Mahashivratra books and stories free download online pdf in Marathi

महाशिवरात्र

आजचा दिवस वेगळाच होता. आनंदराव धर्माधिकारी आज बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या मिटींगसाठी निघाले होते. त्याचवेळी सुमनचीही लगबग सुरु झाली.घरातल्या कामवाल्या बाईला सूचना देऊन सुमन आवरून निघाली. सासूबाईंना माहिती होतं की तिच्या मैत्रिणींबरोबर ती आज एका दिवसाच्या सहलीला चालली होती.उद्या येते सासूबाई संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. हे ही घरात नाहीत आणि अर्णवही गेला आहे ट्रेकला.सांभाळून रहा.नम्रता.. आपल्या गंगाबाईंची मुलगी येईल संध्याकाळी तुम्हाला सोबत.सकाळी जाईल उठून लवकर.काही हवं नको ते तिलाच सांगा.
अगं हो सूनबाई,नको इतकी काळजी करूस.
ड्रायव्हर गाडी घेऊन तयारच होता दारात.आनंदरावांनी आज त्याला सांगितलं की तू आज जा घरी परत.आज अनेक दिवसांनी स्वतः गाडी चालवण्याची इच्छा आहे माझी. आनंदराव स्वतः चालकाच्या खुर्चीत बसले आणि त्यांनीच आज ड्रायव्हरला चौकात सोडलं.
सुमन रीक्षात बसली आणि फोन वाजला.
हो निघाले आहे.पोचते एक दहा मिनीटात. 
सुमन रीक्षातून उतरली आणि चौकात आनंदरावांच्या गाडीत बसली. दोघांनी एकमेकांकडे पाहून एक हास्य उमटवलं प्रसन्नतेचं.
गाडी सुरु झाली.
दोघंही काहीही न बोलता समोर धावणार्‍या रस्त्याकडे पाहत होते. 
आज  महाशिवरात्र... पण तिचं काय महत्व?
तीस वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या संध्याकाळी आनंदने सुमनला आपल्या प्रेमाची कबुली दिली. सुमन गोंधळली पण सुखावलीही. घरी जाऊन तात्यांशी बोलण्याचं धाडस मात्र तिच्यात नव्हतं.
आनंद एक दिवस घरी आला,कर्मठ आणि काहीशा बेदरकार असलेल्या सुमनच्या वडिलांकडे त्याने लग्नाचा विषय काढला...
आम्हाला आमची मुलगी गळ्यातली धोंड नाही झालेली बरं.आणि आम्ही जातीचे पक्के खानदानी आहोत. त्यामुळे आमच्याच भावकीत स्थळ शोधणार.दुसरीकडे नाही द्यायची हो मुलगी आम्हाला....
सुमन प्रतिकार करू शकली नाही.आईनेही तिला पाठिंबा दिला नाही.पळून जावं का असा विचारही मनात आला दोघांच्या... पण भावकीतली मंडळी सुखाने जगू देणार नाहीत याची कल्पना होतीच तिला.
शेवटी व्हायचं तेच झालं... सुमनने आपल्या प्रेमाला तिलांजली दिली.
आनंदचा नाईलाज झाला. रडून रडून सुमन थकली.निराशेच्या छायेत आनंद कासावीस झाला.
एका मुहूर्तावर सुमनचं लग्न झालं.भल्या माणसाचं दान ओंजळीत पडलं. पण ती मनाने त्याच्याशी जोडली नाही जाऊ शकली. सर्वांशी जुळवून घेत आपल्या नवर्‍याला तक्रारीला जागा न ठेवता संसार करत राहिली.त्याला पुसटशी कल्पनाही नाही आली सुमनच्या भूतकाळाची.
पंधरा वर्ष उलटून गेली.आनंदची आठवणच मनात उरली होती.पण थांगपत्ता नव्हता. शोधलं तिने पण सापडला नाही.
घरात थोडी अडचण आली म्हणून कर्ज काढावं लागलं.नवर्‍याबरोबर बँकेच्या मॅनेजरला भेटायला गेली.... आनंदराव धर्माधिकारी...
कसं थोपवावं हे मनातलं वादळ दोघांनाही समजेना...
दोन दिवसांनी आनंदने बँकेत असलेल्या तपशीलावरून तिला फोन केला.एकटीच होती घरात... भरभरून बोलली.
धीर करून भेटलीही एकदा,.. पुलाखालून पाणी गेलं होतं पण प्रेम मात्र आजही अंतर्यामी रूतलं होतं.
मी लग्न नाही केलं.तुला विसरू शकत नाही सुमन मी.तू आनंदी आहेस हे पाहून बरं वाटतय...
मी आनंदात आहे पण माझीही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही आनंद!मात्र वर्तमानाशी सर्वथैव प्रामाणिक आहे मी.
मी बँकेच्या परीक्षा दिल्या. मुंबईत राहिलो.नोकरी केली. बढती होत होत इथे बदली झाली या शाखेचा अधिकारी म्हणून.आई थकली आहे पण माझ्याबरोबरच राहते. बाबा गेले दहा वर्षापूर्वी. मीना सुरतला असते. तिला एक मुलगी आहे.मीनाने बहीण म्हणून प्रयत्न केला माझ्या लग्नासाठी.पण तिलाही माहिती आहेच कारण.
सुमनलाही आता थोडा धीर आला होता संवादातून.
मी लोणावळ्याला एक घर बांधलं आहे.गडी घर सांभाळतो. दर महाशिवरात्रीला तिथे जातो वर्षातून एकदा... तुझी आठवण सांभाळायला.... नंतर मी तिथे फिरकतही नाही वर्षभर...
सुमन आणि आनंदराव गेली दहा वर्ष महाशिवरात्रीला भेटतात.वर्षातून एकदा फक्त आणि फक्त याच दिवशी. मग घरात काही असो किंवा बँकेत. तातडी आली तरीही त्यातून मार्ग काढून भेटतात. सुमनने आजही तिच्या वर्तमानाशी असलेला प्रामाणिकपणा सोडलेला नाही. आनंदरावांनीही तिच्या या भावनांचा आदर केला आहे. वर्षभरात नंतर कधीही भेटत बोलत नाहीत.कोणताही संपर्क नसतो त्यांचा. पण ठरल्याप्रमाणे काहीतरी योजना करून सुमन बाहेर पडतेच शिवरात्रीच्या दिवशी सकाळी... ठरलेल्या जागी भेटून दोघे पुढे जातात...
 मोबाईल फोनची सुविधा आली आहे तेव्हापासून आदल्या दिवशी आणि त्या दिवशी सकाळी फक्त संपर्क करतात एकमेकांना.
वर्षातून एकदाच आपलं प्रेम भरभरून जगतात.  एकमेकांच्या भावनांचा आवडीनिवडीचा आदर करत.,. देवाणघेवाण कशाचीच नाही. फक्त भेटणं आणि त्या आठवणींचं संचित वर्षभर वापरणं पुढच्या शिवरात्रीची वाट पाहत...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED