perjagadh - 24 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - २४

२४)काही प्रमाणात नक्षाचा खुलासा....


अलगद बॅगेला बाजूला ठेवून रितू माझ्या शेजारी बसली.आई घरी नुकतीच जाण्यासाठी वाट बघत बसली होती.आणि तिला बघताच तिचीही चिंता मिटल्यागत झाली होती.डॉक्टरने सांगितलेल्या काही सूचना समजावून शेवटी आई तिथून निघून गेली.आणि एकटी रितू परत मला बघत माझ्यापाशी येऊन बसली.

केव्हा उघडशील रे डोळे?तिच्या मनात असलेला सततचा प्रश्न अलगद चेहऱ्यावर वाचून घेता येईल, अशा पद्धतीने प्रगट होत होता.आणि डोळ्यात आसुसलेल्या प्रेमाची धगधगलेली प्रीती ओसंडून वाहत होती.अगदी हात धरून मला उठवण्यासाठी तिचे हात तरसत होते.आणि हात हातात घेऊन तो निर्जीव असल्यागत झालेला स्पर्श स्वतःच्या मनाला सांत्वनत होती. तिचं प्रेम अजूनही जिवंत आहे याची साक्ष करून घेत होती.कारण तिला आता रहस्य उलगडायचे होते... मला कसंही करून मिळवायचे होतं.मनात प्रश्नाचं विचारचक्र ठेवून कितीतरी वेळ अशी माझ्याजवळ ओसंडून वाहत होती.

मग क्षणात एक कसलासा विचार तिच्या मनात जागा झाला.दोन्ही डोळ्यांतले अश्रू पुसून स्वतःला खिडकीत असलेल्या काचेमध्ये बघितले.रडती मुद्रा कठोर भावनेच्या स्वरूपात बदलवली.कारण ती समजून घेत होती की असं हरून चालणार नव्हतं.त्यासाठी स्वतःच स्वतःचा आधार बनायला पाहिजे.कुठपर्यंत अशी रडत बसणार?कारण त्याने काहीच साध्य होणार नाही.जर मिळवायचेच असेल तर मृत्यूच्या मागील कारण मिळवायला हवे.जे तिच्यापासून तिचे सर्वस्व ओढून नेत होते. तिचं प्रेम, तिचं जिवन सगळंच तिच्यापासून हिरावून नेत होते.आता हे थांबवायला हवं..अगदी संपायला हवं...मला परतायला हवं...

एकतर्फी जिद्दीने तिच्या डोळ्यात अधाशी झाक आली.आणि तिने वळून माझ्या बॅगेपाशी बघितले. तसं तिच्याशिवाय त्या खोलीत येणारे फारसे कुणी नव्हते.त्यामुळे तिने अलगद ती बॅग खोलली.आणि एक एक रकाना ती खोलून पाहू लागली. हेड फोन, पॉवर बँक काय ती सेल्फी स्टिक तिथे ठेवली होती.आणि परत खोलात बघितलं तर तो लॉकेट मिळाला ज्यावर तिचं आणि माझं नाव एका तांदळाच्या दाण्यावर लिहिलं होतं.जे माझ्या प्रेमाचं पाहिलं देणं होतं.

अलगद हातात लॉकेट घेऊन डोळ्यासमोर तिने तो लॉकेट पकडला.आणि काही क्षणचित्रे तिच्यासमोर रेंगाळू लागली.आणि आठवणी त्यांना उफानुन भूतकाळात नेऊ लागल्या.

त्या दिवशी कसल्याशा गोष्टीवरून आमचा वाद चालला होता.त्या दिवशी आम्ही रोजच्यासारखे भेटले होतो.सांगितल्यानुसार कित्येकदा आम्ही भेटायचो.पण म्हणतात ना मुलींची काहीतरी वेगळीच अट असते.तशीच तिचीही होती.बालपणापासून असे आम्ही एकमेकांना बघत आलो होतो.ज्यामुळे प्रेम होण्यासाठी अशी नजरेची गरजच पडली नाही.फक्त असायचा तो निष्काम सहवास.कधी दैनंदिनी व्यवहारा मार्फत बोलणे तर कधी परीक्षेच्या पेपर मार्फत बोलणे.आणि पूर्वापार सतत ओघात आलं ते बोलून देणे, असल्यामुळे तेव्हा प्रेमाची फिलिंग मांडणे हे जरा अवघडच वाटायचे.

तसं पहिल्यांदा मला ती कॉलेजच्या ग्यादरींगलाच आवडली होती.मोकळे केस,ओठावर पुसटशी लाली,डोळ्यांभोवती इवल्याश्या काजळाचे रेघ.आणि खरं म्हणजे ती साडीवर इतकी शोभून दिसत होती, की ती जेव्हा माझ्याकडे नजर रोखून बघायची.मी अलगद नजर तोडून इकडे तिकडे बघू लागायचो.तिला कळायचे सुद्धा नाही..काय चाललय ते.पण म्हणतात ना तारुण्याच्या उंबरठ्यावर येताना प्रत्येकालाच त्याची प्रचिती असते.आणि निदान त्या वेळेस तरी ती माझी फक्त आवड होती.

आमचा मुलांचा एक वेगळाच ग्रुप होता.फक्त बडबोल्या सद्या तेव्हढा आमच्यात जुनाच असायचा.स्टेजवर रितू येताच पब्लिकमध्ये एक जोश आला होता.कारण पहिल्या टॉपरची भूमिका गाजवणारी रितू नसली तरी प्रत्येक वेळा ती काही हटके करायची.संभाषण ती इतक्या शक्तिनिशी करायची की त्याचा प्रभाव अगदी वर्गावर्गात भरून दिसायचा.

कॉलेजच्या जवळचे असल्यामुळे आम्हाला तितकं भय नव्हताच, पण हल्ली कॉलेजमध्ये फार प्रमाणात रॅगिंग व्हायची.आणि रितूने नेमका तोच मुद्दा म्यानेजमेंटच्या समोर मांडला होता.खरंतर तिच्या अस्खलित भाषणावर कितीतरी मुले फिदा व्हायची.त्यातलाच एक उदय.भाषणाला जेव्हा शुरुवात झाली.आमच्या समोरच त्याची टवाळखोरी गॅंग होती.सगळे अगदी मंत्रमुग्धपणाने भाषण ऐकताना, याची मात्र टवाळखोरी चालू...

कसले ते इशारे करणे, फ्लायिंग किस देणे हे सगळं मी बघतच होतो.पण एकाच वेळेस मला काही करायला शोभले नसते.म्हणून मी गुपचूप होऊन बघत होतो.पण जेव्हा त्याने रितुच्या बाबतीत काही घाण शब्द उच्चारले तेव्हा इतका किळस आला मला त्याचा.आणि इतकी घृणा तयार झाली की काय हावी होत आहे माझ्यावर? जे मलाच कळले नाही.आणि मी कसलाही विचार न करता डाव्या हाताने त्याची मानगूट पकडून सरळ मागे खेचत आणले.

सगळे येईपर्यंत त्याला इतकं चोपलं, इतकं धुतलं की पून्ह्यांदा कुणा मुलींचं नाव पण घेणार नाही.पण तो शेवटी टवाळच..त्याला काय सुचणार.उलट मलाच तो म्हणाला..कोण आहे तुझी? प्रेयसी आहे तुझी?अरे तुझ्या मनात काही नाही तर आम्हाला प्रेम करू दे ना,जेव्हा तिला माझ्या विषयी कसलीच तक्रार नाही तर तुला काय प्रोब्लेम आहे.रागाच्या भरात मी त्याला आणखी एक ठेवणार होतो, पण त्याचे बोलणे ऐकून मी आणखी दोन पावले मागे वळलो.

कारण एकंदरीत त्याचंही म्हणणं अगदी बरोबर होतं.एव्हाना सगळे तरुण तरुणी भोवताल जमा झाल्या होत्या.रितू पण काय चाललंय? हे बघण्यासाठी तिथे आली होती.मित्रांनी केव्हाच माझ्याभोवती गराडा टाकून मला खिंचताण करत होते.पण कळत नव्हते त्याच्यावर मी इतका का रागावलो होतो.झालेल्या प्रसंगानंतर मग मी एकांतात असणाऱ्या ग्राऊंडवर चालला गेलो.

"एकटाच तिथे बाकावर बसलेला बसून मागोमाग सगळे मित्रही तिथेच जमा झाले.तेव्हा सद्याच म्हणाला.."

"का यार पवन...काय सॉल्लिड धुतला यार त्याला...पण उगाचच मारलं यार त्याला..."

"अरे पण बघितलं ना तू..काय वात्रटगिरी करत होता तो..तू होतास ना तिथे.."

"अरे मग काय केलं त्याने...काही वेगळं केलं काय?"

"म्हणजे...मी समजलो नाही सद्या...जरा स्पष्ट बोल..उगाच कोड्यात नको बोलू..."

"अरे स्पष्टच बोलत आहे..काय केलं त्याने..?"

"काय केलं म्हणजे...हे सगळं काहीच नव्हतं..मी वेडेपणा केला काय?...विनाकारण चोपला त्याला..."

"हो विनाकारणच चोपला त्याला..."

"सद्या... अती होतंय ह...मित्र म्हणून काहीही ऐकून घेणार नाही तुझं..."

"मग सांग रितुला, त्याने तिला काही म्हणताच तुला त्याच्या बद्दल इतकी घृणा कशी का आली...की भर ग्यादरींगमधून तू त्याचं बखोटा धरून खेचलास.."

"माहीत नाही.."

"अरे कसं समजणार वेड्या तुला..ह्या भावनाच अशा विचित्र असतात..की आपल्या हातून काय कृत्य होतेय याची जराही जाण नसते.कारण त्या बोलायच्या नसतात..आपल्या कृतीतूनच त्या दिसत असतात."

"नेमकं म्हणायचं काय तुला?"

"तू रितुला पसंद करतोस पवन..ती आवडते तुला.."

"काहीपण बोलू नको सद्या...ती फक्त बालपणापासूनची एक मैत्रीण आहे..तिला काय वाटणार हे सगळं ऐकून..."

"इथेच तर चुकतो आहेस मित्रा...कारण ज्या वेळेत तू उदयला त्या पद्धतीने चोपलास ना..तसे कृत्य रितूवर प्रेम करणाराच करू शकतो.आणि उदय तर फक्त बहाणा आहे रे..त्याने कितीही प्रयत्न केले तरी ती त्याला कधीच होकार देणार नाही."

"पण हे.... शिट...नाही सद्या.."

"वाटलंच होतं..पण तुला अजूनही वाटत नसेल तर जाऊन विचार रितूला..."

खरंतर त्याच्याही गोष्टीत तथ्य होतंच.आणि तो चुकीचेही बोलत नव्हता.पण बऱ्याचश्या गोष्टीत बोलताना मला तिच्यासोबत काहीच जाणवत नव्हतं.अगदी समोरासमोर तासनतास बोलायचो.पण जेव्हा प्रेमाच्या बाबतीत काही विचारायचं म्हटलं की जिभेला गोंद लागल्यागत चिकटून राहायची.शब्द असा निघत नव्हता.आणि त्या दिवशीच्या प्रसंगाची कारणेपण रितुला कळलीच होती.त्यामुळे ती पण अशी परस्पर बोलत नव्हती.कारण बहुधा तिलाही माझ्याच तोंडून ऐकायचं असेल.

त्या प्रसंगानंतरही कदाचित एक दीड सप्ताह तरी मी तिच्याशी बोललो नसेल.कारण ती सामोरी आली की हृदयात कसली तरी हालचाल व्हायची. बोलावंसं वाटून सुद्धा हिम्मत व्हायची नाही.त्यामुळे बऱ्यापैकी माझं कुठेच असं लक्ष लागत नव्हतं.त्या दिवशी कॉलेजला येतानाच एक अंगठ्या विकणारा फिरस्थी भेटला.त्याच्याकडे असलेले ते लॉकेट मला फार आवडले होते.आणि मुख्ख्य म्हणजे इवल्याशा तांदळावर तो नाव लिहून एका छोट्याश्या काचेच्या बॉटल मध्ये टाकायचा.जे फार छान वाटायचे.

मी त्याला एका बाजूला माझं नाव आणि दुसऱ्या बाजूला तिचं नाव लिहून मागितलं.आणि आनंदाने शंभर रुपये त्याच्या खिशात कोंबले.आता तिला फक्त द्यायचे कसे? याचा विचार करत मी उभा होतो.कारण कॉलेजला सुट्टी झाल्याशिवाय तिची माझी भेट होणार नव्हती.एरवी मी बोलणं बंद केल्यामुळे ती इतर मुलींसोबत चालली जायची.

सुट्टी झाल्यावर गेटपाशीच मी तिला गाठलं आणि रितू म्हणून हाक मारली.तिने एकवार माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली .."काय झालं? काही महत्त्वाचं आहे का?"

"काय म्हणजे? महत्त्वाचंच बोलायला यायचं तुझ्यापाशी?"

"तसं नव्हे...पण इतक्यात वेळ नव्हती ना बोलायला...म्हणून म्हटलं...?"

"अच्छा... बरं ऐक ना...तुझ्यासाठी काहीतरी आणलय मी..( आणि मी हाताची मुठ तिच्यासमोर उघडली.)"

तिने ते लॉकेट स्वतःच्या हातात घेतले आणि न्याहाळून बघू लागली. त्यातलं ते तांदूळ आणि त्यावर असलेले ते दोघांचे नाव.बहुधा कोणत्या गालावर थापड बसते मी ह्याचाच विचार करत होतो.पण काही क्षणानंतर शेवटी रितूच म्हणाली...आत्ता फक्त हा गिफ्ट देणार आहेस की गळ्यात पण घालणार आहेस.मी अवाकपणे तिच्याकडे बघतच राहिलो.कारण मला असली अपेक्षा नव्हतीच.पण मग तीच म्हणाली..

"किती दिवस झाले ह्या गोष्टीसाठी मी आसुसले होते.पण काय रे? इतका कसा भित्रा तू? नाही तेव्हा बराच काही बरळत असतोस, आणि आता प्रेमाच्या गोष्टी बोलायला भिती वाटतेय हो...घे.."( लॉकेट माझ्या हातात देत.)

"पण का? ..."( थोड्याशा नाराजीने)

अरे लोकं नावे ठेवतात.हे आपल्या प्रेमाची पहिली भेट आहे.ज्या दिवशी मी तुझी होऊन येईन ना, तेव्हा गळ्यात घालून देशील.तोपर्यंत माझी एक आठवण म्हणून कायम जपून ठेव...ठेवशील ना...

"हो..."( आनंदाने)

तेव्हापासूनचा तो लॉकेट आजपर्यंत माझ्याकडे, तिची फक्त एक आठवण म्हणून राहिला होता.आमची पहिली भेट मी इतक्या प्रमाणात जपून ठेवली असेल, असे तिला कधीच वाटले नव्हते.त्या भेटीने आज परत एकदा तिला तिच्या जुन्या आठवणींत नेले होते.

आणि मग परत तिची लक्ष मधल्या खाण्यावर गेली.आणि त्यातलं शिलालेख तिने बाहेर काढलं. त्यावरचं कोड तर तिला माहीतच होतं.कारण सगळ्यात आधी मॅप वर बघताना ती माझ्याच सोबत होती.पण आज जेव्हा तिने हातात ते नक्षाचं शिलापत्र घेतलं होतं.तेव्हा तिला बरेच काही वेगळं दिसत होतं.म्हणजे काहीतरी ती वेगळं बघत होती.जे आधी तिला दिसलं नव्हतं.

मोबाईलचं मॅप ओपन करून ती नक्षात आणि मोबाईलच्या मॅपमध्ये काहीतरी शोधत होती.पण नक्कीच तिथे चाललेली गुंतागुंत ही तिलाही कळत नव्हती.त्यावर असणाऱ्या सगळ्या रेषा मिटल्या होत्या.फक्त त्या कलाकृत्या अगदी स्पष्टपणे तिथे दिसत होत्या.त्यावरून तिला काय तथ्य काढावे काहीच उमगत नव्हते.दोन्ही भुवयांना जवळ करून ती फक्त विचार करत होती.समजून घ्यायचा प्रयत्न करत होती.कधी मोबाईलच्या मॅपमध्ये तर कधी त्या नकाशात.

शेवटी कंटाळून तिने तो नकाशा बॅग मध्ये टाकला आणि मोबाईल बंद करून ती माझ्या जवळ आली.एक प्रेमळ कटाक्ष टाकत माझ्यापाशी खुर्ची लावत ती झोपी गेली.

अचानक कसल्याशा भासाने तिला जाग आली.कुणीतरी तिचं नाव घेऊन ओरडत आहे, असं भास तिला येत होता.तिने तो आवाज ओळखला,कारण तो आवाज माझा होता.आणि तो आवाज येताच खळाळून ती उठली.इकडेतिकडे न बघता समोर पडलेल्या माझ्या देहावर तिची नजर खिळली.पण माझ्यात नसलेला कसलाही बदल ती जाणून घेतच होती.त्यामुळे हा आवाज कुठून येत आहे?याचा विचार करत आजूबाजूला बघत होती.

आवाजही इतक्या सूक्ष्म पद्धतीचा होता.की जेमतेम कानापाशी रेंगाळेल इतकीच त्याची धाव होती.त्यामुळे रितु खोलीतल्या खोलीत इकडेतिकडे हुंदडून बघू लागली.शेवटी शोध न लागल्यावर त्रासून ती आपल्या खुर्चीवर बसली, आणि भास असेल कदाचित म्हणून माझ्याकडे बघू लागली.पण तीचं लक्ष त्या बॅगेकडे गेलं आणि ती आश्चर्यचकित झाली.मघाशी बॅग लावताना तिने चैन अर्धवटच लावली होती.ज्यामुळे तिथून एक लाल रंगाचा प्रकाश पसरला होता.ज्याची किरणे आजूबाजूला पसरत होती.आणि त्या किरणांतूनच तो आवाज अगदी बारीकपणे ऐकायला येत होता.

रितूने ती बॅग उघडली आणि आतल्या रकान्यातून तो नक्षाचा कागद बाहेर काढला.तो सगळा प्रकाश त्या नक्ष्याच्या कागदातून येत होता. नेमकं हे काय आहे म्हणून रितूने तो नक्षा समोर असा पसरवला.त्या प्रकाशाच्या किरणांत प्रत्येक कलाकृती उमेदून दिसत होती.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो प्रकाश त्या प्रत्येक कलाकृती मधून निघत होता.जी जंगलात काही ठराविक भागात बनलेली होती.आणि कसलीशी आकृती नागमोडी स्वरूपात जिकडे तिकडे फिरत होती.जी एक सापासारखी वाटत होती.आणि पेरजागडाच्या पायथ्याशी एक छोटासा गोल होता.ज्यात होणारी हालचाल तिला माझी वाटत होती.तिला येणारा आवाज हा तिथूनच येत असावा असे तिला वाटत होते.हे नक्कीच माझ्या तर्फे तिला येणारे संकेत आहे हे ती ओळखत होती.

काही वेळाने ती सापासारखी सरपटणारी कलाकृती त्या गोलाजवळ आली आणि एक किंकाळी रितुच्या कानात गुंजू लागली.सगळे प्रकाश किरण आपोआप बंद पडले आणि सगळं काही जसे आधी होते तसेच झाले.रितूला कळलंच नाही काय घडत आहे ते?पण माझ्या किंकाळीने तिने नेमकं हे ओळखलं होतं की, आता माझ्या जिवाला फार प्रमाणात धोखा निर्माण झाला आहे.

ती विचार करू लागली, की मी इथे बेडवर पडला असता, माझा आवाज तिथे कसा?काय होतं ते संकेत?आणि आडीमोडी चालणारी ती कलाकृती म्हणजे, नक्की होती तरी काय?आणि अचानक तीच आकृती त्या गोलाजवळ जाताच अचानक हे काय झालं?आणि मग ही किंकाळी...हे नक्की होतं तरी काय? खरंतर रितूसाठी हा फार मोठा संकेत होता.पण रितूला तो कळायला येत नव्हता.कारण मी हरवलो होतो एका अंधाऱ्या विश्वात, ज्यातून माझी सुटका होणे शक्य आहे की अशक्य आहे.हे मलासुद्धा माहीत नव्हते.

कारण ज्या रहस्यासाठी मी पेरजागड गाठलं होतं.प्रत्येक वेळेस मला तो गड तितक्याच कोड्यात नेत होता.ज्या गोष्टींचं मी विचार करायचो.अर्थात श्रध्देचं रूप सत्व.जे आजतागायत अशा गुप्त स्वरूपात असेल म्हणून मला कधीच वाटत नव्हते.पण आज अनुभवांच्या शिखरावर पाऊल ठेवल्यावर विचारांचा कितीतरी मोठा तपशील डोळ्यासमोर होता.आता बघायचंच राहिलं तर स्वतःचं वैयक्तिक एक विचार असतं जे स्वतः पुरताच एक मर्यादित असतं.पण जेव्हा तो घराच्या बाहेर पाऊल टाकतो.त्याच्या भावना उंचावतात.आधी घरासमोरची गल्ली,मग वार्ड,मग गाव मग चाललं विचारांचं शिखर वाढत.

मग कालांतराने जेव्हा आपलं मन मग पृथ्वीच्या बाहेरच्या जगात जातं, तेव्हा भावना शून्य होऊन जातात.ही एक वेगळी गोष्ट आहे की, आपण त्याला कल्पना करतो क्षितिजाची.पण त्या पार जाताना संस्काराची भावना,काळजी ही सूत्रे असतातच काय आपल्या मनात?जसजसे आपण विशाल विश्व वावरत जातो अगदी तसतसे आपल्या विचारधारा बदलतात.जाणीव, भावना संपतात आणि उच्च विचार प्रगटतात.

आता झालेल्या त्या प्रसंगात रितूला काय करावे? हे तर मुळीच कळत नव्हते.पण पेरजागडाच्या पायथ्याशी नक्की काही तरी घडत आहे.हे तिला कळत होते.त्यासाठी सगळ्यात आधी तिने फोन लावला तो राठोडला.अतिशय वेंधळलेल्या परिस्थितीत झोपेतून त्याने फोन उचलला, आणि कोण आहे? असे दरडावत विचारले. ठरल्याप्रमाणे रितुने घडलेला पूर्ण प्रसंग त्यांना सांगितला आणि उद्याबद्दल काय तयारी करायची आहे.याबद्दल पूर्वकृती सांगितली.

रात्रभर रितू त्या बाबतीत विचार करत होती.शेवटच्या सकाळच्या प्रहरेने तिला झोपेच्या डुलक्या येत होत्या.सकाळचे रम्य प्रहरी थोडीशी झोप घेत तिने डोळे उघडले.रोजच्यासारखी सिस्टर येऊन तपासणी करू लागली.सगळं काही जसेच्या तसे बघुन रिपोर्ट करून चालली गेली.कारण त्या दिवशीच्या ताबिजमुळे मृत्यू माझ्यावर हावी होत नव्हता.हे आदल्या रात्रीच तिने ओळखलं होतं.त्यामुळे आता तिला भय नव्हता.भय होताच तर आता फक्त माझ्याविषयी असलेल्या रहस्यांचा.

प्रातः विधी उरकून तिने चहाचा घोट घेतलाच होता की तेव्हढ्यात दारावर इन्स्पेक्टर राठोडची मूर्ती तयारच होती.आणि सोबत त्यांचे ते दोन हवालदार.आणि एक अनुभवी तज्ञ ते सोबत घेऊन आले होते.जसं की रितुने त्यांना सांगितलं होतं.तो नक्षा बारकाईने बघत ते तज्ञ म्हणाले...
"हा नक्षा तुम्हाला कुठून मिळाला? आय मीन कुणी दिला?"

"हा नक्षा पवन च्या बॅगेत होता.त्याला हा नक्षा एका इसमाने दिला होता...पंढरपुरात...पण काय झालं?"

हा नक्षा काही साधासुधा नक्षा नाही.ह्यावर बरीच काही प्रतिकृती आहे.आजच्या युगात जी कलाकृती दिसते.त्याला फक्त वैज्ञानिकाच्या मते मानल्या जाते. त्याचंच तथ्य अनुकरून त्यावर विशेषण दिले जाते.पण जगात अध्यात्माची पण काही पाऊलवाट आहे. हल्ली लोकांच्या मते ती लुप्त होत चाललीय.पण खरं तर ती लुप्त झाली नाही.तर स्वतःला अजून संरक्षण करते आहे.

"म्हणजे...मी समजली नाही..."

अहो हे बघा..त्याने बॅगेतून काही पुस्तके काढली.रामायण काळात हे जंगल तेव्हढेच दाट होते जितके की आज आहेत.प्राचीन काळात अशी बरीचशी उदाहरणे आहेत ज्याचं आजही वास्तव्य आहे.म्हणून रामायण काल्पनिक नाही.चौदा वर्षाच्या वनवासात त्यांचा नऊ ते दहा वर्षांचा वनवास मध्यप्रदेश ते छत्तीसगडच्या जंगलात झाला आहे.रामगिरी पर्वत ज्याची आजही मुभा देते. ज्यावेळेस ते या जंगलातून भ्रमंती करीत होते.त्यावेळेस हे जंगल भयानक सर्पांनी भरलेलं होतं.त्यातील भयानक सर्पांचा नायनाट झाला.पण लोकांच्या मते एक साप अजूनही जिवंत आहे.जो कदाचित कोणाला दिसतो.आणि मुख्य म्हणजे इथल्या धनद्रव्याचा रक्षक तोच आहे.

गेली आठ वर्षे मी सुद्धा या जंगला बद्दलच रिसर्च करत आहे.इतरांना वेडा वाटतो.पण जंगलाविषयी बरंच काही माहिती केलं आहे.आधी शिवशंकराचं बऱ्यापैकी वास्तव्य दिसायचं.पण कालांतराने सगळं अर्धाअर्धी झाले. त्याचं डोकं तिकडे,त्रिशूळ इकडे ,आणि शंख बाजूला अशा प्रकारे.पण यातलं रहस्य आजही कुणाला कळलं नाही.

"अच्छा...म्हणजे हे जंगल साधारण जंगल नाही.यात खूप काही अशा गोष्टी आहेत..ज्या दडलेल्या आहेत."

बिलकुल बरोबर... इथं सत्व दडलाय.आणि जो निर्मळ मनाने तिथे गेलाय.त्याला नक्कीच ते मिळाले आहे.कारण जंगल असूनही तिथली शांतता माणसाला अपरिचित करते.त्या जंगलाचे स्वतःचे आगळे वेगळे नियम आहेत हे तुम्हाला माहीतच असेल.पण त्या नियमांना चालवणारे सुद्धा तसेच अज्ञात आहेत.अत्यंत कमी प्रमाणात मृदा आणि जास्त प्रमाणात शीला आहे.जवळपास पाच ते सहा अशी ठिकाणे आहेत.जिथे उंच अशा शिखरावरून पाणी वाहते.आणि तेही बारामाही.

हे असे जंगल आहे.ज्यात रामाचाही वास आहे.आणि पाच पांडवांचाही.ज्यांची गुंफा तुम्ही बघितलेच असेल.सगळ्यांचं अवतारकार्य संपल्यावर चालू झालं हे कलयुग.पण सगळ्यात आधी इथे आदिवासीचे वास्तव्य होते.ज्यांच्या देवता आजही जंगलात कार्यरत आहेत.कालांतराने होत आलेल्या जंगल तोडीमुळे हे भाग इतर जंगलापासून अलग झाले.पण आजही या जंगलाची हिंस्त्रता कमी झाली नाही.

हा नक्षा तुम्हाला त्या जंगलाचं ते रूप दाखवते.तिथे काय चाललंय? कशाचे वास्तव्य आहे? एकप्रकारची शंका उत्पन्न करते.या नक्षाबद्दल बरीच माहिती माझ्या पुस्तकात आहे.( एक पुस्तक रितूच्या हातात देत.)हे वाचून झाल्यावर तुम्हीच समजून घ्याल की काय आहे त्यात?

पवन प्रकरण खूप दिवस झाले.कानी आहे माझ्या.पण मुळात पेरजागडाशी त्याचं काही वास्तव्य असेल असे मला वाटले नव्हते.वर सोशल मीडियात त्याचे इतके तथ्य चालले आहेत की आमच्यासारखे साधे माणसं या दरवाज्यात पण येऊ शकत नाही.पण आत्ता कळलं...निश्चितच मी आपली मदत करेन...

"धन्यवाद..."( रितू हात जोडत सामोरी आली.)

अहो त्याची काही आवश्यकता नाही.माणूस म्हणून माझे पहिले कर्तव्य आहे ते.आधी तुम्ही ती माहिती नीट समजून घ्या.मग वेळ काढून गडावर जाता येईल.आणि काही वाटलेच तर राठोड साहेब आहेतच मला सांगायला.चला येतो मी.आणि इन्स्पेक्टर राठोड व ते प्रसिज्ञ तज्ञ आचार्य राऊत पण निघून गेले.

शेवटी आपला प्रश्न तितक्यावरच थांबला.की शेवटी पवन होता कुठे? काय आहेत या पेरजागडाची रहस्ये?प्रश्न असणारच ना...आणि उत्सुकता पण.पवन सोबत काय झालं असेल?पुढे रितू काय करणार?अशी प्रश्र्ने वारंवार मनात घर करत असतीलच..त्याची उत्तरे लवकरच आपणांस मिळणार...त्यामुळे वाचत रहा.. पेरजागढ एक रहस्य.आणि हो अभिप्राय द्यायला विसरू नका.

आपला
कार्तिक हजारे...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED