यांनी ज्ञानबोध ग्रंथांचे देखील लेखन केले
या ग्रंथात आपले वडिल बंधु संत निवृत्तीनाथ आणि त्यांच्यातील संवाद आहे.

संत मुक्ताबाईंनी समाधीस्थ होण्यापुर्वी काही काळ अगोदरच या ज्ञानबोध ग्रंथाची निर्मीती झाली होती .

मुक्ताबाईंच्या अवघ्या वीस वर्षांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग म्हणजे त्यांनी केलेली ब्रम्हगिरी प्रदक्षिणा, त्यांच्या आईवडिलांचा देहत्याग, ज्ञानदेवांनी मुक्ताबाईंना दिलेली सनद, व विसोबा खेचर त्यांना शरण आले हे सांगता येतील .
संत ज्ञानेश्वरांसोबत मुक्ताबाईंनी आपल्या अभंगाद्वारे मराठीला अधिक बळकट बनवून भावस्पर्शी बनवले आहे. “अभंग” म्हणजेच जो कधीही भंग पावत नाही असा .
या अभंगामधील गोड शब्दरचना, भजन, कीर्तन, प्रवचन आदीसाठी अभंग अनिवार्य आहे.
अभंग हा काव्यप्रकार एवढा खोलवर गेला की, तो एक काव्य न राहता मानवी जीवनाचा दिशादर्शक बनला
“’अमृतानुभव’ ग्रंथाचे निर्माण केल्यानंतर ज्ञानेश्वरांनी अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या
नामदेवांनी ’तीर्थावली’ म्हणुन संबोधल्या गेलेल्या आपल्या अभंगांमध्ये ज्ञानेश्वरांच्या या तीर्थाटनाचे चित्ररुपी वर्णन केले आहे.
आपले तीर्थाटन संपल्यानंतर ज्ञानेश्वरांना आपल्या जीवनामधील कार्य संपले आहे असे वाटले

व त्यांनी “संजीवन समाधी” घेण्याचे ठरविले.

जेव्हा त्यांच्या भावंडांना या गोष्टीचे ज्ञान झाले तेव्हा हा ज्ञानाचा महासागर आपल्याला सोडुन जाणार म्हणून त्यांना अतीव दु:ख झाले.

परंतु ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते.

त्यामुळे सर्वांचाच नाईलाज झाला .

अखेरीस त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात त्रयोदशीला शके १२१८ रोजी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

संत नामदेवांनी त्यांच्या ’समाधीचे अभंग’ मध्ये याचे चित्ररुपी वर्णन केले आहे.

पाठोपाठ सोपानदेवांनी देखील समाधी घेतली .

.

अखेरीस त्यांनी कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षात त्रयोदशीला शके १२१८ रोजी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधु निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई असे दोघेच राहिले .

ते दोघेही अतिशय सुन्न झाले होते .

विकल मनस्थितीत ते इकडे तिकडे तीर्थयात्रा करीत फिरू लागले .
दु:खी कष्टी अवस्थेत ते दोघे महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहूण येथे आले .

फिरता फिरता ते तापी नदीच्या तिरावर आले असता अचानक वीज कडाडली.

संत मुक्ताबाई त्या प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या…..
नंतर निवृत्तीनाथांनी पण आपले आयुष्य संपवले .

अशा रीतीने या ज्ञानाच्या सुर्यास्तानंतर त्यांच्या भावंडांच्या नजरेसमोर अंध:कार पसरला

व त्या सर्वांनी स्वत:चे अस्तित्व संपविण्याचा निर्णय घेतला

वर्षभरामध्ये सर्वांनी आपले जीवन संपविले व या नाशवंत जगाचा निरोप घेतला.

. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे.

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l

ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे.
सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव सर्व भावंडात थोर होता.

ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप म्हणजे मुक्ताबाई होय.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED