I am a… stone books and stories free download online pdf in Marathi

मी एक… दगड

नमस्कार मंडळी

गोष्ट तशी काल्पनिक आहे पण मनातल्या गाभाऱ्यातून आलेला आवाज कुठेतरी कागदावर मांडता यावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न… 

चंद्रपूर नावाचा एक खेडेगाव होत,  गाव अगदी लहान आणि तिकडे राहणारी लोक तर अगदी साधी, सरळमार्गे व्यवहार करणारी..त्याच गावात एक राजा होता त्याचे नाव चंद्रराज, कदाचित त्याच्याच या नावावरून या गावाला चंद्रपूर हे नाव दिलं असावं..असो

असा हा चंद्रराज राजा फारच धार्मिक आणि सत्कर्म करणारा होता,   त्याच गावाच्या जंगलात एक छोटीशी गुहा होती आणि त्या गुहेत एक साधू महाराज तपश्चर्या करण्यासाठी बसत असत.ती गुहा म्हणजे त्याचं घरच जणू .ही गुहा जंगलात असल्याकारणाने सहसा गावातील लोक तिकडे फिरत नसत.

साधु महाराज हे नेहमी त्या जंगलात आणि निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत करत होते. 

त्याच्या गुहेच्या तोंडा जवळ एक भला मोठा दगड , साधारण वीस फूट उंचीचा आणि दहा ते पंधरा फूट रुंद असा होता.एवढ्या मोठ्या वजनाचा आणि आकाराचा दगड खर तर काहीच उपयोगाचा नव्हता.

एक दिवस चंद्रराज राजाला स्वप्नातृ दृष्टांत मिळाला,  या गावात एक शंकराच मंदिर बांधण्यात यावं आणि हे मंदिर बांधत असताना या मंदिराच कळस बनवण्यासाठी जंगला जवळच्या गुहेजवळ जो मोठा दगड आहे त्याचा वापर करून त्या मंदिराचा कळस उभारण्यात यावा.

स्वप्नावस्थेतून जागे झाल्यावर राजाने ताबडतोब सभा बोलावली ,  मंदिर बनवण्याचा आराखडा तयार केला पण मंदिराचा कळस बनवण्यासाठी लागणारा तो दगड कसा आणायचा याचा विचार राजाला पडला.या समस्येच समाधान मिळवण्यासाठी राजा स्वतः त्या गुहे जवळ  गेला.

तिकडे राहत असलेल्या साधू महाराजांना प्रणाम करता झाला. स्वप्नातला दृष्टांत आणि त्याला पडलेल्या समस्येचे निवारण कसं करता येईल या आशेने त्या साधू महाराजांकडे विचारणा करू लागला , राजाचे सर्व बोलणे ऐकून झाल्यावर साधु महाराज स्मितहास्य करत म्हणाले तुम्हाला जर एवढा मोठा दगड हलवून गावात घेऊन जाणे शक्य नसेल तर याचे दोन भाग करा,  एक भाग तुम्ही  कळस बनवण्याकरता वापरा आणि उरलेला अर्धा भाग मला ठेवा मी बघीन त्याचं काय करायचं.

राजाला आणि तेथील गावकऱ्यांना युक्ती आवडली त्यांनी लगेच त्या दगडाचे दोन समान भाग केले, एक भाग राजा स्वतःबरोबर घेऊन गेला आणि दुसरा भाग साधूने आपल्याजवळ ठेवला.

ठरल्याप्रमाणे राजाने मंदिराचे बांधकाम जोरात सुरू केले,  देश-विदेशातून काही कारागीर बोलावून त्या दगडाला योग्य तो आकार देऊन त्याचा कळस तयार केला. कळसासोबतच मंदिराच्या इतर  आवाराचे काम सुद्धा जोमाने चालू झाले.आता काही दिवसातच मंदिरावर तो कळस चढवून मंदिराचे कार्य पूर्ण होणार होते .

तोच एका रात्री साधू महाराज आपली नित्य साधना  पूर्ण करून आपल्या गुहेत प्रवेश करणार,   इतक्यात एक आवाज आला…. काय साधु महाराज कसे आहात?

अर्थात साधू महाराज तपस्वी असल्याकारणाने ते त्या आवाजाला अजिबात घाबरले नाही, उलट त्या आवाजाला प्रतिसाद देऊन म्हणाले मी ठीक आहे तू कसा आहेस ते सांग?

पुन्हा आवाज आला मी काय आधी होतो तसाच आहे .. निरोपयोगी… वर्षानुवर्ष एका जागी पडलेला.. पण आमच्याकडे बघतो कोण.. माझ्या शरीराचा अर्धा भाग कापून तुम्ही त्या राजाला दिला.. नशिबाने त्या माझ्या अंगाला मंदिराचा कळस होण्याच भाग्य लाभल, आणि माझं नशीब आहे तिथेच आहे… एका दगडाचे असे दोन भिन्न नशीब असू शकतात त्याची प्रचिती आज मला येत आहे…. दगड म्हणून जरी या पृथ्वीवर माझं अस्तित्व असलं तरी माझं एक नशीब मंदिराच्या कळसावर फडकणार आहे आणि दुसरे इथेच या जागी… या जंगलात… आहे त्या परिस्थितीत….

त्या दगडाचे सर्व दुःख ऐकून घेतल्यावर साधु महाराज स्म्हणाले… विश्वास ठेव ,  या विश्वात तुझ अस्तित्व आहे म्हणजे नियतीने तुझ्यासाठी काहीतरी कार्य नियोजित करून ठेवल असणार पण गरज आहे ती योग्य वेळेची.. योग्य वेळ आली की तुझ अस्तित्व सुद्धा सत्कारणी ठरेल याची खात्री मी तुला देतो.असं बोलून तो साधू महाराज आपल्या गुहेत निघून गेला.

काही दिवस लोटून गेल्यावर राजाची माणसे पुन्हा त्या  साधूकडे आली आणि सांगू लागली की मंदिर, मंदिराच कळस, गाभारा सर्व काही बांधून तयार आहे , बाकी आहे ते फक्त मंदिराच्या पायऱ्या आणि गाभाऱ्याचा उंबरठा आणि ते बांधकाम पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा काही दगडांची गरज आहे म्हणून हा उरलेला अर्धा दगड आम्ही घेऊन जाऊ शकतो का याची विचारणा करण्यासाठी आम्ही आलो आहोत.. निश्चितपणे घेऊन जा… क्षणाचाही विलंब न करता साधू महाराजांनी आपला होकार दिला आणि त्याप्रमाणे सर्व सेवकदरबारी तो उरलेला दगडाचा दुसरा भाग घेऊन आले. त्या दगडापासून त्यांनी त्या मंदिराच्या पायऱ्या आणि मुख्य गाभाऱ्याचा उंबरठा तयार केला,  आणि अशा प्रकारे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

चार दिवसानंतर एका शुभ मुहूर्तावर मंदिराचा वर्धापन दिन त्या साधू महाराजांच्या हस्ते करण्याचे, सर्व गावकऱ्यांनी आणि राजाने ठरवलं. वर्धापनाच्या आदल्या रात्री सर्व गाव झोपेत असताना साधू महाराज त्या मंदिराजवळ आले आणि त्या दगडू रुपी पायऱ्यांशी संवाद साधू लागले…. काय म्हटलं होतं ना तुला योग्य वेळ आली की तुझ्या जीवनाचे सुद्धा सार्थक होणार…. तुझा देह पण सत्कर्मी लागणार… आता तरी खुश आहेस ना??

असा प्रश्न  येताच,  पुन्हा एकदा रडक्या सुरात तो दगड म्हणजेच पायऱ्या साधू सोबत प्रतिसंवाद करू लागला म्हणू लागला पायऱ्या  बनणं हे काय सत्कर्म आणि भाग्य आहे का?

तो कळस बघा कसा दिमाखात चकाकतो आहे आणि तोही सर्वात उंचीवर… मंदिराच्या अगदी वर.. त्याची तुरा फडकवत आहे आणि मी  इथे जमिनीवरच पायरी बनून राहणार… उद्यापासून लोक माझ्या अंगावर पाय देत चालत राहणार… म्हणजे आधी माझी परिस्थिती होती त्यापेक्षा आणखीनच बिकट आणि कष्टदायक अवस्था होणार… हे कसले असले नशीब??

“नशीब” हा शब्द ऐकल्यावर  साधूने पुन्हा स्मित हास्य केल,  त्या पायरी जवळ येऊन बसले आणि  म्हणाले अरे वेड्या तुला अजूनही समजत नाही का तुझ्यासारखं नशीबवान या मंदिरात दुसरं कोणीच नाही.

जे स्थान तुला मिळालेल आहे त्यासारखं सत्कर्म कुठलंच नाही…. तो दगड म्हणजेच पायरी म्हणाला,  नाही मला यातलं काही दिसत नाही किंवा जाणवतही नाही तुम्हीच काय ते फोड करून सांगा….

त्यावर साधू महाराज म्हणाले  हे बघ एक तर तुझा वापर मंदिराचा कळस बनवण्यासाठी न होता पायऱ्या म्हणून केला तर यात तुला संकोच आणि कमीपणा वाटतो असं जर असेल तर दुसऱ् दुर्भाग्य नाही …

आता बघ तुझा उपयोग लोक ज्पायऱ्या म्हणून करतील , याचा अर्थ मंदिरात येणाऱ्या त्या प्रत्येक जीवाला,  त्याचा भार तुझ्यावर वाहून घेऊन ,  त्यांना  पुढे  परमेश्वरा समोर सोडण्याचं काम आता तुझ आहे.
तुझी पायरी चढल्याशिवाय प्रत्येक मनुष्य त्या देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्या परमेश्वराला पाहू शकत नाही
तुझ्या अंगावर पाय देऊन जरी लोक चालत असतील तरी त्या परमेश्वराला हात जोडण्याआधी त्याचा पहिला नमस्कार हा तुझ्या पायरीला स्पर्श करूनच होईल 
मंदिरात येणारा प्रत्येक भाविक देवापुढे उभा राहण्याआधी आणि देवाकडे पाठ फिरवताना तुझा पायरीवर डोकं ठेवून मगच पुढे जाईल असं होत असताना तुझ महत्त्व त्या मंदिरातल्या मूर्ती पेक्षा कमी का असेल??
मंदिराच्या कळसाला हात लावताना किंवा तिकडे डोकं टेकवताना किती लोकांना तू बघितल आहेस? पण हे भाग्य तुझ्या वाट्याला आले आहे हे विसरू नकोस.

 तसंच तुला मिळालेले स्थान म्हणजे अगदी देवासमोर… त्यांच्या डोळ्यासमोर… आणि त्यांच्या चरणांजवळ… त्यामुळे गाभारा उघडल्यावर त्या परमेश्वर रुपी मूर्तीची पहिली नजर ही तुझ्यावरच पडेल… त्याच्या डोक्यावर बसलेल्या कळसाकडे नाही….
महाभारतातला प्रसंग आठवतो का तुला…  एक दिवस भगवान श्रीकृष्ण निद्रेत असताना त्यांचा परमभक्त अर्जुन आणि कपट बुद्धी दुर्योधन जेव्हा एकत्र भेटायला गेले तेव्हा दोघेजण श्रीकृष्ण केव्हा जागे होतील या प्रतीक्षेत होते… पण ही प्रतीक्षा करत असताना गर्विष्ठ दुर्योधन कृष्णाच्या डोक्याजवळ उभा होता तर अर्जुन त्याच्या चरणांजवळ आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी जेव्हा दृष्टीपट्टल उघडले तेव्हा त्यांची पहिली नजर अर्जुनाकडे गेली कारण तो त्यांचा खरा भक्त आणि सखा होता.

अर्जुनानंतर, दुर्योधन सुद्धा आपल्या जवळ, पण डोक्याशी उभा आहे याची जाणीव श्रीकृष्णाला नंतर झाली …म्हणून तुला मिळालेली ही जागा  कळसासारखी जरी उंचीवर नसली तरी तुझं स्थान हे परमेश्वराच्या नजरेत कायम उंचीवर असणार हे लक्षात ठेव.

 या परमेश्वराच्या मूर्तीवर होणाऱ्या अभिषेकाचे पाणी,  पंचामृत हे तुझ्यावरून वाहणार आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेस महाभिषेक त्या मूर्तीवर होईल त्या अभिषेकाच्या तीर्थाने तू सुद्धा रोजच्या रोज शुद्ध होऊन तृप्त होणार आहे ….मंदिराच्या कळसाचा अभिषेक होताना तू कधी पाहिल आहेस का  किंवा ऐकल आहेस का? नाही ना… पण तुझ्यावर अभिषेकाचा वर्षाव आता रोज होणार आहे तर या सर्व क्षणाचा आनंद घेण्यासाठी  तू आता तयार रहा…

मंदिराचे सौंदर्य वाढवण्यासाठी,  त्याचे पावित्र्य तेजोमय करण्यासाठी तुझ्यावर रोज फुलांच्या रांगोळ्या आखल्या जातील,  दीपप्रज्वलित  केले जातील… आणि हे सर्व झाल्यावर तुझं रूप …तुझं अस्तित्व अजूनच न्याहाळून निघणार आहे याची तुला कल्पना देखील नाही.

तुला हे सर्व खुलासा करून सांगायचं तात्पर्य एकच,  की कळस म्हणून… उंचीवर राहून मनात गर्व करण्यापेक्षा … नम्र राहून.. परमेश्वराच्या नजरेसमोर राहशील तर खूप आनंदी राहशील… आणि जसं तू म्हणालास तसं…. हो एका दगडाचे दोन वेगवेगळे नशीब असू शकतात आणि त्याचंच उदाहरण आज तुला तुझ्या डोळ्यांपुढे आहे…. आता तूच ठरव तुला मिळालेले स्थान हे खरं लाखमोलाच आहे की कळसाच?? उद्या भेटू….आपण 

ही कल्पनेतील गोष्ट खरं तर खऱ्या आयुष्यात मला सुद्धा बरच काही शिकवून गेली आणि ती शिकवण म्हणजे ..

दगडासारख्या एका निर्जीव वस्तूला सुद्धा नियतीने त्काही कार्य नेमून दिलेल असेल तर आपण तर जिवंत माणसे आहोत.. आपल्याला मिळालेला हा मनुष्यजन्म हे काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिळालेला आहे आणि ते उद्दिष्ट काय आहे याचा शोध घेऊन आपण आपले कार्य, कर्म करत राहिले पाहिजे.

आपल्याला मिळालेले आयुष्य हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नसून तर हा देह दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी सुद्धा  झिजवला पाहिजे हे मात्र नक्की [अगदी त्या मंदिरातल्या पायरी सारखा]

जन्माला येऊन काही साध्य करायचे असेल तर पायरी बनून दुसऱ्यांना पुढे मार्ग दाखवण्याचं काम आपण नक्की केलं पाहिजे 

कोणावरही कोणत्याही प्रकारचे उपकार करून त्याच्या डोक्यावर आपल्या गर्वाचा कळस मिरवण्यापेक्षा , आपल्या हाताने घडत असलेल् प्रत्येक कार्य हे त्या परमेश्वराने नेमून दिलेली  ड्युटी आहे आणि आपण फक्त निमित्त मात्र आहोत हा भाव ठेवणे फार गरजेचे आहे

आपली सध्य परिस्थिती कशीही असो ,  आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे या गोष्टीचा सकारात्मक विचार करून आयुष्य जगले तर ते जास्त सोपे आणि सोयीस्कर होऊन जाते 

दगडाला जेव्हा आकार नसतो तेव्हा सर्वजण त्याला पायदळी तुडवतात..त्याची किंमत शून्य असते.. पण त्या दगडाने जर मूर्तीचा आकार घेतला  तर त्याच दगडापुढे मनुष्यप्राणी नतमस्तक होतात,…. त्याच मूर्ती पुढे लाखो रुपये दान करतात , पण खरंतर त्या दगडासाठी त्याचे मूळ अस्तित्व हे  बदललेले नसते …  बदलतो तो फक्त त्याचा आकार आणि पाहणाऱ्याच्या दृष्टिकोन. 

विश्वात निरुपयोगी असे काहीच नसते प्रत्येक गोष्ट ही निसर्गाने कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तरी निर्माण केलेली असते मग ती सजीव असो वा निर्जीव… योग्य वेळ आली की त्याचा उलगडा कायम  होत राहिला आहे आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात येत असलेली प्रत्येक गोष्ट , प्रत्येक व्यक्ती , प्रत्येक घटना  याचा मनापासून आदर करा आणि स्वीकार करा ..

कुणास ठाऊक…. कोण….कधी….. कोणासाठी…. कसे…. उपयोगी ठरू शकेल.. 

एक आवाज अंतर्मनातला

Tushar K

इतर रसदार पर्याय