अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ८) प्रियंका कुलकर्णी द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ८)


साखरपुड्याच्या तयारीत पंधरा दिवस कसे गेले कळलंच नाही. या पंधरा दिवसात जानकी आणि रघुवीर च एकदाच बोलणं झालं होतं.त्यानंतर दोघांनीही एकमेकांना ना फोन केला न मॅसेज. रघुवीरच्या घरून मात्र जानकीला वरचेवर फोन यायचे.रघुवीर ची मोठी बहीण गायत्री तिच्या नवरा आणि मुलासोबत अकोल्याला पोहचली होती. तीच ही जानकी सोबत फोनवर बोलणं व्हायच..घरातलं उत्साहच वातावरण बघून जानकीला सगळ्यांना फसवत असल्याने अपराधी वाटायच..काळजी,हुरहूर, सल अश्या अनेक भावनांची गुंफण तिच्या मनात होती..
पाहता पाहता साखरपुड्याचा दिवस उजाडला..देव कुटूंबीय त्यांच्या पाहुण्यांसकट सकाळी अकराच्या सुमारास हॉल वर पोहचले .साखरपुड्याचा मुहूर्त तसा दुपारी चार वाजताचा होता..अग्निहोत्रींनी त्यांच अगदी जंगी स्वागत केल .हार,बुके सह फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.आल्या आल्या चहा,कॉफी ,कोल्ड्रिंक्स याची औपचारिकता करण्यात आली..मग दोन्ही कडल्या पाहुण्यांची दोन्ही कुटूंबाने ओळख करून दिली.. रघुवीर चे डोळे जानकी ला शोधत होते..जानकी मात्र आतल्या खोलीत साडी नेसून एका जागी स्तब्ध बसलेली होती.बाकी मंडळींची धावपळ सुरू होती..जिजींनी जानकीला पाहुण्या मंडळींशी ओळख करून देण्याकरिता बोलावणं पाठवलं.मनु जानकीला घेऊन आली.
जानकीने अबोली रंगाची बारीक फुलं असलेल्या प्रिंट ची साधीशी साडी नेसली होती.नेहमी प्रमाणे केसांची एक लांब वेणी.चेहऱ्यावर कसलाही मेकअप नाही पण तरीही खूप गोड ती दिसत होती.जिजींनी तिची ओळख सगळ्यांशी करून दिली. पाहुण्या मंडळींशी गप्पा करण्यात ती मग्न झाली .रघुवीर ची नजर तिच्यावर च होती तीच लाजण, हसणं ,हसताना गालांवर पडणारी खळी, चेहऱ्यावर रुळणारी केसांची बट हे सगळं तो न्याहाळत होता आणिअचानक जानकी च त्याच्या कडे लक्ष गेलं. त्याने तिच्याकडे बघून स्मित हास्य केले तिही किंचित हसली..
काहीवेळाने जेवणं आटोपली आणि सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागले.गुरुजींनी पहिले वराला पूजेसाठी बोलवले.अरुताई आणि नारायणरावांनी रघुवीर चे पाय धुतले,नवीन कपडे,सोन्याचा गोफ,घड्याळ त्याला दिले..त्याने फिक्कट गुलाबी रंगाचाप्रिंटेड कुर्ता त्यावर मॅचिंग होईल असं जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा पैजामा घातला होता..आधीच रुबाबदार आणि देखणा दिसणारा रघुवीर आज आणखीन छान दिसत होता. रघुवीर नंतर जानकी आली तिलाही रघुवीर च्या आई बाबाने नवीन कपडे ,दागिने ,गजऱ्याच्या माळा, शृंगारच साहित्य दिलं..जानकी चेंज करायला आत गेली..त्यानंतर अंगठी बदलण्याचा कार्यक्रम होणार होता. काही वेळातच जानकी तयार होऊन आली आणि जमलेली सगळी लोकं तिलाच बघत राहिले..गडद गुलाबी आणि जांभळा रंगाचे मिश्रण होऊन तयार होण्याऱ्या राणी रंगाच्या साडीवर सोनेरी मोठे मोठे बुट्टे असलेली भरजरी साडी तिने नेसली होती..कानात मोठाले झुमके त्याला लावलेले मोत्याचे वेल, गळ्यात भरीव हार, लांब केसांची वेणी आणि त्या वेणीवर सुगंधी कुंदाचे दाट गजरे, ओठांवर लालसर रंगाचं लिपस्टिक, डोळ्यांत थोडं दाट भरलेलं काजळ, नाकात लहानशी मोत्याची नथ,नाजूक गोऱ्या हातावर काढलेली मेहंदी आणि साडीवर मॅच होतील अश्या भरून बांगडया..या वेशात जानकी कमालीची सुंदर दिसत होती. रघुवीर सुध्दा तिला बघतच राहिला..उपस्थित पाहुणे जानकीच भरभरून कौतुक करत होते.रघुवीर नशीबवान आहे त्याला इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी मिळाली असे तिथे रघुवीर कडल्या पाहुण्यांना वाटतं होते.अण्णांच्या डोळ्यांत जानकीला बघून आनंद अश्रू आले.

गुरुजींनी रघुवीर आणि जानकीला समोरासमोर उभे केले .जानकीचे तर भीतीने अवसान गळाले होते.ती मान खाली घालून उभी होती .गुरुजींनी रघुवीरला जानकीच्या बोटात अंगठी घालायला सांगितली.
जानकीने तिचा हात पुढे केला.घाबरल्यामुळे तिचा हात थरथरत होता.रघुवीरच्या ते लक्षात आलं .त्याने हळुवार तिचा हात त्याच्या हातात घेतला. तिने हळूच त्याच्या कडे पाहिलं .नजरेनेच त्याने तिला धीर दिला..आणि अलगद तिच्या नाजूक बोटात अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट दोघांवर पुष्पवृष्टी केली..जानकी ने ही रघुवीरच्या बोटात अंगठी घातली..गळ्यात हार घातले ,हातात पुष्पगुच्छ दिले.साखरपुडा दिला.गुरुजींनी त्यांना एकमेकांना पेठा भरवायला सांगितले..रघुवीर आणि जानकीने जोडीने मोठ्यांचे आशीर्वाद घेतले .रमा ताईंनी जानकी ची ओटी भरली..पाच सवाष्णीने त्या दोघांच औक्षवण केलं..
रघुवीर आणि जानकी सोबतच देव आणि अग्निहोत्री कुटूंबाचे ही नाते जुळले होते..

" शारदे..अग आता आपण मैत्रिणीच्या विहिणी झालोत ,खूप खूप अभिनंदन तुझं" जिजींनी माईंना शुभेच्छा देत मिठी मारली..

" तुझं पण खूप अभिनंदन रुख्मिणी" माईंनीही जिजींनी शुभेच्छा दिल्या.…

" अण्णासाहेब आजपासून जानकी आमची झाली बरं का" आप्पा म्हणाले..

"हो आता जानकी तुमचीच आहे" अण्णा हात जोडून म्हणाले..

जानकी आणि रघुवीर खुर्चीवर बसले होते.सगळे त्यांना त्यांच्या जवळ जाऊन शुभेच्छा देत होते.दोघांची चेष्टा, मस्करी करत होते. जानकीला कळत नव्हतं की त्यावर कस व्यक्त व्हावं ,रघुवीर मात्र बिनधास्तपणे चेष्टा मस्करीचे उत्तरं देत होता.प्रत्येक व्यक्ती त्या दोघांसोबत फोटो काढत होते..फोटोग्राफरने दोन्ही कुटूंबासोबत जानकी आणि रघुवीरचे फोटो काढलेत..सतत सगळे अवती भवती असल्याने रघुवीर ला जानकी बरोबर काही बोलता येत नव्हतं..बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी दोघांना निवांत वेळ मिळाला..

" जानकी फारच सुंदर दिसते आहेस ग आज..जणू एखादी अप्सरा स्वर्गातून उतरली आहे, खरच मी खूप लकी आहे बरं". रघुवीर तिची स्तुती करत म्हणाला..

" तू फ्लर्ट करतोय का माझ्यासोबत"? जानकी रघुवीर कडे रागाचा कटाक्ष टाकत म्हणाली..

" राग तर नाकावरच राहतो न तुझ्या ..मस्करी पण नाही कळत न तुला..ए पण तू खूप सुंदर दिसतेस हे मात्र खरं..अग रागाने काय पाहतेस मैत्रीण म्हणून म्हणतोय तुला बाकी काही नाही" रघुवीर हसत म्हणाला..

"मैत्री आणि आपली, ती कधी झाली?" जानकी म्हणाली..

" का आपण फ्रेंड्स नाही आहोत का??अच्छा म्हणजे तूला म्हणायच आहे की आपल्यात मैत्रीच नात नसून नवरा बायको च आहे असच न" रघुवीर पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला.

" ए गप हा तू मला अस नव्हतं म्हणायच " ती आणखी चिडत म्हणाली..

" अग सोने मस्करी करतोय मी तुझी आणि चिडू नको तुझा चिडलेला चेहरा कुणी बघितला तर काय म्हणेल" रघुवीर म्हणाला.

" काय रे रघु, कशाला त्रास देतोय तिला" गायत्री त्यांच्याजवळ येत म्हणाली..

" अग ताई मी का त्रास देऊ तिला उलट तीच मला त्रास देतेय." रघुवीर जानकी कडे मिश्कीलपणे हसत म्हणाला.

" नाही ताई मी काहीच नाही केलं बरं." जानकी बिचारी बावरून म्हणाली.

" माहिती आहे ग मला , हा किती आगाऊ आहे ते..तू नको लक्ष देऊ..बरं तुमचं फोटोशूट आटोपलं आहे का?" गायत्री म्हणाली..

"हो झालंच आहे ..पण एक मिनिट ह ताई माझ्या मोबाईल मध्ये जरा आमच्या दोघांचे फोटो काढ" रघुवीर गायत्री कडे मोबाईल देत म्हणाला..

" भरपूर फोटो काढलेत की आता ,मोबाईल मध्ये अजून कशाला " जानकी म्हणाली.

" माझ्या मोबाईल मध्ये कुठे काढलेत फोटो,अन तसही तुझा एकही फोटो नाही माझ्याकडे.तायडे तू काढ ग आमचा मस्त फोटो" रघुवीर म्हणाला.

" ए रघ्या असे दूर दूर काय उभे राहिले तुम्ही,जवळ जवळ या आणि तिच्या खांद्यावर हात ठेव रे " गायत्री म्हणली.

" अस म्हणतेस बरं हे घे ठेवला हात खांद्यावर" रघुवीर जानकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला..

तशी जानकी अजून बावरली तिला काय करावं सुचत नव्हतं..गायत्री ने तिला हसायला सांगितलं आणि दोघांचे बरेच फोटो काढलेत.फोटो काढून झाल्यावर ती दोघांना घेऊन गेली.पुन्हा कुटूंबियांच्या आणि पाहुण्यांच्या मेळ्यात ती दोघे सामील झाले..अग्निहोत्रींनी साखरपुड्यात कुठलीही कमतरता ठेवली नव्हती.अगदी दणक्यात साखरपुडा पार पडला होता .सगळी पाहुणे मंडळी खूश होऊन गेले.सगळ्यांचा मानपान करण्यात आला.कार्यक्रम आटोपल्यावर देव कुटूंबियांनी सगळ्यांचा निरोप घेतला..जातांना रघुवीर ही जानकी सोबत बोलून गेला आणि एक छानस गिफ्ट सुद्धा त्याने तिला दिलं..
साखरपुडा तर निर्विघ्नपणे पार पडला होता. आता बघु हे अजब गजब लग्न कसे पार पडते ते..

क्रमशः...