Devayani Development and Key - Part 8 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ८

    देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

 

 भाग 8

भाग 7 वरून  पुढे  वाचा ................

“वहिनी चहा आणि पोहे पण करू द्या तिला. आता वधू परीक्षा म्हंटली की चहा पोहे हवेतच न. करू दे की तिला. बघूया तरी काय आणि कसं करते ते.”

“काय भाऊजी तुम्ही पण! मला सगळा  स्वयंपाक येतो. म्हणत असाल तर उद्याच पुरणपोळी करून घालते तुम्हाला.” देवयानीचा जबाब 

विकासनी  तिच्या या उत्तरावर खुश होऊन टाळ्या वाजवल्या.

“बरं चल देवयानी तुला चहा साखरेचे डबे दाखवते.” – अश्विनी 

देवयानीनी चहा चांगलाच केला होता आणि सर्वांनी त्यांची तारीफ पण केली.

पुन्हा गप्पा. मग थोड्या वेळाने अश्विनी वहिनी म्हणाल्या

“देवयानी अग तुझ्या घरचे निघाले असतील ना, बघ न विचारून कुठवर आलेत ते.”

हो, हो आत्ताच करते फोन. असं म्हणून देवयानीने फोन लावला आईला. दोन तीनदा फोन करूनही आईनी उचलला नाही. म्हणून मग बाबांना लावला. त्यांनी पण उत्तर दिलं नाही. देवयानीच्या चेहऱ्यावर काळजी दिसली.

“काय ग काय झालं?” आईनी  विचारलं.

“आई आणि बाबा दोघेही फोन उचलत नाहीये.” – देवयानी 

“अग रेंज नसेल रस्त्यात असतील ना.” – वहिनी

“नाही, रिंग वाजतेय, मी सुरेशला फोन लावते.” – देवयानी काळजीच्या सुरात बोलली.

“सुरेश कोण, तुझा भाऊ का?”- वहिनी 

“हो.” – देवयानी 

देवयानीनी सुरेशला कॉल लावला. त्यांनी उचलला.

“हॅलो” – सुरेश 

“हॅलो, सुरेश कुठवर आला आहात? आणि आई, बाबा माझा फोन का उचलत नाहीयेत?” देवयानीनी विचारलं.

“अग जरा शांत हो. आम्ही अजून निघालो नाहीये, केंव्हा निघू माहीत नाही.”– सुरेश 

“का?” – देवयानी

“आम्ही निघायच्या वेळेसच मावशी आणि काका आले. त्यांना कुठून कळलं देव जाणे, बहुदा आईनेच सांगितलं असेल. आणि मग त्यांनी पुन्हा नागपूरला मुलगी का देता म्हणून आईला रागवायला सुरवात केली. हळू हळू आपले काका जे नागपूरला यायला तयार झाले होते, आणि गाडी पण घेऊन आले होते, ते पण मागे हटले. आता नुसता घोळ चालला आहे.” सुरेशनी अद्ययावत माहिती पुरवली.

“आई आणि बाबा काहीच बोलले नाहीत?” – देवयानी

“आई आणि बाबा कधी या लोकांसमोर बोलतात का? तुला तर माहीत आहे. ते गप्प बसून नुसतं ऐकताहेत. नशीब, अजून कोणाला माहीत नाहीये की तू अगोदरच नागपूरला पोचली आहेस म्हणून. ते कळल्यावर काय रणसंग्राम होईल, त्याची कल्पना सुद्धा करवत नाहीये.” – सुरेश.  

“मग आता?” – देवयानी.

“माहीत नाही. पण मला वाटत की या सगळ्या गोंधळाचा काहीच उपयोग होणार नाहीये कारण तू ऑलरेडी तिथे पोचलीच आहेस. तू तुझा प्रोग्राम ठरल्या प्रमाणे चालू ठेव. हे सगळे लोक गेल्यावर मी बोलेन बाबांशी. ठेवतो आता, नाहीतर मी कुठे गेलो म्हणून ओरडा करतील. बाय” – सुरेशनी फोन ठेवला.

देवयानीचा रडवेला चेहरा बघून सगळे समजले की काहीतरी गडबड झाली आहे. पण कोणीच तिला काही विचारलं नाही. ती शांत झाल्यावर आपणहूनच सांगेल असा विचार करून सर्वच शांत बसले. पण देवयानी एकदम रडायलाच लागली. यमुना बाई लगेच उठून तिच्या जवळ गेल्या. तिच्या पाठी वरून हलका हात फिरवत त्या म्हणाल्या

“हे बघ तुला फोन वर काय ऐकायला मिळालं ते काही मला माहीत नाही. पण त्यांच्या इथे येण्याच्या प्रोग्राम मधे बदल झालेला आहे असं वाटतंय. जे काही असेल ते जर आम्हाला सांगण्यासारखं असेल तर सांग, कारण सांगितल्यामुळे तुझ्यावरचा ताण  थोडा कमी होईल. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत, चिंता करू नको.”

हे ऐकल्यावर देवयांनीला पुन्हा हुंदका फुटला. कोणालाच कळत नव्हत की काय झालं असेल, आणि आता आपण काय करायचं आहे ते. सगळे एकदम गप्पच बसले. थोड्या वेळाने तीच  सावरली. मग मनीषा ने तिला पाणी दिलं. त्यानंतर ती जरा शांत झाली.

“काय झालं बाळ, सांगतेस का आम्हाला?” – यमुनाबाई

“माझे काका, काकू, आई, बाबा आणि सुरेश आणि माझा चुलत भाऊ विश्राम नागपूरला काकांच्याच इनोवा मधून यायला निघाले होते. ते लोक गाडीत बसतच होते, तेवढ्यात मावशी आणि तिचे  मिस्टर पोचले. आमच्या  मावशीचा या लग्नाला पहिल्यापासूनच खूप विरोध होता. तिने सगळ्यांचं ब्रेन वॉशिंग केलं. आणि आता त्यामुळे काका पण फिरले. आता ते सगळे मिळून आई बाबांना रागवत आहेत. आई पण लहान आणि बाबा पण, त्यामुळे ते नेहमीच ऐकून घेतात. ते कधी कोणाला उलटून बोलल्याचं आठवत नाही. त्यामुळे आमचे सर्वच नातेवाईक त्याचा गैर फायदा घेतात.” देवयानीनी रडवेल्या सुरात सांगितलं.

“मग आता ?” वहिनींनी विचारलं

“मला काहीच समजत नाहीये. मी काय करू?” आणि देवयानी पुन्हा रडायला लागली.

तिला शांत करण्यात पुन्हा पंधरा वीस मिनिटं गेली. मग बाबांनीच बोलायला सुरवात केली.

“देवयानी, हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. कुठे बेळगाव आणि कुठे नागपूर! अग हे अपेक्षित जरी नसलं तरी असं होऊ शकतं याची कल्पना होती आम्हाला. पण आज सकाळी तू आल्यावर असं वाटलं होतं की आभाळ स्वच्छ झालं आहे. पण असं दिसतंय की थोडं मळभ आलेलं आहे. पण तू काळजी करू नकोस. ज्या अर्थी तुझ्या बाबांनी तुला इथे यायची परवानगी दिली त्या अर्थी हे मळभ लवकरच निघून जाईल याची खात्री बाळग. आज संध्याकाळी मी स्वत: त्यांच्याशी बोलेन. तू काळजी मनातून काढून टाक  आणि इथला वेळ आनंदात घालव. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत”

हे ऐकल्यावर देवयानी हळू हळू पूर्व पदावर आली. आणि पुन्हा सगळं वातावरण हास्य, विनोदाने भरून गेलं. चेष्टा मस्करीला जसा काही उत आला होता. देवयानीला हे वातावरण नवीन होतं. पण तिला हा सगळ्यांचा मोकळेपणा आवडला. तसं तिने बोलून पण दाखवलं. त्यावर आई लगेच म्हणाल्या

“तू इतकं सहजतेने घेऊ नकोस. आत्ता विकास, अश्विनी आणि मनीषा या टार्गेट आहेत. तू नवीन आहेस म्हणून तुला सूट आहे असं दिसतंय पण दोन दिवस जाऊ देत मग तुझी पिसं काढतील हे लोकं, तेंव्हा रडू नकोस म्हणजे झालं.” विकासची आई म्हणाली.

“मला हे सगळं नवीन आहे पण मला आवडलं हे घर. इथे मोकळे पणा आहे. आमच्या घरी सगळे जमले की वातावरण जरा गंभीरच असतं.” देवयानी म्हणाली.

“का ग?” अंकुश म्हणाला, “तुमच्या घरी हास्य विनोदाला बंदी आहे का?”

“नाही तसं नाही, पण जेंव्हा सगळे जमतात तेंव्हा आई आणि बाबा त्यांच्या सरबराईतच गुंतलेले असतात. आणि मोठे असल्याने सगळे आई, बाबांना सतत उपदेशाचे डोस पाजत असतात. तिथे गंमतीला  वावच नसतो. ते बोलत असतात आणि आम्ही ऐकण्याचं काम करत असतो.” देवयानी म्हणाली.

भैय्याच बोलला, “अग चिंता करू नकोस. आमच्या सहवासात आल्यावर कोणी गंभीर राहुच शकत नाही. कठीण प्रसंगात सुद्धा आम्ही कधी  हसणं विसरत नाही. रडून कुठल्याही गोष्टीचं सोल्यूशन मिळत नाही हेच आम्हाला आमच्या बाबांनी शिकवलं आहे. आणि ते खरं आहे. बघ आज दुपारी बाबा तुझ्या बाबांशी बोलतील आणि तुझ्या डोक्यावरचं टेंशन उतरेल असं मी खात्रीने  सांगू शकतो.”

दुपारी चहा झाल्यावर भगवानरावांनी देवयांनीला म्हंटलं की “जरा सुरेशला फोन लावून काय परिस्थिती आहे त्याचा अंदाज घे. म्हणजे केंव्हा बोलायचं आणि कसा  विषय काढायचा ते ठरवू.”

देवयांनीला पण ते पटलं. तिने फोन लावला.

“हॅलो, सुरेश काय म्हणतोस? काय परिस्थिती आहे तिकडे?”

काही विचारू नकोस. पण आधी सांग की तिकडे कसं आहे? तू कसं काय चाललं आहे, ठीक आहेस ना?” – सुरेश

“अरे मस्त. मला खूप छान वाटतंय इथे. सगळी  मोकळ्या मनाची माणसं आहेत. आणि अरे कसला आग्रह करतात हे लोकं! जेवायच्या वेळेस याचा अनुभव आला. सगळे प्रेमळ आहेत. म्हणजे फक्त माझ्याच बरोबर नाहीत, तर सगळ्यांचेच आपसात तसेच संबंध आहेत. मघाशी तुझा फोन आल्यावर मला रडायला आलं पण आईंनी आणि वहिनींनी मला खूप धीर दिला. मग बरं वाटलं. सगळ्यांनीच मला समजून घेतलं. फार प्रेमळ माणसं आहेत, मी नक्कीच इथे सुखात राहीन यांचा विश्वास वाटतो आहे.” देवयानी खुशीत म्हणाली.

“हे मात्र छान झालं. नाही तर कठीणच होतं” – सुरेश 

“काय कठीण होतं.?” – देवयानी

“अग म्हणजे  दोन्ही कडे गोंधळाची परिस्थिती असती तर कठीण होतं. आता तुझी बाजू पक्की आहे, म्हंटल्यांवर एकाच आघाडी वर लढायचं आहे, एवढंच.” – सुरेश 

“अरे नक्की काय झालं आहे, तिथे हे तरी  सांगशील का?” – देवयानी 

काय सांगायचं? मावशी आणि काका दोघंही घरून ठरवूनच आले होते बहुधा. बोल बोल बोलले ते आईला. पुन्हा तेच, नागपूर सारख्या गाव खेड्यात मुलगी देतांना काहीच कसं वाटलं नाही, काळीज कसं तुटलं नाही वगैरे. हळू हळू मग आपले काका काकू पण उलटले. त्यांनी पण मावशीचीच बाजू उचलून धरली. मी आणि विश्राम ने मध्येच बोलायचा  प्रयत्न केला पण काकांनी आम्हाला असं  काही झापलं की ज्याचं नाव ते. मग आम्ही पण गप्प बसलो. आत्ता अर्ध्या तासांपूर्वी सगळे पांगले. आई तेंव्हा पासून रडते आहे. बाबाही काही बोलत नाहीयेत.” सुरेशनी डीटेल मधे सांगितलं.

“इथे विकासचे बाबा विचारत होते की आपले बाबा बोलण्याच्या मनस्थितीत आहेत का ? म्हणाले की जे काही गैरसमज असतील ते दूर करू म्हणून.”- देवयानी 

“अग ते तर मी ही करू शकतो. पण कोणी बोलायला तर पाहिजे.” – सुरेश 

“मग आता? मी नागपूरला आहे हे त्या लोकांना माहीत आहे का?” – देवयानी

“नाही तू नागपूरला गेली आहेस हे कोणालाच माहीत नाही. मी असं करू का, बाबांनाच विचारतो की ते बोलायला तयार आहेत का म्हणून. आणि तुला सांगतो.

बरं. बाय.” – सुरेश

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

                                                

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED